बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास संपादन

आधुनिक बीड जिल्हयाचा इतिहास मात्र इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोक्त परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो (१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतला. (१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचनेदरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये वेगळी झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम व ब्रिटिश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. पुढील काळात स्वामी रामानंदतीर्थगोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडा मुक्तीसाठी प्रयत्न केले. [१]

आधुनिक बीड जिल्हा संपादन

१९०५ मध्ये केज तालुका रद्द होऊन शेजारच्या अंबा तालुक्याला जोडण्यात आला. अंबाचे पुढे मोमिनाबाद असे नामांतर झाले. नंतर १९४८ पर्यत सरहद्दींमध्ये फेरफार झाले नाहीत. सुमारे एकचतुर्थांश जिल्हा खाजगी जहागिरीत होता. सर्फ-इ-खास ही निजामाची जहागिरी जवळजवळ सध्याच्या पाटोदा तालुक्याएवढी होती. जहागिरी रद्द झाल्यानंतर १९५० मध्ये तालुक्यांची फेरआखणी करण्यात आली. तीत मुख्यत: पाटोदा हा वेगळा महाल वा नंतर तालुका झाला. अहमदनगर जिल्ह्यातील २८ खेडी बीड जिल्ह्यात आली तर पाटोदा-आष्टी तालुक्यातील २१ खेडी अहमदनगर जिल्ह्यात गेली. केज हा पुन्हा वेगळा तालुका झाला. पुढे १९६२ मध्ये मोमिनाबादचे अंबेजोगाई असे नामांतर करण्यात आले.

क्रांतिकारकांचा उठाव संपादन

१८९०मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. या उठावाचा केंद्रबिंदू थिगळे गल्लीतील शिवराम सौंदत्तीकर यांचा वाडा होता. या वाड्यात शस्त्र तयार करण्याचा कारखाना पुढे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने बीडच्या क्रांतिकारकांनी सुरू केला. या कारखान्यात गोळ्या तयार करण्याचे एक यंत्रही अलीकडेच सापडले आहे. हे यंत्र उठावाचे नेतृत्व करणार्‍या घोडेखुरच्या लढाईचे प्रमुख क्रांतिकारी धोंडाजी विठ्ठल मुंडे व शहाजी विठ्ठल मुंडे या भावंडांच्या घरात सापडले. हे दोघेही १४ एप्रिल १८९० रोजी या लढाईत शहीद झाले.


जिल्ह्याच्या चतुःसीमा संपादन


पूर्वेला : परभणी जिल्हा
पश्चिमेला : अहमदनगर जिल्हा
उत्तरेला : जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा
दक्षिणेला : लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा

प्रशासकीय विभाग संपादन

जिल्ह्याचे विभाजन २ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

  • बीड उपविभाग
  • अंबेजोगाई उपविभाग

या उपविभागांचे विभाजन ११ तालुकामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती २६ जून १९९९ ला झाली. एकूण गावे १३४६ तर १०१९ ग्रामपंचायती आहेत. विद्युतीकरण झालेली ग्रामीण गावे : १३७

बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका आहेत; जिल्हा व सत्र न्यायाधीश, साहाय्यक न्यायाधीश व अतिरिक्त न्यायाधीश आहेत. बीड तालुक्याचा एक दिवाणी न्यायाधीश व एक प्रथम श्रेणीचा न्यायिक दंडाधिकारी असून उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना मर्यादित दंडाधिकार आहेत. आष्टी व पाटोदा या तालुक्यांकरिता एकच दिवाणी न्यायाधीश(द्वितीय श्रेणी)व एक न्यायिक दंडधिकारी आहे.

राजकीय संरचना संपादन

लोकसभा मतदारसंघ (१) :बीड (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ (६) :
बीड विधानसभा मतदारसंघ
केज विधानसभा मतदारसंघ
आष्टी विधानसभा मतदारसंघ
गेवराई विधानसभा मतदारसंघ
परळी विधानसभा मतदारसंघ
माजलगाव विधानसभा मतदारसंघ

बीडमध्ये जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ असून, पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत. ११ पंचायत समित्या आहेत.

भौगोलिक महत्त्व संपादन

बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा बराच भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे, मात्र जिल्ह्याचा उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या दक्षिण-मध्य भाग हा बालाघाटच्या डोंगररांगांमुळे खडकाळ आहे. येथे चिंचोली, नेकनूर वगैरे भाग येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभ्याहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो. हा जिल्हा म्हणजे गोदावरी -मांजराचे खोरे होय.

भूरचनेच्या दृष्टीने या जिल्ह्याचे दक्षिणेकडील ‘बालाघाट’ पठाराचा उंच प्रदेश, उत्तरेकडील गोदावरी खोर्‍याचा सखल प्रदेश व नैर्ऋत्य आणि पश्चिमेकडील चढ-उताराचा प्रदेश असे तीन भाग पडतात. जिल्ह्याच्या मध्यभागतून पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सहद्दीपर्यत पसरलेली बालाघाट ही प्रमुख डोंगररांग होय.तिच्यामुळे जिल्ह्याचे उत्तरेकडील सखल प्रदेश व दक्षिणेकडील उंचवट्यांचा प्रदेश असे दोन भाग झाले आहेत. हे अनुक्रमे ‘गंगाथडी’ व ‘घाट’ किंवा ’ बालाघाट’ या स्थानिक नावांनी ओळखले जातात. हा पठारी प्रदेश दक्षिणेस मांजरा नदीपर्यत पसरलेला असून त्याची सस. पासून उंची ६०० ते ६५० मी. पर्यत आढळते. प्रदेशाचा उतार दक्षिणेकडे कमी होत जातो.बालाघाट डोंगररांगेची उंची पश्चिम भागात सर्वात जास्त असून ती पूर्वेस क्रमाक्रमाने कमी होत जाते. जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर (८८९ मी.) पश्चिमेस चिंचोलीजवळ असून या रांगेत ६०० ते ८५० मी. उंचीचीही काही शिखरे आहेत. बालाघाट डोंगराचा एक फाटा चिंचोलीजवळ सुरु होऊन नंतर आग्नेय दिशेने जातो. या फाट्यामुळे आष्टी व पाटोदा तालुक्यांदरम्यान नैसर्गिक सरहद्द निर्माण झाली आहे.

उत्तरेकडील गोदावरी नदीखोर्‍याचा पश्चिम भाग सस. पासून साधारण ५५५ मी. उंचीचा असून पूर्वेकडे त्याची उंची ४०० मी. पर्यंत उतरत जाते. या सखल प्रदेशात मधूनमधून ६०० मी उंचीच्या काही टेकड्याही आढळतात. याच्या पश्चिम भागात गणोबा, चितोरा व सिंदफणा नदीच्या दक्षिण भागात नारायणगड इ. टेकड्या आहेत. जिल्ह्याचा तिसरा भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडील सीना नदीखोर्‍याचा असून या प्रदेशात संपूर्ण आष्टी तालुक्याचा समावेश होतो.याचा दक्षिण भाग सु. ६०० मी.उंचीचा असून उत्तरेस ७५० मी. पर्यत उंची वाढत जाते. या प्रदेशात अनेक तुटकतुटक टेकडया आहेत. सीना नदीमुळे याच्या दक्षिण भागाची झीज होऊन मूळचे स्वरुप बदलले आहे.

हा जिल्हा दख्खनच्या पठारी प्रदेशात असून गोदावरी नदीखोर्‍याचा प्रदेश अत्यंत सुपीक आहे. या प्रदेशात गडद करड्या व काळ्या रंगाची मृदा आढळते. या जमिनीत भेगा पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जमीन थोडी क्षारयुक्त असून क्षारांचे प्रमाण ५% आहे. नद्यांच्या काठी जमीन सुपीक, तर इतरत्र पातळ थराची व खडकाळ आढळते. माजलगाव तालुक्याच्या दक्षिणेकडील व केज तालुक्याच्या उत्तरेकडील जमीनही निकृष्ट प्रतीची आहे. आंबेजोगाई तालुक्यातील जमीन काळी कपाशीची व सुपीक आहे. हा जिल्हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने अविकसितच आहे.

हवामान संपादन

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. स्थळपरत्वे जिल्ह्यातील हवामानात थोडाफार फरक आढळतो. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव,परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो. [२]

१९७७ मध्ये जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३९.४o सेल्शियस व सरासरी किमान तापमान २९.९o सेल्शियस होते. वार्षिक पावसाचे प्रमाण कमी असून तो सरासरी ६५ ते ८० सेमी. आहे. जिल्ह्याच्या मध्यभागात पर्जन्याचे प्रमाण जास्त असून तो जून ते सप्टेंबर या काळात जास्त पडतो. पावसाची अनिश्चितता व कमी प्रमाण यांमुळे या जिल्ह्याचा काही भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो.

निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे जिल्ह्यात जंगलाखालील क्षेत्र बरेच अल्प (२%) आहे. १९७८-७९ साली जिल्ह्यात २१,६०० हे. क्षेत्र जंगलांखाली होते. बहुतेक जंगले पाटोदा,आंबेजोगाई, आष्टी, केज, बीड, इ. तालुक्यांतच आढळतात. जंगले विस्तीर्ण प्रदेशात नसून लहानलहान टांपूमध्ये विखुरलेली आढळतात. धावडा, आपटा, आवळा, सलाई, तेंदू, चंदन, टेमरू, कांदोळ, लोखंडी, खैर, महुवा, पळस, हेन इ. येथील प्रमुख वनस्पतिप्रकार होत. जंगलांत बराचसा गवताळ प्रदेश असून कुसळी व शेडा हे गवताचे प्रमुख प्रकार तेथे आढळतात. यांशिवाय रोशा, मारवेल. सोफिआ, बोनी, कुंदा जातींचे गवतही आढळते. दुसर्‍या योजनेच्या काळात १६३ हेक्टर क्षेत्रात झाडे लावण्याचे काम करण्यात आले. १९७८-७९ मध्ये २४० हेक्टर क्षेत्रात जंगले निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जंगलांतून फक्त लाकूड, सरपण, व गवत मिळते. १९७८-७९ मध्ये जंगलापासून फक्त १,६५,५०० रु. उत्पन्न मिळाले. लाकडाचा वापर इमारती, लाकडी सामान व सरपणासाठी केला जातो.

पूर्वी येथे वन्य प्राण्यांची संख्या खूप होती. परंतु जंगलांचे प्रमाण जसजसे कमी होत गेले, तसतशी या प्राण्यांची संख्याही कमी होत गेली. दाट जंगलमय प्रदेशांत क्वचित बिबळ्या आढळतो. यांशिवाय चितळ,रानडुक्कर, कोल्हा, माकड इत्यादी प्राणी जिल्ह्यात आढळतात.

जलसिंचन संपादन

जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. जिल्ह्यात बीड व आष्टी या भागात तुलनात्मकदृष्टया अधिक विहिरी आहेत. बीड शहरात माजलगाव तलाव व बिंदुसरा तलावातून पाणी पुरवठा होतो. ऐतिहासिक काळात बीड शहराला करमारी खजाना विहीरीद्वारे पाणीपुरवठा होत असे. येथील निजामकालीन खजाना विहीर आहे. ही विहीर साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेली आहे. शेतकर्‍यांना कधीच पाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी १५७२ साली निजामाचा सरदार सलाबत खान यानं ही विहीर बांधून घेतली होती. बिंदुसरा नदीच्या पायथ्याशी ही विहीर बांधल्यामुळे यातलं पाणी आजपर्यंत कधीच आटले नव्हते. पण २०१२च्या दुष्काळात विहीर पूर्णपणे आटली. [३] [४]

नद्या संपादन

बीड जिल्ह्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत हा गोदावरी नदीचा. याच नदीने जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे. गोदावरी बरोबरच सिदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी वाहते. चौसाळा, केज, रेना व लिंबा या मांजरा नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.

  • गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्ह्य सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांतुन वाहत जाते. जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
  • मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालेघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर-दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.
  • सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकडयात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणा नदीवर बीडजिल्ह्यातील मोठा धरण आहे.
  • बिंदुसरा नदी बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर बीडजवळ जिल्ह्यातील मोठा धरणप्रकल्प आहे. बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला मिळते.
  • कुंडलिका ही सिंधफणेची एक उपनदी बीड जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते.
  • सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैऋत्य सीमेवरून वायव्य-आग्नेय दिशेने वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
  • पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.[५]

या प्रमुख नद्यांशिवाय बिंदुसरा, कुंडलिका या सिंदफणेच्या उपनद्या; सरस्वती, वाण, लेंडी, अमृता, गुणवती इ. गोदावरीच्या उपनद्या; तर केज, रेना, चौसाला, लिंबा इ. मांजरा नदीच्या उपनद्या बालाघाट डोंगरात उगम पावून या जिल्ह्यात उत्तर व दक्षिण दिशांनी वाहतात. तलवार, कमळी, रूटी, मेहेकर इ. सीना नदीच्या उपनद्या व कुंटका, येळंबची, लमाणबुडवी, होळणा, उंदरी, विंचरणा इ. लहानमोठया नद्याही या जिल्ह्यात आहेत.

जिल्ह्यात दोन मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.

  • सिंदफणा नदीवरील माजलगाव प्रकल्प
  • मांजरा नदीवर केज तालुक्यात मांजरा प्रकल्प.
  • तसेच अंबेजोगाई तालुक्यात वाण नदीवर व पाटोदा तालुक्यात सिंदफणा नदीवर प्रकल्प झाले आहेत.

धरण प्रकल्प संपादन

बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम व १२२ लघू प्रकल्प आहेत. माजलगाव व मांजरा हे मोठे प्रकल्प आहेत. बीड शहराला माजलगाव व बिंदूसरा प्रकल्पामधून पाणी पुरवठा होतो. इतर धरण प्रकल्प बिंदुसरा(बीड), सिंदफणा (शिरूर), बेलपारा (शिरूर), महासांगवी (पाटोदा), वाण (परळी), बोरणा (परळी), बोधेगाव (परळी), सरस्वती (वडवणी), कुंडलिका (वडवणी), वाघेबाभूळगाव (केज), शिवनी (बीड), मणकर्णिका (बीड), सौताडा (पाटोदा), मेहकरी (आष्टी), कडा (आष्टी), कांबळी (आष्टी), रूटी (आष्टी), तलवार (आष्टी), कडी (आष्टी), हिंगेवाडी (शिरूर) ,नागतळवाडी, वेलतुरी, लोणी, पारगाव, कोयाळ, खुंटेफळ, पिंपळा, ोलंग्री, सुलतानपूर, कटवट, जरुड, जुजगव्हाण, ईट, मैंदा, अंबा, मन्यारवाडी, शिंदेवाडी, मादळमोही दासखेड, इंचरणा, मस्साजोग, कारंजा, होळ, मुळेगाव, जनेगाव, तांदुळवाडी, पहाडीपारगाव, साळींबा, नित्रुड, शिंदेवाडी, वांगी, चिंचोटी, तिगाव, लोणी सांगवी, ढालेगाव, सिंदफणा (शिरूर), मांजरा (धनेगाव) आहेत

[६] [७] [८]

कमी पर्जन्य व छोट्या नद्या यांमुळे जिल्ह्यात अनेक लहान जलसिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. १९७७ साली बीड जिल्ह्यात एकूण ११ मध्यम व ५२ लघुजलसिंचन प्रकल्प होते. त्यांव्दारे २६,४७१ हे. जमिनीस पाणीपुरवठा करण्यात आला होता. जिल्ह्यातील बिंदुसरा, कमळी, मेहेकर, तलवार, वाण, कडा, सिंदफणा इ. नद्यांवर छोटी धरणे बांधून तसेच अनेक विहीरींद्वारे शेतीस पाणी पुरवठा करण्यात आला आहे. जायकवाडी प्रकल्पामुळेही जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यांना फायदा झाला आहे. पाणीपुरवठ्यासाठी काही तलाव व पाझर तलावही बांधण्यात आले आहेत. बीड शहरानजीक १५८२ साली बांधलेल्या प्रचंड विहीरीतून सु. २०० हेक्टर जमिनीस पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील बहुतेक गावांचे विद्युतीकरणझाले आहे. १९७९ साली एकूण ६८४ गावांना वीजपुरवठा करण्यात आला होता. परळी वैजनाथ येथे औष्णिक वीज केंद्र असून आंबेजोगाई – परळी मार्गावर गिरवली या ठिकाणी नव्याने विद्युत्‌ उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

  • एकूण पिकाखालील क्षेत्र : ६६२ हजार हेक्टर
  • एकूण ओलीतक्षेत्र : २३६ हजार हेक्टर
  • एकूण वनक्षेत्र : २६ हजार हेक्टर
  • एकूण पडीतक्षेत्र : १२३ हजार हेक्टर
  • एकूण दुसोटाक्षेत्र : हजार हेक्टर

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात ज्वारी हे महत्त्वाचे खरीप पीक आहे तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, तीळ,जवळ,मसुर,सोयाबीन,मिरची, ऊस, कांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा उत्पादनात अग्रेसर ही आहेत. खरीप ज्वारीच्या उत्पादनात जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन आष्टी, अंबेजोगाई, केज प्रामुख्याने येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत.

ऱबी ज्वारीचे उत्पादन आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई व वडवणी या तालुक्यात उत्पादन घेतले जाते. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई या तालुक्यात गव्हाचे उत्पादन होते. आष्टी, पाटोदा, बीड व केज येथे हरभर्‍याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी, माजलगाव, गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते.

जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होते. ऊसची लागवड आष्टी, बीड, माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई इत्यादी तालुक्यांमध्ये केली जाते. बीड, अंबेजोगाई या तालुक्यांत द्राक्षाचे उत्पादन होते. गोदावरी व मांजरा या नद्यांकाठी कलिंगडाचे उत्पन्‍न घेतले जाते. आष्टी, बीड, अंबेजोगाई, नेकनूर येथे आंब्याची खूप झाडे आहेत.. नेकनूर येथील काला पहाड व अंबेजोगाई ये्थील पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरु, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्‍ना घेतले जाते. [९] या जिल्हय़ात २००८ झालेल्या पशुगणनेनुसार जवळपास साडेदहा लाख जनावरे आहेत. यात साडेसहा लाखांपर्यंत दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे जिल्हय़ात दूधउत्पादन हा शेतकर्‍यांचा मोठा जोडधंदा मानला जातो. आठ सरकारी व चार खासगी दूध संघाच्या माध्यमातून दूधसंकलन केले जाते. [१०]

बीड जिल्हा कृषिप्रधान असून ८०% लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते वर्षातून दोन वेळा घेतले जाते. ‘ज्वारीचा जिल्हा’ म्हणूनच याची प्रसिद्धी आहे. खरीप हंगमात ज्वारी, बाजरी, मूग, तूर, भात, भुईमूग इ. मुख्य पिके घेतली जातात. रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, यांचे प्रमाण जास्त असते. एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ९५% जमीन कोरडवाहू आहे. १९७७-७८ साली जिल्ह्यात भात, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांखाली ५,१३,५७० हे. व हरभरा, तूर, व इतर कडधान्यांखाली १,१७,९५२ हे. क्षेत्र होते. या पिकांबरोबरच जलसिंचनाची सोय असलेल्या भागांत ऊस, फळे व भाजीपाला केला जातो. १९७७-७८साली ७,७१९ हे, क्षेत्र उसाखाली व ७,७६५ हे. क्षेत्र फळे व भाजीपाला यांखाली होते. जिल्ह्यात ज्वारीच्या खालोखाल कापसाचे पीक महत्त्वाचे आहे, एकूण २९,५४५ हे. क्षेत्रात कापसाची लागावड करण्यात आली होती. तंबाखूही थोड्याफार प्रमाणात पिकवली जाते. १९७७-७८ साली जिल्ह्यात ज्वारी ३,०३,३००; बाजरी ५४,६००; गहू ३७,२००; तांदूळ १२,१००; बार्ली २००; मका ९,८००; मे.टन तर सर्व कडधान्यांचे ४०,९०० मे.टन उत्पादन घेण्यात आले. ऊस व कापूस यांचे अनुक्रमे ३५,१०० व १,५०० मे.टन उत्पादन घेण्यात आले. जिल्ह्यात विशेषत: डोंगराळ प्रदेशात, बाजरीचे पीक घेतले जाते. आष्टी, पाटोदा, बीड, केज, अंबेजोगाई, गेवराई हे तालुके बाजरीसाठी प्रसिद्ध आहेत. यांशिवाय बीड, केज, अंबेजोगाई तालुक्यांत भुईमूगही चांगला येतो.रब्बी हंगामात ज्वारी हे सर्वात महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यात सर्वत्र, विशेषत: गंगाथडीच्या भागात, हे पीक चांगले येते. ही ‘टाकळी ज्वारी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

दळणवळण संपादन

बीड शहर राजधानी मुंबईपासून साधारणपणे ४५० कि.मी. अंतरावर आहे. जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. बीड जिल्ह्यातील वाहतूक प्रामुख्याने रस्तेमार्गाने चालते.

  • जिल्ह्यातील एकूण लोहमार्गाची लांबी : ४७.८६ कि.मी.
  • जिल्ह्यातील एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी : २२४ कि.मी.
  • एकूण राज्य महामार्गांची लांबी : १००३ कि.मी.
  • एकूण जिल्ह्यामार्गांची लांबी : १६३८ कि.मी.
  • एकूण ग्रामीण मार्गांची लांबी : ४८१२ कि.मी.

या जिल्ह्यातून अतिमहत्त्वाचा एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. एकेकाळी जिल्ह्यात एकूण ३,८२६ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यांत ८३८.६ किमी. राज्य महामार्ग, ५६८.१ किमी. ग्रामीण मार्ग, २,१४७.७ किमी. जिल्हामार्ग व २७१.६ किमी. इतर मार्ग होते. तसेच त्यांतील ७४१ किमी. डांबरी, २,४४०.९ किमी.खडीचे व ६४४.१ किमी. निकृष्ट प्रतीचे होते.(१९७९).

लोहमार्ग संपादन

जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. परळी- वैजनाथ हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन होय. येथे एक लोहमार्ग परभणी (गंगाखेड) तर एक लोहमार्ग लातूर (उदगीर) येथून येतो. परळी वैजनाथ, अंबेजोगाई, घाटनांदूर व पानगाव ही या जिल्ह्यातील प्रमुख लोहमार्ग स्थानके आहेत. लोहमार्ग रूंद- मापी व मीटर-मापी आहेत. त्यापैकी ४०.३८ किमी. रूंद-मापी व ७.४८ किमी. मीटर-मापी आहेत.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे (२६१ कि.मी.) काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. [११]

रस्ते संपादन

राष्ट्रीय महामार्ग संपादन

  • कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ बीड जिल्ह्यातून जातो. या महामार्गावरून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे.
  • सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ बीड जिल्ह्यातून जातो. हा महामार्ग औरंगाबाद,धुळे,उस्मानाबाद आणि सोलापूर ह्या शहरांना जोडतो.

प्रमुख रस्ते संपादन

बीडपासून उत्तरेकडे जाणारा मार्ग गेवराईमार्गे जालना व शेवगावकडे जातो. बीडपासून पूर्वेकडे जाणारा मार्ग माजलगावमार्गे पाथरीकडे जातो. दक्षिणेकडे जाणारा मार्ग केजमार्गे कळंबकडे जातो तर दुसरा दक्षिणेकडे मांजरसुभामार्गे उस्मानाबाद व सोलापूरस जातो. बीडपासून पश्चिमेकडे जाणारा मार्ग आष्टीमार्गे अहमदनगरकडे जातो.

महत्त्वाचे उद्योग संपादन

औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा मागासलेला असून मोठ्या प्रमाणावर चालणारा एकही उद्योगधंदा नाही; कापूस पिंजणे, त्यांचे गठ्ठे बांधणे, तेल गाळणे इ. लघुउद्योग चालतात. बीड, परळी वैजनाथ, गेवराई, आंबेजोगाई, येळंबघाट, धारूर, माजलगाव येथे कापूस पिंजण्याच्या व गठ्ठे बांधण्याच्या तसेच तेल गाळण्याच्या गिरण्या आहेत. जिल्ह्यात कुटिरोद्योगांचे प्रमाण जास्त असून त्यांत विड्या वळणे, गुरे पाळणे, मेंढपाळी, लोकरीच्या घोंगड्या बनविणे, भांडी तयार करणे, हातमागावर कापड विणणे, कातडी कमाविणे, अडकित्ते तयार करणे इत्यादीचा समावेश होतो. जिल्ह्यात १९७८ मध्ये एकूण ९,७३,१४५ गुरे होती. जिल्ह्यात दूध व्यवसायाच्या प्रगतीच्या दृष्टीने योजना आखण्यात आल्या असून त्यांच्या कार्यवाहीला १९७८ पासून सुरुवातही करण्यात आली आहे. त्यासाठी बीड येथे १ कोटी ३२ लाख रुपये खर्चाचा दुग्ध – प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याची दररोज १,२०,००० लिटर दूध हाताळण्याची क्षमता आहे.(१९७८) यांशिवाय जिल्ह्यात आंबेजोगाई, गेवराई व आष्टी या तालुक्यांत साखर कारखानेही उभारण्यात आले आहेत. परळी येथे विजेचे दिवे व विजेच्या इतर साहित्याच्या निर्मितीचा कारखाना आहे. त्याचबरोबर तेल गिरणी व कापूस कारखाना देखील आहे. बीड व वडवणीमध्ये हातमाग आहे. तेलगिरण्या परळीबरोबरच बीड व अंबेईजोगाईमध्ये आहेत. मराठवाडा विकास महामंडळातर्फे बीड येथे चर्मोद्योग प्रकल्प राबविण्यात येत आहे. बीड येथे बनवले जाणारे छागल नावाचे चामड्याचे बुधले प्रसिद्ध आहेत. पाटोदा तालुक्यातील अमळनेर हे गाव तांबे-पितळ्याच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात बांधकामाचा दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने संबंधित उद्योग व व्यवसाय उपलब्ध आहेत. बीड जिल्ह्यात साखर व उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. जिल्ह्यात १२६ कारखाने आहेत. जिल्ह्यात ७ साखर कारखाने आहेत. जिल्ह्यात ६ सुतगिरणी आहेत. महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र परळी येथे येथे १९७० मध्ये उभारण्यात आहे.

साखर कारखाने संपादन

  • परळी वैजनाथ तालुक्यातील परळी वैजनाथ येथील वैजनाथ सहकारी साखर कारखाना
  • केज तालुक्यातील उमरी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना
  • अंबेजोगाई तालुक्यातील आंबासाखर येथील अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना
  • गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर येथील जय भवानी सहकारी साखर कारखाना
  • माजलगांव तालुक्यातील तेलगांव येथील माजलगांव सहकारी साखर कारखाना
  • बीड तालुक्यातील सोनाजीनगर येथील गजानन सहकारी साखर कारखाना
  • आष्टी तालुक्यातील कडा येथील कडा सहकारी साखर कारखाना

शिक्षण संपादन

बीड नगरीत शिक्षणाचा आरंभ झाला तो तुंडे मास्तरांच्या खासगी शाळेपासून. साधारणत: इ.स.१९१० च्या दरम्यान तुंडे मास्तरांनी पेठ भागात महेबूबगंज (आजचा हिरालाल चौक) परिसरात शाळा (शिकवणी) सुरू केली. या शाळेत अनेक क्रांतिकारी घडले. रमणलाल कोटेचा, हिरालाल कोटेचा हे त्यापैकीच. नंतर बीडच्या बाहेर (अर्थात त्या काळी) निझाम सरकारने मदरसे फोकानिया ही सरकारी पहिली शाळा सुरू केली. पुढे ती मल्टिपर्पज हायस्कूल म्हणून ओळखली गेली. जी आज जमीनदोस्त झाली आहे. या शाळेने बीडला कलावंत, प्रतिभावान साहित्यिक, खेळाडू व कलावंत दिले. आज या शहरात अनेक शाळा आहेत.संस्कार विद्यालय , श्री शिवजी विद्यालय, चंपावती विद्यालय, भगवान विद्यलाय या आज शहारातील प्रमुख शाळा आहेत.
शैक्षणिकदृष्ट्या बीड जिल्हा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाच्या अंतर्गत बीड जिल्ह्यात एकूण सुमारे ७० विविध प्रकारची महाविद्यालये आहेत.

  • अभियांत्रिकी महाविद्यालये: (३)
    • सोमनाथ नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, परळी जिल्हा बीड
    • आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, बीड
    • बसवेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, अंबेजोगाई जिल्हा बीड
  • वैद्यकीय महाविद्यालये: (२)
    • स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाई जिल्हा बीड
  • तंत्रनिकेतन:
    • शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय, बीड
  • कृषी महाविद्यालय:
    • आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड
    • छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी जिल्हा बीड
    • केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कृषी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
    • आदित्य कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
    • आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
  • अध्यापक विद्यालये:
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था: १४
  • महाविद्यालये : ६५
  • माध्यमिक शाळा: ५५२
  • प्राथमिक शाळा: २०००
  • आदिवासी आश्रमशाळा: २

जिल्ह्यात १९७१ साली एकूण २,३९,०० लोक (२४.०१%) साक्षर होते. त्यांपैकी १,९४,०००(२१.४२%) ग्रामीण भागांतील व ४५,००० (४३.७४%) शहरी भागांतील होते. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागांतही स्त्रियांच्या साक्षरतेचे प्र्माण वाढत आहे. १९७८-७९ साली जिल्ह्यात एकूण १३ पूर्व प्राथमिक शाळांत ७२९ मुले व १८ शिक्षक होते. याच वर्षी १,५७८ प्राथमिक शाळांत १,४७,४६६ विद्यार्थी व ४,१२८शिक्षक; १५० माध्यमिक शाळांत ४९,०५० विद्यार्थी व २,२२७ शिक्षक आणि १४ उच्च शिक्षण संस्थांत (महाविद्यालयांसह) ६,९४४ विद्यार्थी व ४५० शिक्षक होते. जिल्ह्यात एकूण ७६,८०१ मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. मागासवर्गींय विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण सुविधा असून अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १९७७-७८ साली जिल्ह्यात तीन तंत्रशाळा सुरु करण्यात आल्या. ग्रामीण विकासासाठी त्या भागांत महाविद्यालयांपर्यत (वैद्यकीय महाविद्यालयासह) सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे (स्थापना १९७५) कार्य उल्लेखनीय आहे. बीड जिल्ह्यात १५ चित्रपटगृहे व नाट्यगृहे (१९७९) तसेच तमाशा मंडळे यांसारखी करमणुकीची साधने आहेत. १९७८-७९ साली जिल्ह्यात ७९ बॅक कार्यालये व १,४२६ सहकारी संस्था होत्या. याच वर्षी जिल्ह्यातून ३ दैनिके, ११ साप्ताहिक, २ पाक्षिके (पैकी एक उर्दू) व १ मासिक प्रसिद्ध होत होते. चंपावती पत्र, झुंजार नेता, बीड समाचार ही दैनिके बीड शहरातून, तर सावज आणि पाठलाग ही साप्ताहिके अनुक्रमे आंबेजोगाई व माजलगाव येथून; जैन सारथी मासिक पाटोदा येथून प्रसिद्ध होतात.

आरोग्य संपादन

  • जिल्हा सामान्य रुग्णालय: २
  • जिल्हा स्त्री रुग्णालय : १
  • जिल्हा क्षय रुग्णालय : १
  • खासगी रुग्णालये : १४
  • खासगी दवाखाने : २७
  • प्राथमिक आरोग्य केंद्रे : ५०
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे : २७८
  • प्राथमिक आरोग्य पथके : २
  • ग्रामीण कुटुंब केंद्र :

(As per registered Jan 2011)

प्रेक्षणीय स्थळे संपादन

वने संपादन

बीड जिल्ह्यात वने अभावानेच आढळतात. डोंगराळ भागाच्या आसपास वने आढळतात.परंतु ती देखील विरळच आहेत. बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील विंचरणा नदीवरील श्री रामेश्वर सौताडा धबधबा प्रसिद्ध आहे.

किल्ला संपादन

धारूर तालुक्यात धारूर किल्ला आहे.

धार्मिक ठिकाणे संपादन

कंकालेश्वर मंदिर

धरणे संपादन

प्रमुख ठिकाणे संपादन

  • बीड:- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बिंदुसरा नदीकाठी वसले आहे. जिल्हयातील सर्वात मोठे शहर . शहरात कंकालेश्र्वराचे जलमंदिर आहे. सुरेख व कलात्मक बांधणीमुळे हे जलमंदिर प्रेक्षणीय ठरले आहे. शहराजवळच्या टेकडीवर खंडेश्र्वराचे प्राचीन मंदिर, आहे. शहरात पीर बालाशहा व मन्सूरशाह यांचे दर्गे आहेत. शहरापासून जवळच खजाना ही प्रसिद्ध विहिर आहे. या विहिरीस कायम पाणी असते. बीड शहराच्या पश्चिमेस सु. ४ किमी. वर प्रसिद्ध ‘खजाना विहीर’ आहे. अलीकडील काळात बीड औद्योगिक व शैक्षणिक शहर म्हणूनही विकसित होत आहे.
  • आंबेजोगाई:- आंबेजोगाई किंवा अंबेजोगाई तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे बर्‍याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. निजामी अमलात हे गाव मोमिनाबाद नावाने ओळखले जात असे.स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे. गावात जोगाई व खोलेश्र्वर यांची प्राचीन मंदिरे आहेत. जोगाईच्या मंदिरामुळे हे गाव अंबेजोगाई म्हणून ओळखले जाते. अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबेजोगाई हे ठिकाण देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते.आद्यकवी मुकुंदराज व संतकती दासोपंत यांच्या समाधी येथे आहेत. ज्ञानेश्र्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचा उल्लेख सापडतो. दासोपंतांनी लिहिलेली बारा मीटर लांब व एक मीटर रुंदीची पासोडी येथे पाहावयास मिळते. येथील क्षयरोग रुग्णालय विख्यात आहे. क्षयरोग लवकर बरा होण्यासाठी येथील कोरडे हवामान उपयुक्त ठरते. अंबाजोगाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे. जवळील रेल्वे स्थानक परळी येथे आहे. जवळील विमानतळ लातूर येथे असून अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आहे.
  • परळी वैजनाथ किंवा परळी वैद्यनाथ: भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. बारा ज्योतीर्लिंगांपैकी हे (आद्य) ज्योतीर्लिंग आहे. हे तालुक्याचे मुख्य ठिकाण जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ ५५ कि. मी. अंतरावर आहे तर परभणीपासून ६१ कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी येथील औष्णिक विद्युतकेंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचे गणले जाते. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे. [१२]
  • भगवानगड:- श्रीक्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र भगवानगड हिंदू समाजाचे भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. बीड जिल्ह्यातील खरवंडीच्या बाजूलाच धौम्य ऋषीचा धौम्यगड होता. धौम्य ऋषी पांडवांचे पुरोहित होते. याठिकाणी भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड उभा राहिला. [१३] [१४]
  • गहिनीनाथगड:- श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हिंदू भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.
  • कानिफनाथ गड खडकवाडी:- गावात एका टेकडीवर नाथ पंथातील नाथ कानिफनाथ भ्रमण करत असताना काही दिवस तपशर्या केली .जालिंदर नाथानी येवलवाडी ता.शिरूर जि.बीड येथे वास्तव्य केले.
  • धर्मापुरी :- धर्मापुरी हे महाराष्ट्र राज्यातील गाव आहे. ते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई - अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे. गावामधेच एक जुने राम मंदिर आहे.
  • राक्षसभुवन:- गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसले आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. शनिअमावस्येस येथे मोठी यात्रा भरते. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला.
  • केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी:- केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे. धर्मापुरीचे शिवमंदिर कोरीव शिल्पकामासाठी प्रसिद्ध आहे.
  • कंकालेश्‍वर मंदिर, बीड ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. शतकांपूर्वी बीड नगरीवर राज्य होतं ते हैदराबादच्या निझामाचं. या काळात दसरा सण उत्साहात व्हायचा. लोक सीमोल्लंघनासाठी खंडेश्वरीला जात. निझाम सरकारच्या वतीने खंडेश्वरी मंदिरासमोर मंडप टाकले जात. जवळपास सर्व मुस्लिम अधिकारी, प्रतिष्ठित मुस्लिम नागरिक व व्यापारी या पेंडॉलमध्ये येत व पानसुपारी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत. धूलिवंदनाच्या दिवशी अंधर्शद्धा, अस्पृश्यता या सारख्या विषयावर व्ाख्याने होत. लोक चौकात एकमेकास प्रेमाने रंग लावत. शतकापूर्वी बीडची मंदिरे आजच्या सारखी नव्हती. नगरीतील मुख्य मंदिर कंकालेश्वर बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजार्‍यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला १९१५ साल उजाडावे लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. १७ सप्टेंबर १९४८ अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खर्‍या अर्थाने मुक्त झाले. [१५]
  • पुरूषोत्तमपुरी मंदिर, बीड महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात श्रावण महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत पुरुषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यात पुरुषोत्तमपुरीचे मंदिर उल्लेखनीय ठरते. या मंदिराचे यादवकालीन वेगळे स्थापत्य की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. इसवी सन १३१०मध्ये रामचंद्रदेव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळे या भागास पुरुषोत्तमपुरी नाव पडले. मंदिरातील मुख्य देवताही पुरुषोत्तम या नावाने ओळखली जाऊ लागली. [१७]
  • येळंब, शिरूर मराठवाड्यातील एकमेव असलेल्या ब्रनाथ येळंब येथील ब्रनाथ महाराजांचा यात्रोत्सव र्शावण महिन्यात चौथ्या सोमवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी शिरूर तालुक्यातील येळंब येथे ब्रrानाथ महाराजांचे मराठवाड्यातील एकमेव मंदिर आहे. नगर-बीड या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील या मंदिरास शेकडो वर्षांची परंपरा आहे. सिंदफणा नदीच्या काठावर असणार्‍या ब्रrानाथ महाराजांच्या हेमाडपंती मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत आहे. मूळ गाभारा दगडाचाच ठेवून सभागृह व अन्य कामे लोखंड व सिमेंटची करण्यात येत आहेत. र्शावण महिन्यात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्याही मोठी असते. चैत्र महिन्यातील तिसर्‍या सोमवारी अंबिलचा कार्यक्रम होतो. या दिवशी सर्व जाती धर्माचे लोक महाराजाच्या आंबिलाचा आस्वाद घेतात. चौथ्या सोमवारी युवकांनी गंगेहून आणले. या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. कावडीच्या पाण्याने ब्रrानाथ महाराजांना अभिषेक करण्यात येतो. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. [१८]
  • राम मंदिर, बीड शाहूनगर भागातील गजानन कॉलनी येथे अर्धा एकर क्षेत्रफळ असलेल्या व 37 बाय 22 या जागेत लोकसहभागातून मंदिराचे तळघर व स्लॅबचे काम पूर्ण झाले. या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान आणि गणपती या पाच मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. एक कासवही आणले जाणार आहे. [२०]
  • जालिंदरनाथ देवस्थान, रायमोह बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे.[२१]
  • बर्‍हाणपूर, गेवराई बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बर्‍हाणपूर येथे मावलाई देवीचे पुरातन मंदिर आहे. एप्रिल महिन्यात विविध ठिकाणी पंधरा, आठ आणि दोन दिवसांची यात्रा भरते.परंपरेनुसार याही वर्षी यात्रेत माणसांकरवी बारा गाड्या ओढल्या जाणार आहेत. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी लोकवर्गणीतून कुस्ती स्पर्धा घेतली जाते. राज्यस्तरावर लिखान करणारे पत्रकार, राष्ट्रीय व राज्य खेळाडू तयार करणार्‍या संघटकाला येथील मावलाई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मावलाई राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. [२२]
  • दत्तमंदिर, बीड शहरातील सुभाष रोडवरील ऐतिहासीक दत्तमंदिर प्रसिद्ध आहे. दत्तमंदिराच्या सांस्कृतिक सभागृहाचे व जीर्णोद्धाराचे काम चालू [२३]


  • कपिलधार, बीड जिल्हा श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमी मांजरसुंभा व तेथून दीड किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणार्‍या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे. येथे मन्मथस्वामींचे या लिंगायतांच्या सत्पुरुषाची टुमदार समाधी मंदिर आहे. लिंगायतपंथीयां ते एक श्रध्दास्थान आहे. जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. गर्द वनश्रीच्या सान्निध्यात येथे. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. [२७]
  • [नागनाथ मानूर, बीड]]:- सुमारे ७00 यादवकालीन आडाचा इतिहास असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नागनाथ मानूर. कालौघात या गावातील तब्बल साडेसहाशे आड आज बुजून गेले आहेत तर उरले सुरले पाच पन्नास आड जुन्या इतिहासाची साक्ष देत कसेबसे आपले अस्तित्व जपत आहेत. या गावचा गत इतिहास पाहता त्रिकोनी, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा प्रकारचे आड येथे आहेत. काही भागात तर खापरी आड ही बघायला मिळतात. खापरापासून तयार करण्यात आल्यामुळे त्यांना खापरीआड म्हणत. सातशे आड आणि सातशे माड (मंदिर) असलेले मानूर हे परिसरात एकमेव गाव आहे. [२८]
  • पिंपळवंडी (पाटोदा तालुका, बीड जिल्हा) पाटोदा तालुक्यात पिंपळवंडी या गावालगत डोंगरदरीत असलेल्या आणि कार्तिकस्वामी मंदिरामुळे अलीकडील काळात भाविकांची रीघ वाढल. तेराव्या शतकात यादव काळात निर्माण झालेल्या हेमाडपंती मंदिरांमध्ये पिंपळवंडी येथील अश्वलिंग, कार्तिकस्वामी मंदिराची उभारणी झाली. निझाम राजवटीत संकटांचा सामना करूनही हे देवस्थान आज तेवढय़ाच ताठ मानेने उभे आहे. भारती परंपरा आणि संन्याशी मठाची परंपरा लाभलेल्या या संस्थांचा कारभार सध्या महादेवानंद भारती (मधुकर शास्त्री महाराज) हे पाहत आहेत. पिंपळवंडीचे अश्वलिंग देवस्थान मात्र गेल्या दहा वर्षांपर्यंत तरी दुर्लक्षितच होते. याबरोबरच मागील दहा वर्षांपासून येथील कार्तिकस्वामी मंदिरही मराठवाड्यातील भाविकांच्या दृष्टिपथात आले. कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले. [२९]
  • तलवाडा (गेवराई तालुका, बीड जिल्हा) बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात तलवाडा या गावी डोंगरावर र्शी त्वरिता देवीचे भव्य मंदिर आहे. भक्ताच्या हाकेला त्वरित म्हणजे लवकर धावते म्हणून देवीला त्वरिता देवी नाव पडले. हे मंदिर १६६२ मध्ये निर्मित शिवकालीन मंदिर असल्याचा उल्लेख दीपमाळेवरील शिलालेखावर आहे. तलवाडा गावचे नाव निझाम राजवटीत त्वरितापूर होते असे म्हटले जाते. त्वरितापूर निवासिनी त्वरिता देवी असा उल्लेख इतिहासात आढळतो. देवीच्या चार हातात कमळ, खंजीर, गदा, परशु अशी चार आयुधे आढळतात. देवीची मूर्ती स्वयंभू सुमारे तीन फूट उंचीची आहे. त्वरिता देवीचे रूप विष्णुरूपी असून, मूर्ती चतुभरुज आहे. देवी चौरंगावर विराजमान आहे म्हणून त्वरिता देवी ही नारायणी वैष्णवीचा अवतार मानली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. गाभारा पूर्व-पश्चिम आहे. डोंगराच्या पायथ्याशी तुळजा देवी मंदिर आहे. मंदिरात देवीच्या दर्शनाला जाणार्‍यांसाठी एकाबाजूने 200 पायर्‍या आहेत व दुसर्‍या बाजूने मंदिरापर्यंत वाहन जाते. नारायणी त्वरिता देवीचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे मानले जाते. दसरा, हनुमान जयंती चैत्रपौर्णिमेनंतर यात्रा महोत्सव भरतो. त्वरितादेवी ट्रस्ट या मंदिराची देखरेख करते. [३०]
  • औरंगपूर (अंबाजोगाई तालुका, बीड जिल्हा) औरंगपूर तालुका अंबाजोगाई या गावाजळव कळंब-अंबाजोगाई रस्त्यावर उभा राहत असलेल्या सद्‌गुरू संत तुकाराम महाराज पावनधामवर तुकाराम बीजनिमीत्त फार मोठा धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात. संत तुकाराम मंदिर असलेले मानूर हे बीड जिल्ह्यात एकमेव गाव आहे. संत तुकाराम मंदिर महाराष्ट्र, कर्नाटकात कुठेच नाही. [३१]
  • रामगड, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात शहरानजीक असलेल्या श्रीक्षेत्र रामगड येथे श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. रामगडही प्रभू रामचंद्राने पाऊल ठेवलेली भूमी असून वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी मुक्काम केलेली जागा आहे. [३३]
  • मोहिनीराज, बीड बीड तालुक्यातील बालाघाट डोंगर पट्टयामधील बोरफडी आणि हिवरा पहाडी गावाच्या मध्य ठिकाणी उंच डोंगरावर भगवान शंकराचे श्री क्षेत्र मोहिनीराज देवस्थान आहे. [३४][१२][३५]
  • मंजरथ, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात मंजरथ हे गोदावरीच्या काठावरील तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणी गोदावरी आणि सिंदफणा या नद्यांचा संगम आहे. या गावास दक्षिण काशी असे संबोधले जाते. या ठिकाणी त्रिविक्रमाचे मंदिर आहे. ४00 वर्षांपूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला ८00 फूट लांब आणि ६0 फूट उंच घाटही [३६]
  • रामगड, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात शहरानजीक असलेल्या बाजारपुल जैनभवनाजवळ येथे मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळ आहे. [३७]
  • बातमी :- केशवराज मंदिर, बीड महाराष्ट्राच्या माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील केशवराज मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी वारीनिमित्त शुक्रवारी हजारो भाविकांनी केशवराजाचे दर्शन घेतले. रिमझिम पावसात भिजत महाएकादशीच्या पर्वकाळात भाविकांनी रांगेत उभे राहून धाकट्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. माजलगावपासून चार किलोमीटर अंतरावरील केसापुरीतील केशवराज मंदिरात केशवराज येथील मूर्तीचा विष्णूचा अवतार आहे. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. आषाढी एकादशीनिमित्त केसापुरीत यात्रा भरते. ही यात्रा पौर्णिमेपर्यंत असते. पौर्णिमेला कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी केशवराज मंदिरात सकाळी पाच वाजेपासूनच दर्शनासाठी महिला व पुरुषांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात दुकाने थाटली आहेत. सकाळपासूनच रिमझिम पाऊस चालू झाला. या रिमझिम पावसात देखील केशवराजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील जवळपास ३० हजार भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेतले. रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर उघडे ठेवण्यात येणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली होती. [३८]

गोदाकाठी राक्षसभूवन, पुरूषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत.

  • नायगाव अभयारण्य:- भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे.
  • आष्टी :- आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
  • सौताडा :- हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. विंचरणेचा प्रवाह येथे सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. (६८.५९ मी.) असून त्याच्या पायथ्याशी रामेश्वर मंदिर आहे. तेथे श्रावणात तिसर्‍या दिवशी मोठी यात्रा भरते. ३५० फूट उंचावरून पडणारा रामेश्वर धबधबा आणि निसर्गरम्य रामेश्वर मंदिर कायमच पर्यटकांना खुणावत असते. विविध प्रकारची वनराई फुलवतानाच पर्यटकांना जाण्या-येण्यासाठी छोटे रस्ते, पॅगोडा, वाहनतळ, व्ह्युह पॉइंट तसेच लहान आकाराचे साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. वनविभागाच्या बीड परिक्षेत्राच्या पाटोदा उपवन विभागामार्फत रामेश्वर परिसरात पर्यटनस्थळ विकास करण्यात आला आहे.

शिवदरा येथील शिवमंदिर शिवद-याच्यानिसर्ग रम्य परिसरात शिवमंदीरासह विठ्ठल रूक्मीणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कार्तीक स्वामी मंदिर आहे. शिरूरकासार येथे महाशिवरात्रीनिमित्त धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर भाविकांनी दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली.

बीड जिल्ह्यातील शिवालये कंकालेश्‍वर, सोमेश्‍वर, निळकंठेश्वर, पुत्रेश्वर, जटाशंकर, मार्कंडेश्वर, पापनेश्‍वर, पुत्रेश्‍वर, [३९]
बीड तालुक्यातील कपीलधार, चाकरवाडी, नागनाथ देवस्थान, बेलश्वर
गेवराई येथील चिंतेश्‍वर महादेव मंदिर, कल्पेश्‍वर, रूद्रेश्‍वर, भाटेपुरी
पाटोदा तालुक्यातील अश्वलिंग, भामेश्वर, सौताडा येथील रामेश्‍वर मंदिर
आष्टी येथील पिंपळेश्‍वर महादेव मंदिर
माजलगाव येथील सिध्देश्वर
केज तालुक्यातील उत्तरेश्‍वर पिंप्री, तांबवेश्वर
धारुरचे धारेश्वर, कारी येथील सिध्देश्वर
अंबाजोगाईच्या खोलेश्वर, बुट्टेनाथ
शिरुर कासारच्या सिद्धेश्वर मंदिर
परळी वैजनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे [४०] [१२] [४१]

याशिवाय धारूर (धारूर तालुक्याचे मुख्य ठिकाण) हे एक . ऐतिहासिक स्थळ आहे. येथे फतेहबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे. सोन्याचांदीच्या व्यापारासाठीही प्रसिद्ध. अमळनेर (पाटोदा तालुक्यात . तांब्या पितळेच्या भांडयासाठी प्रसिद्ध या उद्योगाचे येथे सु. ११ कारखाने असून त्यांतील विविध प्रकारच्या भांड्यांचा महाराष्ट्रात सर्वत्र पुरवठा केला जातो.), धर्मपुरी (अंबेजोगाई तालुकयात केदारेश्र्वराचे हेमाडपंती मंदिर), पांचाळेश्र्वर ( गोदावरीकाठी, महानुभावपंथीयांचे दत्त मंदिर, हे स्थळ गोदावरी नदीच्या तीरावर असून नदीपात्रात मध्यभागी दत्तमंदिर आहे. हे ठिकाण दत्तात्रेयाचे भोजनस्थळ म्हणून मानले जाते. येथे चैत्र वद्य सप्तमीस मोठी यात्रा भरते ), चिंचोली ( पाटोदा तालुक्यात थंड हवेचे ठिकाण,सर्वांत उंचावर (८८९ मी.), गहिनीनाथाचे मंदिर ), नवगण -राजूरी ( बीड तालुक्यात नऊ गणेशमूर्ती असलेले मंदिर) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे आहेत. [४२]

शहरातील खंडोबा मंदिरासमोरील उंच दीपमाळा प्रेक्षणीय आहेत. येथील शहेनशावली,बालाशाह इ. दर्गे प्रसिद्ध आहेत. नारायणगड हे उंच ठिकाण निसर्गसुंदर आहे. येथे विठ्ठल व महादेव यांची मंदिरे असून कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. येथील मंदिरे व समाध्या दगडी कामासाठी प्रसिद्ध आहेत. यांशिवाय बीडपासून ७ किमी. अंतरावरील वडवनी हे गाव हातमागावरील टेरिकॉटच्या कापडासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात या कापडास मोठ्या प्रमाणात मागणी असते.

बीड शहरातील ऐतिहासीक स्थान: बारादरी : सरदार सुलतानजी निंबाळकर यांचे निवासस्थान. निजामाने त्याचे रूपांतर न्यायालयात केले. मदरसे - फोकानिया : १०० वर्षांपूर्वी निजामाने सर्वात पहिल्या सरकारी शाळेचा पाया रचला. (नंतरची मल्टिपर्पज हायस्कूल) देशमुख यांची हवेली : बीडचे वतनदार सिद्धोजी नाराोजी देशमुख यांची१०० वर्षांपूर्वीची हवेली. जुनी तहसील : बहमनी कालखंडात या ठिकाणी टाकसाळ होती, असे मानले जाते. निजामाने या इमारतीचे रुपांतर रुग्णालयात केले. निजामाची सनद : खंडेश्वरीचे पुजारी बीडकर यांना निजामाने ही सनद दिल्याचा दावा बीडकर करतात. दीपमाळ : खंडेश्वरी मंदिराच्या परिसरातील ह्या दीपमाळ. अनेक वर्षांपासून ऊन वार्‍याला तोंड देत इतिहास मनात साठवत आहेत. बीडचे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी शहराच्या पूर्वेकडील बाजूस उभारलेल्या खंडोबा मंदिरापासून सहा फुट अंतरावर ७० फुट उंचीच्या दोन दीपमाळा उभारल्या. या दीपमाळीवर एकाच वेळी ४०० दिवे लावण्याची व्यवस्था आहे. खंडोबाचे मंदिर उभारण्यासाठी जहागीरदार निंबाळकर यांना मराठा सरदार महादजी शिंदे यांनी मदत केली होती. दीड एकराचा हा भाग असून त्यावर ही इमारत आहे. दहा बाय दहा फुट चौथरा असून चुन्याचे बांधकाम आहे. अतिशय नयनरम्य परिसरातील ही वास्तू आजही बीडच्या वैभवाची साक्ष देते. राज्यासह आंध्र, कर्नाटक आदी राज्यातून बीड जिल्ह्यात येणारे नागरिक या ठिकाणी आवर्जून येतात. जवळच खंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. नवरात्रात हा परिसर लक्ष दिव्यांच्या रांगोळीने उजळून निघतो. या दीपमाळीवर विविध देवतांची शिल्पे आहेत. पूर्वी दीपमाळेच्या टोकावर तुळशीवृंदावन होते ते भग्नावस्थेत आहे. रचना आठ कोनात असून प्रत्येक कोनाला एक खिडकी आहे. दीपमाळेवरुन पूर्ण बीड शहर दिसते.

शहरातील धार्मिक स्थळांचे स्वरूप शतकापूर्वी आज सारखे नव्हते. कंकालेश्वरचे खनकाह होते. दत्त मंदिर मात्र बीडच्या तरुण क्रांतिकारकांचे मुख्य स्थळ होते. असंख्य तरुण इथे व्यायामासाठी येत व राष्ट्रभक्तीवर चर्चा करीत. याच मंदिरात शहरातील पहिला सार्वजनिक गणपती बसवला. पुढे पुरुषोत्तमराव गोडसे यांनी त्या मंडळाचे नेतृत्त्व केले. निझामाच्या कचाट्यातून बीड मुक्त झाल्यावर भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल चौधरी यांचा सत्कार झाला होता. तो याच मंदिरात.. [४३]

बीड शहरात मुस्लिम बांधवा ईदगाह नाका, गरीब मस्जिद, कादरिया मस्जिद, ईदगाह इस्लामपुरा येथे सामूहिक नमाज अदा करण्यात येते. [४४]

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे संपादन

बीड जिल्ह्याला प्राचीन पार्श्वभूमी असून महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य दुसरा हा बीडचाच. काही संशोधक तो यवतमाळचा उसल्याचा सांगतात, मात्र ते चुकीचे आहे, कारण यवतमाळ जिल्ह्यातील पाटणी देवी मंदिरातील शिलालेखात स्पष्टपणे भास्काराचार्यांची वंशावळ नमूद केली असून कलिंदकन्या नदीच्या शेजारी त्याचे जन्मस्थान असल्याचे म्हटले आहे. ही कलिंदकन्या नदी म्हणजे आजची बिंदुसरा नदी होय. [४५] भारतीय संरक्षणमंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री व संसदीय कार्यमंत्री प्रमोद महाजन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आष्टी तालुक्यातील भाळवणी आजोळ होते. [४६]
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तसेच बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा, ता. परळी येथे झाला. [४७] [४८]
भाजप आमदार पंकजा पालवे-मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. [४९]
बीड लोकसभा मतदारसंघाचया माजी खासदार केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर
राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक शंकरबापू आपेगावकर
मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता मकरंद अनासपुरे
आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामने खेळलेला खेळाडू संजय बांगर
पत्रकार व मराठवाडा मित्रमंडळ संस्थास्थापक सदाशिव मार्तंड गर्गे
मराठी आस्वादक समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार विजय वसंतराव पाडळकर
संत-कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत
आद्यकवी मुकुंदराज
स्वामी रामानंदतीर्थ हैद्राबाद (मराठवाडा) मुक्ती संग्रामात स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली बीडची भूमिका महत्त्वाची होती.

मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेडनंतर अंबाजोगाई हे असे गाव होते की, जिथे विविध सामाजिक प्रo्नांवर आंदोलने उभी राहायची. हे आंदोलन पुढे संबंध मराठवाड्यात पसरायचे. अशा आंदोलनाून अनेक नेते व प्रकल्प मराठवाड्याला मिळाले. पूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया, डॉ. लक्ष्मणराव पन्हाळे, कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे, अमर हबीब, नरहरी कचरे, कॉ. काशिनाथ कापसे, अशोक गुंजाळ, अण्णा खंदारे, अरुण पुजारी, भगवानराव लोमटे, प्राचार्य भ. कि. सबनीस, नागोराव लोमटे, संभाजीराव जोगदंड आदींनी रुग्णालयाचा प्रश्न व जिल्हानिर्मितीबाबत आंदोलनाची हाक दिली. [५०]

  1. ब्भूतकाळ आणि वर्तमान
   आपला प्रदेश
   विहंगालोकन
   पुरातनकाल
   मोहोलेशे ते महाराष्ट्र
   अर्थव्यवस्था आणि उद्योग
   सहकारी चळवळ
   विज्ञान आणि तंत्रज्ञान
   शिक्षण
  1. सैर सपाटा
  अनोळखी पर्यटणस्थळे
  किल्ले
  धार्मीक ठिकाणे-मंदिरे
  1. सांस्कृतिक आसमंत
   धर्म आणि पंथ
   तीर्थक्षेत्रे
   विधी आणि संस्कार
   चालीरीती परंपरा
   प्राक्कालीन वाङ्‍मयीन अभिव्यक्ती
   आजकालचे वाङ्‍मय
   नाटक
   चित्रपट
   संगीत
  1. कलाक्षेत्रातील परंपरा
   दैनंदिन जीवनातील कला
   कारागिरी
   नाणी
   अलंकार
   वस्त्रे
   प्राचीन धातुमूर्ती
   लघुचित्रे
   आजकालची कला
  1. ऎतिहासिक स्मारके
   पाषाणगुहातील देवळे
   प्राचीन बांधकामे
   मध्ययुगीन स्मारके
   महत्त्वाची स्थळे
  1. सैर सपाटा
  2. साहित्य
  3. संस्कृती
  4. कला
  5. क्रीडा

प्रस्तावित आराखडा संपादन

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी बीड शहरातील दोन प्रकरणे सोडता सर्व भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. [५१]

बीड जिल्ह्यातील कापरखेडा (टेंभी) येथे १५0 एकर शासकीय जमीनवर विमानतळ उभारणीच्या हालचालींना आता वेग आला आहे. आराखडा सादर केला विमानतळासाठी ढेकणमोहा येथील गायरान जमीन व टेंभी परिसरातील शासकीय जमीनीचा पर्याय होता. यातील टेंभी-मुर्शदपूर परिसरातील जागा एअरपोर्ट अँथॉरिटीला पसंत पडली. येथे चार्टर, बोईंग, एटीआर क्षमतेचे विमान उतरण्यासाठी आवश्यक असे विमानतळ मंजूर योजना असेल. [५२]

बीडमध्ये सध्या कॉपीमुक्ती चळवळ चालू आहे. कॉपीमुक्ती चळवळीसाठी बीडमध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. या परिषदेने बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवले. त्यामुळे कॉपीमुक्ती चळवळीला यश आले.

बीडचा रथ हाकणार्‍या नेत्यांपुढे व अधिकार्‍यांपुढे ‘व्हिजन’बाबत चिंता आहे. या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, शिक्षण, कृषी, सिंचन, रोजगार, रस्ते, वीज अशा पायाभूत सुविधा, रेल्वेचे जाळे, विमानतळाचे प्रस्ताव, विविध शासकीय योजनांच्या गरजा, नवीन प्रकल्पाच्या गरजांचा अपेक्षित आराखडा आणि सद्यस्थिती याचा महत्त्वपूर्ण उल्लेख असतो. सद्यस्थितीतील उणिवांवरील चर्चेसह दहा वर्षात गाठावयाच्या उद्दिष्टांची चर्चा, दर दोन ते पाच वर्षांनी विकासाचे योग्य रितीने सिंहावलोकन व त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून जिल्ह्याला अपेक्षित असणारा निधींची मागणी आदी बाबींचा समावेश असतो. हा आराखडा प्रत्येक जिल्ह्याने तयार करून ठरावीक मुदतीमध्ये राज्य शासनाकडे सादर करावयाचा असतो. दहा वर्षात वाढती लोकसंख्या अपेक्षित धरून त्यांना आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा आणि त्यांच्या रोजगारांसाठी आवश्यक असणार्‍या विकासाची सांगड घालणारी उद्योगवृद्धी या बाबींचा आराखडा केला जातो. परंतु जिल्ह्यात याकडेच दुर्लक्ष केले गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. [५३]

  1. ^ http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-04-08-2012-c8998&ndate=2012-08-05&editionname=main. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.ibnlokmat.tv/showstory.php?id=281682. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-1-25-08-2012-bab8e&ndate=2012-08-26&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-1-12-08-2012-3ed83&ndate=2012-08-13&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-28-07-2012-5bde6&ndate=2012-07-29&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-24-06-2012-6a9ad&ndate=2012-06-25&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245914:2012-08-23-18-46-58&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ #पुनर्निर्देशन अहमदनगर जिल्हा
  12. ^ a b c http://abhishekdavidmanase.hpage.co.in/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87_90545147.html. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ http://www.lokprabha.com/20090116/utsav.htm. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/31122012/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-rr-patil-targets-raj-thackeray-in-beed-4204159-NOR.html?OTS2=. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/05012013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/07052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/14022013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/14022013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/28022013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/24042013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/13052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ http://www.loksatta.com/vruthanta-news/two-arrested-as-they-attacked-on-hanumanmaharaj-hadule-115560/. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/20052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  26. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/23052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=6185&Itemid=2. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ http://epunyanagari.com/epapermain.aspx?queryed=10. Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/10032013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/23052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  31. ^ http://www.marathwadaneta.com/top-news/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95.php. Missing or empty |title= (सहाय्य)
  32. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/23052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  33. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/23052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  34. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-06-08-2012-c69ba&ndate=2012-08-07&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  35. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/11032013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-1-25-06-2013-fa19b&ndate=2013-06-25&editionname=aurangabad. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  37. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/06072013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  38. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/20072013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  39. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-13-08-2012-09237&ndate=2012-08-14&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  40. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-06-08-2012-c69ba&ndate=2012-08-07&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  41. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/11032013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  42. ^ http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  43. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/31122012/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  44. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245233:2012-08-20-18-02-48&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  45. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/24042013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  46. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=246826:2012-08-28-18-48-24&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  47. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-8905615,prtpage-1.cms. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  48. ^ http://www.esakal.com/esakal/20110707/5124860828896443982.htm. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  49. ^ http://www.maha.marathiwebsites.com/node/2674. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  50. ^ http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/beed-zila/353/08052013/0/1/. Text " दिनांक " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  51. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-10-07-2012-f7507&ndate=2012-07-11&editionname=aurangabad. २९ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  52. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-09-05-2013-47550&ndate=2013-05-09&editionname=aurangabad. Missing or empty |title= (सहाय्य)
  53. ^ http://archive.is/DotjD. Archived from the original on १४ ऑगस्ट २०१४. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
"बीड जिल्हा" पानाकडे परत चला.