स्वागत शिवांगी महाजन, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन शिवांगी महाजन, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१६७ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १७:१४, १२ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply


चर्चा:रामचंद्र गणेश बोरवणकर येथे आपण उपलब्ध केलेल्या माहितीची दखल घेऊन रामचंद्र गणेश बोरवणकर लेख अद्ययावत केला आहे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:००, २९ मार्च २०१५ (IST)Reply

श्री.जनार्दन सखाराम करंदीकर संपादन

श्री.जनार्दन सखाराम करंदीकर केसरीचे दीर्घकाळ संपादक होते. ते केसरी-मराठी ह्या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त होते. त्यांचे व जनार्दन विनायक ओकांचे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध होते. ओकांच्या पश्चात् ओकांनी स्थापन केलेल्या 'लोकशिक्षण' ह्या मासिकाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ते मासिक चालू ठेवण्याचा कसोशीचा प्रयत्न करंदीकर ह्यांनी केला होता. त्यांनी ओकांच्या मृत्युनंतर त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा मृत्युलेख 'लोकशिक्षणा'त लिहिला होता. तो मृत्युलेख खाली उद्घृत केला आहे. त्यावरून ओक ही व्यक्ति आणि तिचे कर्तृत्व ह्यांची वाचकांना चांगलीच ओळख होते.


एक अडचण: आपण येथे टंकलेला जनार्दन सखाराम करंदीकर यांनी लिहिलेला मृत्युलेखास उत्तम संदर्भमुल्य आहे. त्या लेखाचे संदर्भ देऊन नक्कीच लेखन करूयात. अर्थात तो मृत्युलेख किंवा जनार्दन सखाराम करंदीकर यांचे कोणतेही साहित्य आंतरजालावर अथवा इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी जनार्दन सखाराम करंदीकर यांच्या लेखनावर १९५९ हे करंदीकरांचे मृत्यूवर्ष लक्षात घेता १ जानेवारी २०२० पर्यंत कॉपीराइट असणे अभिप्रेत आहे आणि १जानेवारी २०२०च्या आधी प्रकाशीत करण्यासाठी जनार्दन सखाराम करंदीकर यांच्या साहित्यावरील कॉपीराइट ज्या कुणा वंशजाकडे आहेत अथवा कॉपीराइट जनार्दन सखाराम करंदीकर यांनी कुणास बहाल केले असल्यास त्यांची लिखीत अनुमती असणे अभिप्रेत आहे.


सदर मृत्युलेख आपण आपल्या व्यक्तीगत संगणकावर संशोधनासाठी संदर्भ उधृत करण्यासाठी जतन करून ठेऊ शकता. बाय द वे अजून एक पृच्छा आहे या मृत्यूलेखाची प्रकाशनाची तत्कालीन तारीख काय होती ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:०५, १३ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

द्वारकाबाई ओक संपादन

द्वारकाबाई ओक (??-७ जानेवारी १९९८)

द्वारकाबाई ओक ह्या गीर्वाणलघुकोशकार जनार्दन विनायक ओकांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. विवाहोत्तर त्यांचे नाव सरस्वतीबाई आपटे असे होते. त्या ३ ई रोड, जमशेदपूर, बिहार येथे राहत होत्या. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे मामा ती. प्राध्यापक शंकर नागनाथ गोडबोले (नागपूर) ह्यांनी त्यांचा सर्वतोपरी सांभाळ केला. द्वारकाबाई त्यांना बाबा ह्या नावाने संबोधित असत.

गीर्वाणलघुकोश १९१५ साली प्रसिद्ध झाला. प्रथमपासूनच कोशाला मागणी होती पण पहिली आवृत्ति संपण्यास १९५१ साल उजाडले. ह्या अवधीत अनेक स्थित्यंतरे झाली अाणि ग्रंथांची मूल्ये कोठल्या कोठे वाढली. असे असूनही कोशाच्या उरलेल्या प्रती द्वारकाबाईंनी मूळ किंमतीलाच म्हणजेच चार रुपयाला विकल्या. प्रथम आवृत्ति संपल्यानंतर कोशाची दुसरी आवृत्ति काढणे आवश्यक होते. पण कोशासारख्या ग्रंथाच्या मुद्रणाचे कार्य महाराष्ट्राबाहेर शेकडों कोसावर राहून कसे व्हावयाचे ह्याची त्यांना मोठी विवंचना होती. पण ती.बाबांनी ह्या कार्यात पुढाकार घेतला व त्यांच्या साहाय्याने द्वारकाबाईंनी कोशाची १९५५ साली दुसरी आवृत्ति काढली. परंतु ह्या आवृत्तीत दोष अाढळून आल्यामुळे ती सर्व आवृत्ति मागे घेण्यात आली. म्हणून संशोधन करून अाणि नवीन जुळणी करून १९६० साली तिसरी आवृत्ति प्रकाशीत करण्यात आली. दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्तीला द्वारकाबाईंनी विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. तिसऱ्या आवृत्तीला ज्यांची मदत झाली त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

प्रा.शंकर नागनाथ गोडबोले (द्वारकाबाई ओक ह्यांचे मामा)

श्री.सीताराम चिंतामण तथा अप्पासाहेब जोशी (अॅडव्होकेट, हायकोर्ट, मुंबई)

श्री.वि.बा.दीक्षित (इंटरनॅशनल बुक सर्व्हिस)

श्री.व.भि.मंडपे (नागपूरच्या हायकोर्टाचे प्रसिद्ध अॅडव्होकेट)

श्री.लक्ष्मण रामचंद्र कुलकर्णी (नागपूरचे संस्कृत, पाली व प्राकृत भाषांचे प्राध्यापक)

श्री.दिनकरपंत चितळे (आॅल इंडिया रिपोर्टर लि., नागपूर ह्या संस्थेचे एक वरिष्ठ अधिकारी)

मराठीतून सर्व शिक्षण दिले जावे ह्या अभिमानाने झीज सोसून ज.वि.ओकांनी कोशाच्या प्रकाशनाचे धाडस एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केले. तीच परंपरा द्वारकाबाईंनी आपल्या परीने चालू ठेविली. गीर्वाणलघुकोश हा मौलिक ग्रंथ त्यांच्या परिश्रमांमुळे आज उपलब्ध आहे. ह्याकरिता महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणाइत राहील.

श्री.जनार्दन विनायक ओक संपादन

श्री.जनार्दन विनायक ओक

गीर्वाणलघुकोश ह्या संस्कृत-मराठी शब्दकोशाचे कर्ते, डेक्कन कॉलेज मधील फेलो, फर्ग्युसन कॉलेजातील अध्यापक, नागपूरच्या नील सिटी स्कूलचे सुपरिंटेंडेंट व तेथील कॉलेजातील अध्यापक, समर्थ विद्यालयातील शिक्षक, महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे चिटनीस, 'लोकशिक्षण' मासिकाचे संपादक.

त्यांच्या कार्यातून त्यांची संशोधक वृत्ति, तर्कशुद्ध विचारसरणी व ध्येयासक्ति दिसून येते. मातृभाषेतून शिक्षण देण्याविषयी ते आग्रही होते. स्वातंत्र्य हे प्रगतीचे मूळ आहे. शिक्षणस्वातंत्र्य असेल तरच शिक्षक योग्य प्रकारे विद्यार्थांस ज्ञानदान करु शकतो असे त्यांचे मत होते.


गीर्वाणलघुकोशापूर्वी झालेले संस्कृत-मराठी कोश :

१. अनंतशास्त्री तळेकर (शके १७७५, सन १८५३)

२. माधव चंद्रोबा ह्यांचा 'शब्दरत्नाकर' (पानें ७००, शके १७९२, सन १८७०, मूल्य १४ रुपये)

३. नारो आप्पाजी गोडबोले व गोपाळ जिवाजी केळकर (पानें ५००, शके १८७२, मूल्य ६ रुपये)

४. वासुदेव गोविंद अापटे


गीर्वाणलघुकोशापूर्वी झालेले संस्कृत-इंग्रजी कोश :

१. वामन शिवराम आपटे

२. मोनिअर विल्यम्स

३. वैद्य


प्राचीन संस्कृत-संस्कृत कोश :

१. अमरकोश

२. वाचस्पत्य

३. शब्दकल्पद्रुम

मेदिनी, हेमचंद्र, तारानाथ (?)


गीर्वाणलघुकोशाची सविस्तर माहिती खाली दिली आहे. हा ग्रंथ कृष्णाजी गोविंद ओक ह्यांना अर्पण केला आहे. ग्रंथात त्यांचे छायाचित्र सुद्धा देण्यात आले आहे.

पहिली आवृत्ति १९१५ प्रस्तावना - श्री.जनार्दन विनायक ओक मूल्य - ४ रुपये

दुसरी आवृत्ति १९५५ प्रस्तावना व प्रकाशक - द्वारकाबाई ओक तथा सरस्वतीबाई आपटे मूल्य - १२ रुपये

तिसरी आवृत्ति १९६० पृष्ठसंख्य़ा (प्रास्ताविक + संहिता + [परिशिष्टें + शुद्धिपत्र]) ३७ + ६३८ + २० प्रस्तावना व प्रकाशक - द्वारकाबाई ओक तथा सरस्वतीबाई आपटे मूल्य - १६ रुपये

चौथी आवृत्ति २००२ पृष्ठसंख्य़ा (प्रास्ताविक + संहिता + परिशिष्टें) ५७ + ६३८ + १७ प्रस्तावना - सुहास गजानन आपटे, १०३९ सदासिव पेठ, पुणे ४११०३० प्रकाशक - आनंद लाटकर, कॉम्प प्रिंट कल्पना प्रा.लि., पुणे ४११०३० मूल्य - २५० रुपये


कोशकार्यात ओकांना सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावे :

रघुनाथ कृष्ण पाटणकर

नारायण रामचंद्र पाटणकर (रघुनाथ पाटणकर ह्यांचे पुतणे)

वि.गो.विजापूरकर

नारायणशास्त्री मराठे

दत्तात्रेय वासुदेवशास्त्री निगुडकर (संस्कृत पाठशाळेचे गुरु)

भास्करशास्त्री सोमण

राजाराम दामोदर देसाई

परशुराम गणेश जोग (नागपूरचे ठेकेदार)

रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर (मोरोपंतकाव्यग्रंथप्रकाशक व 'धि प्रिंटिंग एजन्सी'चे मालक)


कोशाची अनुक्रमाणिका

१. नामकोश २. धातुकोश ३. विशेषनाम कोश ४. परिशिष्ट पहिले : न्याय ५. परिशिष्ट दुसरे : अलंकार ६. परिशिष्ट तिसरे : वृत्तें ७. परिशिष्ट चौथे : ज्योतिष (ह्यात राशी (१२), नक्षत्रें (२७), योग (२७), करणें (११) व संवत्सर (६०) ह्यांची नावे दिली आहेत.)


कोशात खालील विषयांवरील शब्दांचा समावेश केला आहे.

गणित, ज्योतिष, तंत्रशास्त्र, नाट्यशास्त्र, न्याय, मीमांसा, योगशास्त्र, राजनीति, वनस्पति, वेदांत, वैद्यक, व्यवहार (न्यायनिर्णय), व्याकरण, श्रौत, संगीत, साहित्यशास्त्र, सांख्य.


गीर्वाणलघुकोशाची ठळक वैशिष्ट्यें खाली दिली आहेत.

१. शब्दांचे अनेक अर्थ व त्यांचे संदर्भ :

संस्कृत भाषेत एकच शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. कोशात प्रत्येक शब्दाचे सर्व अर्थ संदर्भग्रंथांसहित दिले आहेत.

ज्या ग्रंथांतील शब्द व त्यांचे संदर्भ ह्या कोशात आहेत त्या ग्रंथांची यादी खाली दिली आहे.

अध्यात्मरामायण, अमरुशतक, अर्नघराघव, आनंदलहरी, ईशावास्योपनिषद्, उपनिषद्, उत्तरामचरितम्, ऋग्वेद, ऋतुसंहार, एेतरेय ब्राह्मण, कठोपनिषद्, कादंबरी, कात्यायन गृह्यसूत्रें, काव्यप्रकाश, किरातार्जुनीय, कीर्तिकौमुदी, कुमारसंभव, केनोपनिषद्, कौषीतकीय ब्राह्मण, भगवद्गीता, गीतगोविंद, चाणक्यशतक, छांग्योपनिषद्, जाबालोपनिषद्, तैत्तिरीयोपनिषद्, तर्कसंग्रह, तांड्यब्राह्मण, दशकुमारचरित, देवीपुराण, देवपूजा, नलोदय, नारायणोपनिषद्, नारदस्मृति, नीतिशतक, नैषद, पंचतंत्र, पंचदशी, पाणिनीय अष्टाध्यायी, पातंजलसूत्रें, पुरुषसूक्त, पूजामंत्र, प्रश्नोपनिषद्, प्रबोधचंद्रिका, प्रसन्नराघव, बृहदारण्यकोपनिषद्, ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, ब्रह्मसूत्रें, भट्टिकाव्य, भागवत, भाषापरिच्छेद, भामिनीविलास, मनुस्मृति, महाभारत, महावीरचरित, मालतीमाधव, मांडक्योपनिषद्, मार्कंडेयपुराण, मालविकाग्निमित्र, मिताक्षरा, मीमांसा, मुद्राराक्षस, मुण्ङकोपनिषद्, मृच्छकटिक, मेघदूत, मोहमुद्गर, याज्ञवल्क्यस्मृति, रघुवंश, रसगंगाधर, रत्नावली, राजतरंगिनी, लीलावती, वासवदत्ता, वायुपुराण, वाल्मीकिरामायण, विक्रमोर्वशीय, विश्वगुणादर्शचंपू, विक्रमांकदेवचरित, विष्णुस्मृति, वेदांतपरिभाषा, वेणीसंहार, वेदांतसार, वैराग्यशतक, शतश्लोकी, शतपथब्राह्मण, शाकुंतल, शांकरभाष्य, शांतिशतक, शिशुपालवध, पाणिनीय शिक्षा, शुक्रनीति, श्वेताश्वतरोपनिषद्, साहित्यदर्पण, सिद्धांतकौमुदी, सुश्रुत, सुभाषित, आनंदलहरीस्तोत्र, गणेशाष्टकस्तोत्र, गंगालहरीस्तोत्र, चर्पटपंजरीस्तोत्र, दीनबंध्वष्टकस्तोत्र, देव्यपराधक्षमापनस्तोत्र, द्वादशपंजरिकास्तोत्र, धनाष्टकस्तोत्र, नारायणस्तोत्र, ब्रह्मदेवकृतरामस्तुति, श्रीमद्भगवच्छरणस्तोत्र, मंगलस्तोत्र, शिवमानसपूजास्तोत्र, मुकुंदमालास्तोत्र, रामरक्षास्तोत्र, श्रीमदच्युताष्टकस्तोत्र, लक्ष्मीलहरीस्तोत्र, लक्ष्मीनृसिंहस्तोत्र, विष्णुपादादिकेशांतवर्णन, विष्णुमहिम्नस्तोत्र, श्रीदेवव्यासाष्टकस्तोत्र, शंकराष्टकस्तोत्र, साधनपंचकस्तोत्र, स्मृति, हर्षचरित, हरिवंश, हितोपदेश.

ह्या लांबलचक यादीवरून कोशाच्या व्यापकतेची कल्पना येतेच, शिवाय ओकांच्या मतानुसार संस्कृत भाषेतले महत्त्वाचे ग्रंथ कोणते हे पण समजते.

२. गणिती शब्दक्रम

कोशात 'क्षेत्र' व 'ज्ञान' असे सामान्य शब्द चटकन सापडले नाहीत तर आश्चर्य होऊ नये. कारण 'ह' ह्या वर्णावरच कोश समाप्त होतो. 'ळ' ने सुरु होणारे शब्द संस्कृतात नाही पण 'क्ष' व 'ज्ञ' चे काय? क्ष = क् + ष हे जोडाक्षर असल्यामुळे त्याचा 'क'च्या वर्णयादीत समावेश केला आहे! तर 'ज्ञ' चा वर्णक्रम त्यांनी 'जो' नंतर लावला आहे! 'जोष्य' ह्या शब्दानंतर 'ज्ञ' ने सुरु होणारे सर्व शब्द दिले आहेत व त्यानंतर 'ज्या' हा शब्द दिला आहे. सारांश 'ज्ञ'चा अंतर्भाव त्यांनी 'ज'च्या वर्णयादीत केला आहे.

वर्णक्रम नेहमीचा घेतला आहे :

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ॡ, ए, ऐ, ओ, औ, क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह

प्रत्येक शब्द हा वर्णांनी तयार झालेला असतो. उदा.

काल = क् + आ + ल् + अ,

क्रतु = क् + र् + अ + त् + उ.

दोन्ही शब्दांचा पहिला वर्ण 'क्' आहे पण दुसरा वर्ण भिन्न आहे. वर्णक्रमात 'आ' आधी व 'र्' नंतर असल्यामुळे 'काल' हा शब्द आधी व 'क्रतु' हा शब्द नंतर येणार.

आता अनुस्वारांचा विचार करू या. कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग ह्या वर्गांतल्या अक्षरांपूर्वीच्या अनुस्वारांचे त्या त्या वर्गाचे अनुनासिक होतात. उदा.

अंग = अ + ङ् + ग् + अ,

दंड = द् + अ + ण् + ड् + अ.

हे जाणून क्रम लावला आहे. उदा. 'अघोर' मग 'अंग' मग 'अजय' येतो. 'य' ते 'ह' ह्यांच्या पूर्वीचे अनुस्वार येतील तेथे मात्र तो शब्द सर्वांच्या आधी घातला आहे. उदा. 'वंश' मग 'वक्र' मग 'वंग' येतो.

शब्दक्रम दर्शविताना आपण < हे चिह्न वापरुया. वरील उदाहरणे ह्या चिह्नलिपीत पुनः खाली दिली आहेत.

अघोर < अंग < अजय

वंश < वक्र < वंग

आणखी काही वेचक उदाहरणें खाली दिली आहेत.

यजुस् < यज्ञ < यज्ञीय < यज्य

रक्त < रक्षक < रक्षा < रंक

लक < लक्ष < लक्ष्मी < लगुड

वीक < वीक्ष < वीचि

वृद्धि < वृंद < वृष

संजीवन < संज्ञ < संज्वर

सारांश 'ज्ञान'सारखे शब्द शोधण्यापासूनच हा कोश आपल्याला 'सज्ञान' करत जातो. इतका काटेकोर गणिती शब्दक्रम लावणारा हा पहिला (व कदाचित् शेवटचाही) कोश आहे. ह्या शब्दक्रमाला 'ओकशब्दक्रम' असे संबोधायला हरकत नाही.

३. सामासिक शब्द दर्शविण्याची पद्धति

समासाची खूण आडवी रेघ ही वापरली आहे. सामासिक शब्द हा मूळ शब्दाला आडव्या रेघेनंतरचा शब्द लावून तयार करायचा आहे. पोटसमास असतील तेथे पोकळ शून्य जोडशब्दापूर्वी ठेविले आहे.

उदा. अंतराग्निः, अंतःकरणं, अंतःपुरं, अंतःपुरचरः, अंतःप्रकृतिः, अंतःप्रकृतिप्रकोपः, अंतर्भावः हे शब्द कोशात खालीलप्रमाणे दिले आहेत.

अंतर्

 - अग्निः
 - करणं
 - पुरं 
     o चरः
 - प्रकृतिः
 
     o प्रकोपः 
 - भावः

४. असीमित शब्दसंख्येचा प्रश्न

संस्कृत भाषेतल्या शब्दांची संख्या सीमित नाही हे तिचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. ह्याचे कारण असे की सिद्ध झालेल्या शब्दांपासून नवीन शब्द सिद्ध करणारी अनेक कार्ये पाणिनीने सांगितली आहेत. उदा. द्वंद्व समासाचा प्रयोग करून शब्दातली अक्षरसंख्या कितीही वाढविता येते. त्यामुळे कोशात नेमके कोणते शब्द समाविष्ट करायचे हा कोशकारापुढे एक यक्षप्रश्न आहे. ओकांनी ह्या समस्येवर विस्तृत विवेचन केले आहे. मुख्य म्हणजे त्यांनी आपला वाचकवर्ग निश्चित केला आहे - तो म्हणजे सामान्य संस्कृत व्याकरण शिकलेले विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांना अवश्य वाचनीय असे जे ग्रंथ ते वाचताना विशेष उपयोग व्हावा ह्या निकषावर त्यांनी शब्दांची निवड केली आहे. नञ् समास सर्व द्यावयाचे म्हटल्यास तोच कोश नञ् लावून पुनः लिहावा लागेल अशी एक मार्मिक टिप्पणी सुद्धा ते करतात.

४. शब्दाचा नेमका अर्थ ठरविणे

ओकांनी ह्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. निरनिराळ्या ग्रंथांवर निरनिराळे टीकाकार असतात, प्रत्येकजण आपआपल्यापरी अर्थ करतो. त्यातून योग्य अर्थ निवडणे बऱ्याच त्रासाचे काम असते. ह्याशिवाय कोशांमधूनहि अनेक मतभेद असतात. पाठभेद आणि लेखकप्रमाद किंवा लेखकप्रमादाने झालेले पाठभेद वगैरेंचा निर्णय करून अर्थ ठरविणे फारच कठिण असते. ह्याची ५ उदाहरणे ओक देतात.

स्मार्त, सुराध्वजः, साधिका, संज्ञम्, अकर्दमम्

५. अल्प मूल्य

ज्ञान हे मुक्त असले पाहिजे. गीर्वाणलघुकोश अधिकाधिक लोकांना उपलब्ध व्हावा म्हणून त्याचे मूल्य कमीतकमी ठेविण्यात आले. नारो आप्पाजी गोडबोले व गोपाळ जिवाजी केळकर ह्यांच्या कोशात अनेक त्रुटि असून त्याची किंमत ६ रुपये आहे ह्यावर ओक टीका करतात. त्याकाळी संगणकासारखी साधने असती तर ओकांनी तो संकेतस्थळावर विनामूल्यच सर्वांना उपलब्ध करून दिला असता ह्यात काय संशय!


श्री.जनार्दन विनायक ओकांच्या सतत तीन वर्षांच्या परिश्रमानंतर शके १८३७ माघ वद्य नवमीला कोशाचे प्रकाशन झाले. त्यानंतर थोड्याच अवधीत त्यांच्यावर मृत्यूचा घाला पडला आणि सर्व कुटुंबाची वाताहात झाली. सात आठ दिवस ज्वर येऊन ते आजारी होते. त्यांचा मृत्यु २२ एप्रिल १९१८ ला रात्री साडे आठ वाजता झाला. केसरीचे मंगळवार दि.२३ एप्रिल १९१८ च्या अंकातले स्फुट खाली दिले आहे.

'आह्मांस कळविण्यास अतिशय दुःख वाटते की रा.जनार्दन विनायक ओक, एम.ए. यांस सात आठ दिवस ज्वर येऊन काल रात्री देवाज्ञा झाली. डेक्कन कॉलेज मधील फेलो, फर्ग्युसन कॉलेजातील प्रोफेसर, नागपूरच्या नील सिटी सिकूलचे सुपरिंटेंडेंट व तेथील कॉलेजातील प्रोफेसर, समर्थ विद्यालयातील शिक्षक, महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे चिटनीस, 'लोकशिक्षण' मासिकाचे संपादक, गीर्वाण लघुकोश कर्ते, अशा अनेक नात्याने महाराष्ट्रीयांशी रा.ओक ह्यांचा संबंध जडला असल्यामुळे त्यांच्या मृत्युची हृदयद्रावक वार्ता एेकून महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ वाटेल. रा.नाना ओक विद्यार्थिदशेत अत्यंत बुद्धिवान म्हणून नावाजलेले असून त्यांनी आपल्या अद्भूत ग्रहणशक्तीने प्रि.सेल्वी सारख्यासही चकित केले होते. त्यांची शिक्षणाची पद्धति अतिशय टापटिपीची आणि व्यवस्थित असल्याने विद्यार्थिवर्गास ते फार प्रिय असत. त्यांचा स्वभाव अत्यंत करारी व मानी होता. राष्ट्रीय शिक्षणाचे ते कट्टे अभिमानी असल्याने महान स्वार्थ त्याग करून ते समर्थ विद्यालयास येऊन मिळाले होते आणि ते विद्यालय बंद झाल्यावर त्यांनी लोकशिक्षण कार्यालयाद्वारा अनेक पुस्तकें प्रसिद्ध करून महाराष्ट्र सारस्वताची आजन्म सेवा केली. विद्यार्थिदशेत त्यांची प्रकृति नावाजण्याजोगी सुदृढ होती. परंतु ती एकाएकी ढासळून अलिकडे ते फार अशक्त झाले होते. तथापि त्यांचा असा अंत होईल अशी कल्पना नव्हती. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील एक अत्यंत करारी देशभक्त हरपला. त्यांच्या पश्चात् त्यांची वृद्ध मातोश्री, अल्पवयी तृतीय पत्नी व अज्ञान मुलगी आहे. त्यांच्या अपार दुःखाची कल्पना करणेही असह्य आहे.'


नील सिटी स्कूलची नोकरी का सोडली? ह्या संबंधात खुद्द नानांच्या हातचाच जो लेख ता.३ डिसेंबर १९०७च्या केसरीत प्रसिद्ध झाला होता तो खाली दिला आहे.

आता चारशे रुपये पगाराची जागा रुजू झाल्यापासून १०-१२ महिन्यांचे आतच मी का सोडली, ह्याबद्दल पुष्कळांना गूढ पडेल ह्यात संशय नाही. म्हणून त्याची कारणें प्रसिद्ध करणे जरूर दिसते. ह्याबद्दल सविस्तर खुलासा करू लागलो तर पत्रविस्तार फार होईल म्हणून दोनतीन मुख्य मुद्द्यांचा मात्र उल्लेख मी आज करणार आहे. पहिली गोष्ट अशी की, मी ज्या उद्देशाने ह्या नोकरीबद्दल खटपट केली तो उद्देश सिद्धिस जाण्याची मला बिलकूल आशा दिसत नाही. इकडील युनिव्हर्सिटी, शाळाखाते, पुस्तकें, अभ्यासक्रम, शिक्षक, विद्यार्थीवर्ग, लोकांची मानसिक स्थिति, येथील शाळेच्या व्यवस्थापक मंडळीची रचना व तिचा सरकारशी संबंध, वगैरे अनेक गोष्टींचे गेल्या १०-१२ महिन्यांत मी बारकाईने अवलोकन केले आहे. त्यावरून हल्लीच्याच स्थितीत व ह्याच नोकरीत राहून माझे शिक्षणविषयक हेतु सिद्धीस जाणे अशक्य आहे, अशी माझी खात्री झाली आहे. तेव्हा मूळ उद्देश जर साध्य होत नाही, तर निव्वळ पैशाच्या लोभामुळे तशीच चिकाटी धरून राहणे मला रास्त दिसत नाही.

दुसरे असे की, रिस्ले सर्क्युलर निघाल्यापासून हल्लीच्या शाळांतील सर्व शिक्षकांची स्थिति विलक्षण झाली आहे व त्यातल्या त्यात मुख्य शिक्षकांची तर फारच विलक्षण झाली आहे. कारण शाळेंतील मुलांना सार्वजनिक चळवळीत पडू देऊ नये किंवा सभांना जाऊ देऊ नये, ही नवीन कामगिरी शिक्षकांचे गळ्यांत घालण्याचा प्रयत्न चालू आहे. ह्याचा अर्थ असा दिसतो की, शिक्षकांनी गावात व सभेच्या ठिकाणी पोलिसाप्रमाणे हडेलहप्पी करीत जावी व सार्वजनिक प्रसंगी जे विद्यार्थी दिसतील त्यांना धरून सरकारचे स्वाधीन करीत जावे. ही स्थिति कोणत्याही स्वाभिमानी शिक्षकास मान्य होणार नाही. हे सर्क्युलर मला पसंत नसल्याबद्दलचे माझे मत मी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. हे सर्क्युलर शाळेकडे आले त्यावेळेसच मी राजीनामा देणार होतो, परंतु वर वर्णिलेला प्रसंग येऊन खटका उडेपर्यंत तसे करणे म्हणजे जरा अधीरपणा दिसेल, असे वाटले. शिवाय असे वाटे की, निकरावर गोष्ट आली नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची मने सुसंस्कृत करून त्यांना वळण देणे ह्याबद्दलचा प्रयत्न अल्प प्रमाणाने का होईना जो करिता येतो आहे त्याला मध्येच आपण होऊन 'खो' आणू नये. म्हणून त्यावेळेस एवढेच केले की, ह्या सर्क्युलराचे उत्तर पाठविणे जरूर आहे व अमुक अमुक अाशयाचे उत्तर पाठवावे, अशी सूचना केली. पण त्यावेळी कोणी त्याबद्दल विशेष विचार केला नाही व ती वेळ तशीच निघून गेली. परंतु वर सांगितल्यासारखे हडेलहप्पीचे प्रसंग लवकरच येणार असे वाटू लागल्यामुळे अशा स्थितीत ह्यापुढे राहणे इष्ट दिसत नाही.

तिसरी गोष्ट अशी की, अलीकडील राजकीय वातावरणात ज्या विलक्षण घडामोडी होत आहेत त्यांचा विचार केला असता, सर्व लोकांनी आपल्या परिस्थितीचा विचार करून आपली दिशा ठरविण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. जहाल व मवाळ हा भेद विसरण्याचा व दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय पक्ष ह्या नावाखाली एक होऊन राष्ट्रकार्यसिद्धीबद्दल खटपट करण्याचा समय आला आहे. अशावेळी आपल्याच लोकांशी भांडण करून त्यांना खाली दडपण्याच्या प्रयत्नात सामील होणे रास्त दिसत नाही. हिंदू लोकांनी आपल्याच लोकांवर शस्त्रें उगारून स्वराज्य घालविले, असा धडा हिंदुस्थानचा इतिहास शिकवितो. हा धडा विसरून जाऊन पोलिसांचे जोरावर आपल्याच लोकांशी भांडण करण्यास प्रवृत्त होणे म्हणजे वरील गुन्ह्याची पुनरावृत्तीच करणे होय, असे म्हणण्यास हरकत नाही. वर लिहिल्याप्रमाणे माझी समजूत असल्यामुळे पोलिसांना बोलावून आणून त्यांचे करवी मुलांना धरून नेवविले, असा मजबद्दल लोकांना नुसता संशय येणे, ही कल्पनासुद्धा मला हृदयभेदक वाटते. तेव्हा जर पुढे असा प्रसंग खरोखरच आला तर आपण देशद्रोह करीत आहो असे माझे मन मला सारखे टोचीत राहील. स्वतःची मनोदेवता असे सांगत असताना निव्वळ चारशे रुपयांचे आशेने नोकरीवर राहण्यापेक्षा असले प्रसंग ज्या नोकरीमुळे येण्याचा दिवसेंदिवस जास्त संभव वाटतो ती नोकरीच सोडून देणे रास्त होय, असे मला वाटते. चारशे रुपये म्हणजे थोडे नाहीत, एवढी मोठी नोकरी सोडणे म्हणजे आपलेच पायावर धोंडा पाडून घेणे आहे, वगैरे आक्षेप काही लोक घेतील हे मी जाणून आहे. परंतु स्वतःची मतें व सदसद्विवेकबुद्धि ह्यांची मला त्याहून जास्त किंमत वाटते. वरील विवेचनावरून शाळेचे अधिकारी व विद्यार्थी ह्यांमधील लढ्याला निराळे स्वरूप आले असून तो सरकार व लोक ह्यांच्यामधील लढा होऊ पाहत आहे, हे चाणाक्ष वाचकांचे लक्षात येईलच. "चतकोर भाकरीची गुलामगिरी" ज्यांचे पदरी - कोणत्याहि स्थितीमुळे अगर कारणांमुळे असो - आली आहे, त्या शाळांची दिवसेंदिवस अशीच स्थिति होणार ह्याबद्दल संशय नाही. म्हणून वेळीच सर्व लोक सावध होऊन आपले वर्तन ठेवतील, तरच काही तरणोपाय आहे, असे माझे अल्पमतीस वाटते.


ओकांनी लिहिलेली गीर्वाणलघुकोशाच्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना खाली दिली आहे.

संस्कृत-मराठी कोशाची जरूरी समर्थ विद्यालय चालू असताना प्रथम भासू लागली. मराठीतून सर्व विषय शिकविण्याचा उपक्रम प्रथम समर्थ विद्यालयाने केला. तोपर्यंत 'मराठीत विविध विषयांवर पुस्तकें आहेत कोठे?' 'पुस्तकें असल्याशिवाय मराठीतून शिक्षण देणे अशक्य आहे' वगैरे अडचणींना फाजील महत्त्व देऊन ह्या मार्गाला कोणीहि हात घातला नव्हता. पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही हा न्याय येथेहि लागू आहे. स्वभाषेतून शिक्षण देण्यास प्रत्यक्ष सुरुवात केल्याशिवाय पुस्तकेंहि तयार व्हावयाची नाहीत. शिक्षणोपयोगी पुस्तकें आगाऊ तयार होणे प्रायः संभवनीय नाही. म्हणून 'स्वभाषेतून शिक्षण देण्यास सुरुवात करू या, नंतर पुस्तकें आपोआप तयार होऊ लागतील, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतील अनुभवहि असाच आहे', असे मनात आणून समर्थ विद्यालयाच्या चालकांनी मराठीतून शिक्षण देण्यास प्रत्यक्ष सुरुवात केली. त्या संस्थेत काम करीत असताना प्रथम मराठीत कोणकोणत्या विषयांवर पुस्तकें व्हावयास पाहिजेत म्हणजे विद्यालयाची अडचण अंशतः तरी दूर होईल असा प्रश्न मनात येऊन आम्ही एक यादी तयार केली होती. तीत संस्कृत-मराठी कोश ह्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला होता. विद्यालय चालू असतानाच संस्कृतप्रवेश हे पुस्तक विद्यालयाचे म्हणून काढण्यात आले होते. पण पुढे लवकरच विद्यालय सरकारने बंद केल्यामुळे त्या पुस्तकाची दुसरी अावृत्ति राष्ट्रीयशिक्षणमालेच्या द्वारे काढावी लागली. त्याच्या पुढचे संस्कृतवाचनपुस्तक प्रथमगुच्छ हे करीत असतांना 'संस्कृत-मराठी कोश' संस्कृत वाङ्मय वाचताना विद्यार्थ्यांच्याजवळ अवश्य पाहिजे असे विशेषच भासू लागले. ह्याच सुमारास राजापूरचे रा. रघुनाथ कृष्ण पाटणकर ह्यांनी 'आमच्याजोगे काही काम असल्यास कळवा' असे विचारल्यावरून संस्कृत-मराठी कोशाचे काम त्यांना सुचविले. त्याप्रमाणे त्यांनी ह्या कामास शके १८३३ च्या गणेशचतुर्थीस आरंभ केला व सविस्तर योजनाहि विचारून घेतली. पण कोशासारखे मोठे काम एकट्यावर टाकून शेवटास जाण्यास फारच दिनावधि लागेल म्हणून आपण स्वतः अर्धा भाग उचलावा ह्या हेतूने 'प' अक्षरापासून सुरवात केली (वैशाख शके १८३४). इतके झाले तरी कोशाचे काम मुकाट्यानेच चालले होते. त्याला जाहीर स्वरूप आले नव्हते. नंतर लोकशिक्षण मासिक सुरू केल्यावर कोशाची कल्पना जाहीर केल्यास लोकांकडून मदत मिळविता येईल व कार्यहि शीघ्र गतीने होईल असा गुरूवर्य प्रो.वि.गो.विजापूरकर ह्यांचा अभिप्राय पडल्यावरून त्यांच्या सल्ल्याने कोशाची योजना ठरवून ती जाहीर करण्यात आली. एक लहान व एक मोठा अशा दोन कोशांची कल्पना पुढे ठेवून त्याबद्दल योजना ठरवून केसरी मध्ये व लोकशिक्षणात जाहिरात देण्यात आली. पण मोठ्या कोशासंबंधाने लोकांकडून कोणत्याच रीतीचे उत्तेजन न आल्यामुळे मोठा कोश होण्याचा संभव फार कमी दिसू लागला. लहान कोश अगदीच छोटा झाला तर तिकडूनहि काम अपुरेच होईल. सबब सामान्य विद्यार्थ्यांना उपयोगी असा मध्यम प्रतीचाच कोश करावा असे वाटले. शिवाय पूर्व योजनेप्रमाणे रामायण, महाभारत ह्या सर्वमान्य ग्रंथांतीलच शब्द घेतले तर चांगले अशीहि कित्येकांची सूचना आल्यावरून कोशाचे स्वरूप व्यापक करण्याचे ठरविले. अर्थात् ह्यामुळे ग्रंथविस्तार बराच झाला व पूर्वी ठरविलेल्या मुदतीत (चारसहा महिन्यात) ग्रंथ पुरा होणे अगदी अशक्य झाले. त्यामुळे मुदतीची अट काढून टाकली. कोशासारखी कामे वारंवार होत नसतात, म्हणून जे काम करावयाचे ते व्यापक व शक्य तितके उपयुक्त करावे ह्या कल्पनेने काम चालू ठेवले. असे करताना उशीर बराच झाला व आगाऊ नावे नोंदविलेल्या वर्गणीदारांकडून वारंवार पत्रें आली. काहींनी तर 'आम्हास उगीच आशा लावून ठेवली आहे, हा कोश बाहेर पडणार तरी केव्हा? आम्हास हा पाहण्यास तरी मिळतो की नाही. आमचा रुपया मात्र आपण घेऊन ठेवला आहे,' इत्यादि उद्गार काढले. पण कार्याच्या महत्त्वाकडे नजर ठेवून ह्या सर्व गोष्टी सहन करणे भाग होते. अर्थात् ग्रंथाचे स्वरूप व्यापक केल्यामुळे काम बरेच वाढले.

'घर बांधून पाहावे व लग्न करून पाहावे' अशी आपल्यात म्हण आहे. कोशाच्याहि कामी आम्हाला तोच अनुभव आला आहे. कोशाचे काम एकंदरीने फारच किचकट असते. निरनिराळ्या ग्रंथांवर निरनिराळे टीकाकार असतात, प्रत्येकजण आपआपल्यापरी अर्थ करतो. त्यातून योग्य अर्थ निवडणे बऱ्याच त्रासाचे काम असते. ह्याशिवाय कोशांमधूनहि अनेक मतभेद असतात. पाठभेद आणि लेखकप्रमाद किंवा लेखकप्रमादाने झालेले पाठभेद वगैरेंचा निर्णय करून अर्थ ठरविणे फारच कठिण असते. पण सरते शेवटी काही तरी निर्णय करून पुढे जावे लागते. पुष्कळदा हा निर्णय स्वतःचा स्वतःलाच पटत नसतो. पण कोशकार किंवा टीकाकार अमुक अर्थ देतात एवढ्याकरिताच आपणहि द्यावयाचा असे होते. अशा स्थितीत खुद्द अामचेच समाधान कित्येक ठिकाणी होत नाही तेथे कोश वापरणाऱ्यांचे होईल ही अपेक्षा बाळगणे व्यर्थ होय. त्यातल्या त्यांत निरनिराळ्या ठिकाणीं सापडलेल्या अर्थांपैकी सारासार विचार करून अर्थनिर्णय करून तो घेणे ह्यापलीकडे आमच्या हाती काहीच नाही असेच समजून हे कार्य चालवावे लागले. ह्याप्रमाणे डोक्याला व शरीराला बरेच कष्ट झाले. पण शरीरहानीच नव्हे तर द्रव्यहानिहि करणारे हे काम आहे. बोलून चालून मराठीतून शिकविण्याची पद्धत अद्याप प्रचलित नाही. अशा स्थितीत ह्या कोशाचा जारीने प्रसार होऊन गुंतलेली रक्कम सुटणे म्हणजे कपिलाषष्ठीच्या योगाप्रमाणेच आहे. तथापि राष्ट्रीय शिक्षणाच्या उदयकालाबद्दल दृढश्रद्धा बाळगून आम्ही हे कार्य केले आहे. त्याचे चीज करणे महाराष्ट्राकडे आहे.

कोशाची प्रथम जाहिरात दिली त्यावेळी ठराविक ग्रंथ वाचण्याकरता घेतले व त्यांची मित्रमंडळींमध्ये वाटणी करून दिली. नाटके वगैरे छोटे ग्रंथ ज्या मंडळींकडे दिले होते, त्यांनी आस्थेने काम केले, पण त्यांच्या नवशिकेपणामुळे त्यांच्याकडून आलेल्या शब्दांचा तादृश उपयोग झाला नाही. मुख्य मुख्य ग्रंथांचे वाचन तळेगाव, राजापूर व वाई येथे झाले व हेच काम खरे उपयोगी पडले. वाईचे वे.शा.सं. नारायणशास्त्री मराठे व त्यांचे शिष्य ह्यांनी उपनिषदांतील शब्द काढण्याच्या कामी फार साहाय्य केले. राजापूरचे रा.रा. पाटणकर व त्यांचे पुतणे रा.नारायण रामचंद्र पाटणकर ह्यांची मदत केवळ ग्रंथवाचनात झाली असे नाही, तर आम्ही केलेली कोशाची कच्ची प्रत वाचून तिची व्याकरण दृष्ट्या बारीक छाननी करणे, मेदिनी, हेमचंद्र वगैरे जुन्या कोशांशी पडताळा घेणे व अर्थ देताना संदिग्धपणा व अस्पष्टपणा हे दोष राहू न देणे वगैरे प्रकारेंहि त्यांची मदत झाली व ती बहुमोल होती ह्यात संशय नाही.

इतर अनेक कोशांचे ह्या कामी साहाय्य झाले आहे. त्यांपैकी अमरकोश, वाचस्पत्य, शब्दकल्पद्रुम हे संस्कृत कोश, शब्दरत्नाकर नामक संस्कृत मराठी कोश आणि कै. वामनराव आपटे, मानिअर उईल्यम्स व कै. वैद्य ह्यांचे संस्कृत-इंग्रजी कोश हे प्रमुख होते. इतरहि आणखी कोश प्रसंगी वापरले, पण त्यांची मदत महत्त्वाची नाही. ह्या सर्व कोशांचा उपयोग करताना त्यांची पुष्कळच चाळणी करावी लागली. प्रत्येकाच्या धोरणात ग्राह्यांश दिसून आला तो येथे संकलित केला अाहे. त्या कोशांतून काहीं काहीं चुकाहि आढळल्या, त्या टाळण्याचा प्रयत्न केला अाहे. असे कोश चाळण्याने वेळ मात्र फार जातो व त्यामानाने निष्पन्न फार थोडे होते. पुष्कळ वेळी संशय कायमच राहतो. पण काम चोख करण्यास दुसरा मार्ग नसतो. अजूनहि पुष्कळ शंकास्थाने राहिली आहेत. तेथे मुद्दाम प्रश्नचिह्न घातले आहे. हेतु हा की, कोश वापरणाऱ्या लोकांना त्या त्या ठिकाणी विचार करण्यास स्फूर्ति व्हावी व त्यांना काही निर्णयात्मक माहिती किंवा आधार मिळाला तर त्यांनी आम्हास कळवावा. तसेच नजरचुकीने प्रस्तुतच्या कोशातहि आमची प्रमादस्थळे राहिली असतील, ती कोश वापरणाऱ्यांनी दाखवावीत म्हणजे ईश्वरकृपेने जर द्वितीयावृत्ति काढण्याचा योग आला तर त्यावेळी ह्या सर्वांचा उपयोग करता येईल. हे काम संस्कृत वाङ्मयाचे व म्हणूनच सर्व समाजाचे आहे हे लिहावयास नकोच.

प्रस्तुत कोशाचे एकंदर तीन भाग केले आहेत. नाम व धातु (आख्यात) असे दोन भाग आपल्यांत रूढ आहेत. अमरकोश वगैरे जुने कोश धातूंखेरीज इतर सर्व शब्द देतात व त्यांना नामकोश अशीच संज्ञा आहे. त्या परंपरेला अनुसरून धातूंखेरीज सर्व शब्द पहिल्या भागात घातले अाहेत व धातूंचा दुसरा भाग केला अाहे. केसरी व मराठा ह्या पत्रांचे विद्वान संपादक रा.रा.न.चिं.केळकर ह्यांनी विशेषनामांचा भाग निराळा करावा अशी सूचना केली ती महत्त्वाची वाटल्यावरून तो भाग निराळा काढला. असे करताना विशेषनामें कोणती हे ठरविणे बरेच त्रासाचे झाले व त्यामुळे काही नामे दोन्ही भागांत आली, पण विशेषनामें निराळी केल्याने वाचणाऱ्यांची थोडीशी सोय होईल असे वाटल्यामुळे, तशी द्विरुक्ति सह्य मानावी लागली. सामान्यतः देवगंधर्वयक्षादि नावें वगळून रामायणभारतादि ग्रंथांतून वारंवार येणाऱ्या प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची व स्थळे इ.ची नावें ही विशेषनामांत संकलित केली आहेत. ह्याप्रमाणे हे तीन भाग झाले. शेवटी चार परिशिष्टें जोडली आहेत. संस्कृतमध्ये पुष्कळ प्रसंगी दृष्टांतांचा उपयोग केलेला असतो. त्यांना न्याय असे नाव अाहे. असे न्याय शेवटी एकत्र देण्याबद्दल पुष्कळांनी सुचविल्यावरून त्यांतील प्रमुख न्याय पहिल्या परिशिष्टांत दिले आहेत. त्याचप्रमाणे अलंकारांचे एक परिशिष्ट, वृत्तांचे एक परिशिष्ट व मुख्य ग्रंथांत न आलेल्या ज्योतिषविषयक योगकरणादींच्या यादीचे एक परिशिष्ट दिले आहे.

ह्याप्रमाणे ह्या ग्रंथाच्या भागाची ही व्यवस्था झाली. आता कोशाच्या रचनेचे धोरण व स्वरूप सामान्यतः खाली लिहिल्याप्रमाणे आहे. रामायण महाभारत हे पुराणेतिहासग्रंथ, मन्वादिस्मृतिग्रंथ, पंचतंत्र, शुक्रनीति, इ. नीतिग्रंथ, प्रमुख उपनिषदें, महाकाव्यें, भागवत व प्रसिद्ध नाटकें असले ग्रंथ वाचण्याला ह्या कोशाचा उपयोग व्हावा, म्हणून त्या ग्रंथांतील शब्द येथे घेतले आहेत व शब्दांचा अर्थ देऊन त्यापुढे ग्रंथांतील नक्की स्थल दिले आहे. सबंध वाक्य उतरून घ्यावे असे काहींचे म्हणणे होते व काही कोशांतून तसे करण्याची पद्धतहि आहे पण कोश हातांत घेऊन त्यावरून कोणी भाषा शिकत नाही. एखादा ग्रंथ घेऊन त्यांत आलेला शब्द अडला म्हणजे मनुष्य कोशाचे साहाय्य घेतो. तेव्हा सबंध वाक्य हे त्याच्या समोर असतेच. आपल्याच ग्रंथाचा आधार कोशात दिलेला पाहून हाच अर्थ येथे लागतो असे त्यास कळून येते व कोशाचा मुख्य उद्देश एवढ्याने सिद्धीस जातो. शिवाय सबंध वाक्य, श्लोकचरण इत्यादि दिल्याने ग्रंथविस्तार फार होतो व पुस्तकाची किंमत सामान्य ग्राहकांच्या आटोक्याबाहेर जाते. अगोदरच मराठीभाषेचे क्षेत्र लहान. त्यातहि महाराष्ट्राची सांपत्तिक स्थिति बेताबाताचीच. तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ती पद्धत स्वीकारण्यात आली नाही. फक्त स्थलनिर्देश करण्याचे ठरवले. त्यातहि जेथे शब्दांचा अर्थ अगदी प्रसिद्ध आहे अशा ठिकाणी उताऱ्याची जरूर नसल्यामुळे सामान्यतः उतारा दिला नाही. पंचतंत्र, रघुवंश, गीता, मनुस्मृति इत्यादि ग्रंथांतले आधार प्राधान्ये करून देण्याचे धोरण ठेवले आहे. व जेथे त्या ग्रंथांपैकी एकदोन ग्रंथांचा आधार मिळाला तेथे रामायणभारतादि किंवा उपनिषदादि वरिष्ठ अथवा अवघड ग्रंथांतले त्याच शब्दाला किंवा त्याच अर्थाला उतार देऊन जागा अडविली नाही. जेथे पंचतंत्रासारख्या सोप्यासोप्या ग्रंथांचा आधार न मिळेल, तेथे रामायणभारतादि ग्रंथांतील आधार द्यावयाचा असे सामान्य धोरण ठरविले आहे. काव्यग्रंथांतील उतारे देताना प्रथम कांड, स्कंध किंवा पर्व, नंतर अध्याय व नंतर श्लोकाचा अाकडा दिला आहे. अावृत्ति निराळी असली तर क्वचित् स्थली दोन चार श्लोक मागे पुढे होतील. पण कोशातील स्थलांवरून गद्यग्रंथांतील आधार सापडणे मुष्किलीचेच होईल. कारण, आवृत्त्या निरनिराळ्या असतात व त्यामुळे पानांमध्ये फरक पुष्कळ पडतो. सबब अशा ठिकाणी त्या ग्रंथाच्या अमक्या भागात (अंकात, प्रकरणात इ.) तो आला आहे एवढेच दर्शविले आहे. क्वचित् रामायण महाभारताचे मोघम उतारें पं.तारानाथ, आपटे वगैरेंच्या कोशांतून सापडले ते तसेच मोघम घेतले आहेत. अर्थात् नक्की पत्ता सापडता तर फार बरे होते, पण महाभारतासारख्या ग्रंथामध्ये तो शोधणे दुरापास्त असल्यामुळे सापडला तसाच उतारा घेण्यावाचून गत्यंतर नव्हते. वाचणाऱ्याच्यापुढे ग्रंथ असतोच. त्याला शब्द काढल्यावर आपल्या ग्रंथाचा हवाला दिला आहे, तेव्हा हाच अर्थ येथे जुळत असल्यास पहावा अशी कल्पना सुचेल व तेवढ्यापुरता तरी वाचणाऱ्याला उपयोग होईल अशा समजुतीने अशा काहीं काहीं मोघम उताऱ्यांचा समावेश केला आहे. काहीं थोडे आधार प्रत्यक्ष ग्रंथ न वाचता घेतलेले असे अाहेत. ते इतर कोशांच्या (विशेषतः आपटे) आधारावर घेतले आहेत, पण अशी स्थळें अगदी थोडी. सामान्यतः दुसऱ्या कोशाने दिलेला आधार स्वतः तपासून मग दिलेला आहे. छापण्यामध्ये नजरचूक होऊन आकडे चुकले असल्यास त्यास उपाय नाही. डोळ्यांत तेल घालून कितीहि तपासले तरी अशा नजरचूका राहतात. ग्रंथ वाचावयाचे, अर्थ ठरवावयाचे, कोश चाळावयाचे व कच्ची मुद्रितेहि आपणच पहावयाची अशा स्थितीत एकंदर कामाचा बोजा फार हाऊन मुद्रणदोष राहणे अपरिहार्य होय. असे काहीं दोष अाढळल्यास त्याबद्दल सहृदय वाचक क्षमा करतील अशी आशा आहे. कोणकोणत्या ग्रंथांतून आधार घेतले आहेत व त्या ग्रंथांकरिता कोणते संक्षेप वापरले आहेत त्यांची यादी स्वतंत्र दिली अाहे.

ह्यापूर्वी संस्कृत-मराठी कोश तीन चार झालेले आहेत पण त्यात बरेच दोष अामच्या नजरेस आले आहेत. शिवाय ते सर्व आज दुर्मिळ आहेत. आम्हास मिळालेल्या कोशांमध्ये पहिला कोश १७७५ (सन १८५३) मध्ये झाला. तो रा.रा.अनंतशास्त्री तळेकर ह्यांनी केला होता. 'अाबालवृद्धांस' अमरकोशाचा अर्थ सुबोध होऊन, जो पाहिजे तो शब्द झटकन मिळावा ह्या दृष्टीने कोश केल्याचे प्रस्तावनेत दिले आहे. त्यावरूनच त्या कोशाचे स्वरूप दिसून येईल. अमरकोशातलेच शब्द पण ते वर्णक्रमाने दिले आहेत. बाहेरचे शब्द क्वचितच घेतले आहे. ह्यानंतरचा कोश माधव चंद्रोबाचा 'शब्दरत्नाकर'. हा बराच मोठा असून (पानें ७००, आकारहि लांबीरुंदीला मोठा, शके १७९२ सन १८७०) ह्याचे काम नऊ वर्षें चालले होते. शब्दरत्नाकर हे नाव जनार्दन महादेव गुर्जर ह्यांच्या सूचींत आहे व त्याची किंमत तेथे चौदा रुपये दिली आहे. हा कोश पूर्वीच्या एकंदर संस्कृत-मराठी कोशांत चांगलाच होता. पण ह्यात केवळ अर्थ दिलेले आहेत, त्यांना ग्रंथांतील आधार मुळीच दिलेले नाहीत, पाल्हाळ जास्त, उपसर्गयुक्त धातू ग्रंथांतरी भिन्नभिन्न अर्थी योजलेले अाढळत असूनहि तसे क्वचित् दिले आहेत असे अनेक दोष ह्यात होते. तथापि तो आज उपलब्ध असता तर विद्यार्थ्यांचे बरेच काम होते. ह्या कोशात वनस्पति व वैद्यक ह्याबद्दलचे शब्द व माहिती बरीच आहे. तिसरा कोश नारो आप्पाजी गोडबोले व गोपाळ जिवाजी केळकर ह्यांचा (१८७२, पानें ५००, किंमत ६ रु.). हाहि कोश जवळजवळ निरुपयोगीच. अमरकोश, त्रिकांडशेष इत्यादि तीनचारच कोश व हितोपदेश ह्यातले शब्द घेऊन त्यातच मराठी सहा क्रमिक पुस्तकें व नवनीत ह्यातले शब्द ह्यांचाहि समावेश केला आहे, त्यामुळे संस्कृत व प्राकृत असे दोन्ही शब्द त्यात आलेले आहेत, उदा. विटंबो, पाविजे, नुमटे, वांया, विख इ. काहीं ठिकाणीं धातूंची भूतकाळ इ. रूपें, पूर्वकालवाचक अव्ययें ही स्वतंत्र शब्द म्हणून दिली आहेत, उदा. अपैति, अपृच्छत्, स्यात्, स्वीकृत्य, श्रोतुं इ. अर्थात् संस्कृत कोशात अनावश्यक असे बरेच शब्द येऊन उपयुक्त असे अनेक शब्द आले नाहीत व धातूहि नाहीत. इतके असून किंमत मात्र सहा रुपये. ह्यानंतरचा कोश रा.रा.वासुदेव गोविंद अापटे ह्यांचा होय. हा अगदीच लहान आहे. त्यामानाने तो अपुरा असणे स्वाभाविक आहे.

ह्याप्रमाणे चांगल्या प्रकारचा संस्कृत-मराठी कोश आपल्याकडे नसल्यामुळे राष्ट्रीयशिक्षणमालेत असा कोश अवश्य पाहिजे अशा कल्पनेने हा कोश तयार केला आहे. लोकशिक्षण वर्ष पहिले, अंक ४ मध्ये ह्या कोशाच्या हेतूबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, ती जिज्ञासूंनी पहावी. त्यात कोशाच्या रचनेबद्दलहि माहिती दिली आहे. ती रचना मात्र तंतोतंत कायम राहिली नाही. बृहत्कोश हाती घेणे संभवनीय दिसेना. म्हणून लघुकोशाचे छोटेखानी स्वरूप बदलून त्यालाच व्यापकपणा द्यावा लागला. मात्र प्रत्येक अर्थाला संस्कृत वाङ्मयातला आधार देण्याची योजना कायम ठेवता आली नाही. ग्रंथांतले आधार सापडले तेवढे व जरूर वाटेले तेवढ्या अर्थांपुरते दिले पण जेथे अाधार मिळाला नाही तेथे इतर प्राचीन व अर्वाचीन कोशकार देतात म्हणून आम्हीहि त्या शब्दांचा व अर्थांचा समावेश केला आहे. ह्यात थोडेसे अंधानुकरण होते असा कोणी अाक्षेप घेतील पण सर्वसामान्य उपयुक्तता साधावी म्हणून असे करणे भाग पडले. तथापि हा लौकिक संस्कृत भाषेचा कोश अाहे, विद्यार्थ्यांकरिता आहे, विद्यार्थांना अवश्य वाचनीय असे जे ग्रंथ ते वाचताना विशेष उपयोग व्हावा अशा हेतूने केला आहे. तेव्हा अर्थात् वैदिक वाङ्मयातील शब्द गाळले आहेत. हा बृहत्कोश नसल्यामुळे अर्थबोधास जरूर तेवढे स्पष्टीकरण करण्याचे धोरण ठेविले आहे. सविस्तर माहिती किंवा स्पष्टीकरण प्रत्येक ठिकाणी देत बसलो नाही. सामान्य व्याकरण शिकलेला विद्यार्थीच कोश वापरणार हे लक्षात घेऊन सोपे समास गाळले आहेत. समासाचे विग्रहहि दर्शविणे कोशाचे काम नव्हे. धातूसाधितें व इतर रूपें देत बसलो नाही. तशी दिल्याने ग्रंथाचा विस्तार भलतीकडेच झाला असता. फाजील विस्तार न व्हावा म्हणून ज्या योजना अंमलात आणल्या त्या पुढे देत आहो :-

१. संस्कृतमध्ये समासांचा भरणा फार तेव्हा सुलभ समास (अवयवरूप शब्दांचे अर्थ एकत्र केल्यानेच समजण्यासारखे) गाळण्याकडे प्रवृत्ति ठेविली आहे.

२. शिवाय संस्कृतमध्ये समासातले पूर्व किंवा उत्तर पद ह्यापैकी प्रत्येकाबद्दल त्याचे पर्यायशब्द घालून नवीन शब्द तयार होतात. मुख्य कल्पना किंवा सामान्य पुराणादिकांपैकी जरूर तेवढी माहिती असली म्हणजे असे समास स्वयंस्पष्ट होतात. उदा. मदनाचे बाण पाच अशी कल्पना संस्कृतात आहे, तेव्हा पाच बाण आहेत ज्याचे' अशा अर्थी कोणतेहि दोन शब्द जोडून मदनवाचक शब्द तयार करता येतो. उदा. पंचबाण, पंचशर, पंचेशु, पंचसायक इ. तसेच दशार्ध (=पाच) बाण इ.

त्याचप्रमाणे करसरोरुह, हस्तारविंद, पाणिकमल इ.; किंवा पादाब्ज, चरणसरोरुह इ.;

चक्रवाक, चक्रनामन्, रथाङ्गनामन् (=चक्रवाक);

इंद्रधनुष्य, त्रिदशचाप, सुरधनुः इ.;

अमरवधू, सुरांगणा, अमर्त्यवधू, देवांगना इ. (=अप्सरा);

अमरसरित्, त्रिदशनदी, त्रिदशतटिनी, स्वर्णदा, सुरतटिनी इ. (=आकाशगंगा);

नाकेश, नाकनाथ, नाकनायक इ. (=इंद्र);

समृद्रपत्नी, समुद्रयोषित् इ. (=नदी);

नदीपति, वाहिनीनाथ इ. (=समुद्र);

अंबुद, जलद, नीरद, अंबुधर इ. (=मेघ);

नीरज, नीररुह, जलरुह, सरोरुह इ. (=कमळ);

नीरधि, नीरनिधि, किंवा 'नीर' बदलून अंबुधि, अंबुनिधि इ. (=समुद्र);

भूरुह, महीरुह, पृथ्वीरुह इ. (=वृक्ष);

उष्णरश्मि, चंडरश्मि, धर्मदीधिति, अहिममयूख इ. (=सूर्य);

शीतरश्मि, अनुष्णरश्मि, हिमरश्मि, शीतांशु इ. (=चंद्र);

इत्यादि अनेक सामासिक शब्द होतात; ह्यापैकी पुष्कळ स्वयंस्पष्ट असल्यामुळे दिले नाहीत. जास्त रूढ म्हणून किंवा नवशिक्या विद्यार्थ्याला अडणारे असे काहीं काहीं मात्र दिले आहेत.

तसेच समृहवाचक - जन, वर्ग, गण, समूह, जाल, वृंद इ. (उदा. मुनिजन, साधुजन, मूर्खजन इ.);

वर्णवाचक - कार (उदा. अकार, इकार, उकार, इ.);

श्रेष्ठत्ववाचक - सिंह, शार्दूल, पुंगव, ऋषभ किंवा अधिप, इंद्र, राज, पति इ. शब्द;

अपत्यवाचक - पुत्र, तनय, सुत, नंदन, ज इ. लावतात;

पण असे शब्द जोडून होणारे पुष्कळ समास दिले नाहीत.

३. विष्णुसहस्रनाम इ. देवतांच्या सहस्रनामावळींतील शब्द येथे दिले नाहीत. कारण, ते शब्द त्या देवतांचे वाचक म्हणून वाङ्मयात क्वचितच वापरण्यात येतात.

४. एकाक्षरी शब्दांचे अनेक अर्थ कोशांत येतात त्यांचा संग्रह येथे केलेला नाही. असे शब्द येण्याचा संभव अगदीच कमी. काही थोडे अपवादादाखल घेतले अाहेत.

५. विशेषणाचाच उपयोग अव्ययासारखा करतात. एकदा विशेषणाचे अर्थ देऊन नंतर अव्यय दर्शवून, पुन्हा तेच अर्थ देणे म्हणजे उगीच विस्तार केल्याप्रमाणे होते. उदा. सुख वि. सुखी. सुखं अ. सुखाने. तोच शब्द अव्ययाप्रमाणे वापरला म्हणजे काय अर्थ होतो हे सहज कळण्यासारखे आहे. असे कळण्यासारखे नसेल तेथे अर्थ दर्शविला आहेच.

६. नञ् समास अनेक होतात ते सर्व द्यावयाचे म्हटल्यास तोच कोश नञ लावून पुन्हा लिहावा लागेल. म्हणून ह्या कामी बराच संक्षेप करणे प्राप्त झाले.

७. धातूचे अनेकार्थत्व प्राचीन कोशकार मानतात. लक्षणेने धातूंचे अर्थ फार बदलत जातात व काव्यादि जो ग्रंथ आपल्या समोर असेल त्यातील वाक्यातल्या इतर शब्दांच्या धोरणानेच पुष्कळ वेळा धातूचा अर्थ लावून घ्यावा लागतो. केवळ कोशातलाच शब्द प्रत्येक उताऱ्यांत जशाचा तसा नीट जमेल असे नाही. प्रसंगाप्रमाणे व मराठी भाषेच्या पद्धतीप्रमाणे एका शब्दापेक्षा दुसरा शब्द कानाला बरा लागतो. पण असे पर्याय शब्द अनेक देत बसल्याने विस्तार फार होतो. मुख्य क्रिया किंवा कल्पना कोणती हे दर्शविले म्हणजे पुरे असे धोरण ठेवले आहे.

८. पाणिनीय धातुपाठात दिलेले अर्थ मोघम असतात. उदा. 'संघाते','गतौ', इ. हे शब्द स्वत: अनेक अर्थी असतात; तेव्हा तितके सर्व मूळ धातूचे अर्थ की काय अशी शंका येते. शिवाय धातु सकर्मक की अकर्मक हा निर्णयहि त्यावरून होऊ शकत नाही. अर्थाप्रमाणे एकच धातु सकर्मक किंवा अकर्मक होऊ शकतो. तेव्हा दोनहि प्रकारचे सर्वत्र अर्थ दिलेले नाहीत. संदर्भाप्रमाणे वाचकाने सकर्मक किंवा अकर्मक अर्थ लावून घ्यावयास पाहिजे.

९. धातुपाठात जे धातु दिले आहेत ते सर्व नेहमीच वाङ्मयात येत नाहीत. म्हणून त्यातले जे धातु वाचनात प्रायः येत नाहीत किंवा त्यापासून साधलेल्या शब्दांचेहि जेथे महत्त्व नाही असे धातु गाळले आहेत. तथापि 'लघु' ह्या नावाच्या मानाने ह्या कोशात धातुसंग्रह बराच जास्त झाला आहे हे खरे. वर्तमानकालवाचक अत्, आन वगैरे प्रत्यय लागून होणारिं धातुसाधितें, त, तवत् लागून होणारी भूतकालवाचक धातुसाधितें व तव्य, अनीय, अ, अन, ति, तृ, अक इ. प्रत्यय लावून होणारे अनेक साधित शब्द गाळले आहेत. रूपाच्या किंवा अर्थाच्या महत्त्वामुळे देणे जरूर असे मात्र घेतले आहेत.

आता प्रस्तुत कोशाचे विशेष म्हटले म्हणजे खाली दिल्याप्रमाणे होत :-

१. हा कोश मराठीत आहे हा ह्याचा मुख्य विशेष होय. प्रचलीत बहुतेक कोश संस्कृत-इंग्रजी आहेत. कै. वामनराव अापटे ह्यांचा कोश बराच चांगला आहे व आम्ही त्याचा बराच उपयोग केला अाहे हे खरे. पण मराठीत कोश करणे म्हणजे नुसते संस्कृतचे व इंग्रजीचे भाषांतर करणे नव्हे. प्रत्येक अर्थाची छाननी करणे, शब्दाच्या अनेक अर्थांमध्ये क्रम लावून त्याप्रमाणे अर्थ देणे, दिलेले आधार तपासून पाहणे व इतरांनी केलेल्या चुका टाळणे व वापरणाऱ्यास शब्द सहज सापडतील अशी कोशाची रचना करणे वगैरे अनेक गोष्टी करव्या लागतात. शिवाय आपट्यांनी रामायण, महाभारत, भागवत, उपनिषदें इत्यादींचे उतारें दिलेले नाहीत. जे अगदी थोडे दिले आहेत ते मोघम आहेत. त्यांचा सर्व भर नाटकें, महाकाव्यें इत्यादि विश्वविद्यालयाने लावलेल्या ग्रंथांवर होता. समर्थ विद्यालयाचे संस्कृतबद्दलचे धोरण निराळे होते. (संस्कृतप्रवेश व प्रथमगुच्छ ह्या पुस्तकांच्या प्रस्तावना पाहा.) रामायण, महाभारत, उपनिषदें, मनुस्मृति इत्यादि ग्रंथ विद्यार्थ्यांनी जास्त वाचावेत अशी आमची इच्छा आहे. त्या ग्रंथांत आर्यसंस्कृति साठविलेली आहे व त्या ग्रंथांतच संस्कृत भाषेचे जिवंत स्वरूप आहे. म्हणून त्यांच्याशी परिचय वाढावा हा आमचा हेतु असल्यामुळे त्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. अर्थात् त्या ग्रंथांचे मुद्दाम ह्या कामासाठी वाचन करून शब्द घेणे बऱ्याच प्रयासानचे झाले.

२. धातू निराळे दिले आहेत हा दुसरा विशेष होय. संस्कृत भाषेत साधित शब्द फार असतात. धातू हे मूळ असून त्यापासून अनेक शब्द तयार होतात. धातूचा मुख्य अर्थ कळला व प्रत्यय कोणत्या अर्थी लागतात हे समजले म्हणजे पुष्कळ साधित शब्दांचा उलगडा होतो. म्हणून हे धातूचे प्रकरण स्वतंत्र केले आहे. शब्द व त्यांचे अर्थ देणे हे मुख्यतः कोशाचे काम आहे. प्रत्यय, त्यांचे अर्थ व ते धातूंना लावून रूपें कशी होतात हे दर्शविणे व्याकरणाचे काम होय. म्हणून ती माहिती येथे दिली नाही.

३. उपसर्गयुक्त धातु वर्णक्रमाने न देता ते त्या त्या धातूखाली दिल्याने मूळ धातूचे अर्थ उपसर्गांमुळे कसे कसे बदलत जातात हे स्पष्ट नजरेस येते. म्हणून धातूखाली त्या त्या धातूचा उपसर्ग देऊन त्या उपसर्गांमुळे होणारे धातूचे अर्थ दिले आहेत.

४. विशेषनामें निराळी दिली आहेत. कारण, हीं देताना शब्दाचा अर्थ द्यावयाचा नसतो, तर शब्दाने दर्शविलेल्या व्यक्ति, स्थळ इ.ची माहिती द्यावयाची असते व ती स्वतंत्र भागात दिल्याने जास्त सोय होते.

५. न्याय, अलंकार, वृत्तें इ. उपयुक्त माहिती स्वतंत्र परिशिष्टांत दिली आहे.

कोश लवकर तयार होऊन वाचकांच्या हाती पडावा अशी आमची उत्कट इच्छा होती व त्याकरता कसून मेहनत करून एकसारखे खपलो असताहि इतका दिनावधि लागला त्यास अनेक कारणें झाली. मुख्यतः लोकशिक्षण मासिकाचे व कोशाचे अशी दोन कामें एकसमयावच्छेदेकरून चालवावी लागत. मासिक हे नियतकालिक असल्यामुळे त्याला वेळेचे महत्त्व अधिक. अंक दरमहाचे दरमहा निघून वर्गणीदारांकडे रवाना झाले पाहिजेत. तेव्हा त्याची वेळ चुकू देता येत नसे. ती वेळ साधण्यात व मासिकाची इतर कामें करण्यात कोशाचे काम मधून मधून मागे पडे. शिवाय राष्ट्रीयशिक्षणमालेचे कामहि चालू होते. (गेल्या साली इंग्रजीप्रवेश व बीजगणित ह्यांच्या नवीन आवृत्त्या काढल्या असून मुलांचा महाराष्ट्र हे नवे पुस्तक मालेत छापले आहे. तसेच काव्हूर उर्फ इटलीचा रामदास हेहि पुस्तक छापविले आहे.) तिकडेहि वेळ घालवावा लागे. ह्याशिवाय दैविक आपत्तीहि मधून मधून येत गेल्या. दोन वर्षें तळेगावी प्लेग असल्यामुळे स्थलांतर करावे लागले व कामाचा गोंधळ झाला. दुसऱ्या प्लेगात तर आमचे तळेगाव येथील घरवाले व स्नेही, तसेच आमची गृहिणी व आमचे कारकून असे तीन बळी प्लेगने घेतल्यामुळे कामाची काही काळापर्यंत अत्यंत अव्यवस्था झाली. तीन आधार एकदम गेल्यामुळे तळेगावी राहणे अत्यंत गैरसोईचे होऊन कायमचे स्थानांतर करावे लागले व कार्यालयाचे सर्व बिऱ्हाड तळेगावाहून येथे आणवून त्याची येथे घडी बसविण्यातहि बराच वेळ खर्च झाला. वरील आपत्तिमूलक अस्वास्थ्य बरेच झाले. त्यामुळेहि कामात खोटी झालीच. ह्याप्रमाणे हा ग्रंथ तयार करण्यात कित्येक अडचणी आल्या पण ग्रंथ छापतानाहि पुष्कळ अडचणी आल्या. कोशात देण्याचा मूळ शब्द, त्याचा अर्थ व आधार हे स्पष्ट निरनिराळे दिसावेत म्हणून एकाच उंचीचे, पण निरनिराळ्या प्रकारचे ठसे पसंत करावे लागले व कोशाकरता भरपूर नवीन ठसे पाडून घ्यावे लागले. मधून मधून एखाद्या अक्षराचे ठसे अंदाजाबाहेर लागत. त्यामुळे तो ठसा भरपूर पाडून होईपर्यंत खंड पडे. कोशाची छपाई इतर सामान्य ग्रंथांच्या छपाईप्रमाणे नसते. त्यात दक्षता फार ठेवावी लागते. निरनिराळे ठसे, अनेक संक्षेप इत्यादि भानगडी असल्यामुळे छापखान्यातली माणसे अशा कामाला रुळण्यास वेळ लागतो. इतक्या सर्व भानगडींमध्ये दिवस फार जातात व कच्ची मुद्रिते तपासता तपासता डोळ्यांची अगदी खराबी होऊन जाते. अशा सर्व अडचणीतून एकदाचा हा ग्रंथ पार पडला हे ईश्वराचे मोठेच उपकार म्हणावयाचे.

आता ह्या कामी ज्या अनेक व्यक्तींचे साहाय्य झाले त्यांच्या अत्यंत आभारपूर्वक उल्लेख करावयास पाहिजे. अनेक लोकांचे ह्या कामी कमीजास्त प्रमाणाने साहाय्य झाले आहे; त्या प्रत्येकाचा निर्देश करणे अशक्य आहे. म्हणून मुख्य व्यक्तींचा उल्लेख करीत आहो. पण सर्वांचा येथे नामनिर्देश करणे अशक्य असले तरी ज्या ज्या माणसाचा यत्किंचितहि उपयोग ह्या कामास झाला आहे त्या प्रत्येकाचे आम्ही मोठ्या आनंदाने आभार मानतो. प्रारंभी योजना जाहीर केल्यावर काही प्रमुख शास्त्री, अध्यापक व प्रोफेसर ह्यांना कोशाची योजलेली रचना कळवून त्यांच्याकडून सूचना मागविल्या. त्याप्रमाणे त्यांपैकी बहुतेकांनी काळजीपूर्वक सूचना केल्या व मागाहून नमुन्याचे पान पाठविले ते पाहूनहि आणखी सूचना केल्या. सबब आम्ही त्यांचे आभारी आहो. काही तरूण मंडळींनी, एकाने शाकुंतल, तर दुसऱ्याने मुद्राराक्षस अशा रीतीने ग्रंथ वाचून शब्दांचे टाचण पाठवून आम्हास मदत केली. गु. अण्णासाहेब विजापूरकर ह्यांनी लघुकोशाची प्रथम जाहिरात देताना योजना केली व मधून मधून दिशाहि दाखविली, शिवाय बहुतेक प्रत त्यांच्याकडून चाळली गेली आहे. राजापूरच्या पाटणकरद्वयांनी बरीच कामगिरी केली, तिचा उल्लेख मागे केलाच आहे. कोणाकडून काहीं कोणाकडून काहीं अशी पुस्तकें आणावी लागली त्यांचेहि आभार मानले पाहिजेत. खुद्द 'महाराष्ट्रविद्याप्रसारकमंडळा'चे बरेच ग्रंथ ह्या कोशाच्या कामी उपयोगी पडले आहेत. राजापूरच्या संस्कृतपुस्तकसंग्रहालयातील पुस्तकांचा रा.पाटणकरांना पुष्कळ उपयोग करण्यास सापडला व तेथील संस्कृत पाठशाळेचे गुरु विद्यारत्न दत्तात्रेय वासुदेवशास्त्री निगुडकर ह्यांची वारंवार मदत झालेली आहे. तेव्हा ह्या दोन्ही संस्था व गुरूजी ह्यांचेहि आम्ही ऋृणी अाहो.

आता घरच्या मंडळींचाहि उल्लेख करणे जरूर आहे. कोशासारखे किचकट व नीरस काम करताना न कंटाळता व नेटाने वे.शा.सं.भास्करशास्त्री सोमण ह्यांनी कोशाची योजना जाहीर केली तेव्हापासून आजपावेतो काम केले आहे. तसेच मि.रा.राजाराम दामोदर देसाई हे प्रथमगुच्छाच्या वेळेपासून ह्या कोशाच्या कल्पनेमध्ये असून यंदा हे काम पार पाडण्यास त्यांनी पुष्कळच मदत केली ह्याबद्दल ह्या उभयतांचे आम्ही फार आभारी आहो. ग्रंथ रचण्यात ह्याप्रमाणे अनेकांनी मदत केली आहेच, पण 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' ह्या न्यायाने सर्व कार्यांना द्रव्याची आवश्यकता असते. कोशासारखे प्रचंड काम तीन वर्षें सारखे चालविणे, ग्रंथ तयार करणे व तो छापविणे म्हणजे मोठ्या खर्चाचे काम आहे व ते आम्हास स्वतःच्या हिंमतीवर पार पाडणे अगदी अशक्य होते. पण द्रव्यदृष्टया अशक्य असे हे काम नागपूरचे प्रसिद्ध ठेकेदार रा.रा.परशुराम गणेश जोग ह्यांच्या साहाय्याने शक्य झाले. त्यांनी कोश छापून निघेपर्यंत लागणारा निधी बिनव्याजी कर्जाऊ देण्याचे कबूल केले व म्हणूनच हे काम आज शेवटास गेले आहे. एरवी 'उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः' ह्याप्रमाणे ह्या ग्रंथाची वाट लागण्याचा संभव होता. तेव्हा सदर उदार गृहस्थांचे आभार मानणे अत्यंत अवश्य होय.

कोशासारख्या कामाला स्वतः ठसे पाडून घेण्याची छापखाण्याची सोय असेल तरच ठीक. कोणते अक्षर किती लागेल ह्याचा अंदाज आगाऊ केव्हाच करता येत नाही, तेव्हा अक्षरें जशी लागतील तशी पाडून घ्यावी लागतात. ह्याच दृष्टीने आर्यभूषण छापखान्याकडे आम्ही हे काम दिले व एकंदरीने काम सर्वांना पसंत पडण्यासारखे झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ह्याबद्दल सदर छापखान्याचे आम्ही आभारी आहो. तसेच कागद, ठसे, छपाई, बांधणी ह्या बाबतीत सल्लामसलत देणे व काही अंशी मुद्रितेहि तपासणे ह्या कामी येथील 'धि प्रिंटिंग एजन्सी'चे मालक रा.रा.रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर (मोरोपंतकाव्यग्रंथप्रकाशक) ह्यांचे फारच साहाय्य झाले आहे, तेव्हा त्यांचेहि आभार मानणे जरूर आहे. ह्याप्रमाणे अनेक दिवस होऊ घातलेला व वाचकांनी आतूरतेने वाट पाहिलेला असा हा ग्रंथ ईशकृपेने अनेक अडचणींतून पार पडला आहे. गीर्वाणवाङ्मयाची व राष्ट्रीय शिक्षणाची ही सेवा महाराष्ट्र गोड करून घेवो!

जनार्दन विनायक ओक

लोकशिक्षणकार्यालय, पुणे दासनवमी माघ व. ९ शके १८३७


दुसऱ्या व चौथ्या आवृत्तींतील महत्त्वाचा काही भाग खाली दिला आहे.

चालू शतकाच्या अगदी प्रारंभी जी अनेकांगी राष्ट्रीय चळवळ उदय पावली तिचे राष्ट्रीय शिक्षण हे एक महत्त्वाचे अंग होते. राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे तरुण ज्यामुळे निर्माण होतील असे शिक्षण असले पाहिजे, आणि तेहि स्वभाषेतूनच दिले पाहिजे, अशासाठी त्याग आणि निष्ठापूर्वक कार्य करणारी जी प्रमुख मंडळी होती तीत श्री.जनार्दन विनायक ओक हे एक होते. तळेगावचे मूळचे समर्थ विद्यालय सरकारच्या दडपशाहीला बळी पडल्यावरही निरनिराळ्या विषयावर राष्ट्रीय उन्नतीला पोषक असे ग्रंथ मराठीत करवून ते आपल्या राष्ट्रीय ग्रंथमालेतून प्रसिद्ध करण्याचे कार्य त्यांनी सतत चालू ठेविले होते. गीर्वाणलघुकोश हा त्या प्रयत्नाचाच एक भाग होता.

संपादक ज.वि.ओक आणि त्यांचे सहकारी ह्यांची संस्कृताच्या अभ्यासासंबंधी काही ठाम मते होती. संस्कृतातील कोणकोणत्या ग्रंथांच्या अभ्यासावर विशेष भर द्यावा हे कोशाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत त्यांनी सांगितले आहे. त्या सर्व ग्रंथांचे बारकाईने, स्वतंत्रपणे, वाचन करून त्या ग्रंथांतील शब्द आणि त्यांचे संदर्भ ह्यांचा संग्रह ह्यांनी कोश समृद्ध झाला. पूर्वप्रसिद्ध कोणत्याहि कोशावर गीर्वाणलघुकोश बेतलेला नसून त्याची निर्मिति अशा स्वतंत्र रीतीने झालेली आहे.

श्री.जनार्दन विनायक ओक आणि त्यांचे सहकारी ह्यांनी ज्या काळात ह्या कोशाची निर्मिति केली, त्या काळात 'मानधन' आणि 'अनुदान' हे दोन शब्द अस्तित्वातच नव्हते. स्वदेश आणि स्वभाषा ह्यांची भक्ति हे त्या मंडळींचे स्फूर्तिस्थान होते. त्यांनी स्वतःची पोटे बांधून, अगदी सामान्य स्थितीतील मराठी भाषिकांनी गीर्वाणभाषेचा अभ्यास मराठीतूनच करावा ह्या तळमळीने स्वार्थत्याग करून हा कोश रचिला आणि एकून ६९४ पृष्ठांचा कापडी पुठ्ठा बांधणीचा ग्रंथ, केवळ चार रुपयात मराठी जनतेला उपलब्ध करून दिला.


रसांवर विवेचन करणारे संस्कृत व मराठी ग्रंथकार संपादन

हा लेख केशव नारायण वाटवे ह्यांच्या रसविमर्श ह्या पुस्तकावर आधारलेला आहे.


रस

प्राचीन काळापासून रसांचा उग्दम झाला. रसांची दोन रूपे आहेत - एक आविष्कारात्मक व दुसरे शास्त्रीयचर्चात्मक. अथर्ववेद, उपनिषदें इत्यादि वैदिक वाङ्मयामध्ये रसांचा उल्लेख दिसून येतो. ऋग्वेद, रामायण, महाभारत व इतर काव्यनाटकांमध्येहि रस आविष्कृत झालेले दिसून येतात. रस एक प्रमुख काव्यतत्त्व म्हणून रसांची साहित्यशास्त्रीय चर्चा भरतमुनींच्या नाट्यसूत्रांपासून चालू झाली. परंतु भामह, दण्डी व वामन इत्यादिकांनी काव्यातील अलंकार, गुण, रीति वगैरे तत्त्वांना अधिक महत्त्व दिल्यामुळे त्या काळात रसांना गौणपणा आला. मात्र आनंदवर्धनाच्या काळापासून रसांना पुन्हा प्राधान्य व महत्त्व मिळाले ते अगदी शेवटपर्यंत कायम आहे. अगदी पूर्वीच्या काळी नाट्यसंप्रदाय व काव्यसंप्रदाय भिन्न मानले जात असावेत. पण पुढच्या काळात स्वतंत्र नाट्यसंप्रदाय काव्यसंप्रदायात मिसळून गेला असे दिसून येते. अाणि म्हणूनच नाट्यांतील रसचर्चा व काव्यांतील रसचर्चा असा भेद उरला नाही. भामह, दण्डी व वामनाच्या काळात रस हा घटक काव्यनिष्ठ (objective) होता; पण ध्वनिमतापासून तो रसिकनिष्ठ (subjective) झाला. अभिनवगुप्ताने भरताचा रस व आनंदवर्धनाचा ध्वनि ह्यांचा सुरेल संगम करत रसध्वनीचे काव्यचर्चेतले महत्त्व कायमस्वरूपी वाढविले. म्हणूनच अलंकार, रीति, वक्रोक्ति इत्यादि एके काळी प्रमुख मानली जाणारी तत्त्वें गौण व रसानुषंगिक ठरली. रसांचे महत्त्व अधिकाधिक वाढू लागले. वैदिक वाङ्मयांत उगम पावलेले हे रसांचे रूप काळाप्रमाणे विस्तारत गेले आणि फार व्यापक झाले.


काही रसविषयक संस्कृत ग्रंथ व ग्रंथकार खालीलप्रमाणे आहेत.

भरतमुनि - नाटयशास्त्र

भामह (इ.स. ४०० किंवा इ.स. ५००-६३०) - काव्यालङ्कार (४०० श्लोक)

दण्डी (इ.स. ६००-७५०) -

वामन (इ.स. ८००) -

उद्भट (इ.स. ८००) - काव्यालंकारसंग्रह

रुद्रट (इ.स. ८००-८५०) - काव्यालंकार

रुद्रभट (इ.स. ९००-११००) - शृंगारतिलक

आनंदवर्धन (इ.स. ८४०-८७०) - ध्वनिमत

? (इ.स. ८५०-९००) - अग्निपुराण

राजशेखर (इ.स. ९२५) - काव्यमिमांसा

कुन्तल (इ.स. ९२५-१०२५) - वक्रोक्तिमत

महिमभट्ट (इ.स. १०२०-६०) - व्यक्तिविवेक

भट्टतौत (इ.स. ९६०-९९०) - काव्यकौतुक

धनंजय (इ.स. ९९४) - दशरूपक

भोज (इ.स. १०१८-१०५४) - रसायोग

क्षेमेन्द्र (इ.स. १०२५-१०६०) - औचित्यविचारचर्चा

मम्मट (इ.स. ११००) - काव्यप्रकाश

शारदातनय (१२ व्या शतकाचा पूर्वार्ध) - भावप्रकाशन

हेमचंद्र (१२ व्या शतकाचा उत्तरार्ध) - काव्यानुशासन

रामचंद्र व गुणचंद्र (१२ व्या शतकाचा उत्तरार्ध) - नाट्यदर्पण

शिङ्गभूपाल (१४ वे शतक) - रसार्णवसुधाकर

शार्ङ्गदेव (इ.स. १२१०-१२४७) - संगीतरत्नाकर

भानुदत्त (१४ व्या शतकाच्या प्रारंभी) - रसतरंगिणी

विश्वनाथ (इ.स. १३००-१३८४) - साहित्यदर्पण

रूपगोस्वामी (इ.स. १५००-१५६०) - भक्तिरसामृतसिंधु

मधुसूदनसरस्वती (१६ व्या शतकाच्या शेवटी किंवा १७ व्या शतकाच्या आरंभी) - श्रीभगवद्भक्तिरसायन

शांडिल्य व नारद - शांडिल्यसूत्र व नारदभक्तिसूत्रें


ज्याप्रमाणे संस्कृतमध्ये रसांचा उग्दम व विकास झाला त्याचप्रमाणे मराठीत रसांचे महत्त्वाचे स्थान निर्माण झाले. मराठीने रसांची परिभाषा संस्कृत भाषेतून जशीच्या तशी जरी घेतली असली तरी बदलत्या परिस्थितीमुळे त्या त्या रसांचे महत्त्व बदलले. संस्कृत वाङ्मयातून शिक्षित व श्रीमंत लोकांच्या भावना व्यक्त होत होत्या तर मराठीतून अशिक्षित व गरीब बहुजनसमाजाच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. त्यामुळे शांत व भक्तिरस रसव्यवस्थेत जोरावारीने शिरू लागले व शृंगारहास्यादि रस हिरमुसून गेले.

मराठीतील रसव्यवस्थेची साधारणपणे तीन युगे दिसून येतात :

१. महानुभवांपासून शाहिरांपर्यंत धार्मिक व लौकिक जुने मराठी.

२. इंग्रजकाळानंतर जुन्या विद्वानांनी संस्कृत साहित्यविषयक ग्रंथांची केलेली भाषांतरे.

३. आंग्लशिक्षित चिकित्सक पंडितांची अलीकडील स्वतंत्र रसविषयक चर्चा.


मराठीत जुन्या युगात संत किंवा साधुकवि व कलाकवि असे दोन वर्ग होते. कलाकवींत पुन्हा दोन वर्ग होते - देवदेवतांची चरित्रे गाणारे व लौकिक विषयांवर रचना करणारे.

भास्करभट्ट बोरीकर - शिशुपालवध, एकादश स्कन्ध

दामोदर पंडित - वच्छहरण

नरेंद्रकवि - रुक्मिणीस्वयंवर

ज्ञानबोध

सह्याद्रिवर्णन

ऋद्धपूरवर्णन

इतर संत व कवी खालील प्रमाणे आहेत.

संत - ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम, एकनाथ, निळोबा.

कवी - मुक्तेश्वर, वामन, श्रीधर, सामराज, विठ्ठल, नागेश, रघुनाथपंडित, मोरोपंत.


मराठीतील दुसऱ्या युगातील काही महत्त्वाचे ग्रंथ व ग्रंथकार पुढीलप्रमाणे आहेत.

दाजी शिवाजी प्रधान (इ.स. १८६८) रसमाधव

ज.वि.दामले (इ.स. १८८४) अलंकारादर्श

बळवंत कमलाकर माकोडे (इ.स. १८९२) रसप्रबोध

राजारामशास्त्री भागवत (इ.स. १८९३) अलंकारमीमांसा

गणेश सदाशिवशास्त्री लेले (इ.स. १८९४) साहित्यशास्त्र

वामन एकनाथ क्षिरसागर ऊर्फ केमकर (१८९६) अलंकारविकास

कृष्णशास्त्री चिपळूणकर (१९०५) अर्थालंकारनिबंध

तळेकरशास्त्री (१९०५) - अलंकारदर्पण

ग.मो.गोरे (१९०८) - अलंकारचंद्रिका व काव्यदोषदीपिका

बाळूताई खरे - अलंकारमञ्जूषा

भिडे - अर्थालंकारनिरूपण


मराठी रसचर्चेच्या तिसऱ्या महत्त्वाच्या युगातले आधुनिक विद्वान पुढीलप्रमाणे आहेत.

न.चिं.केळकर - सुभाषित आणि विनोद, हास्यविनोदमिमांसा

कृष्णाजी कोल्हटकर

प्रो. श्री.वि.परांजपे

प्रो. रा.श्री.जोग - अभिनव काव्यप्रकाश

पं. बाळाचार्य खुपेरकर - वेदशास्त्रदीपिका

गोदावरी केतकर (१९२८) - भारतीय नाट्यशास्त्र

डॉ. श्रीधर केतकर (१९२८)

प्रो. द.के.केळकर (१९३१) - काव्यलोचन

प्रो. द.सी.पंगु

काकासाहेब कालेलकर

प्रो. य.र.आगाशे (१९३४) - सारस्वत-समीक्षा

श्री. नी.र.वऱ्हाडपांडे

श्री. मर्ढेकर (१९४१)- वाङ्गमयीन महात्मता

रा. दा.ना.आपटे - साहित्यप्रकाश

श्री.डॉ.केशव नारायण वाटवे संपादन

श्री.डॉ.केशव नारायण वाटवे हे एक मराठी लेखक, संस्कृत विद्वान, प्राध्यापक, संशोधक व टीकाकार होते.


विद्यार्थीदशा


श्री.वाटवे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. कॉलेजात शिकत असताना ते वैदिकाश्रमात ह.भ.प.विनायकबुवा साखरे ह्यांच्या कडक देखरेखीखाली राहत असत. त्यांच्याबरोबर वर्गमित्र, श्री.धोपाटेही राहत असे. आश्रमाच्या कडक शिस्तीमुळे त्यांना डोक्यावर केस ठेवता येत नसत. तुळतुळीत हजामत करून ते कॉलेजला जात. अाचार्य अत्रेही त्याच सुमारास फर्ग्युसनमध्ये शिकत होते. ते श्री.वाटवे ह्यांचे वर्गबंधू होते.

श्री.के.ना.वाटवे ह्यांना कविता करण्याचा नाद होता. त्यांचा स्वभाव विनोदी होता. एकदा त्यांनी अाचार्य अत्रे ह्यांच्यावर एक मर्मभेदी कोटी केली होती. प्रसंग असा की 'मासिक मनोरंजन' मध्ये 'पानाआड फूल' ह्या नावाची कविता अत्रे ह्यांनी लिहिली होती. तिच्या शेवटच्या ओळीत 'त्या फुलाप्रमाणे मलाही एखाद्या पानाआड दडावेसे वाटते' अशी इच्छा त्यांनी प्रकट केली होती. ती ओळ वाचून वाटवे एक दिवस हसत हसत त्यांना म्हणाले, "तुम्हाला ज्याच्याआड दडता येईल असे एकच पान आहे". त्यावर अत्रे ह्यांनी "कोणते?" अशी विचारणा करताच ते म्हणाले "केळीचे!"

(संदर्भ : अाचार्य अत्रे, कऱ्हेचें पाणी, खंड १, पान १९१)


नोकरी


श्री.के.ना. वाटवे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे प्राध्यापक होते. प्राचार्य र.दा.करमरकर, प्रा.र.ना.गायधनी, डॉ. रामचंद्र शंकर वाळिंबे, प्रा.रा.ना.गद्रे व प्रा.अरविंद गं. मंगरूळकर हे त्यांचे सहाध्यापक होते. त्यावेळी ते पुण्यात योगकुंज, चिमणबाग, टिळक रोड, सदाशिव पेठ येथे राहत होते.


वाटवे ह्यांची साहित्यसंपदा


श्री. वाटवे ह्यांनी अनेक पुस्तके लिहिली. ते व्यासंगी व संशोधक वृत्तीचे होते हे त्यांच्या लिखाणातून दिसून येते. त्यांचा रसाचा अभ्यास त्यांच्या 'रसविमर्श' पुस्तकातून सतत जाणवतो. तसेच त्यांची इतर पुस्तकेही तितकीच प्रभावी आहेत. त्यांनी संस्कृत नाटकांचा, काव्यांचा व कवींचा अभ्यास करून लिहिलेली सर्व पुस्तके भावी पिढीला मार्गदर्शक आहेत.

पांचगणीनजीक दांडेघर ह्या गावी 'कुटीर' नावाचा एका बंगला होता. त्यात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाटव्यांनी 'संस्कृत काव्याचे पंचप्राण' ह्या ग्रंथाचा बराचसा भाग लिहिला. ह्या निसर्गरम्य व शीतल निवासस्थानाचा लाभ त्यांना ह्या ग्रंथाच्या वेळीच केवळ नव्हे तर अठरा एकोणीस वर्षे अव्याहतपणे एेन उन्हाळ्यात झाला. ह्याचे सर्व श्रेय ह्या रम्य निवासाचे धनी व त्यांचे रसिक स्नेही श्रीमंत बाळासाहेब साठे (इनामदार, वाई) ह्यांच्या सौजन्यास व विद्याप्रियतेस आहे. श्रीयुत तात्यासाहेब केळकरांच्या 'टिळकचरित्राचे' काही लेखनही ह्याच निवासात झाले आहे.

वाटवे ह्यांची काही पुस्तके खालीलप्रमाणे अाहेत.

१. रसविमर्श

२. संस्कृत काव्याचे पंचप्राण

३. संस्कृत नाट्य-सौंदर्य

४. मराठी पंडीत कवि

५. भागवतातील कथा

६. मराठी पंचतंत्र

७. दश अवतार कथा

८. मराठी मेघदूत

९. पंचमहाकाव्य कथा

रसविमर्श - लेखक श्री.केशव नारायण वाटवे संपादन

'रसविमर्श' हा श्री.के.ना.वाटवे ह्यांचा एक उत्कृष्ट संशोधनात्मक ग्रंथ आहे.


रसविमर्शाची भूमिका


भरतमुनींपासून विद्यमान पंडितांपर्यंत सर्वांची रसविषयक मतें व मतान्तरें रसविमर्शामध्ये विचारात घेतली गेली आहेत. मानसशास्त्राचा आधार घेऊन संस्कृत रसव्यवस्थेचा मराठीशी सांधा जोडण्याचा रसविमर्शाचा हेतु आहे. रसविमर्शामध्ये संस्कृत पंडितांची व मराठी साहित्यिकांची (तीसुद्धा प्रायः 'केशवसुतां' नंतरची) उदाहरणे दिलेली आहेत. तसेच रसांविषयी पाश्चात्त्य साहित्यशास्त्रातील विद्वानांची मतेंही लक्षात घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


रसविमर्शाला लाभलेली पार्श्वभूमि


दहाबारा शतकांपर्यंत बहुतेक स्थगित झालेला भारतीय विद्यांचा थोर संप्रदाय १८७५ सालापासून मराठीत पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला. शास्त्रीय विषयांमध्ये खालील विद्वानांनी मोलाची भर घातली.

वेदविद्या आणि वेदान्तशास्त्र - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

कोशशास्त्र - डॉ.केतकर

इतिहासशास्त्र - वि.का.राजवाडे

धर्मशास्त्र - प्रो.काणे व दप्तरी

छन्द:शास्त्र - डॉ.माधवराव पटवर्धन

हास्यविनोदमीमांसा - न.चिं.केळकर

नीतिशास्त्र - प्रो.वामनराव जोशी

तसेच भाषाशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादि शास्त्रांमध्ये त्या त्या विद्वानांनी भर घातली. ह्या चिकित्सक प्रवृत्तीचा लाभ वाङ्मयटीकाशास्त्रालाही झाला. त्याचा गाभा रस. रसचर्चेची सुरुवात प्रारंभी भाषान्तरित ग्रंथ, स्वतंत्र लेख व निबंध ह्यांपासून होऊन ती अखेर स्वतंत्र प्रबंधात परिणत झाली. पौरस्त्य व पाश्चात्त्य अशा दोनही साहित्यशास्त्रांचा तुलनात्मक अभ्यास चालू झाल्याने जुन्या रसव्यवस्थेकडे नवीन दृष्टीने पाहण्याची प्रथा सुरु झाली. त्यातच मानसशास्त्राचा उपयोग वाङ्मयात करण्याची सुरवात झाल्यापासून वाङ्मयटीकेत नवीन क्रान्ति झाली.

न.चिं.केळकर, श्री.कृ.कोल्हटकर, प्रो.श्री.नी.चाफेकर, प्रो.वा.म.जोशी, प्रो.रा.श्री.जोग, प्रो.द.के.केळकर इत्यादि नवीन विद्वानांनी चिकित्सक रसचर्चेत चांगलीच भर घातली. डॉ.माधवराव पटवर्धन ह्यांनी "जुनी रसव्यवस्था व्यर्थ आहे व तिची चर्चा म्हणजे एक शून्यसंशोधन आहे" असे क्षोभक मत प्रतिपादून तिला जोराची चालना दिली. ह्यावेळी श्री. रंगाचार्य रेड्डी व इतर जुन्या विद्वानांनी जुन्या रसव्यवस्थेचेच समर्थन केले. तात्पर्यार्थ, रसचर्चेचे मंथन चालू झाले. त्यात रसव्यवस्थेचे सर्वच घटक घुसळून निघाले आणि त्यांच्या मूलभूत कल्पना कोणत्या ह्याचे परीक्षण चालू झाले. त्यात उपस्थित झालेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१. रसाची सामग्री कोणती?

२. रसनिष्पत्ति कशी होते?

३. रसाच्या आस्वादाचे स्वरूप काय? किंवा काव्यानंदाची उपपत्ति कशी लावावयाची?

४. रस किती आहेत? ते किती असावेत? त्यांच्यात गौणप्रधानभाव कसा ठरवावयाचा?

५. अलंकार, गुण, रीति इत्यादि इतर काव्यांङ्गे व रस ह्यांचा परस्पर संबंध काय?

६. भक्ति हा स्वतंत्र रस मानावा की नाही?

७. ललितवाङ्मय व इतर कला ह्यांचा रसदृष्ट्या काही संबंध आहे काय?

८. रसप्रधान ललितवाङ्मय व नीति ह्यांचा मेळ कसा बसतो?

९. हल्लीच्या मराठीने पौरस्त्य व पाश्चात्त्य ह्या दोन साहित्यशास्त्रांपैकी कोणाच्या पावलावर पाऊल ठेवावे?

ह्या मुद्द्यांची मूलगामी चर्चा एकत्र व एका नव्या दृष्टीने केल्यास ती मराठी वाङ्मयटीकेच्या सशास्त्र वाढीला उपकारक होईल असे वाटवे ह्यांना वाटले. म्हणून अशी चर्चा रसविमर्श ह्या प्रबंधात त्यांनी करवयाचे योजले व त्याला मानसशास्त्राची जोड दिली. 'संस्कृत साहित्यशास्त्राचा इतिहास' लिहीत असताना प्रो.पां.वा.काणे ह्यांनी १९१० मध्येच रसव्यवस्था व मानसशास्त्र ह्यांचा संबंध सूचित करून ठेविला आहे.


रसविमर्शाची रचना


ह्या ग्रंथाचा आरंभ रसाच्या इतिहासापासून केला आहे. संस्कृतात रसमत केव्हा निघाले व त्याचा विकास कसा झाला, तसेच संस्कृत रसव्यवस्था मराठीत आल्यावर तिच्यावर काय संस्कार झाले ह्याचा संगतवार वृत्तान्त प्रथम निवेदिला आहे. हा वृत्तान्त सांगत असताना रसचर्चेतले जे महत्त्वाचे मुद्दे वर दिले आहेत त्यांबाबत संस्कृत व प्राकृत पंडितांची मतें काय काय होती हे संक्षेपत: कथन केले आहे. रसचर्चेचा इतिहास व तिचे विषय ह्यांची सांगड पडून चर्चा सुगम व्हावी म्हणून विषयप्रवेशात्मक दोन प्रकरणें दिली आहेत. त्यामुळे पुढे केलेल्या मुख्य चर्चेत वाचकांचा प्रवेश सुखाने होतो. मुख्य चर्चेची मांडणी १० निकषांत केली आहे.


अनुक्रमणिका


विषयप्रवेश - १. रसांचा संस्कृतातील उद्गम आणि विकास २. रसांचा मराठीतील अवतार

निकष १ ला - रसांचे मानसशास्त्रीय अधिष्ठान

निकष २ रा - रससामग्री

निकष ३ रा - रसनिष्पत्तिप्रक्रिया

निकष ४ था - रसास्वाद किंवा काव्यानंदमीमांसा

निकष ५ वा - रससंख्यानिर्णयाची तत्त्वें

निकष ६ वा - भक्तिरस

निकष ७ वा - नवरसस्वरूपदर्शन

निकष ८ वा - रस व काव्यांची उपांगें

निकष ९ वा - रस व ललितकला

निकष १० वा - रस व पाश्चात्त्य साहित्यशास्त्र

निकष ११ वा - रसव्यवस्थेचे संस्कार व आधुनिक मराठी साहित्यशास्त्राचा पाया

१. आधारभूत ग्रंथ

२. लेखक-नाम-सूचि

३. विषयसूचि


पहिली व दुसरी अावृत्ति


पहिली अावृत्ति - १९४२

दुसरी आवृत्ति - १९६१. प्रकाशक - कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयानगर, पुणे ३०. पाने - ४७४.

'रसविमर्श' ह्याची पहिली अावृत्ति १९४२ साली निघाली. एकोणीस वर्षांनी दुसऱ्या सुधारीत अावृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. पहिली अावृत्ति संपून गेल्यानंतर साधारण चार पाच वर्षांनी दुसऱ्या अावृत्तीचे प्रकाशन झाले. अनेक अडचणींमुळे वाटवे ह्यांना दुसऱ्या अावृत्तीचे काम हाती घेता आले नव्हते. परंतु पुस्तकास निकडीची मागणी असल्याने ह्या नव्या अावृत्तीचे काम हाती घेणे अावश्यकही होते. थोड्या उशिरांनी का होईना नवी सुधारलेली अावृत्ति मराठी साहित्यशास्त्राच्या अभ्यासकांच्या हाती आली हे भाग्यच. ह्या आवृत्तीला वाटवे ह्यांनी ७ पानांची प्रस्तावना लिहिली.

पहिल्या अावृत्तीवर झालेल्या टीकेला वाटव्यांनी त्या त्या वेळेच्या मासिकांतून आणि काही गौरव-ग्रंथांतूनही उत्तरे दिली होती. त्या सर्वांचा समावेश करून व काही पुस्त्या-दुरुस्त्या जोडून 'रसविमर्श' पुन्हा एकदा लिहून काढावा असे त्यांच्या मनात होते. परंतु उतार वयात प्रकृति बिघडल्यामुळे त्यांना ह्या पुनर्लेखनाचा ताण सहन होण्यासारखे नव्हते. शिवाय ह्यामुळे पृष्ठांची संख्या बेसुमार वाढून ग्रंथाची किंमत अभ्यासकांच्या आटोक्याबाहेर गेली असती. म्हणून तो विचार त्यांनी सोडून दिला. तथापि त्यांना जेथे दुरुस्ती आवश्यक वाटली तेथे त्यांनी ती आपल्या दुसऱ्या अवृत्तीत केली. शिवाय त्याच्या प्रस्तावनेतच काही आक्षेपांना संक्षिप्त उत्तरेंही दिली.

'रसविमर्श' च्या रचनेपासूनच प्रा.दे.द.वाडेकर ह्यांच्याशी वाटवे ह्यांनी मानसशास्त्रासंबंधी वेळोवेळी चर्चा केली होती. न्यू किताबखान्याचे चालक श्री.वि.दामले ह्यांनी 'रसविमर्श' ची दुसरी आवृत्ति प्रकाशित केली. प्रुफे तपासण्याचे किचकट काम त्यांच्या चिकित्सक आणि मर्मज्ञ स्नेही त्र्यं.रा.दामले ह्यांनी निरलसपणे व चोख केले.


पारितोषिके


'रसविमर्श' प्रसिद्ध होताच त्याचे चोहीकडून चांगले स्वागत झाले. अनेक मासिकांनी अाणि वृत्तपत्रांनी त्यावर अनुकूल अभिप्राय प्रकट केले. ह्या पुस्तकाला खालील तीन पारितोषिके मिळाली.

- १९४२ सालात उत्तम पुस्तक म्हणून मुंबई विश्वविद्यालयाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर पारितोषिक

- भोर येथील संकराजी नारायण पारितोषिक

- डेक्कन व्ह.ट्रा.सोसायटीचे इचलकरंजी पारितोषिक

तसेच मुंबई, पुणे, नागपूर, कर्नाटक, गुजराथ इत्यादि विद्यापीठांनी हा ग्रंथ मराठी सन्मान शाखेत बी.ए.ला (व एक ठिकाणी एम.ए.लाही) संदर्भग्रंथ म्हणून नियुक्त केला.


'रसविमर्श' च्या पहिल्या अावृत्तीवर झालेली टीका


'रसविमर्श' लिहिताना प्राचीन संस्कृत साहित्यशास्त्रातील रससिद्धान्त त्याच्या अंगोपांगासह मराठीत मांडणे, ही प्रथम मोठी जबाबदारी वाटवे ह्यांच्या समोर होती. त्यांतून शक्य तेथे तो सिद्धान्त पाश्चात्त्य मानसशास्त्राच्या निकषांनी तपासून पाहावयाचा त्यांचा मानस होता. त्यामुळे त्यांच्या विवेचनात मतभेदाला पुष्कळच जागा उत्पन्न झाली. म्हणून गुणग्रहणाप्रमाणेंच अनेक विद्वानांनी ह्या ग्रंथांचे दोषदर्शनही केले. असे मतभेद व्यक्त करणाऱ्या विद्वानांमध्ये काही संस्कृत साहित्यशास्त्राचे जाणते, काही पाश्चात्त्य टीकाशास्त्राचे अभ्यासक आणि काही निव्वळ मानसशास्त्राभ्यासी होते. त्यांच्या मतप्रदर्शनापासून योग्य तो बोध वाटवे ह्यांनी घेतलाच परंतु त्यांचे मत असे होते की, 'रसविमर्शा'चे सर्वांगीण आणि योग्य परीक्षण करणाऱ्या विद्वानांजवळ संस्कृत रसशास्त्र आणि आधुनिक पाश्चात्त्य मानसशास्त्र ह्या दोहोचेंही सखोल ज्ञान असावयास पाहिजे. 'रसविमर्शा'च्या बऱ्याच टीकाकारांत हे ज्ञान त्यांना आढळले नव्हते.

मतभेद व्यक्त करणाऱ्यांचे काही अाक्षेप खालीलप्रमाणे होते.

१. रससिद्धान्ताचे मानसशास्त्रीय परीक्षण कशास हवे? तो नुसता आहे तसाच मांडून दाखवावा म्हणजे पुरे.

२. मानसशास्त्रीय परीक्षण करावयाचेच असेल तर ते मानसशास्त्र निदान भारतीय तरी असावे.

३. पाश्चात्त्य मानसशास्त्रांत अनेक पंथ आहेत. त्यापैंकी एखादाच का घ्यावा?

४. रससिद्धान्ताचा मानसशास्त्राशी संबंध नाही. त्याचे विवेचन तत्त्वज्ञानाच्या (philosophy) साहाय्याने करावे किंवा फार तर सौंदर्यशास्त्रान्वये (Aesthetics) त्याचा विचार व्हावा.

५. संस्कृत स्थायिभाव हे सेंटिमेंट् नसून इन्स्टिंक्ट्स् किंवा इमोशन्स आहेत.

६. रससिद्धान्त हा एक जुन्या काळाचा विचार असल्याने तो हल्लीच्या काळी लागू पडत नाही. म्हणून त्यावर संस्करण करून तो बिघडवू नये. जुन्या काळाचा एक नमुना म्हणून तो म्यूझियममध्ये ठेवून द्यावा.

७. रसव्यवस्था अपुरी आहे. तिचे विवेचन हे शून्यसंशोधन आहे.

८. जुन्या रसव्यवस्थेत बदल करण्याचा किंवा जुन्या शास्त्रकारांना चूकबरोबर म्हणण्याचा आधुनिकांना अधिकारच नाही.

हे व अशासारखे पुष्कळ आक्षेप होते.


वाटवे ह्यांनी टीकेला दिलेले उत्तर


वरील आक्षेपात रस अाणि मानसशास्त्र ह्यांच्या परस्पर संबंधाविषयीचे आक्षेपच वाटवे ह्यांना जास्त अाणि महत्त्वाचे वाटले. त्याला त्यांनी दिलेले उत्तर खालीलप्रमाणे आहे.

कवीने निर्माण केलेल्या नाटक, काव्य आदीकरून ललित वाङ्मयाची गोडी चाखून त्यातून उच्च आनंद अनुभवणे रसशास्त्राचे उद्दिष्ट असते. हा आनंद बह्वंशी भावनात्मक असतो. कारण एका टोकाशी असलेल्या कवीच्या भावनांशी त्याचा संबंध असून काव्य-नाटकातील पात्रांच्या भावनांच्या द्वारा तो दुसऱ्या टोकाशी असलेल्या रसिकाच्या भावनांशी संबद्ध होतो. काव्यनाटकांचे वाचन किंवा दर्शन ह्या रसिकाच्या भावना कशा जागृत करते? व शेवटी त्याला वाङ्मयसौंदर्यप्रतीति कशी घडविते हा सर्व विषय 'रसविमर्शा'च्या पहिल्या दोन निकषांत विस्ताराने वाटव्यांनी दाखविला आहे. रसाचा विभाव, अनुभाव, व्यभिचारिभाव, स्थायिभाव ही सामग्री तर निव्वळ मानसशास्त्राचाच विषय आहे हे स्थूल दृष्टीच्या वाचकासही पटेल असे आहे.

रसास्वादाचा किंवा वाङ्मयसौंदर्यास्वादाचा विषय तत्त्वज्ञानाच्या किंवा सौंदर्यशास्त्राच्या कक्षेत येतो असा एक अक्षेप होता. रसास्वाद ह्या चौथ्या निकषात वाटव्यांनी काव्यानंदाचे सांख्य किंवा अद्वैत वेदान्त ह्या तत्त्वज्ञानाच्या पंथान्वये विवरण करणाऱ्यांचे मत दिले आहे. पण तेथे त्यांनी येवढेच सांगितले आहे की हे विवरण गूढ आहे. त्यापेक्षा मानसशास्त्रीय उपपत्ति सुगम आहे. सौंदर्यशास्त्राची सुद्धा एक मानसशास्त्रीय शाखा असून तिचा जनक फेचनर (Fechner) हा आहे. ह्या मानसशास्त्रीय सौंदर्यशास्त्राचा पहिला उद्देश मानवी मनाने केलेले सौंदर्याचे रसग्रहण हाच आहे. रसशास्त्रात तरी हा रसास्वाद हेच सौंदर्याचे खरे स्वरूप आहे. त्यामुळे सौंदर्यशास्त्रात मानसशास्त्र हक्कानेच येते. 'क्रीडारूप आत्माविष्कार' ही वाटव्यांनी दिलेली काव्यानंदाची उपपत्ति मानसशास्त्रीय असून सुगम आहे. मात्र येथील मानसशास्त्र हे विशिष्ट पातळीवरच्या (aesthetic plane) मनाचे शास्त्र असते हे काव्यरसिकांनी ध्यानी घ्यावे.

म्हणूनच वाटवे म्हणतात की मानसशास्त्राधिष्ठीत असलेले रसशास्त्र जर मानसशास्त्राच्या साहाय्याने स्पष्ट व सुगम करावयाचे नाही तर कशाने करावयाचे? भारतीय असे स्वतंत्र मानसशास्त्र नाही. वेदान्त-न्यायादिशास्त्र ह्यातील वस्तुज्ञानग्रहण (perception), योगशास्त्र, रसशास्त्र ह्यातच मनाच्या त्या त्या व्यापारांचे वर्णन व्यवस्थित रूपात आले असून वेद, उपनिषदें, इत्यादि इतर अनेक ठिकाणी मन व त्याचे व्यापार ह्यांचे विस्कळित उल्लेख आहेत. हेच आमचे भारतीय मानसशास्त्र. आता रसशास्त्रातील आमचे मानसशास्त्र तपासून पाहावयाचे तर आधुनिक पाश्यात्त्य मानसशास्त्रावाचून दुसरे कोणते साधन आहे? प्रायोगिक मानसशास्त्राच्या शाखेने व इतर शास्त्रांच्या वाढीमुळे आजचे मानसशास्त्र चांगले संपन्न झाले असून, ते रसाच्या विषयाला निश्चित सुगमता आणणारे आहे.

विद्यमान मानसशास्त्रात अनेक पंथ असले तरी त्यांतल्या त्यांत रसशास्त्रातील गृहित धरलेल्या कल्पनांच्या जास्त जवळ असलेला पंथ स्वीकारणेच इष्ट व ह्यासाठीच वाटवे ह्यांनी वुइल्यम् मॅग्डुगल्च्या (William McDougall) होर्मिक् पंथाचा आश्रय केला. काही मतभेद सोडले तर हा होर्मिक् पंथ म्हणजे भारतीय मानसशास्त्राचेच विकसित स्वरूप आहे असे त्यांना वाटले. निदान instinct (सहजप्रवृत्ति), emotion (भावना), sentiment (भावबंध), derived Emotions (साधित भावना) ह्यांच्यामुळे भारतीय रससामग्री उत्तम तऱ्हेने विवरून सांगता येते. त्यामुळे स्थायिभाव आणि व्यभिचारिभाव ह्यांचा अन्योन्यसंबंध अत्यंत स्पष्ट होतो. हे मॅग्डुगल्च्या मताप्रमाणे अनुक्रमे सेंटिमेन्ट व डिराइव्हड् इमोशन्स आहेत. ज्याच्याबद्दल आपल्या मनात सेंटिमेन्ट (किंवा स्थायिभाव) दृढ झाला आहे तो आपल्या सेंटिमेन्टचा विषय (object) ज्या ज्या अवस्थेत असेल त्याप्रमाणे मनात उत्पन्न होणारे आणि जाणारे जे अस्थिर भाव, ते संचारिभाव किंवा व्यभिचारिभाव (Derived Emotions) आहेत.

उदाहरणार्थ - एका तरुणीच्या मनात तिच्या प्रियकराबद्दल रति हा स्थायिभाव (sentiment of love) स्थिर झाला आहे. तो तिच्या रतिस्थायिभावाचा विषय (म्हणजे विषयालंबनविभाव). आता हा तिचा प्रियकर फार दिवसांनी परदेशाहून यावयचा आहे. तो आता थोड्याच वेळाने भेटणार म्हणून उत्सुकता, त्याच्यासारखाच कोणी आला म्हणून संशय, तो येणार ही आशा, त्याला वेळ लागला की चिंता, तो येणार नाही ह्या कल्पनेने निराशा, तो दिसला की आनंद, पण प्रवासात तो मेला असे समजले तर शोक असे अनेक भाव तिच्या मनात येऊन जातील. हेच रति ह्या स्थायिभावामुळे मनात येणारे दुय्यमभाव म्हणजेच संचारिभाव.

स्थायिभाव ----> रति

संचारिभाव ----> उत्सुकता, संशय, आशा, चिंता, निराशा, आनंद, शोक

ह्या मानसशास्त्रीय स्पष्टीकरणाने म्हणजे Derived Emotions च्या sentiment शी असलेल्या संबंधाने त्यांचे परस्पर संबंध जसे स्पष्ट होतात तसे आमच्या प्राचीनांच्या संदिग्ध व अलंकारिक भाषेने ते होत नाहीत. संचारिभाव हे सागरावरचे कल्लोळ किंवा सूत्रांत ओवलेली फुलें असे म्हणण्याने निश्चित ज्ञान होत नाही (कर्नाटक विद्यापीठाचे जर्नल, Vol III, No 2, जून १९५९ मधील वाटवे ह्यांचा लेख). स्थायिभाव हे इन्स्टिंक्ट, इमोशन, मूड वगैरे काही नसून ते सेंटिमेंट्स आहेत. हे वाटवे ह्यांचे निश्चित मत त्यांनी प्रा.दे.द.वाडेकर ह्यांच्या लेखाला उत्तर म्हणून म.सा.पत्रिकेत प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या लेखांत ठाम मांडले आहे. हा वाटवे ह्यांचा समग्र लेख परिशिष्ट म्हणून रसविमर्शाच्या दुसऱ्या निकषाच्या शेवटी छापला आहे.

सेंटिमेंट्स ह्यांना सहजप्रवृत्तींचा उपजत (Innate) पाया असला तरी मानवाच्या वैयक्तिक जीवनातले विषय त्यांना मिळून ते अनुभव-संपादित (acquired) होतात. तिच गोष्ट स्थायिभावांचीही आहे. साहित्यदर्पणाच्या तृतीय परिच्छेदातील 'वासना' (रति आदीकरून स्थायिभावच) स्पष्ट करताना टीकाकार म्हणतो की वासना दोन प्रकारची असते. एक प्राक्तनी (पूर्वजन्मातली म्हणजे उपजत किंवा सहजात) व दुसरी इदानींतनी (म्हणजे ह्या जन्मांतली म्हणजेच संपादित). ह्या दोन्ही प्रकारच्या वासनांमुळे रसास्वाद घेता येतो. स्थायिभाव रसिकांचेच असल्याने त्यांचेच विवेचन येथे 'वासना' शब्दाने केले आहे. ह्यावरून जुने लोक स्थायिभावांना अनुभवसंपादितही मानीत होते हे स्पष्ट होते.

मात्र अभिनवगुप्ताचा कल वासनेला-स्थायिभावांना उपजत मानण्याकडे आहे. कारण त्याच्या मनात वासनेचा सहजात किंवा प्राक्तन भागच जास्त असावा. स्वतः भरत ह्यावर स्पष्ट असे काही बोलला नव्हता. इतरही ग्रंथकार ह्या मुद्द्याबद्दल मूक आहेत. ह्यावरून असे स्पष्टच दिसते की मनाच्या ह्या संघटनांचे ज्ञान त्याकाळी आजच्याइतके सूक्ष्म व निश्चित नव्हते. केवळ अन्तर्निरीक्षणाच्या (Introspection) जोरावर त्यांनी केला इतका सूक्ष्म विचार करणे हे देखील मोठ्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे हे मान्य केले पाहिजे. पण त्यांना जे ज्ञान झाले नाही परंतु जे त्यांच्या मनात नक्की अनुक्त होते ते आज स्पष्ट करण्याचा अधिकार - शास्त्रीय सूक्ष्मतेच्या दृष्टीने - प्रत्येकास आहे असे वाटवे ह्यांना वाटते. मनात स्थायिभाव स्थिर झालेला असतात. ते काव्यवाचनाने किंवा नाट्यदर्शनाने जागृत होतात. त्यामुळे ज्या भावनांचा अनुभव येतो त्या भावना म्हणजे स्थायिभावजन्यच. रसास्वादात नुसताच भावनानुभाव नसतो तर त्यात कलाकृतीचे कौतुक, तटस्थता, तादात्म्य, दूरता, साधारणीकरण इत्यादि सौंदर्यस्वादाला (Aesthetic pleasure) अावश्यक असणारे घटकही असतात. भावनांना त्यात प्राधान्य आहे म्हणूनच त्यांचाच उल्लेख केला जातो. पण काही टीकाकारांचा ह्याविषयी गैरसमज झालेला दिसतो.


दुरुस्तीची स्थळें


दुसऱ्या आवृत्तीत वाटवे ह्यांनी करुणरसाबाबत महत्त्वाची दुरुस्ती केली आहे. करुणरसाचा भरताने दिलेला स्थायिभाव 'शोक' हा आहे. शोक ही प्राथमिक भावना नाही. ती प्रेमाच्या पूर्वावस्थितीवर अवलंबून आहे इत्यादि गोष्टी वाटवे ह्यांनी दाखविल्या आहेत. त्यावरच कशीतरी करुणरसाची उभारणीही त्यांनी पहिल्या आवृत्तीत करून दाखविली होती. पण तसे करणे चूक अाहे असे त्यांना नंतर वाटले. त्यांच्या पूर्वीच्या विवेचनात त्यांनी सुचविल्याप्रमाणे प्रेम हाच करुणरसाचा स्थायिभाव मानला पाहिजे. फरक इतकाच की, येथे प्रेमाचा विषय चिरवियुक्त किंवा मृतावस्थेत असतो. तसेच प्रेम हा शब्द व्यापक होतो. त्याचा निश्चित विषय ध्यानी येत नाही. म्हणून प्रेमाचे - प्रेमाधिष्ठित - तीन उत्कट प्रकार येथे घ्यावे. ते म्हणजे रति, वात्सल्य अाणि भक्ति; अाणि त्यांच्या विषयालंबन विभावांच्या आधारावर - ते विभाव वियुक्त किंवा मृत अवस्थेत असता - करुणरस उभारावा. ह्याचा अर्थ मात्र स्पष्ट असा होतो की, करुणरस हा स्वतंत्र रस न राहता शृंगार, वात्सल्य व भक्ति ह्या रसांचा तो एक प्रकार होतो. पण त्याला उपाय नाही. हा विषय वाटवे ह्यांनी विस्ताराने डॉ.पी.के गोडे गौरवग्रंथात मांडला आहे (पृष्ठ ४६८).

हास्यरसाबाबत वाटव्यांना अभिनवगुप्ताची उपपत्ति फारच मौलिक वाटते. हास किंवा विनोदन (Amusement) हा हास्यरसाचा स्थायिभाव मानावा असे म्हटले आहे ते ठीक आहे. पण हास किंवा विनोदन म्हणजे तरी नेमकी कोणती भावना ह्याचे उत्तर देणे कठीण आहे. ही भावना स्वतंत्र नाही. स्थलपरत्वे रति, अहंप्रभुता, शोक, क्रोध, वात्सल्य, प्रेम इत्यादि स्थायिभाव अनुचित विभावादींनी जागृत झाले की तेथे हास उत्पन्न होतो. म्हणजे इतर रसांतील स्थायिभावांचे रूपांतर म्हणजे हास. म्हणूनच अभिनवगुप्ताने सर्व रस हास्यात समाविष्ट होतात (सर्वे रसा हास्येऽन्तर्भूताः|) असे मोठ्या मार्मिकपणे म्हटले आहे. फेंच तत्त्वज्ञ बर्गसाँ ह्यांचे मत असे आहे की हास्य हे निव्वळ बौद्धिक असते. त्यात भावना नसते. हे मत कसे चुकीचे आहे हे वाटव्यांनी त्यांच्या पूना युनिव्हर्सिटी जर्नलमधील लेखात सविस्तर दाखविले आहे (ज्ञानखंड, नं.१, १९५३, पृष्ठें ४९ ते ५५).

उत्साह हा वीररसाचा स्थायिभाव भावनारूप नसल्याने त्याएेवजी 'अमर्ष' हा त्याचा स्थायिभाव घ्यावा असे वाटव्यांनी पहिल्या आवृत्तीत म्हटले होते. अमर्ष (आक्रमण सहन न होणे - राग) ह्याच्यामागे स्वयंप्रभुतेची (self-assertion) सहजप्रवृत्ति असते. मात्र तिची सहचरभावना म्हणजे स्वयंप्रभुभाव (किंवा अहंभाव) हाच वीररसाचा स्थायिभाव मानावा असे त्यांनी दुसऱ्या आवृत्तीत सुचविले आहे. ह्यापेक्षा कोणतेही अन्य बदल किंवा दुरुस्त्या त्यांनी त्यांच्या दुसऱ्या आवृत्तीत केलेल्या नाहीत. सदर ग्रंथ हा रसावरील एक संदर्भग्रंथ म्हणून वापरला जात असल्याने त्यात फार बदल न करणे त्यांना इष्ट वाटले.

संस्कृत नाट्य-सौंदर्य - लेखक श्री.केशव नारायण वाटवे संपादन

संस्कृत नाट्य-सौंदर्य ह्या ग्रंथात के.ना.वाटवे ह्यांनी नऊ निवडक संस्कृत नाटकांचे विवेचक रसग्रहण केले आहे व त्याला नाट्यशास्त्र व नाट्यवाङ्मय ह्यांचा समालोचनपर उपोद्घात जोडला आहे.


अावृत्ति


पहिली आवृत्ति - शके १८८४, पाने - ११+४१६, प्रकाशक - रामभाऊ देशमुख आणि कंपनी, मुद्रक - कल्पना मुद्रणालय, चालक - श्री.लाटकर.


संस्कृत नाट्य-सौंदर्याचा वाचक वर्ग व भूमिका


हा ग्रंथ सुबुद्ध, प्रौढ व संस्कृत नाट्यप्रेमी अशा मराठी वाचकांसाठी मुख्यत: आहे. तथापि संस्कृत नाट्यतंत्र, नाट्यवाङ्मय व काही निवडक कलाकृति ह्यांचे एकत्र विहंगमावलोकन करावयासाठी काही प्रौढ विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही हा ग्रंथ निश्चित उपयोगी आहे. पण प्रौढ मराठी वाचकांसाठीच मुख्यतः हा ग्रंथ आहे. म्हणूनच त्यांची गरज व त्यांची दृष्टि वाटव्यांनी हा ग्रंथ लिहिताना लक्षात घेतली आहे. संस्कृत नाट्य वाङ्मयाच्या सौंदर्याचा (विशेषतः शाकुंतल, मृच्छकटिक, उत्तररामचरित ह्यांच्या सौंदर्याचा) लौकिक प्रौढ मराठी वाचकांच्या कानावर गेलेला असतो, व ही नाटकें आहेत तरी कशी अशी त्यांना जिज्ञासा असते. पण त्यांना मूळ संस्कृत अवघड वाटते. संस्कृत भाषेची त्यांच्या मार्गातील ही अडचण दूर करून त्यांना मूळ कलाकृतीची संपूर्ण कल्पना देणे हा श्री.वाटवे ह्यांचा मुख्य उद्देश आहे. ह्या ग्रंथात वाटव्यांचे सर्व लिखाण त्यांनी पूर्णपणे शास्त्रपूत केले असले तरी त्यात शास्त्राचे काठिण्य व त्याचा कंटाळवाणा तपशील येऊ दिलेला नाही.

अर्थात शास्त्र म्हटले की ते थोडे कठीण वाटणारच. पण ते विवेचक रसग्रहणास निघालेल्या सर्वसामान्य वाचकाचे डोके उठविणारे असावे असा नियम नाही. ह्या अर्थाने वाटव्यांचे उपोद्घातातील शास्त्रीय लिखाणसुद्धा त्यांनी सुगम करून लिहिले आहे. `````संस्कृत नाट्य म्हणजे काय ते थोडक्यात - पण त्यातला शेलका शेलका भाग वेचून काढून आम्हाला सांगा. सोपे करून सांगा, पण ते संपूर्ण सांगा - जे म्हणून सांगायला हवे ते सांगा अशी जिज्ञासु मराठी वाचकांची मागणी त्यांनी पुरविण्याची पराकाष्ठा केली आहे.


संस्कृत नाट्यशास्त्राची रचना


संस्कृत नाट्य-सौंदर्याचा प्रबंध समीक्षणात्मक आहे. ह्यात संस्कृत नाट्याची वैशिष्ट्ये दाखवून त्याचे विवेचक रसग्रहण केले गेले आहे. ह्या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिला भाग उपोद्घात आहे. त्यात प्रथम संस्कृत नाट्यशास्त्राचे स्वरूप दाखवून नंतर समग्र नाट्यवाङ्मयाचे धावते समालोचन केले आहे. ह्या संस्कृत नाट्यशास्त्राच्या आणि नाट्यवाङ्मयाच्या परिचयाने ह्या प्रबंधाच्या दुसऱ्या भागाची पूर्वतयारी होते. दुसऱ्या भागात संस्कृतातील प्रसिद्ध अशा नऊ नाट्यकृतींचे व्यक्तिशः रसग्रहण केले आहे. ह्याप्रमाणे ह्या दोन भागात मिळून संस्कृत नाट्याच्या सौंदर्याचे दर्शन घडविले आहे.

संस्कृत नाट्य-दर्शन ह्या उपोद्घातात मुख्यतः भरताच्या नाट्यशास्त्राधारे पुढील गोष्टी विवेचल्या आहेत. संस्कृत नाट्याचा उगम, नाट्य-लक्षण, नाट्याचे प्रयोजन, संस्कृत नाट्याचे दहा प्रकार, संस्कृत नाट्य-कथांचे मूळ आधार, नांदीपासून भरतवाक्यापर्यंत नाट्य-संविधानक-रचनेची सर्व वैशिष्ट्ये, संस्कृत नाट्य आणि ग्रीक नाट्य, प्राचीन नाट्यगृह आणि रंगभूमीची सजावट, शोकांतिकेचा अभाव, नाट्यपात्रे, नाट्यरस, संस्कृत नाट्याची सजावट, संस्कृत नाट्याचा उत्कर्षकाल, त्याच्या ऱ्हासाची कारणमीमांसा, नाट्याच्या मर्यादा आणि उणिवा, संस्कृत नाट्यांतील प्रणय, परंपरारक्षण, संस्कृत नाटकांचे कलाविशेष, त्यांचे सांस्कृतिक मूल्य, नाट्याचे सौंदर्यदर्शन व संस्कृत नाट्याचे पंचप्राण.

संस्कृत नाट्य-सौंदर्य ह्या दुसरा भागात कालानुक्रमे पुढील नऊ नाट्यकृति विवेचनास घेतल्या आहेत. त्यात सात नाटके असून एक प्रकरण व एक नाटिका आहे. कालानुक्रमाने ह्या नऊ नाट्यकृति पुढीलप्रमाणे आहेत. भासाचे स्वप्नवासवदत्त, शूद्रकाचे मृच्छकटिक, कालिदासाची तीन नाटके - मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि शाकुंतल, विशाखादत्ताचे मुद्राराक्षस, श्रीहर्षाची रत्नावली नावाची नाटिका, भवभूतीचे उत्तररामचरित आणि भट्टनारायणाचे वेणीसंहार. ह्या नऊ नाट्यकृतींच्या व्यक्तिशः केलेल्या रसग्रहणात पुढील विषय आले आहेत. नाटककार-परिचय, नाट्यकृतींचे आकर्षक संविधानक, तिचा मूलाधार व त्यात केलेले फरक, संविधानकरचना, पात्रपरिपोष, रसवत्ता व इतर कलावैशिष्ट्ये व शेवटी तीमधील निवडक सुभाषितें मराठी भाषांतरासहित. केवळ विस्तारभयास्तव फक्त नऊ नाट्यकृतींचाच समावेश केला आहे. उरलेल्या नाट्यकृतींचा असाच परिचय करून देण्याचा वाटव्यांचा मानस होता.


अनुक्रमणिका


[भाग पहिला]

उपोद्घात - संस्कृत नाट्य-दर्शन

नाट्याचा उगम

नाट्याचे लक्षण

नाट्याचे प्रयोजन

दशरूपके

नाट्यविकास

नाट्यकथांचे आधार

पूर्वरंग आणि नांदी

सूत्रधार

नटी

प्रस्तावना व तिचे प्रकार

संविधानकरचना

अर्थप्रकृति - पताका

अवस्था - पंचसंधि

विष्कंभक - प्रवेशक

अंकमुख - अंकावतार

पताकास्थानें

नाटकाचे नाव

नाट्यसंवाद

भरतवाक्य

नाट्यगृह व रंगभूमीची सजावट

नाट्यवृत्ति

नाट्यरस

नाट्यपात्रें

शोकान्तिकेचा अभाव

संस्कृत नाट्य व ग्रीक नाट्य

श्रुति

स्मृति

इतिहास व पुराणें

प्रमाणविद्या व समयविद्या

अर्थशास्त्र

कामसूत्र

नाट्यशास्त्र व इतर

संस्कृत नाट्याचा काल

ऱ्हासाची कारणें

नाट्यशास्त्रविस्तार

संस्कृत नाट्याच्या मर्यादा

प्रणयप्रधान नाटकें-नाटिका

नाट्य की काव्य

नुसते कथा-कथन

संस्कृत नाट्याचे गुणविशेष

रचनाकौशल्य

अमरव्यक्तिरेखा

सुभाषितें

प्रवृत्तिपरता

सांस्कृतिक मूल्य - राजसंस्कृति

आश्रमसंस्कृति

शास्त्रपरंपरारक्षण

कलामूल्य - रसवत्ता

शैली

संस्कृत नाट्याचे पंचप्राण

[भाग दुसरा]

संस्कृत नाट्य-सौंदर्य

१. स्वप्नवासवदत्त

२. मृच्छकटिका

३. मालविकाग्निमित्र

४. विक्रमोर्वशीय

५. अभिज्ञान-शाकुन्तल

६. मुद्राराक्षस

७. रत्नावली

८. उत्तररामचरित

९. वेणीसंहार


ऋणनिर्देश


रसग्रहण केलेल्या नऊही नाट्यकृती विश्वविद्यालयीन परीक्षांसाठी संस्कृत पाठ्यपुस्तकें म्हणून नेमल्यामुळे अनेक विद्वान आणि रसिक प्राध्यापक त्यांच्या सटीप आवृत्त्या काढत. ह्या प्रबंधाचा उपोद्घात लिहिताना वाटव्यांना खालील ग्रंथकर्त्यांच्या ग्रंथांचा व विद्वान आणि रसिक प्राध्यापकांच्या टीपांचा उपयोग झाला.

भरतमुनी - नाट्यशास्त्र (काव्यमाला प्रत)

कुमारी गोदावरी केतकर - भारतीय नाट्यशास्त्र

विश्वनाथ - साहित्यदर्पण

धनंजय - दशरूपक

A.B.Keith - The Sanskrit Drama

दासगुप्ता व दे - A History of Sanskrit Literature - Classical period - Vol I

ज.स करंदीकर व हिवरगावकर - कौटिलीय अर्थशास्त्र आणि वात्स्यायनाचे कामसूत्र ह्यांचे संपादन (चौखंबा संस्कृत सेरीज, बनारस)

डॉ.गोविंद केशव भट - उत्तररामचरित (टिप्पणी ग्रंथ)

प्रा.र.पं.कंगले - कालिदासाची नाटके

तसेच, स.प.कॉलेजमधील सहाध्यापक प्राचार्य र.दा.करमरकर, प्रा.र.ना.गायधनी, डॉ.रामचंद्र शंकर वाळिंबे, प्रा.रा.ना.गद्रे व प्रा.अ.गं.मंगरूळकर ह्या विद्वान आणि रसिक प्राध्यापकांनी त्यांना सहाय्य केले.

प्रस्तुत ग्रंथ लिहिताना लागलेली पुस्तकें वाटव्यांना मुख्यतः त्यांच्या सर परशुरामभाऊ कॉलेजच्या ग्रंथालयातून मिळाली. तसेच मराठी साहित्य परिषद्, टिळक विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या पुण्यामधील इतर संस्थांच्या ग्रंथालयातूनही काही दुर्मिळ पुस्तकें मिळाली.

संस्कृत काव्याचे पंचप्राण - लेखक श्री.केशव नारायण वाटवे संपादन

'संस्कृत काव्याचे पंचप्राण' ह्या प्रबंधात के.ना.वाटवे ह्यांनी सुप्रसिद्ध व सर्वमान्य अशा संस्कृत पंचमहाकाव्यांचे एकैकश: निरीक्षण व विवेचन केले आहे. ती महाकाव्यें म्हणजे कुमारसंभव, रघुवंश, किरातार्जुनीय, शिशुपालवध व नैषधीयचरित. ह्या महाकाव्यांचा उगम, आधार व रामायण-महाभारताशी असलेला संबंध, इत्यादि असा अभ्यास ह्या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रत्येक महाकाव्याच्या अभ्यासात कवि-परिचय, कथासार, रसग्रहण व सुभाषितें अशी प्रकरणें आहेत.

'संस्कृत काव्याचे पंचप्राण' ह्या ग्रंथाने मराठी वाङ्मयात मानाचे स्थान मिळवले. शिवाय साहित्य-अकादमीने अन्य भारतीय भाषांत अनुवाद करण्यासाठीही ह्या ग्रंथाची निवड केली.


पहिली अावृत्ति व दुसरी आवृत्ति


पहिली आवृत्ति - १९४७

दुसरी आवृत्ति - १९७०, पाने - ३११, प्रस्तावना - मनोहर महादेव केळकर, प्रकाशक - मनोहर ग्रंथमाला,१६०९, सदाशिव पेठ, पुणे ३०.

'संस्कृत काव्याचे पंचप्राण' ह्या पुस्तकाची दुसरी अावृत्ति काही वर्षे उपलब्ध नव्हती. अनेक अडचणींमुळे ते काम मागे पडले होते. पण १९७० साली पुनरावृत्तीचा योग आला. महाराष्ट्र-साहित्य-परिषदेच्या हीरक-महोत्सवाच्या दोन दिवस आधी ही आवृत्ती प्रसिद्ध झाली. डॉ.के.ना.वाटवे ह्यांचा अनेक समवयस्क श्रेष्ठ साहित्यिकांसमवेत महाराष्ट्र-साहित्य-परिषदेच्या महोत्सवात सत्कार करण्यात आला. ह्या सत्कार-समारंभाचे अध्यक्ष भारताचे त्यावेळेचे माननीय गृहमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण हे होते.


महाकाव्यें आणि महाकवि


'संस्कृत काव्याचे पंचप्राण' ह्या ग्रंथात रघु, कुमार, किरात, शिशुपालवध व नैषधीयचरित ह्यांचे व्यक्तिगत विशेष सांगितले आहेत. ते सांगत असता महाकवि व महाकाव्यें ह्यांबद्दल थोडे थोडे विवेचन प्रसंगपरत्वे अधूनमधून आलेले आहे. पण महाकाव्य ह्या विशिष्ट काव्यप्रकाराची ऐतिहासिक व तात्त्विक बैठक समजावून घेतल्यावाचून त्यांच्या स्वरूपाची नीटशी ओळख होणार नाही. म्हणून 'महाकाव्यें आणि महाकवि' असा एक प्रास्ताविक निबंध वाटव्यांनी लिहिला आहे. ह्या निबंधांत ह्या काव्यप्रकाराच्या वाढीचा इतिहास प्रथम निवेदीला आहे. सदर काव्यांचा उगम कोठून झाला? त्यांचा आधार कोणता? रामायण-महाभारतांशी ह्या काव्यांचा संबंध कोणत्या प्रकारचा? रामायण-महाभारत ही जर 'महाकाव्यें' मानली जातात तर ती जुनी काव्यें व ही नवी काव्यें ह्यात फरक काय व तो का पडला? दोहोंची तंत्रें कोणती? उद्देश कोणते? महाकवि कोणास म्हणावे? ह्या नव्या काव्यांचा ह्रास केव्हा, का व कसा झाला? देशी वाङ्मयावर ह्यांचे कोणते परिणाम झाले? संस्कृतानंतरच्या प्राकृत व देशी भाषांत ह्यांचे नवे अवतार कोणते व कशा स्वरूपाचे झाले? इंग्रजी आमदानीनंतर आजतागायत महाकाव्यरचनेचे प्रमुख प्रयत्न किती झाले? व शेवटी अाधुनिक कालाच्या प्रवृत्ति ध्यानात घेता ह्या रचनाप्रकाराचे भवितव्य काय आहे? इत्यादि एेतिहासिक, तंत्रविषयक व तात्त्विक प्रश्र्नांची चर्चा वाटव्यांनी केली आहे. ती करतांना त्यांनी पाश्चात्त्य महाकाव्यांचा धागा मध्ये गुंफला आहे. म्हणून पंचमहाकाव्यांचें विवेचन सर्वांगपरिपूर्ण झाले आहे.

त्याचप्रमाणे हे एेतिहासिक, तंत्रविषयक व तात्त्विक विवेचन अधिक स्पष्ट व्हावे ह्यासाठी रामायण-महाभारतासारख्या जुन्या व रघुवंश-किरात-नैषधादि नव्या महाकाव्यांना परस्परातील भेद दर्शविणाऱ्या दोन वेगवेगळ्या संज्ञा दिल्या आहेत. साहित्यदर्पणात (६.३२५) रामायण-महाभारतांना 'आर्ष महाकाव्य' हे मोठे यथार्थ नाव देण्यात आले आहे व तेच वाटव्यांनी येथे वापरले आहे. तसेच कुमारसंभव, रघुवंश, किरातार्जुनीय, शिशुपालवध व नैषधीयचरित ह्या महाकाव्यांना 'विदग्ध महाकाव्यें' असे वाटव्यांनी संबोधिले आहे. 'विदग्ध महाकाव्य' म्हणजे उत्तरकालीन संस्कृतीच्या बदलत्या ओघात व भिन्न परिस्थितीत पूर्वीच्याच काव्यांच्या आधारे विशिष्ट हेतूने आणि जाणिवेने रचलेले, चातुर्य आणि विद्वत्ता ह्यांनी नटलेले, कलामंडीत व तंत्रबद्ध महाकाव्य.


संस्कृत काव्याचे पंचप्राणचे - वाचक व पार्श्वभूमि


संस्कृत पंचमहाकाव्यांचे प्रस्तुत विवेचन मराठी वाचकांना अनेक दृष्टींनी मोठे उपयुक्त वाटेल. संस्कृत विद्या ही सर्वच देशी भाषांचा एक मोठा वडिलोपार्जित ठेवा आहे जो त्यास वारस हक्काने मिळाला आहे. त्यातल्या त्यात रामायण-महाभारत-भागवताश्रय संस्कृत महाकाव्यें म्हणजे गेल्या दोन हजार वर्षातील भारतीय जीवनाच्या विविध अंगांचे ललित शब्दचित्र आहे. त्यात प्राचीन भारतीय संस्कृति खास भारतीय कलात्मकतेने नटलेली आहे. राजकारण, समाजकारण, एेहिक व पारलौकिक धर्म, लोकव्यवहार, विद्या, कला इत्यादींची प्राचीन आदर्श मांडणी ह्यातच आढळते; व भारतीय काव्यकलेची भव्यता व उंची तर ह्यामध्ये शिगेला पोचली आहे. त्यामुळे इतिहाससंशोधक, संस्कृत व समाज ह्या विषयाचे अभ्यासी, राजकारणी व वाङ्मयटीकाकार इत्यादि मंडळींना ही काव्यें म्हणजे सूक्ष्म निरीक्षणाची एक अमोल खाणच आहे. निव्वळ काव्यलोलुपांना तर कालिदासादि कवींची ही महाकाव्यें काव्यामृतपानाची नंदनवनभूमि वाटते. भारत-भागवता-रामायण ही त्रयी व हे महाकाव्यपंचक म्हणजे मराठी भाषेच्या घडणीतील आठ घटक धातू आहेत.

पण ह्या मूळ संस्कृत काव्यांचा आस्वाद निव्वळ मराठी वाचकांना भाषेच्या आडपडद्यामुळे मुळीच घेता येत नाही. सामान्य संस्कृतज्ञ तर सोडा, उत्तम संस्कृतज्ञ सुद्धा ह्या सर्व पंचमहाकाव्यांचे आमूलाग्र अवलोकन करतोच असे नाही. आठ साडेआठ हजार श्लोकांच्या सूक्ष्म निरीक्षणाकडे केवळ रसिकतेच्या पोटी कोणी सहजासहजी वळत नाही. अशा सर्व मंडळींसाठी वाटव्यांनी हे वाढप्याचे काम केले आहे. पण त्यांनीसुद्धा हे काम केवळ स्वयंस्फूर्तीने अंगिकारले नव्हते. ह्याला खरी प्रेरणा त्यांचे प्रकाशक रा.मनोहरपंत केळकर ह्यांची होती. चांगले वाङ्मय वाचकांना उपलब्ध करून देण्याची केळकरांची इच्छा हीच ह्या प्रकाशनाच्या बुडाशी होती. प्रथम केळकरांच्याच विनंतीवरून वाटव्यांनी पंचमहाकाव्यांच्या कथा त्यांच्या 'वाङ्मयशोभे'त लिहिल्या होत्या. एकदोन रसग्रहणेहि तेथेच प्रसिद्ध केली होती. ती वाचून अनेक मंडळींनी समक्ष व पत्रद्वारे सदर विषयाचे संपूर्ण विवेचन पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची आग्रहाची विनंति वाटव्यांना केली होती. प्रकाशकाच्या मूळ इच्छेला मिळालेल्या ह्या वाचकांच्या प्रोत्साहक दुजोऱ्याचे फळ म्हणजेच हा ग्रंथ. प्रस्तुत विषयाच्या विवेचनात वाटव्यांना अनेक ग्रंथांचा व काही व्यासंगी मित्रांशी केलेल्या चर्चेचा उपयोग झाला होता. त्यांत त्यांच्या कॉलेजातील इंग्रजीचे विद्वान प्राध्यापक श्री.सत्तेगिरी ह्यांचे साहाय्य मोलाचे होते.


संस्कृत काव्याचे पंचप्राण - रचना



अनुक्रमणिका


महाकाव्यें आणि महाकवि (प्रास्ताविक निबंध) ३-७१

कालिदासाचे 'कुमारसंभव' ७३-११३

कवि-परिचय

कुमारसंभव-कथासार

कुमारसंभव-रसग्रहण

कुमारसंभव-सुभाषितें

कालिदासाचा 'रघुवंश' ११५-१६०

रघुवंश-कथासार

रघुवंश-रसग्रहण

रघुवंश-सुभाषितें

भारवीचे 'किरातार्जुनीय' १६१-२०८

कवि-परिचय

किरातार्जुनीय-कथासार

किरातार्जुनीय-रसग्रहण

किरातार्जुनीय-सुभाषितें

माघाचे 'शिशुपालवध' २०९-२५४

कवि-परिचय

शिशुपालवध-कथासार

शिशुपालवध-रसग्रहण

शिशुपालवध-सुभाषितें

श्रीहर्षाचे 'नैषधीयचरित' २५५-३११

कवि-परिचय

नैषधीयचरित-कथासार

नैषधीयचरित-रसग्रहण

नैषधीयचरित-सुभाषितें