काकतीय

शके ११व्या ते १३व्या शतकातले भारताच्या तेलुगू भाषिक प्रदेशातील राजवंश

काकतीय या वंशातील हे देवगीरीच्या सोमवंशी यादव वंशातील होते परंतु प्रादेशिक काकती देवीवर श्रद्धा व उपासक असल्यामुळे त्यांना काकतीय हे संबोधन लागले. काकतीयांचा आंध्रातील स्वतंत्र राजे म्हणून उदय इ.स. ११५०च्या सुमारास झाला. चालुक्यांची सत्ता झुगारून काकतीयांनी वरंगळ येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले . [१]

काकतीय राजवंशात बांधले गेलेले वरंगळ येथील रामप्पा मंदिर

तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी विजगापट्टण, चेट्टूर, गुलबर्गा हा प्रदेशही आपल्या ताब्यात घेतला.

काकतीय साम्राज्यातील राजे संपादन

  • यर्रय्या उर्फ बेतराज पहिला (इ.स. १००० ते १०५०)
  • प्रोळराज पहिला (इ.स. १०५० ते १०८०)
  • बेतराज दुसरा (इ.स. १०८० ते १११५)
  • प्रोळराज दुसरा (इ.स. १११५ ते ११५८)
  • रुद्रदेव उर्फ प्रतापरुद्र पहिला (इ.स. ११५८ ते ११९७)
  • महादेव (इ.स. ११९७)
  • गणपती (इ.स. ११९८ ते १२६१)
  • रुद्रमा (गणपतीची मुलगी)(इ.स. १२६१ ते १२९६)
  • प्रतापरुद्र दुसरा (रुद्रमेच्या मानलेल्या मुलीचा मुलगा)(इ.स. १२९६ ते १३२६)

राजांची कामगिरी संपादन

काकतीय वंशातील बेतराज पहिला याचे राज्य कोरवी प्रदेशावर होते. नळगुंदा जिल्ह्याचा काही भागही त्याच्या राज्यात होता. याचा मुलगा प्रोळराज पहिला याने चालुक्यांच्या वतीने अनेक राजांशी संग्राम करून विजय मिळविले होते म्हणून त्याला हनमकोंडाच्या भोवतालचा भाग बक्षीस मिळाला होता. त्याचा मुलगा बेतराज दुसरा यानेही चालुक्य विक्रमादित्य सहावा याच्या वतीने लढाया जिंकल्या म्हणून त्यालाही सब्बिनाडू हा प्रदेश बक्षीस मिळाला होता. त्याने अनमकोंड येथे आपली राजधानी स्थापन केली. बेतराज दुसरा याचा मुलगा प्रोळ दुसरा याने मात्र चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारून दिले. प्रोळ दुसरा याचा मुलगा प्रतापरूद्र याने त्याच्या राज्यात सामंतांनी केलेली बंडे मोडून काढली. कर्नुल हा नवा भाग जिंकून आपल्या राज्याला जोडला. याच्या काळातच आंध्रात अनेक मंदिरे बांधली गेली. काकतीय वंशातील गणपती हा महापराक्रमी राजा होता. त्याने बहुतेक सगळा आंध्रदेश जिंकून आपला राज्यविस्तार केला. कांचीनेल्लोर हे तामिळनाडूमधले प्रदेशही त्याने जिंकून घेतले. याने अनमकोंड येथून राजधानी हलवून वरंगळ येथे आणली. गणपतीच्या राजवटीनंतर त्याची मुलगी रुद्रमा ही गादीवर आली. मार्कोपोलो हा प्रवासी रुद्रमा हिच्या कारकिर्दीतच इ.स. १२९३ साली मोटुपल्ली बंदरात उतरला होता. रुद्रमेवर यादवराज महादेव याने चाल करून तिचा पराभव केला त्यामुळे तिची सत्ता दुर्बळ झाली. अनेक सामंतांनीही स्वातंत्र्य पुकारले. रुद्रमेनंतर तिच्या मानलेल्या मुलीचा मुलगा प्रतापरुद्र दुसरा हा गादीवर आला. उत्तरेकडून आलेल्या मुघल आक्रमणापुढे त्याचा टिकाव लागला नाही. इ.स. १६२६ मध्ये उलुघखान याने वरंगळवर स्वारी करून प्रतापरुद्राला कैद केले व काकतीय साम्राज्याचा अस्त झाला.

इतर संपादन

काकतीय राजे व त्यांचे सरदार विद्या व कलांचे भोक्ते होते. त्यांनी आंध्रात प्रचंड देवालये बांधली. वरंगळ येथील हजार खांबांचे मंदिर, पालमपेठ येथील रुद्रेश्वराचे मंदिर, पिल्ललमर्री येथील रेड्डी सरदारांनी बांधलेली मंदिरे ही सर्व काकतीय शिल्पकलेची स्मारके आहेत. पाखालराम व लखनाराम येथील तलावही याच काळात बांधले गेले.

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ देवी, यशोदा. द हिस्ट्री ऑफ आंध्र कंट्री (इंग्लिश भाषेत). ०४/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)