सिसिलिया कार्व्हालो

प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो (एम.ए. पीएच.डी) या एक मराठी लेखिका आहेत. त्या वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मराठीच्या अध्यापिका आहेत. तेथल्या विद्यार्थ्यांना त्या मुंबई विद्यापीठातया पीएचडीसाठीचे मार्गदर्शन करतात.

कार्व्हालो यांनी काव्याबरोबरच कथा, ललित, बालवाङ्मय, संकलन, लोकसाहित्य असे अनेक प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे. उन्मेश, अंतर्यामी, सूर्य किरणात आला, पंख, माणूस उकरून काढावा लागतोय ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय त्यां प्रेमांजली’ व मृद्‌वेणा ही अनुवादित पुस्तके लिहिली आहेत.

कार्व्हालो यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान असे २५ पेक्षा अधिक पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत.

कार्व्हालो यांनी उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळावरबालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर संपादक म्हणून काम केले आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २४ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या अमृताते पैजा जिंके या मराठी भाषेचे वैभव सांगणाऱ्या ग्रंथात डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान हा लेख समाविष्ट आहे.

कार्व्हालो या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

इटली, जर्मनी, चीन असा देश-विदेशात त्यांचा प्रवास झाला आहे.

पुस्तके संपादन

  • अंतर्यामी
  • 'उत्थानगुंफा : आकलनाचे आलेख' या डॉ. अरुणा देशमुख यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील एक समीक्षालेख (उत्थानगुंफा हा डॉ. यशवंत मनोहर यांचा पहिला काव्यसंग्रह आहे)
  • उन्मेष (कवितासंग्रह)
  • ऋतुचक्र (बालवाङ्मय)
  • काठ (कथासंग्रह)
  • चांदणे निर्मळ शुभ्र
  • दारातल्या रांगोळीचे रंग (काव्यसंग्रह) या पुस्तकाला २००७ सालचा इंदिरा संत पुरस्कार मिळाला अाहे.
  • पंख
  • पंडिता रमाबाई : व्यक्ति व वाङ्मय (प्रबंध)
  • प्रकाशझोत (कथासंग्रह)
  • प्रेमांजली (अनुवादित)
  • माणूस उकरून काढावा लागतोय
  • मृद्‌वेणा (अनुवादित)
  • सूर्य किरणात आला
  • ज्ञानवृक्षाची पालवी (या पुस्तकाला पुण्याच्या ख्रिस्ती साहित्य प्रसारक या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त डी. पी. ॲन्ड्ऱ्यूज स्मृती पुरस्कार मिळाला आहे.)


पुरस्कार संपादन

  • डिसेंबर २००९ मध्ये सोलापूर येथील सुशील सोशल फोरम संस्थेतर्फे सुशीलकुमार शिंदे पुरस्कार
  • पंढरपूर येथील अक्षरगंध संस्थेतर्फे महिला लेखकांना दिला जाणारा पुरस्कार
  • सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (नोव्हेंबर २०१२)
  • याशिवाय, महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा २५हून अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
  • सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार २०२३