श्रीधरस्वामी नाझरेकर
श्रीधरकवी ब्रह्मानंद नाझरेकर (जन्म : इ.स. १६५८च्या आसपासचा; मृत्यू : इ.स. १७३०) हे इ.स.१७ व्या शतकातील एक प्रसिद्ध आख्यानकवी होते. त्यांचे मूळ गाव पंढरपूराहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले नाझरे हे त्यांचे मूळ गाव. काशीच्या आनंद संप्रदायातले हे आठवे वंशज. ह्यांचे घराणे मोगलाईतील खडकी येथील होते. आडनाव खडके म्हणत, पण यांच्या घराण्यातील एक पुरुष घोडदळात अधिकारी बनल्याने घोडके आडनाव पडले. त्यानंतर राघोपंत नाझर एका महालाचे कुलकर्णी बनल्यावर त्यांना नाझरेकर म्हणू लागले. श्रीधरांचे वडिलांचे नाव ब्रम्हानंद होते. आईचे नाव सावित्री. इ.स. १६७८ मध्ये हे वडिलांसोबत पंढरपूर क्षेत्री आले. येथेच त्यांचे पुराणे, पंचकाव्ये, रामायण, भागवत आदी ग्रंथाचे अध्ययन झाले व संतकवींची कविताही त्यांनी वाचली. वडिलांकडूनच अनुग्रह घेतल्यानंतर स्वामींनी आनंद संप्रदायाच्या प्रसाराचे कार्य सुरू केले. याच काळात त्यांनी ज्ञानार्जन करून त्यांनी एकूण ५८ हजारावर ओळींचे ११हून अधिक काव्यग्रंथ रचले.
संतकवी श्रीधरस्वामी हे मराठी काव्याच्या महोदय पर्वातील, सुवर्णकाळातील एक अग्रणी कवी होते. छत्रपती शाहूमहाराजांनी सातारा दरबारात त्यांचा मोठा सन्मान करून त्यांना एक गाव इनाम दिले होते. श्रीधरांचे घराणे योगी व पुराणिकांचे होते. समकालीन व उत्तरकालीन साधुसंतांनी श्रीधरांची अपार थोरवी गायलेली आहे. "श्रीधरांची अफाट लोकप्रियता सर्वांनाच थक्क करणारी आहे" अशा शब्दात महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल. भावे यांनी श्रीधर यांचा गौरव केलेला आहे.
श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेल्या शिवलीलामृत या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत.भारतामध्ये छापखाना सुरू झाल्यानंतर म्हणजेच साधारण १८९२ सालापासून हा ग्रंथ छापील स्वरूपात मिळू लागला. त्यापूर्वी त्याची अनेक हस्तलिखिते तयार करण्यात आली असून, त्यांतील काही हस्तलिखिते भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शिवलीलामृतातील अकराव्या अध्यायाचे भारतभर मोठ्या प्रमाणात पठण केले जाते. अनेकांना हा संपूर्ण अध्याय तोंडपाठ आहे. मराठी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ कालांतराने अनेक भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आला. या ग्रंथाविषयी आणि श्रीधरस्वामी यांच्याविषयी इतिहास अभ्यासक चिंतामणी नीळकंठ जोशी यांनी विपुल संशोधन केले आहे.
श्रीधरस्वामींचे शेवटचे वास्तव्य पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिराजवळ असलेल्या घरात होते. त्याच घरात सध्या (२०१९ साली) त्यांची नववी पिढी राहते आहे. त्यांच्याकडे श्रीधरस्वामींच्या हस्ताक्षरातील शिवलीलामृत आणि मल्हारी माहात्म्य या पोथ्या आजही (२०१९ साली) जपून ठेवलेल्या आहेत.
श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेले काही ग्रंथसंपादन करा
- अंबिका उदय
- पांडवप्रताप
- पांडुरंग माहात्म्य
- मल्हारी माहात्म्य
- रामविजय
- व्यंकटेश माहात्म्य
- शिवलीलामृत
- हरिविजय
- ज्ञानेश्वर चरित्र
नाझरेकरांविषयीची पुस्तकेसंपादन करा
- (श्रीरामविजय, पांडवप्रताप, हरिविजय आणि शिवलीलामृत कर्ते) संतकवी श्रीधर स्वामी नाझरेकर (चरित्र, विद्याधर मा. ताठे)