स्वागत अनिल दातीर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन अनिल दातीर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१४६ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ११:२०, १० जून २०१७ (IST)Reply

ढगांची फॅक्टरी...... संपादन

ढगांची फॅक्टरी............... काल असाच आकाशात निवांत भटकत होतो. आजूबाजूने तुरळक ढग जात होते, चान्दण्या चमकत होत्या, मस्त वारा वाहात होता. चालता चालता एकेठिकाणी गडबड उडालेली दिसली. भव्य राजवाडा लांबूनच दिसून येत होता, अनेक प्रकारचे रथ त्या राजवाड्याच्या भव्य कमानीतून आत जात होते. एका बाजूला डी.जे. लावला होता आणि त्यावरही सैराट चे `झिंगाट' वाजत होते. मी दबकत दबकत त्या गेट जवळ गेलो, तेवढ्यात एका रखवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले आणि...........`अरे ए लेकाच्या, मध्ये कुठे तडमडलाईस, चाल व्हय बाजूला' अशे शब्द आले, आणि हा सातारी दिसतोय असे लक्षात आले. मी लगेच पुढे होत त्याला म्हटले ``काय सातारकर.......... तो तीन ताड उडालाच. इथे स्वर्गात कोण आपल्याला सातारकर म्हणतंय असे म्हणत बघायला लागला. मग मी त्याला सांगितले कि मीही सातारकर आहे म्हणून. गडी जाम खुश झाला राव. पण संशयाने बघत म्हणाला........`लेका, चांगला जिता जागता दिसतोयस, आन हिथं सर्गात काय करतोयस.............. मी म्हणालो ``काका, ते राहूद्या हो, पण इथं एवढी गडबड काय चाललीये?............. ``अरे आता तुमच्याकडं पावसाळा सुरु होणार न्हवं? मग सगळ्या ढगांच्या फॅक्टरी मालकांची सभा हाय, सिझन कधी सुरु करायचा म्हणून.............. मी डोके खाजवत म्हटले `म्हणजे?'............. ``अरे म्हंजी काय, तुमच्याकड्चा पावसाळा संपला कि इकडं लगेच ढगांचा सिझन सुरु होतंय, सूर्यदेव आग ओकत मोठं मोठ्या भट्ट्या लावतोय आणि अरबी समुद्रापासून पार तिकडं दुबई पातूर समुद्राचं पाणी गरम व्हाया लागतंय. आणि एक डाव का हे पाणी गरम झालं कि त्याची वाफ व्हतिया, आणि ती वाफ इकडं वर आली कि लगेच सगळे कारखाने सुरु व्हत्यात, आणि ढग बनवायला लागत्यात................. मी विचार करत होतो, तेवढयात काकांनी मला हळूच इचारलं ``वाईच, जरा तंबाखू हाय काय?........ ``नाही हो काका, मी नाही खात?............... ``आक्रितच म्हणायचं कि, सातारी म्हणतुयास, अन तंबाखू खात नाही, हात लेका, जनम वाया गेला तुझा..... असे म्हणत काकांनी रिकामे हात बार मळल्यासारखे चोळले......... `म्हणजे काका, इथे पण तंबाखू मिळती काय?.............. `नाही रे, पाव्हण्या, तुम्हाकडं खाली कोण गेला ना, त्याच्या दहाव्याला लोक, त्याच्या आवडीच्या वस्तू ठेवत्यात ना? त्यात तांखुची पुडी हमखास अस्त्तिया, अन लोकही लै बेनवाड, सगळं खाली सोडून येतील, पण तंबाखूची पुडी मात्र हमखास संगती आनत्यात, मग आम्ही अशे नग बरोबर हेरतो, आणि पुड्या काढून घेतो'........... असे म्हणत काका मस्त खो खो करत हसले............ मग मी संभाषणाची गाडी परत रुळावर आणत त्यांना विचारले ``मग काका, ढगांच्या फॅक्टऱ्या सुरु झाल्यावर पुढे काय होते?.............. ``आर, पुढे काय?...... आठ महिने कारखाने चालूच, सगळी गोदामं ढगांनी भरून जात्यात, आन पावसाळा सुरु व्हायच्या येळेला हे ढग तुमच्याकडे पाठिवत्यात.'.............. ``मग, आत मिटिंग कसली आहे?......मी विचारले............ `हेच कि, सिझन कधी सुरु करायचा, यावर?........ मी म्हणालो `सोडता का आत? जरा ऐकतो काय म्हणताहेत'......... काका एकदम कावलेच अन म्हणाले `खुळा का काय? माझी नौकरी घालवतुयास काय?....... `अहो काका काळजी कसली करताय? गेली नोकरी तर या साताऱ्यात, ढिगाने फ्लॅट पडून आहेत, देतो एखादा जुगाड करून, हा, येताने फंड आणि ग्रॅच्युटीचे पैसे तेवढे घेऊन या, म्हणजे झालंच'................ यावर खो खो हसत काका म्हणाले, `खुळाच हैस, एक डाव मेल्यावर परत जिमनीवर कसा येणार?.............. मग मी म्हटले `नसेल जमत तर भूत होऊन या हो, आमच्या कडे बऱ्याच इमारती, अर्धवट बांधून पडल्यात, कुठंही जागा मिळून जाईल............... काका काही आत सोडायला तयार होईनात, पण मी लैच गुळ लावल्यावर म्हणाले `आता काय, गाववाला म्हणल्यावर तुला न्हाय पण म्हणता येत नाही, मी असं करतो, सगळे आत गेलेत, फक्त इंदर देवाचा रथ तेवढा यायचा हाय, तो आला कि, मी गेट थोडं उघडं ठिवतो, तू हळूच सटक आत. काय?.......... मी तयार झालो. ........... थोड्याच वेळात इंद्र देवाचा तो भव्य रथ त्या गेट मधून आत गेला, आणि त्यामागोमाग मीही आत सटकलो. आतमध्ये भव्य सभागृहात अनेक मोठं मोठे महानुभाव बसलेले होते. वर स्टेजवर मध्ये इंद्र, उजव्या हाताला सूर्य आणि डाव्या हाताला वरून देव बसले होते. अप्सरा सगळयांना पेय वाटप करत करत होत्या, अनेक जणांच्या जीभ सैल सुटल्या होत्या. तेंव्हा मी ओळखले कि `पेय' कुठल्या प्रकारचं असेल. आपल्यालाही एखादा पेग मिळावा असं वाटलं, पण मन आवरलं. ........... इंद्रदेवांनी सगळ्यांना शांत करत मिटिंग सुरु करायची का? म्हणून विचारणा केली. अनेकांनी हात वर करत, आरडा ओरडा करत, काहींनी खिल्ली उडवत परवानगी दिली. इंद्रदेवांनी सूर्यदेवांना प्रस्तावना करायला सांगितली...........सूर्यदेव म्हणाले `` गेली आठ महिने, आम्ही सगळं भाजून काढत, जास्तीत जास्त समुद्र तापवून भरपूर वाफ पाठवली आहेच, त्याचा तुम्ही उपयॊग केला असेलच, आता माझी जबादारी संपली'.......... यानंतर वरून देव बोलायला उभे राहिले ....`` सूर्यदेवांच्या कृपेने या वर्षी आपल्याला कच्चा माल भरपूर उपलब्ध झाल्याने सर्व फॅक्टर्यां मधून ढगांचे भरपूर उत्पादन झाले आहे, सगळे गोडाऊन भरून गेले आहेत. सिझन ला जर उशीर केला तर नवीन ढग कुठे साठवायचे हा प्रष्ण उभा राहील. म्हणून लवकरात लवकर सिझन सुरु करावा असा मी प्रस्ताव मांडतो'............... त्यावर एक बेणं म्हणालं.........`काही नको, लवकर सुरु करायला, खाली लै लोक माजलेत, जरा भोगू दे आपल्या कर्माची फळं'............. यावर सगळीकडूनच गदारोळ सुरु झाला, कोण काय बोलतंय हेच कळेना झालं, तेवढ्यात कुणीतरी आपट्याच्या पानाचे बोळे करून स्टेजवर फेकले. बऱ्याच गोंधळानंतर सगळे शांत झाले, पुन्हा पेयांचे चषक फिरू लागले. मी मात्र मनात म्हणालो.......... ``आपले संसद भवन, आणि हि इंद्रसभा सारखीच दिसतेय............ मग इंद्रदेव बोलायला उभे राहिले, त्यांनी अगोदर सगळ्या नोंदवलेल्या ऑर्डर आणि तयार माल याचा आढावा घेतला आणि एक जूनच्या आतच सिझन सुरु करायचा निर्णय जाहीर केला. त्यावर एकाने सांगितले कि `भारतीय हवामान खात्याने अगोदरच डिक्लेअर केलंय कि मान्सून ४ दिवस आधीच सुरु होणार म्हणून, आपण जरा त्यांना झटका द्यायला पाहिजे'........... पण इंद्रदेव म्हणाले `असू दे, त्यांचंही कधी थोडे फार खरे ठरू दे, नाही तर त्यांच्या भरवश्यावर कोणीच राहत नाही........... `आपल्या सगळ्या निरीक्षक टीम ने पुष्पक विमानातून या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवा, सगळीकडे ढग व्यवस्थित पोहोचतात कि नाही, वेळेवर डिलिव्हरी होतेय कि नाही'........... यावर नियोजन मंत्री उभे राहून म्हणाले कि ` महाराज, यावेळी आपण `ड्रोन' खरेदी केलेत, त्यातून लक्ष ठेवता येईल'.......... हे ड्रोन काय असतंय?......... ``छोटी विमाने म्हणा ना महाराज, यात कुणी बरोबर द्यायची गरज नसते, त्यातला कॅमेरा सगळे फोटो काढून पाठवतोय'............... इंद्रदेव खुश होणार तेवढ्यात एक जण म्हणाल `या ड्रोन खरेदीत घोटाळा झालाय, त्याची चौकशी व्हायला पाहिजे यावर नियोजन मंत्री म्हणाले कि `होय महाराज, पृथी तलावरून एक पुढारी मयत होऊन वर आला होता, त्यानेच हा व्यवहार करून दिला. एक लाख सुवर्ण मुद्रांना एक असा व्यवहार झाला पण, नंतर आम्ही `अमेझॉन' वर चौकशी केली तेंव्हा याच ड्रोन ची किंमत ५०००० सुवर्ण मुद्रा आहेत असे कळले. ते पुढार्याचं बेणं मरून सुद्धा खायची सवय काही सोडत नाही. आम्ही चौकशी करून त्यांची रवानगी नरकात केली आहे.'.......... या सगळ्या उहापोहानंतर इंद्रदेवानी `१ तारखेला केरळात मान्सून ला सुरुवात होईल आणि ७ जून परंत साताऱ्यात पावसाचे आगमन होईल असे जाहीर केले. हे ऐकून मी इतका आनंदी झालो कि, आपण कुठे आहोत हेही विसरून गेलो, आणि `हुर्रे' म्हणून ओरडलो. सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे गेले नि, परिस्थीचे भान येताच मी पाय लावून पळायला सुरुवात केली.................... आणि तेवढ्यात `कडाड-कड' असा विजेचा आवाज आला नि मी झोपेतून जागा झालो. उठून बाल्कनी आलो, अंधारातही सगळे आभाळ भरून आलेले कळत होते, ४-२ थेम्ब पडतही होते, त्यातून मातीचा सुगंध येत होता. थोडावेळ वाट पहिली, काहीच हालचाल दिसेना, म्ह्णून `हि डिलिव्हरी साताऱ्याची नसून दुसरीकडे कुठेतरी ऑर्डर असेल, असे समाधान करून घेत पुन्हा बेडकडे वळलो....................... अनिल दातीर.

भेसळ आणि स्लो पॉयझनिंग. संपादन

स्लो पॉयझनिंग......... काल एक कलिंगड आणले. दुपारी गरम असेल म्हणून फ्रिज मध्ये ठेवले. संध्याकाळी मस्त पैकी थंड झाल्यानंतर, जेवण झाल्यावर खावे म्हणून कापले. बरोबरच्या चित्रात दिसतेय तेच ते. गर्द लाल रंग, रसरशीतपणा हे बघून तोंडातून वाह! अशी दाद आली, पण हा आनंद क्षणभरही टिकला नाही. जेंव्हा एक फोड तोंडात टाकली तेंव्हा, आपण कलिंगड खात नसून काकडी खातोय कि काय असे वाटावे इतकी पांचट /बेचव चव. कदाचित आपल्याच तोंडाची चव बिघडली असेल असे समजून संकेत ला आणि वंदनाला विचारले तेंव्हा त्यांच्याही प्रतिक्रिया तशाच होत्या. आणि कळून चुकले कि, ना या कलिंगडाचा रसरशीतपण खरा आहे, ना त्याचा रंग खरा आहे, ना त्याची चव नैसर्गिक आहे. रासायनिक प्रक्रिया केलेले फळ आपण खातोय हे स्पष्ट कळत होते. आजकाल आपण जाणते, अजाणतेपणी किती विष पचवतोय याची कल्पना करून बघा. मार्केटमध्ये मिळणाऱ्या आम्ब्यावर, केळीवर, सफरचंदावर, चिकूवर काय काय प्रक्रिया केल्या जात असतील? आणि हे काही आश्चर्यजनक नाही, अनेकवेळा कुठल्या तरी चॅनलवर असे अघोरी प्रयोग सिद्ध करून दाखवले गेलेत. भाज्यांचेही तसेच, काय खावे लागेल काही कल्पना नाही. विचार केला या सर्वात चूक कुणाची?...... जास्त पैसे मिळावेत/ फळ जास्त मोठे व्हावे म्हणून इंजेक्शन/ औषधे मारणाऱ्या शेतकऱ्याची?..... कि त्या शेतकऱ्याने कष्ट करून पिकवलेला माल कवडीमोल भावात विकत घेऊन, आपल्याला मात्र कितीतरी पट भावात विकून वारेमाप नफा कमावणाऱ्या दलालांची?.....कि इतर ठिकाणी वाटेल तसे पैसे उधळणाऱ्या पण मंडईत मात्र घासाघीस करून कमीत कमी पैशात भाजीपाला मिळवणाऱ्या, कांद्याचे, डाळीचे भाव थोडे वाढले म्हणून आकांड-तांडव करणाऱ्या आपल्यासारख्या शहरी सामान्य जणांची?..... कि शेतकऱ्याच्या जीवावर राजकारण करून त्याच्या शेतमालाला रास्त किंमत न ठरवणाऱ्या जाड कातडीच्या राजकारण्यांची?...... हे स्लोव पॉयझनिंग थांबवायचे असेल तर गरज आहे शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याची. पिकवलेला माल किमान आधारभूत किमतीच्या खाली विकावा लागणार नसेल तर कदाचित शेतकरी असे अघोरी प्रयोग थांबवतील. आणि त्या वर्गालाही हे पटवून द्यायला हवेय कि, बाबांनो तुम्ही हे जे विष फवारून चार पैसे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करताय, तेच विष तुमचाच शहरात राहणारा एखादा नातलग/ भाईबंद खातोय, आणि आपल्या स्वास्थ्यावर परिणाम करून घेतोय. एखादा शेतकरी जेंव्हा आजारी असलेल्या पाहुण्याला भेटायला हॉस्पिटल मध्ये जाईल आणि याला कळत नकळत आपण जबाबदार नाही ना? असा त्याला प्रश्न पडेल त्यावेळी कदाचित मानसिकता बदलेलंही. (आजाराला फक्त भाजीपालाच कारणीभूत आहे असं मला बिलकुल म्हणायचे नाही, इतरही अनेक गोष्टी आहेत, त्यातील हि एक एवढेच) पण यासाठी अगोदर शेतकरयांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळून त्यांना सन्मानाने जगता येईल, अशी व्यवस्था उभी राहायला हवीय. आणि हे करणे फक्त सरकारलाच शक्य आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कुणी?.... आपले काय, असेच चालायचे................ अनिल दातीर.

 
भेसळ

`देव म्हणजे नक्की काय? संपादन

`देव म्हणजे नक्की काय?'.................. काल मी यात्रेकरूंच्या बसला अपघात होताने देव त्यान्च्या मदतीला का आला नाही? या स्वरूपाची पोस्ट टाकली होती, त्यावर बरेच विचारमंथन झाले. ज्यांनी भाग घेतला त्यांना खूप धन्यवाद. अनेकांनी होणाऱ्या अपघाताला बस ची कंडिशन किंवा ड्राइवर ला जबाबदार धरले. काहींनी `देव काय तुमच्या चुकांवर पांघरून घालणार काय?' असाही सूर लावला. एकाने तर फाजील पोस्ट असेही म्हटले. पण माझ्या मूळ मुद्द्याला कोणीच समर्पक उत्तर दिले नाही. `देवाला' अनेकजण संकट समयी धावून येणारा, दुःख निवारण करणारा, संकट मोचक वगैरे म्हणतात, म्हणून माझा साधा प्रश्न होता कि `मग बसचा अपघात होताना देवाने का रक्षण केले नाही?......................... मुळात `देव' या संकल्पनेचा अनेक जणांनी आप-आपल्या सोयीने अर्थ लावलेला आहे. माझ्या दृष्टिकोनातून मानवाची बुद्धी आणि शास्त्र यापलीकडे जाणारी एक अद्वितीय शक्ती नक्कीच अस्तित्वात आहे, त्या शक्तीला `देव' म्हणतात. आणि मी अशा शक्तीला नाकारत हि नाही. इतर ग्रह ताऱ्यांच्या मानाने इवलासा असणारा चंद्र २४ तासातून ४ वेळा एवढ्या अजस्त्र समुद्राचा पाणीसाठा पुढे मागे करू शकतो, इथेच अशा शक्तीचा प्रभाव जाणवतो. माणूस कितीही प्रगत झाला, विज्ञानाने कितीही शोध लावले तरीही निसर्गावर मात करणे अजून शक्य झाले नाही, म्ह्णून मी अशा निसर्गाला देवत्व बहाल करतो. आणि या दैवी शक्तीचे अस्तित्व अनेक प्रसंगी जाणवते, जिथे `असे कसे शक्य आहे?' हा प्रश्न येतो तिथे या अतींद्रिय शक्तीचा प्रभाव दिसून येतो............... देव म्हणजे काय हो, तर एक अशी सर्व गुण संपन्न, निर्गुण, निराकार, दयाळू, आदर्शवत कल्पना म्हणजे देव. प्रत्येकाला कोणीतरी एक आदर्श समोर हवा असतो, त्यातले चांगुलपण, प्रभुत्व, ज्ञान आपल्यात यावे म्हणून माणूस धडपडत असतो. `देव' हि अशीच एक आदर्शवत संकल्पना. त्या देवाला आदर्श मानून आपले जीवन सुखकर करायचे प्रयत्न म्हणजेच देवपूजा. एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून त्याच्या समोर धनुर्विध्येचा अभ्यास केला आणि प्रभुत्व मिळवले. असा पुतळा आदर्श म्हणून समोर न ठेवता तो तसेच प्रयत्न करत राहिला असता तर कदाचित त्याला एवढी विद्या नसती हि प्राप्त झाली. पण तो पुतळा समोर ठेऊन आपल्याला त्याच्याच सारखी धनुर्विद्या प्राप्त करायची आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याने एकलव्य यशस्वी झाला. हा त्याचा विश्वास म्हणजे देव. अगदी साधे उदाहरण...... आपण आपल्या लहान मुलाला सहज सांगतो ना, कि तो शेजारचा अमेय बघ, कसा नेहमी शाळेत पहिला येतो, तसाच तू हि येऊ शकतो'..... म्हणजेच आपण आपल्या मुलासमोर एक चांगला आदर्श ठेवतो, यालाही मी देवत्व बहाल करणे असेच म्हणेन......... पण माझा आक्षेप आहे तो `देव` या संकल्पनेचा बाजार मांडण्यावर. देवाला अमुक एक वस्तू दान केली, कि त्याच्या मोबदल्यात आपल्याला काही तरी प्राप्त होईल अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे केवळ अंधश्रद्धा आहे, असे माझे मत आहे. ज्यांचा यावर विश्वास आहे त्याबद्दल माझा आक्षेप बिलकुल नाही. पण देवाच्या नावाचा अनेक जणांनी व्यापार मांडला आहे ती गोष्ट चुकीची आहे. आक्खे आयुष्य भणंग अवस्थेत राहिलेले साईबाबा आज सोन्यामोत्यांच्या, हिऱ्यांच्या, पैशांच्या राशीवर राशी बघून खुश होत असतील आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हावर कृपा करणार अशी ज्यांची कल्पना असेल तर ती शुद्ध आपल्या मनाची फसवणूक आहे असे मी म्हणेन. काही उच्च बुद्धीच्या लोकांनी `देवाचा आणि दानाचा' संबंध तुमच्या सुखाशी जोडून लोकांना `श्रधांद ' करून टाकलेय, आणि भर भरून दान करायला उद्यक्त केलंय, त्यातून फक्त आणि फक्त पैसे उकळून स्वतःचे खिसे भरण्या पलीकडे काही हेतू असावा असे मला वाटत नाही.............. अहो, देव दयाळू आहे असे आपण मानतो तर तो असा भेदभाव कसा करील कि `ज्याने जास्त दान केले त्याच्या पदरात जास्त सुख टाकायचे आणि कमी दान करणाऱ्याला उपाशी ठेवायचे'. आणि आपण जर काही दान केले नाही, अमुक पूजा केली नाही तर देव नाराज होईल आणि आपले नुकसान करेल असे जे लोक मानतात, त्याला तर अंधश्रद्धेशिवाय दुसरे काही समर्थन असूच शकत नाही.................... तर माझ्या मते हा निसर्ग म्हणजे देव, हे ब्रह्मांड म्हणजे देव, हा समुद्र म्हणजे देव, हा वारा म्हणजे देव...... थोडक्यात जिथे मानवाच्या ताकदीच्या सीमा संपतात, आणि जिथे काही अद्भुत, अतर्क्य, अमर्याद असल्याची जाणीव मनाला होते ती जाणीव म्हणजे देव. आपल्याला वाचवायला देव येईल, आपल्या समस्यांचे निराकरण देव करेल, असे न समजता स्वतःहून प्रयत्न करून आपापले उद्दिष्ट साध्य करून घेणे म्हणजे देवपूजा हे माझे प्रांजळ मत, आणि हि देवपूजा ठराविक ठिकाणीच होते, देव विशिष्ठ ठिकाणीच आहे असे नाही, तर मनात सद्भाव ठेऊन कुठेही नमस्कार केला तरी तो त्या शक्तीपर्यंत पोहोचतो असे मी मानतो. आणि म्हणुनच मी दिसणाऱ्या प्रत्यके मंदिराला हात जोडत नाही पण समुद्राला, आकाशाला, सूर्याला, जमिनीला हात जोडतो, आणि हात जोडताने कुठलीही अपेक्षा अगर मागणी करत नाही, आणि आजपर्यंत तरी माझे काही वाईट झालेले नाही. असो...... हे माझे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते मी प्रामाणिकपणे मांडलेत. सर्वांना पटतील असेही नाही, आणि ज्यांचे विचार यापेक्षा वेगळे आहेत त्यान्च्याबद्दल हि मला काही आक्षेप नाही. ............. अनिल दातीर.