असीमा चॅटर्जी
असीमा चॅटर्जी (२३ सप्टेंबर, इ.स. १९१७ – २२ नोव्हेंबर, इ.स. २००६) या भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉक्टर होते. कोलकाता विद्यापीठातून असीमा चॅटर्जी यांनी इ.स. १९३८ साली सेंद्रीय रसायनशास्त्रात (ऑर्गनिक केमिस्ट्री) एम.एस्सी. पदवी घेतली. इ.स. १९४४ साली डॉ. पी.के. बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डी.एस्सी. झाल्या. भारतात कुठल्याही विद्यापीठात डॉक्टर ऑफ सायन्स होणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत.
असीमा चॅटर्जी यांनी रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे या विषयांवर चारशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील बरेचसे लेखन पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत केले गेले आहेत. यांचे मुख्य कार्यक्षेत्र कोलकाता हेच राहिले.
जीवनसंपादन करा
असीमा चॅटर्जी यांचे लग्न प्रख्यात फिजिकल केमिस्ट आणि बेंगॉल इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य वरदानंद चॅटर्जी यांच्याशी झाले होते. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच इतर ज्येष्ठ संशोधकांच्या प्रोत्साहनामुळेच हे कार्य करणे त्यांना शक्य झाले असे त्या मानत.
आंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधनसंपादन करा
- इ.स. १९४७ एल. एस. मार्कस विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी अमेरिकेची संयुक्त संस्थाने) विषय - निसर्गात आढळणारे ग्लुकोजयुक्त पदार्थ यांवर संशोधन.
- इ.स. १९४८ ते इ.स. १९४९ कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी पासारिना, अमेरिका येथे ‘अ-जीवनसत्त्व व इतर जीवनसत्त्वे यांचे प्राथमिक स्वरूपातील पदार्थ’ या विषयात एल. झेशमेस्टर यांच्याबरोबर संशोधन केले.
- इ.स. १९४९ एन. एल. युनिव्हर्सिटी ऑफ झुरिच येथे ‘प्राणिजगतात अल्कली परिणाम देणारे कार्यक्षम घटक’ हा विषय त्यांनी अभ्यासला.
कारकीर्दसंपादन करा
इ.स. १९५० साली भारतात परत येऊन असीमा चॅटर्जी यांनी भारतातील औषधी वनस्पती, विशेषतः त्यातील अल्कली व कुमारिन घटक यांच्या संदर्भात अभ्यास केला. कुमारिन हे रक्तातील गुठळीप्रतिबंधक द्रव्य आहे. हे हळदी मध्ये असते. इ.स. १९५४ साली त्या कोलकाता युनिव्हर्सिटीत प्रपाठक नेमल्या गेल्या. इ.स. १९६२ मध्ये त्यांना ‘खैरा- प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री’ हे अत्यंत मानाचे अध्यासनपद मिळाले. संपूर्ण भारतात विद्यापीठातले अध्यासन भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत.
विशेष योगदानसंपादन करा
- असीमा चॅटर्जी यांनी इ.स. १९८५मध्ये ‘सेंटर ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज् ऑन नॅचरल प्रॉडक्ट्स’ ही संस्था स्थापन केली. ही संस्था निसर्गात आढळणाऱ्या पदार्थांचा रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करते. यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स कमिशनकडून सहकार्य मिळवले होते.
- त्यांनी कलकत्ता येथे सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन् आयुर्वेद ह्या संस्थेची व केंद्र व राज्य शासन या दोहोंच्या सहकार्याने सॉल्ट लेक सिटीची स्थापना केली..
पेटंटसंपादन करा
- फेफरे, अपस्मार यांवर इलाज करणारे आयुर्वेदिक औषध ‘आयुष- ५६’ हे मार्सिली मिनाटा (इंग्रजी: Marsilie Minata) या वनस्पतीतून शोधले.
- मलेरिया प्रतिबंधक औषध अल्स्टोनिया स्कोरिस (इंग्रजी: Alstonia Schoris),स्विर्शिया शिराता (इंग्रजी: Swrrtia Chirata), पिक्रॉप्मिझा कुरोआ(Picropmiza Kurroa) आणि सीसक्लिपिना क्रिस्टा (इंग्रजी: Ceasclpinna Crista) या वनस्पतींपासून शोधून काढले.
ही औषधे आजही विकली जात आहेत.
साहित्य संपादनसंपादन करा
कोलकाता युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेले सहा खंडात्मक ‘भारतोद्भव वनौषधी’- ‘भारतात उगवणाऱ्या औषधी वनस्पती’ हे पुस्तक त्यांनी सुधारून संपादित केले. तसेच ट्रीटाइज ऑफ इंडियन मेडिसिनल प्लॅंट्स (इंग्रजी : Treatise of Indian Medicinal Plants) या कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या सहा खंडात्मक प्रकाशनाच्याही त्या प्रमुख संपादक होत्या.
पुरस्कारसंपादन करा
- इ.स. १९६० भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, नवी दिल्लीच्या फेलो म्हणून निवड
- इ.स. १९६१ शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार रसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
- इ.स. १९७५ पद्मभूषण पुरस्कार - विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी
- इ.स. १९८२ इ.स. १९९० राष्ट्रपतींतर्फे राज्यसभेच्या सभासद म्हणून नियुक्ती
- इ.स. २०१७ २३ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गूगलने २४ तास गूगल डूडल दाखवले.