फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ (एप्रिल ३, १९१४ - जून २७, २००८) भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.

सॅम माणेकशॉ

सुरुवातीची वर्षे संपादन

माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी देहरादून येथे असलेल्या भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली.

माणेकशॉनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.

ब्रिटीश भारतीय लष्कर व दुसरे महायुद्ध संपादन

माणेक्षा यांचे भारतीय सैन्यातील आयुष्य हे चाळीस वर्षांचे असून, दुसऱ्या महायुद्धापासून ते भारताच्या तीन चीन व पाकिस्तान विरुद्ध युधांपर्यंत होते.दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल.एम.जी.च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी माणेकशॉना वाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.

१९७१ चे भारत-पाक युद्ध संपादन

७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली.

या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.

  • १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर घडलेला एक किस्सा

१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकच्या लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्लाखान नियाझी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली आणि बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. अर्थातच यानंतर युद्धात पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. या छावण्यांमध्ये युद्धकैद्यांची नीट काळजी घेत असली जात असे, युद्धकैद्यांना नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या जात असत, भारतीय जवानांना मिळणाऱ्या रेशन एवढंच रेशन मिळत असे. तर मुस्लिम सणांच्या दिवशी ज्यादा धान्य दिले जात असे. पण तरीही कैद्यांना छावण्यांमध्ये कुठल्याही सोयीसवलती दिल्या जात नाही व अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा खोटा प्रचार पाकिस्तानतर्फे करण्यात आला. एकदा पाकचे लष्करप्रमुख जनरल टिकाखान यांच्याशी चर्चा करण्यास माणेकशॉ लाहोरला गेले होते. लाहोरच्या गव्हर्नरने माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली होती. भोजनानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी माणेकशॉ यांची भेट घेतली. माणेकशॉ प्रत्येकाशी बोलत-हस्तांदोलन करत पुढे जात होते. अचानक त्यांच्यापैकी एका कर्मचाऱ्याने आपल्या डोक्यावरचा फेटा काढून त्यांच्या पायावर ठेवला. माणेकशांनी त्याला तसं करण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला-

“ सर, तुम्ही होतात म्हणून आम्ही जिवंत राहिलो. माझी पाचही मुलं सैन्यात आहेत आणि ते सगळे सध्या तुमचे कैदी आहेत. ते नेहमी मला पत्र लिहून तिथली स्थिती कळवत असतात. तुम्ही त्यांना कुराण दिले आहे, आमचे सैनिक बराकीत राहत असताना तुमच्या जवानांना तंबूत राहावं लागत आहे, हे आम्हाला माहीत आहे. हिंदू वाईट आहेत जर कोणी मला सांगितलं तर मी आता त्यावर विश्वास ठेवणार नाही” [१]

निवृती नंतर संपादन

माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. जानेवारी १५ १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.

माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता न्युमोनियाच्या दीर्घ दुखण्याने निधन झाले.

संदर्भ संपादन

संदर्भसूची संपादन

[१]

  1. ^ दातार, भगवान. फील्ड मार्शल सॅम माणेकशा भारतीय लष्कराचा मानबिंदू.