मंथन महिला साहित्य संमेलन

बेळगाव शहरात इ.स. १९८८पासून ‘मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी’तर्फे होणाऱ्या मंथन महिला साहित्य संमेलन होते. या संमेलनाचे आयोजन करणाऱ्या मंथन संस्थेचा इतिहास ‘महिलांनी महिलांसाठी, महिलांकडून’ सुरू केलेल्या हिंदवाडी मंडळापर्यंत जातो.

इसवी सन १९६६मध्ये श्री. व सौ. डॉ. पट्टण हिंदवाडीमध्ये राहावयास आले. त्यांनी त्यांचा व्यवसाय इथेच सुरू केला. व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्याची तळमळ असणाऱ्या के.डी. मंदाकिनीताईंनी हिंदवाडीतील महिलांना एकत्र करून १५ ऑगस्ट १९६७ रोजी हिंदवाडी महिला मंडळाची स्थापना केली.

सुरुवातीला या मंडळातर्फे शिवणकाम, भरतकाम, विणकाम, पाककला अशा विविध विषयांचे क्लासेस घेण्यात येत असत. मंडळासाठी या वर्गांसाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्‍न त्यावेळी कै. मीरा पेडणेकर यांनी स्वतःच्या घरातीलच जागा देऊन सोडवला. त्यांच्या घरातच विविध, नवनवीन उपक्रम त्यावेळी होत असत.

सर्वजणींना आणि विशेषतः पट्टणबाईंना संस्थेची स्वतःची वास्तू असावी असे प्रकर्षाने वाटत होते. अनेकांचे मदतीचे हात सरसावले आणि महालक्ष्मी मंदिर आणि एक सभागृह दिमाखात उभे राहिले. इथे मंडळातर्फे चालणाऱ्या विविध उपक्रमांचा कळसाध्याय म्हणजे साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, आरोग्य आणि घरगुती उद्योगधंदे असे सहा विषय घेऊन मंथन महिला मंडळाची निर्मिती झाली. ..

या बौद्धिक आणि वैचारिक मंथनातून आलेले नवनीत म्हणजेच इ.स. १९८९ सालापासून दरवर्षी होणारे ‘मंथन महिला साहित्य संमेलन’ होय. स्थानिक लेखिका, कवयित्री, साहित्यावर प्रेम करणाऱ्या महिल यांना प्रोत्साहन मिळावे, हा या संमेलनाचा मूळ हेतू आहे. या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. कथाकथन, वक्तृत्व, निबंधलेखन, काव्यलेखन, गायन, नाट्यवाचन असे या स्पर्धांचे स्वरूप असते. ह्याला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. ग्रंथदिंडीपासून ते समारोपापर्यंत अतिशय उत्साहाने महिला या संमेलनात सहभागी होतात.

आजपर्यंत इंदिरा संत, उमा कुलकर्णी, प्रा.डॉ. कल्याणी हर्डीकर, जयश्री कुबेर, ज्योत्स्ना देवधर, नंदिनी आत्मसिद्ध, नीलांबरी कुलकर्णी, डॉ. नीलिमा गुंडी, नीलिमा बोरवणकर, मंगला गोडबोले, मंदा कदम, डॉ. मंदा खांडगे, मधुरा कोरान्ने, माधुरी वैद्य, मीना प्रभू, मृणालिनी चितळे, मृणालिनी पटवर्धन, मोनिका गजेंद्रगडकर, श्रीमती वसुंधरा पटवर्धन, विजया पाटील, विद्या बाळ, विद्या सप्रे, विनीता पिंपळखरे, संजीवनी बोकील, संध्या टांकसाळे, सुजाता देशमुख, स्नेहसुधा कुलकर्णी, अशा साहित्य क्षेत्रातील महनीय महिलांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

२८-२-२०१६ रोजी मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे झालेल्या २९व्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वसईच्या डॉ. सिसिलिया कार्व्हालो होत्या. त्या ‘साहित्यातून समाजाशी सुसंवाद’ या विषयावर बोलल्या.

३०वे मंथन महिला साहित्य संमेलन रविवार दि. २९ जानेवारी २०१७ रोजी बेळगावमधील टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात झाले. संमेलनाच्या अध्यक्षा अनुराधा गोरे होत्या. ‘ओळख सियाचीनची’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

पहा : मराठी साहित्य संमेलने