अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते. 

भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणाऱ्या वैदिक साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे. 

ब्रह्म पुराणात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी आस्तिक वृत्तीची आहे, जी देवपूजा परायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नपणे वागत नाही, जी कोणाची ईर्ष्या करीत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)[१]

भारतीय तत्त्वज्ञान असे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो. त्यामुळे परमेश्वर सन्निध असण्यासाठी अशा वेळी ॐ नमो भगवते वासुदेवाय। असा जप करावा असे सांगितले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की जी व्यक्ती अंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्यापाशी येते. उत्तरायणात आलेला मृत्यू हा पुण्यकारक मानला जातो असेही गीतेत सांगितले गेले आहे.[१]

दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते.. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा.  त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा. 

एके काळी अंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणाऱ्या संस्कारात) पाळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा :

द्वि व त्रि पुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. अस्थीचे विसर्जन :

अस्थी अंत्यसंस्काराच्या दिवशी किंवा 3ऱ्या, 7व्या किंवा 9व्या दिवशी गोळा केली जातात आणि 10 व्या दिवसाच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित केली जातात. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करणे चांगले. अस्थीचे विसर्जन 10 व्या दिवसानंतर करायचे असेल तर तीर्थ-श्राद्धाच्या विधीनंतरच करावे. अंतिम विधी करण्यासाठी कर्त्याचे जन्म-नक्षत्र, ग्रहण-योग, गुरु-शुक्र अस्त इत्यादी पाळावे लागतात.वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा.

  • पिंडदान : उत्तर क्रिया ९

पिंडदान ९ व्या दिवसापासून सुरू करतात . आजकाल, पिंडदान जे 1ल्या दिवसापासून १०व्या दिवसापर्यंत केले जाते किंवा 10 व्या दिवशी एकत्रित विधी म्हणून केले जाते.

10 व्या दिवशी, पिंडदान हे शिव मंदिरात किंवा नदीच्या काठावर किंवा जवळच्या धर्मशाळेत किंवा स्मशानभूमी (स्मशानभूमी) मध्ये असलेल्या देवतेच्या मंदिरात केले जाते. नंतर यथाकाल श्राद्धविधी करावा.

सपिंडीकरण श्राद्ध : संपादन

सपिंडीकरण श्राद्ध १२ व्या दिवशी केले जाते. सपिंडिकरण श्राद्ध केल्याने व्यक्ती 'पितृ' ही पदवी प्राप्त करून पितृलोकात स्थान मिळवते.

अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम यमाई देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने. आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.

गरुड पुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वी घरात एक पिंड द्यावा. शवयात्रा सुरू करण्यापूर्वी दरवाजात दुसरा पिंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक पिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यावा आणि चितास्थानी एक पिंड द्यावा, असे एकूण पाच पिंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्याचे अपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातीला जलाची प्रार्थना, भूमिप्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदान (प्रेताच्या कपाळ, मुख,हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे, शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, अग्नी, पितर व मृताला प्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणा, तिलांजली असे सर्व विधी केले जातात.[२]


हिंदू अंतीम संस्काराचे महत्त्व:

  • हिंदू धर्मानुसार आत्मा कधीही मरत नाही.
  • हे दिवंगत आत्म्याला दैवी शक्तीशी जोडण्यास मदत करते.
  • मृत व्यक्ती स्वतःला पुनर्जन्म प्रक्रियेतून मुक्त करते किंवा त्यांच्या पुढील प्रवासाला गती प्राप्त करते.
  • अंत्यसंस्कार विधी कुटुंब आणि मित्रांना मृत व्यक्तीबद्दल आदर आणि प्रेम दाखवण्याची संधी देते.

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. सुलभ जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण
  2. ज्ञान प्रबोधिनी,पुणे प्रकाशित दाहकर्म संस्कार पोथी


हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी
  1. ^ a b धर्मशास्त्राचा इतिहास-डॉ. पां.वा. काणे
  2. ^ अंतिमा-चंद्रकांत बारहाते