सी.एन. अण्णादुराई

भारतीय राजकारणी

सी.एन्. अण्णादुरै तथा कांजीवरं नटराजन् अण्णादुरै/कांजीवरम् नटराजण् अण्णादुरै, लोकप्रिय नाव: अण्णा (तमिळ्: கா. ந. அண்ணாதுரை; १५ सप्टेंबर १९०९ - ३ फेब्रुवारी १९६९) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. तमिळ् भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या द्रविडर कळघम् ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार ह्यांमधील मतभेद वाढीस लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.

सी.एन्. अण्णादुरै

कार्यकाळ
फेब्रुवारी १९६७ – ३ फेब्रुवारी १९६९
मागील एम. भक्तवत्सलम
पुढील व्ही.आर. नेडुंचेळियन (कार्यवाहू)

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
१९६२ – १९६७

जन्म १५ सप्टेंबर १९०९ (1909-09-15)
कांचीपुरम, मद्रास प्रांत
मृत्यू ३ फेब्रुवारी, १९६९ (वय ५९)
चेन्नई
राजकीय पक्ष द्रविड मुण्णेट्र कळगम्

अखेर १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या द्रविड मुण्णेट्र कळगम् ह्य नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व हिंदी भाषेचा तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान मद्रास राज्यामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी मागे पडली. वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची येथील सत्ता संपुष्टात आणली.

मुख्यमंत्रीपदावर केवळ २ वर्षे राहिल्यानंतर १९६९ साली कर्करोगामुळे अण्णादुराईंचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या सुमारे १.५ कोटी लोकांच्या गर्दीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये करण्यात आली होती. चेन्नईमधील मरीना बीच येथे त्यांचे स्मारक असून शहरामधील अण्णा सलाई हा सर्वात वर्दळीच्या रस्त्याला, अण्णा नगर ह्या भागाला, अण्णा विद्यापीठ ह्यांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये फूट पडून एम.जी. रामचंद्रनने स्थापन केलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला देखील त्यांचेच नाव दिले गेले आहे.

बाह्य दुवे संपादन