हंसराजस्वामी हे एक संतकवी होते.

हंसराजस्वामी
जन्म १८०५
महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार ग्रंथ

जीवन संपादन

स्वामींचा जन्म मराठवाड्यातील परभणी या गावी सन १८०५ मध्ये झाला, त्यांचे मूळचे नाव नारायण. त्यांचे आजोबा रामचंद्रपंत हे सावकार असून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. त्यांचे वडील गंगाधरपंत हे सावकारी न करता परभणी येथेच पेशकारी करत होते. त्यांच्या आईचे नाव रेणुकाबाई. नारायण हा या दांपत्याचा मधला मुलगा. नारायणाच्या जन्मापासून या कुटुंबाची ग्रहदशा फिरली व गंगाधरपंतांची नोकरी सुटली. त्यांच्यावर उपजीविकेच्या शोधात गावोगाव भटकण्याची पाळी आली. या भ्रमंतीत असताना हे कुटुंब रेणुकाबाईंच्या माहेरी कोयाळ येथे आले. तेथे ता काळच्या रीतीप्रमाणे नारायणाचे लग्न बालवयातच तेथील कुलकर्ण्यांच्या मुलीशी लावून देण्यात आले. त्यांच्या पत्नीचे सासरचे नाव लक्ष्मी असे ठेवले. ही लक्ष्मी आपल्या पावलांनी घरात आली. पण त्या अगोदरच लक्ष्मीदेवीने त्या घरातून काढता पाय घेतला होता. त्यातच भर म्हणून की काय, नारायणाचा थोरला भाऊ पत्नीसह वेगळे घर करू लागला. त्याच्या रोजगारीची जी थोडीफार आवक होती, तीही बंद पडली. त्यामुळे गंगाधरपंतांची विवंचना अधिकच वाढली. तेव्हा कुमारवयाच्या नारायणाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि म्हणून द्रव्यार्जन करून कुटुंबाला मदतीचा हात देता यावा, म्हणून त्याने घराबाहेर पडून थेट सुरत गाठले. तेथे एका नातेवाइकाने केलेल्या द्रव्य साहाय्याने थोडासा व्यापार करून काही पैसा मिळवला. तो घेऊन गावाकडे येत असता ते चोरांनी लुबाडले. कर्माने मिळवले होते, दैवाने ते नेले. त्यानंतर पुन्हा प्रयत्न करावा, म्हणून नारायण ग्वाल्हेरला गेला. आईची रखमा नावाची बालमैत्रीण तेथील राजघराण्यात दिली होती. तिच्या ओळखीने तेथील पागेची नोकरी मिळवायचा त्याने प्रयत्न केला. पण तिथल्या दिवाणाच्या आडकाठीमुळे त्या नोकरीचे काही जमू शकले नाही. अखेर निराश होऊन नारायण परतला. ग्वाल्हेरला मिळवलेले थोडेफार द्रव्यही त्याने वाटेत एका गरीब ब्राह्मणाला देऊन टाकले.

परभणीला आल्यानंतरही तेथील पागेचे काम त्याला मिळाले. काही दिवसांनंतर हद्रे आणि अर्धापूर तालुक्याच्या सरदेशपांडेगिरीचे कामही त्याला मिळाले. पण तीही नोकरी फार काळ टिकली नाही. पण नारायणाला त्याचे काही वाटले नाही. कारण प्रपंचाविषयी त्याची वृत्ती मुळातच विरक्त होती. द्रव्यलोभ त्याला नव्हताच. त्याचे चित्त परमार्थाकडे जास्त ओढ घेऊ लागले. त्याला गुरुप्राप्तीची तळमळ लागली. मनाच्या या अवस्थेत असतानाच पाथरी येथे त्याची व एका संन्याशाची गाठ पडली. त्याने ’वसामतचे लक्ष्मणराव तुला गुरुपदेश देतील,’ म्हणून सांगितले. ’क्ष्मणराव हे एक सरकारी नोकरीतले गृहस्थ, ते आपल्याला काय गुरुमंत्र देणार ?’ असा एक विचार नारायणाच्या मनात येऊन गेला. त्याने तो संन्याशाला सांगितला. तेव्हा त्याने ’साखर खाणाऱ्याने वाण्याच्या रूपाकडे पाहू नये.’ अशा मार्मिक उत्तराने त्याचे समाधान करून त्यास लक्ष्मणरावांकडे पाठविले. तेव्हा नारायणाने लक्ष्मणरावांकडे जाऊन गुरुमंत्राची याचना केली. त्यांनी आरंभी चालढकल केली. पण त्याची निष्ठा व तळमळ पाहून त्यास शेवाळे येथे उपदेश दिला. हा गुरुअनुग्रह साधारणपणे १८२७-२८ साली झाला असावा.

लक्ष्मणराव हे श्रीसमर्थ रामदास – उद्वव – माधव – रुद्रराम – नागनाथ – लक्ष्मण या परंपरेतील समर्थांपासून सहावे पुरुष होत. आदिनारायणाने हंसरूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला व त्याचे अज्ञान दूर केले, ब्रह्मदेवाने तेच ज्ञान वसिष्ठांना दिले व वसिष्ठांनी ते प्रभु रामचंद्रास दिले, प्रभु रामचंद्र हे समर्थांचे गुरू होत. अशा तऱ्हेने आदिहंस गुरूपासून सुरू झालेल्या ज्ञानपरांपरेचे समर्थ व उद्धवादी त्यांचे शिष्य प्रशिष्य हे वारसदार ठरतात. ब्रह्मविद्येची ही अखंड परंपरा जोपासणाऱ्याला या संप्रदायाला तो हंसापासून सुरू झाला म्हणून ’हंस संप्रदाय’ असे नाव हंसपद्धतिकारांनी दिले आहे. कलियुगातले समर्थ हे पहिले हंस असून लक्ष्मणहंस हे सहावे आणि नारायण हंस हे सातवे हंस होत. हंस म्हणजे मूल हंसप्रेरित अद्वैतज्ञानाची अधिकारी आणि गुरुपद प्राप्त करून स्वशिष्यांमध्ये अद्वैतज्ञानाचा प्रसार करणारी थोर विभूती होय. हंसराजस्वामींच्या मूळ नारायण या नावाऐवजी हंसराज हे नाव रूढ होण्यामागचे हे स्पष्टीकरण हंसपद्धतिकारांनी दिले आहे.

पुढे नारायण हंसांना वऱ्हाडात अनसिंग येथे सरदेशपांडेगिरीची नोकरी मिळाली. पण त्यांनी तीनच वर्षे ती नोकरी केली, नोकरीतून त्यांचे मन उडून गेल्यामुळे त्यांनी तिचा राजीनामा दिला व ते थेट शेवाळ्यास लक्ष्मण हंसांकडे आले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईही त्यांच्याबरोबर आल्या. (१८३०). लक्ष्मण हंसांनी नारायण हंसांना तेथील एका दुकानदाराकडे हिशेब लिहिण्याचे काम मिळवून दिले. मिळकत थोडी असली तरी गुरुसान्निध्याचा लाभ झाल्यामुळे ते आनंदात होते, शेवाळ्यात दोन वर्षे मोठ्या आनंदात गेली. या अवधीत लक्ष्मीबाईंना दिवस गेले. पण सातव्या महिन्यातच त्या प्रसूत झाल्या. पुत्र झाला पण तो मृत अवस्थेत होता. लक्ष्मीबाईही पाचव्या दिवशी मृत्यू पावल्या. नारायण हंसाच्या गळ्यात जो काही प्रपंचाचा पाश अडकला होता, तोही तुटून गेला, तेव्हा त्यांनी गुरूंची अनुज्ञा घेऊन संचारास प्रारंभ केला (१८३२).

प्रथम ते माहुरास गेले. तेथे त्यांना श्रीदत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला. नंतर लक्ष्मणहंसांच्या आजाराचे वृत्त ऐकून ते परत शेवाळ्यास आले. तेथे गुरूंची त्यांनी उत्कृष्ट सेवा केली. याच मुक्कामात गुरूंच्या प्रेरणेने त्यांनी ’गुरुभक्तिसार’ नामक ग्रंथाची रचना केली. नंतर गुरूंची संमती घेऊन ते पुन्हा संचारास बाहेर पडले. ते फिरत फिरत डोमगावला आले. तेथून पंढरपूरला आले. तेथे जनार्दन उत्पात, सखारामबाबा डोमगांवकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्याचे पुढे स्नेहात रूपांतर झाले. तेथून सज्जनगडास जावे असे नारायण हंसांच्या मनात होते. पण समर्थांनीच एके रात्री त्यांना दर्शन दिले, पंढरपूरला असतानाच पूर्णाश्रमस्वामींचा व नारायण हंसांचा परिचय वाढला होता. हे स्वामी उत्तर हिंदुस्थानात जायला निघाले, तेव्हा नारायणहंसांनी त्यांच्याकडून, मनात येईल तेव्हा संन्यास घेता येईल, या हेतूने प्रैषोच्चार लिहून घेतला होता. स्वामी उत्तरेकडे निघून गेल्यानंततर थोड्याच दिवसांनी त्यांनी संन्यास घेतला व ते ’नारायणतीर्थ’ बनले. त्यांच्या या परमहंस दीक्षेमुळे त्यांना हंसराज म्हणू लागले, असे स्पष्टीकरण श्रीरघुनाथशास्त्री गोडबोले यांनी दिले आहे. पण ते पटणारे नाही. कारण स्वतः समर्थ व त्यांचे उद्धवादी शिष्य रामदासी असले तरी त्यांनाही हंसपद्धतिकारांनी ’हंस’ म्हणूनच संबोधले आहे. संन्यास दीक्षेनंतर सखारामबाबा डोमगावकरांच्या आग्रहावरून हंसराजस्वामी डोमगावला गेले. तेथे त्यांचे वास्तव्य सन १८३३ पासून सन १८४० पर्यंत होते. या काळात त्यांना बऱ्यापैकी स्वास्थ्य अनुभवता आले. त्यामुळे त्यांचे संकेत ’कुबडी’, ’आगमसार’, ’पूर्वारंभ गाथा’ व ’सदाचार’ असे चार ग्रंथ लिहून झाले. सन १८४० च्या चतुर्मासात सखारामबाबा कीर्तनासाठी म्हणून हैद्राबादला गेले आणि तेथेच ते समाधिस्थ झाले. त्यामुळे हंसराजस्वामींनी डोमगाव कायमचे सोडले आणि ते परांड्यास राहू लागले. सन १९४० ते १८५५ ही पंधरा वर्षे त्यांचे वास्तव्य काही अपवाद सोडल्यास परंडा येथेच होते.

परांडा येथे प्रथम त्यांचे वास्तव्य केशवराजाच्या मंदिरात होते, त्यानंतर ते राममंदिरात राहू लागले. त्यानंतर त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी राममंदिराच्या मागच्या बाजूस मोकळी जागा घेऊन तेथे मठ बांधून त्यांची राहण्याची व्यवस्था केली. तेथे त्यांना ध्यानासाठी गुंफा बांधली. तिच्या पूर्वभागात मारुतीची स्थापना केली. तेथेचे ते अखेरपर्यंत राहिले. केशवराजाच्या मंदिरात राहत असताना त्यांनी मनाबाई रजपूत या निरक्षर स्त्रीला लिहायला, वाचायला शिकवून तिला वेदान्त शिकण्यासाठी आख्याने रचली. तोच कथा कल्पलता हा ग्रंथ होय. राममंदिरात राहत असताना (१८४०-४७) त्यांनी ’चूडालाख्यान’,’वेद नावाची पदे’, शिवगीतेवरील ’वेदेश्वरी’ टीका हे ग्रंथ रचले. मठात रहायला आल्यानंतर ’वाक्यवृत्ति टीका’, ईशावास्योपनिषदावरी ’वेदाज्ञा’ ही टीका, ’अनुभवामृत’, ’तत्त्वझाडा’ इत्यादी ग्रंथ रचले.

१८५० मध्ये त्यांनी रघुनाथ भास्कर गोडबोले यांना गुरुमंत्र दिला. सन १८५४ मध्ये माघी पौर्णिमेस ते एकाएकी ध्यानस्थ झाले. आणि ध्यान उतरल्यानंतर पुढेही अबोलच राहिले. फाल्गुनी पौर्णिमेस रघुनाथशास्त्री गोडबोले यांना बोलावून घेतले आणि त्यांच्याशी ३६ तास संवाद केला. सन १८५५ मध्ये वैशाख शु. ८ला पहाटे शुचिर्भूत होऊन आपण चौरंगावर बसले, त्यांचे शिष्य बाबाजी जोशींना स्वतःची पूजा करावयास सांगितले. त्यानंतर-
“ब्राह्मी मुहूर्त उत्तम काळ । मुखासी पाहत असतां सकळ ।
तंव एकाएकी अंतराळ । तेजोभरित जाहले ॥” (हं प. १३-८-३६)

त्या तेजाने सर्वांचे डोळे दिपले. अर्ध्या घटकेनंतर डोळे उघडून पाहतात तो सद्‌गुरू हंसराजस्वामी आत्मस्वरूपात विलीन झाल्याचे सर्वांना समजले. असा त्यांच्या निर्वाणाचा क्षण हंसपद्धतिकारांनी शब्दबद्ध करून ठेवला आहे.

हंसराजस्वामींचे वरील चरित्र पाहता त्यांना शास्त्रशुद्ध अध्ययन करायला वेळच मिळाला नाही असे दिसते. परंतु अध्यात्मशास्त्राकडे त्यांचा ओथा लहानपणापासूनच होता. भगवद्‌गीता, शिवगीता, विष्णुसहस्रनाम हे ग्रंथ त्यांच्या नित्य पठनात होते. विवेक सिंधू, एकनाथी भागवत, दासबोध, दीपरत्नाणकर इ. ग्र्थांचे त्यांनी वाचन केले होते. अशा नित्यनियमाने केलेल्या ग्रंथपठनामुळे स्वामी व्युत्पन्न झाले होते. त्यांची बुद्धीही तीव्र होती. रघुनाथशास्त्री गोडब्ले लिहितात, “यांची बुद्धी इतकी विलक्षण तीव्र होती की, कोणताही विषय असो, एकदा नजरेखालून किंवा कानावरून गेला की पुरे. मग तो जातो कोठे ?” असे असल्यामुळे संजीवन कवी आश्चर्याने म्हणतात –
पहा व्युत्पत्ती काही नसता । वेदशास्त्रे निघती मुखता ।
सहा शास्त्र अधयन असता । तोही पुढे कुंठित ॥ - (हंसपद्धती ९-८-६७)
तेथेच चिमणकवी म्हणतात –
नारायण हंसस्वामींनी पहिली । रूपावळीही नाही म्हणितली ।
परी संस्कृत व्युत्पत्ती बाणली । आपोआप (हंसपद्धती ७-७-१२८)

हंसराज स्वामींची सर्व ग्रंथरचना डोमगाव, परांडा या भागातील वास्तव्याच्या काळात झाली. ते स्वतः मुक्तच होते. पण केवळ लोकानुग्रहाखातरच त्यांनी ग्रंथप्रपंच केला. त्यांच्या नावावर त्यांच्या चरित्रकारांनी जवळ जवळ सोळा ग्रंथांची नोंद केली आहे. त्यातील काही अद्यापी मिळालेलेच नाहीत, काही ग्रंथ अर्धवट अवस्थेत मिळालेले आहेत, काही प्रकाशित झालेले आहेत तर काही अजून प्रकाशनाची वाट पहात आहेत.

प्रकाशित ग्रंथ संपादन

  1. आगमसार (वेदान्तावर स्वतंत्र ग्रंथ)
  2. संकेत कुबडी (दासबोधसार)
  3. कथा कल्पलता (एकूण १८ प्रकरणे असल्याची माहिती आहे पण त्यातील केवळ ८ प्रकरणे उपलब्ध/प्रकाशित आहेत)
  4. सदाचार (श्रीशंकराचार्यांच्या ’सदाचार’ ग्रंथावरील ओवीबद्ध टीका)
  5. वाक्यवृत्ती (श्रीशंकराचार्यांच्या ’लघुवाक्यवृत्ति’ वरील टीका)
  6. वेदाज्ञा (ईशावास्य उपनिषदावरील टीका)
  7. वेदेश्वरी (पद्मपुराणांतर्गत शिवगीतेवरेल बृहद् टीका)
  8. चूडालाख्यान (योगवसिष्ठातील एका आख्यानावर आधारीत प्रकरण)
  9. वेद नावाची पदे
  10. अमृतानुभव (ज्ञानेश्वरांच्या ’अमृतानुभव’ ग्रंथावर समच्छंदी टीका)

या व्यतिरिक्त १) पूर्वारंभ गाथा, व २) तत्त्वझाडा (गद्य) हे दोन ग्रंथ अजून अप्रकाशित आहेत.

वरील सर्व ग्रंथांतून स्वामींनी मराठी वाङ्मयात अपरिचित अशा विषयांवर लिहून नव्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व ग्रंथ वेदान्त याच विषयावरचे आहेत. हंसराजस्वामी वेदान्ताचे गाढे अभ्यासक आणि प्रवक्ते होते. वेदान्ताखेरीज दुसरे काहीही लिहावयाचे नाही अशी त्यांची प्रतिज्ञाच होती.

प्रबंधलेखन संपादन

डॉ.कल्याण काळे यांनी १९७८ साली, 'परांड्याचे हंसराज स्वामी: चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान' या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. (मराठी) मिळवली. त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉ. य.वि. परांजपे आणि कै. न.चिं. केळकर ही दोन पारितोषिके मिळाली होती.