कानबाई व रानबाई ह्या अनुक्रमे राधा व चंद्रावली (रुख्मिणी) देवी होत. खानाच्या नावाने कानबाई बसवली जाते असा अपप्रचार आहे पण या उत्सवाला पाच हजार वर्षाची परंपरा आहे आणि खानांचा इतिहास तेवढा पुरातन नाही म्हणून ते तथ्यात्मक नाही.

कानबाई माता

जेव्हा गुरू गोरक्षनाथ खान्देशात (कान्हदेश) नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी आले त त्यांनी बघितलं की सदर प्रांतातील सर्व लोक हे कानबाई व रानबाई या दोन देवींचे भक्त आहेत आणि जेव्हा त्यांना या दोन देवींबद्दल सविस्तर माहिती कळल्यावर त्यांनी आपण या दोघे देवीचे बंधू असून त्यांचे भक्त आहोत असे स्वीकार केलं. कानबाई रानबाई या देवींचे पूजन खानदेशातील अहिर लोक साधारणतः चार हजार वर्षापासून करत असावेत असा अंदाज आहे. हे अहिर कृष्ण वंशी होते आणि गोपाळन हा त्यांच्या मुख्य व्यवसाय होता. राधा आणि चंद्रावली या अहिर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत आणि त्यांनाच कानबाई व रानबाई या नावाने संबोधले जाई.

अहिराणी ही अहिराची मूळ भाषा. ह्या भाषेचा इतिहासही पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. अहिरांची अर्थात यादवांची 5000 वर्षांपूर्वीची इलावर्षी भाषा आणि सध्या बोलली जाणारी अहिराणी भाषा यांच्यात बरेचसे साम्य आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बळसाणे गावातील बार देवी मंदिर हे अहिर वंशी लोकांणीच स्थापित केलेले आहे आणि इथे राधा (कानबाई) व चंद्रावली (रानबाई) यांना त्यांच्या सखींसहित पूजले जाई. हे बळसाने गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील वृज मंडळातील बरसाना (राधाचं गाव) गावाचे प्रति रूप होय. कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी श्रीमती राधिका होय आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रावली होय.

कानबाईना रोट म्हणजे आमना खान्देशनी दिवाई.

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाईचा (अर्थात राधा आणि चंद्रावली ) हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. ह्याला रोट (यंदा आमना गावले कानबाई मायना रोट शेतस) उत्सव म्हणून ओळख आहे . या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरून दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी व (रशी) चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो. तीन दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते. तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेले असते. तीन दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी तो गावात येतोच! एकवेळ लगीनसराई, दिवाळीसारखे सण टळतील, पण कानबाई मायले पाठ कोणीच नई दावस. परदेशात असणारेसुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात. गावाला या तीन दिवसात जत्रेचे स्वरूप आलेले असते. अनेक दिवसांपासून भेटलेले मित्र एकमेकांना पुन्हा भेटत असतात. यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.

कानबाई ची मुख्य सेविका असते तिला गवरणी (गवळणी) म्हणतात. ही गवळणी म्हणजे राधाच्या मुख्य सेविका ललिता आणि विशाखा ह्यांचे प्रतिक.