डॉ. विमलकीर्ती (जन्मनाव: एल.जी. मेश्राम; ५ फेब्रुवारी १९४९ - १४ डिसेंबर २०२०) हे भारतीय बौद्ध विद्वान, आंबेडकरी विचारवंत, पाली भाषेचे व्यासंगी आणि मराठीहिंदी भाषेतील लेखक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत विभागाचे ते प्रमुख होते. त्यांनी एकूण ८१ पुस्तकांचे लेखन; तसेच अनुवाद केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे प्रेरणास्रोत होते.[१][२][३][४][५]

विमलकीर्ती
जन्म नाव एल.जी. मेश्राम
जन्म ५ फेब्रुवारी १९४९
मृत्यू १४ डिसेंबर २०२०
नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध धर्म
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी, हिंदी, पाली, इंग्लिश
साहित्य प्रकार धार्मिक, सामाजिक
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विमलकीर्ती हे मुळचे भंडारा जिल्ह्यातील देवरीदेव या गावातील होते, व त्यांचे मूळ नाव एल.जी. मेश्राम होते. शिक्षणासाठी ते नागपुरात आले. नागपुरातील पन्नासे ले-आउट (त्रिमूर्ती नगर) येथे राहात होते.[१][२]

बौद्ध भिक्खू डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते १९७१ साली बौद्ध धम्माची उपसंपदा घेतली. त्यानंतर त्यांना भन्ते आनंद कौसल्यायन यांनी विमलकीर्ती नाव दिले. नंतर ते डॉ. विमलकीर्ती नावाने ओळखले जाऊ लागले. १९७० पासून ते १९८८ पर्यंत अशी सुमारे दोन दशके ते कौसल्यायन यांच्या सहवासात होते. त्यातून त्यांना आंतरिक प्रेरणांच्या शोधाची आणि या शोधातून गवसले ते प्रसृत करण्याची प्रेरणा मिळाली. भदंत आनंद कौशल्यायन यांचे सर्व बौद्ध साहित्य प्रकाशित करण्याचे काम डॉ. विमलकीर्ती यांनी केले. आतापर्यंत पाली, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्याचे सर्वाधिक प्रकाशन दिल्ली येथील सम्यक प्रकाशनतर्फे प्रकिशित करण्यात आले.[१][२][३][४][५]

ते पाली साहित्याचे विद्वान होते. तथागत बुद्धांंच्या विचारांची मांडणी त्यांनी मराठी-हिंदीतील पुस्तकांद्वारे केली, यात 'त्रिपिटक' सुद्धा होते. १९७९मध्ये त्यांनी 'स्वतंत्र मजूर पक्ष' हे आंबेडकरांनी इ.स. १९३६ साली स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्ष या राजकीय पक्षावर आधारित पुस्तक लिहिले.[१][२][३][४][५] यानंतर धर्मांतर: प्रेरणा आणि प्रयोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिकता, पाली सिक्खापकः पठमो भागो, बौद्ध धर्म के इतिहास में डॉ. आंबेडकर का योगदान, धर्मांतरण की आवश्यकता क्यो?, बौद्ध संस्कृती भारत, सतसार इशारा, वज्रसूची, देश के दुश्मन, हिंदू कोड बिल या पुस्तकांच्या लेखनासह मिलिंद प्रश्न, या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. याशिवाय ससाई: जापान से भारत, बौद्धमत, बुद्ध का दर्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर के पत्र, पाली व्याकरण, पाली त्रिपिटक, ललित विस्तर, दीघनिकाय, महावंस, चुलवंस, दीपवंस, बोधीचर्यावतार ही पुस्तके लिहिली. पालीविषयक पुस्तकांशिवाय महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित खंडरूपात त्यांनी लिखाण केले.[१][२][३][४][५] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आणि पत्रांचे मराठीतून हिंदीत भाषांतर करण्याचे काम त्यांनी केले. महात्मा फुले यांच्या साहित्याचे मराठी ते हिंदी भाषांतरही त्यांनी केले आहे. त्यांचे लिखाण हे आंबेडकरी चळवळीला दिशादर्शन करणारे असल्याचे मानले जाते. बौद्ध धम्मग्रंथ असलेल्या त्रिपिटकाला उघडपणे मांडण्याचे काम डॉ. विमलकीर्ती यांनी केले. यासोबतच मोग्गलान पाली व्याकरण, पाली काव्यधारा, बौद्ध संस्कार जीवनपद्धती, श्रमण संस्कृती बनाम ब्राम्हणी संस्कृती, भगवान बुद्ध प्रेरणादायी जीवन, थेरीगाथा या पुस्तकाच्या लेखनासह धम्मपदाचा मराठी अनुवाद डॉ. विमलकिर्ती यांनी केला. सुमारे ८१ पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद त्यांनी केला.[१][२][३][४][५]

१४ डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथे त्यांचे निधन झाले.[१][२][४][५]

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d e f g "व्यासंगी: डॉ. विमलकीर्ती". Maharashtra Times.
  2. ^ a b c d e f g "पाली साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. विमलकीर्ती यांचे निधन | eSakal". www.esakal.com.
  3. ^ a b c d e "प्रो. डॉ. विमलकीर्ति | Samyak Prakashan". www.samyakprakashan.in.
  4. ^ a b c d e f न्यूज़, दलित दस्तक (14 डिसें, 2020). "ज्योतिबा फुले से हिंदी जगत का परिचय कराने वाले बौद्ध विद्वान डॉ. विमलकीर्ति नहीं रहें". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ a b c d e f "साहित्यीक डॉ. विमलकिर्ती यांचे कोविडमुळे नागपूर इथं निधन". newsonair.com.[permanent dead link]