नेत्रा सदाशिव साठे (जन्म : ३१ मे १९३७; मृत्यू : कल्याण, २३ ऑगस्ट २०१४) या एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार होत्या. त्यांनी १९५५ मध्ये मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधून DTC आणि १९५९ मध्ये Painting Advance हे अभ्यासक्रम पुरे केले होते.

नेत्रा साठे यांचे वडील कृष्णराव केतकर हे स्मारक-शिल्पे बनवीत. शिल्पाकृतींची सरकारी कामे मिळविण्यासाठी त्यांना दिल्लीत राहणे गरजेचे होते. त्यांचा स्टुडिओ कल्याणमध्ये व फाउंडरी डोंबिवलीत होती.

नेत्राच्या आईने कन्येला संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, साहित्य या सगळ्यांचीच गोडी लावली. लग्नाअगोदर मुंबईत असताना नेत्रा संस्कृत नाटकांतून अभिनय करीत असत. अभिज्ञान शाकुंतल आणि मृच्छकटिकम्‌ या नाटकांतून त्यांनी दाजी भाटवडेकर यांच्या दिग्दर्शनाखाली अनुक्रमे प्रियंवदा व मदनिकेच्या भूमिका केल्या होत्या. त्याच्या रूपाची, भूमिकेची आणि अभिनयकौशल्याची तत्कालीन वृत्तपत्रांतून दखल घेतली गेली होती.

दिल्लीतील नाट्यविषयक कार्यक्रम संपादन

नेत्रा कृष्णराव केतकर, १९५६ साली लग्नानंतर नेत्रा सदाशिव साठे झाल्या. दिल्लीत राहणारे त्यांचे पती सदाशिव साठे हे मूळ कल्याणचे. कल्याणात त्यांचा ’साठे वाडा’ होता. ते स्वतः जागतिक कीर्तीचे शिल्पकार होते. त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन आणि प्रिन्स फिलिप यांची शिल्पे केली होती. लग्नानंतर दिल्लीत आल्यावर नेत्रा साठे यांनी दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळात स्वतःची विशेष ओळख करून दिली. त्यांनी मंडळासाठी नाटके लिहिली, नाटके बसवली आणि नाटकांतून कामंही केली. त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांतील ’एक बिचारी व्यथा’ ही विनोदी एकांकिका विशेष गाजली, तर ’नियती’ या गंभीर विषयावरील एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला होता.

दिल्लीच्या गणेशोत्सवासाठी नेत्रा साठेंनी ’सौभद्रकल्लोळ’ नावाची एकांकिका बसवली. सौभद्र आणि संशयकल्लोळ या नाटकांतील पदांवर आधारलेलीही व मुलांसाठी लिहिलेली ही नाटिका, त्यांतील नाट्यगीतांमुळे विशेष गाजली. या नाटिकेचे सुमारे ५ प्रयोग दिल्लीत झाले.

बालगंधर्वांना वाहिलेल्या एका श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात नेत्रा साठे यांनी तरुण वयातल्या बालगंधर्वांसारखी वेशभूषा करून बालगंधर्वांच्या लकबींसकट त्यांची नाट्यगीते प्रस्तुत केली होती. याशिवाय दिल्लीत असताना, ’धुम्मस’, घेतलं शिंगावर’, संभूसांच्या चाळीत’ आणि 'दिनूच्या सासूबाई राधाबाई' अशा रंगमंचावर सादर झालेल्या अनेक नाटकांमधून नेत्रा साठे यांनी प्रमुख पात्रांची कामे केली.

कल्याणला आगमन संपादन

पुढे काही कारणाने नेत्रा साठे महाराष्ट्रात कल्याणला स्थायिक झाल्या. येथे त्या ’कल्याण गायन समाज’ या संस्थेच्या प्रमुख झाल्या.

कल्याणात असताना नेत्रा साठे यांनी ’कांचनमृग’ या नावाच्या नृत्यनाटिकेचे आणि ’राणी रुसली राजावर’ व लग्नाला चला तुम्ही’ या वगांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. कल्याणमध्ये झालेल्या अंधायुग या नाटकातील गांधारीच्या भूमिकेसाठी त्यांना पारितोषिक मिळाले.

कोल्ड सिरॅमिक्सचा शोध संपादन

नेत्रा साठे यांनी १९७२ साली लावलेल्या कोल्ड सिरॅमिक्सच्या शोधाने त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. पेंटिंगसाठी पॉलिएस्टर रेझिनचा उपयोग करून पारदर्शक रंगचित्रे काढणाऱ्या त्या पहिल्या कलावंत ठरल्या. एरवी शिल्पात करावयाच्या या माध्यमाचा उपयोग चित्रांत केल्यामुळे नेत्रा साठे यांची चित्रे जणू जिवंत झाली, आणि त्यांना त्रिमितीचा गुण लाभला.

लेखन आणि इतर संपादन

  • अनेक एकांकिका आणि वग लिहिले, बसवले आणि रंगमंचावर सादर केले.
  • कांचनमृग, वसुंधरा या नृत्यनाटिकांचे लेखन, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शन आणि सादरीकरण. यांतली वसुंधरा ही नृत्यनाटिका बालकवींच्या पृथ्वीचे गीत या कवितेवर आधारित होती. नृत्यांगना मीना नेरूरकर यांनी या नाटिकेचे अमेरिकेत व भारतात अनेक प्रयोग केले. चतुरंग या संस्थेने ही नृत्यनाटिका हिंदीतही बसवली. वसुंधराचे १००हून अधिक प्रयोग झाले.
  • वर्तमानपत्रांतून कथा, ललित लेख, कविता आणि स्फुट लेखन. त्यांतील इंग्रजी लेखांचा संग्रह Palet या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे.
  • श्रीराम लागू यांच्या ’विष्णूगुप चाणक्य’ या नाटकातीला पात्रांची वेशभूषा संकल्पित केली.
  • नेत्रा साठे यांचा सई परांजपे यांच्या बरोबर दिल्ल्ली दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमात सहभाग असे.
  • दिल्लीच्या शाळेत कलाशिक्षकाचे काम केले.
  • घरी पेंटिगचे वर्ग घेतले.
  • मुंबई (ताज आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर), दिल्ली (अशोका हॉटेल, श्रीधरानी कलादालन), चेन्नई, मॉस्को, लंडन, न्यूयोर्क, वॉशिंग्टन, बाल्टिमोर, ब्रुसेल्स, डेट्रॉइट, हॉलंड, ॲटलांटा, ह्यूस्टन, बोस्टन आदी अनेक ठिकाणी स्वतःच्या चित्रांची ५५हून अधिक प्रदर्शने भरवली.
  • नेत्रा साठे यांनी सी.डी. देशमुख, स.का. पाटील, यशवंतराव चव्हाण, वेणूताई यशवंतराव चव्हाण, श्री.ना. पेंडसे, श्रीराम लागू, अशा अनेकांची पोर्ट्रेट्स रंगवली. त्यांनी बनवलेले आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सरन्यायाधीश नागेंद्र सिंगजी यांचे भव्य व्यक्तिचित्र हेग येथे लावले आहे. या शिवाय दिल्लीत परिचय केंद्रात जवाहरलाल नेहरू, कल्याण गायन समाजात पंडित भास्करबुवा बखले यांची तैलचित्रे लावली आहेत. नेत्रा साठे यांनी रंगविलेली सुधीर फडके, बडोद्याचे माधव आचवल, जळगावचे भंवरलाल जैन, मुंबईचे देवधर आदींची व्यक्तिचित्रेही गावोगावी बिंतींवर चिराजमान आहेत.

मृत्यू संपादन

अशा या कर्तबगार स्त्रीला २००७साली कर्करोग झाला. त्यातून त्या बऱ्याही झाल्या होत्या. पण असे असूनही वयाच्या ७७व्या वर्षी नेत्रा साठे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची कन्या अल्पना लेले या आहेत. त्या गोव्यात राहतात.

पुरस्कार संपादन

  • १९८० साली कल्याण नगरपालिकेने नेत्रा साठे यांना ’कल्याण गौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.


(अपूर्ण)