माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणाऱ्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.

खंडोबाचे मंदिर संपादन

माळेगाव येथील खंडोबाचे मंदिर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदिराची व्यवस्था परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.[१]

खंडोबाची यात्रा संपादन

खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. [२] खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.

माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.

भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.

माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.

परिसरातील हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "श्री क्षेत्र माळेगाव यात्रा". १५ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ १५/०१/२०१२[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती