गोवरी म्हणजे गाय,बैल,म्हैस,रेडा किंवा टोणगा या पाळीव जनावरांच्या शेणापासून तयार केलेली वस्तू होय. हिचा इंधन म्हणून वापर केला जातो.शेण थापून वाळवून 'गोवरी' करून चुलीत इंधन म्हणून जाळली जाते.ग्रामीण भाषेत यांना 'शेण्या' असेही म्हणतात.

प्रक्रिया संपादन

ग्रामीण भागात जळणासाठी गाई-म्हशींच्या शेणापासून शेणाच्या गोवऱ्या तयार करतात. या गोवऱ्या साधारणतः उन्हाळ्यात तयार केल्या जातात. शेण एकत्र करून घट्ट असेल तर त्यात पाणी टाकून ते मळतात व नंतर एका ठिकाणी वर्तुळाकार तबकडीच्या आकारात थापतात. त्या काही दिवसातच वाळतात व घट्ट होतात, वाळलेल्या गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने थरावर थर रचून वर्षभर जळणासाठी उपयोगी पडाव्या या उद्देशाने साठवतात.

उपयोग संपादन

चूल,पाण्याचा बंब किंवा होळी पेटविण्यासाठी गोवऱ्यांचा उपयोग होतो. हिंदू धर्मानुसार मृत शरीराचे अंत्यसंस्कार करण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ]

साहित्यातील संदर्भ संपादन

संत जनाबाई यांच्या चरित्रात गोवरीभोवती एक कथा आढळते. विठ्ठलाचे नामस्मरण करीत गोवऱ्या थापलेल्या असल्याने सर्व ढिगाऱ्यातून जनाबाईंच्या गोवऱ्या ओळखण्यासाठी ती सवंगड्यांना त्या कानाला लावून ऐकण्याचा उपाय सांगते.ज्या गोवरीतून 'विठ्ठल, विठ्ठल' असा नाद येईल ती गोवरी जनाबाईची असे ठरते. आणि खरोखरच काही गोवऱ्यातून असा नाद ऐकू येतो. यावेळी विठ्ठलाला मदतीसाठी आळवणी करणारा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे.[१]

 
म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या

संदर्भ संपादन

  1. ^ ओंकाराची रेख जना - ले.मंजुश्री गोखले, मेहता प्रकाशन