प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी


परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी (जन्म : माहीम-पालघर, १५ मे १८९३, - परंडा, २३ मार्च १९६८) हे एक अद्भुत विभूतिमत्व असलेले थोर संन्यासी संत एकोणिसाव्या‌-‌विसाव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांना कर्वे स्वामी किंवा दंडी स्वामी म्हणत. त्यांनी गोस्वामी तुलसीदासरचित[[२]] रामचरितमानस[३] या रामायणग्रंथाचा मराठीत समवृत्त-समछंद अनुवाद करून त्यावर विस्तृत टीका लिहिली.म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे तुलसीदास म्हणतात.[१] [२]अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे कर्ममार्गाचे आचरण आणि तितक्याच उच्चप्रतीची निष्ठावंत, निष्काम श्रीरामभक्ती याचा सुरेख संगम श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींच्या जीवनात दिसतो. प्रपंच नेटका करून परमार्थातील अत्युच्च शिखर कसे गाठावे याचा वस्तुपाठ म्हणजेच श्रीस्वामींचे चरित्र होय.[३][४]

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी_कर्वे स्वामी_दंडी स्वामी हे थोर संन्यासी संत महाराष्ट्रात होऊन गेले.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी
प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी[[१]]
जन्म :- १५ मे १८९३, - परंडा ता. परंडा जि. उस्मानाबाद.

नाव :- दत्तात्रय नारायण कर्वे

आईचे नाव :- सौ. गंगाबाई नारायण कर्वे

वडील :- श्री. नारायणराव कर्वे (कीर्तनकार)

शिक्षण :- बी.ए. (संस्कृत) एस.टी. सी.

पेशा :- शिक्षक

१९३० :- रावजीबुवा बिडवाडीकरांकडून 'राममंत्र' - 'श्रीराम जय राम जय जय राम' जप ४.५ कोटी पूर्ण

१८/१/१९४३ :-वासुदेवानंद सरस्वती स्वामी (पुणे - नाशिक रोडवरील आळे येथील पोटे स्वामी)कडून

संन्यास-दीक्षा.

१९४३ ते १९६८ :- या काळात मानसाची अगणित पारायणे, प्रवचने व अनेक शिष्याना दीक्षा व मंत्र दिले.

१०/३/१९६८ ते २३/३/१९६८ :- प्रायोपवेशन ( अन्न पाणी त्याग आनंदाने करून )

२३/३/१९६८ :- रात्री १ वाजून १० मि. जीवनपुष्प श्रीराम चरणी समर्पित (महासमाधी)

टिपा

पूर्ववृत्तान्त संपादन

स्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव दत्तात्रय नारायण कर्वे'[[४]].[५] [६]मूळस्थान मुक्काम गिम्हवणे, तालुका दापोली, जिल्हा रत्‍नागिरी. हरिहरेश्वर[[५]] व जोगेश्वरी ही यांची कुलदैवते. श्री. नारायणराव म्हणजे श्रींचे वडील[[६]] हे शिक्षक होते, धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना संतवाङ्मयाची गोडी होती. यांचा द्वितीय विवाह माहीम-पालघर येथील पेंडसे यांचीकन्या गंगाबाई यांच्याशी झाला. सौ. गंगाबाई अत्यंत प्रेमळ, सात्त्विक व पतिपरायण होत्या.[७]

जन्म,बालपण व शिक्षण संपादन

दि. १५ मे १८९३'[[७]], वैशाख वद्य अमावस्या, सोमवारी सौ. गंगाबाईंच्या माहेरी ( माहीम, ता. पालघर) येथे स्वामींचा जन्म झाला.[२][८]बालपणापासून ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, एकपाठी व आपला निश्चय कसोशीने पाळणारे होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मराठी सातवी उत्तीर्ण झाले व इ. स. १९१३मध्ये मुरूड-जंजिरा येथून मॅट्रिक पास झाले. इ. स. १९१८मध्ये श्री संस्कृत हा मुख्य विषय घेऊन ते बडोद्याहून बी.ए. झाले.[[८]][९]

विवाह संपादन

 
सौ.कमलताई कर्वे अर्थात् द्वारकाताई - श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी

श्रींचा विवाह इ. स. १९१५ मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षात असताना  मुक्काम टिटवाळा, ता. कल्याण येथे चौकचे श्रीधर रामचंद्र जोशी यांच्या कन्या 'द्वारका' यांच्याशी त्यांच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध झाला. विवाहसमयी श्रीसमर्थ रामदासस्वामींप्रमाणे[[९]] पळून जाण्याचा [१०]विचार आला होता;परंतु त्यांच्या वडिलांचे स्नेही श्री. गोपाळबुवा गणू पाटील (रा. आन्हे, पो. पडघे, जि. ठाणे) यांनी मुखावरून जाणून शपथ घालून विचारल्यामुळे सांगावा लागला व पुढे प्रारब्धास शरण म्हणून श्री विवाहास तयार झाले.[११]

नोकरी संपादन

पुढे इ. स. १९२४ मध्ये श्रींनी एस.टी.सी.ची परीक्षा दिली. बी.ए. एस.टी.सी. झाल्यानंतर मामलेदाराची नोकरी सहजासहजी मिळत असूनही तत्त्वाविरुद्ध म्हणून स्वीकारली नाही तसेच सरकारी नोकरी तर करायचीच नाही, असा त्या काळास अनुसरून दृढनिश्चय केला होता.[१२]

इ. स. १९१७ मध्ये मिशनरी हायस्कूल, मुरबाड, जि. ठाणे येथे, पुढील वर्षी वसई हायस्कूलमध्ये सहा महिने ते शिक्षक होते. इ.स. १९२० मध्ये डहाणू येथे हायस्कूलमध्ये, इ.स. १९२१ मध्ये चिंचणी तारापूर येथे व काही काळ 'कांजी थरमसी हायस्कूल' येथे त्यांची मुख्याध्यापक म्हणून एकूण १६ वर्षे झाली. ते शाळेत संस्कृत, गणित, इंग्रजी हे विषय शिकवत.[१३][१४]

सद्गुरुकृपा, रामनाम मिळाले संपादन

इ.स.१९२९ मध्ये श्रीधरस्वामी बिडवाडीकर उर्फ रावजीबुवा या सत्पुरूषाची गाठ पडली व त्यांच्या दर्शनाने, संगतीने पूर्वजन्मीचे संस्कार उफाळून येऊन विषयी वैराग्य व मुमुक्षुत्व प्राप्त झाले. दि. १९ मार्च इ. स. १९३०ला चिंचणीहून श्रींनी श्रीरावजीबुवा यास विनंतीवजा पत्र लिहिले -

जयजयाजी गुरुनाथा। दास ठेवितो पदी माथा।
विनंती आयकावी आता। दयाघना श्रीधरा।

परिणामे इ. स. १९३० साली श्रीरावजीबुवांकडून त्यांच्या लालबाग येथील मठात त्रयोदशाक्षरी मंत्र मिळाला.[१५] नंतर भक्तिज्ञानासंबंधी अधिक मार्गदर्शन व्हावे अशी विनंती सद्गुरूंस केली असता 'आधी साडेतीन कोटी जप करून ये, मग पुढचा मार्ग सांगेन' अशी आज्ञा झाली. व त्याप्रमाणे श्रींची साधना सुरू झाली.[१६]

उपासनासदृश दिनचर्या संपादन

 
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी

पहाटे ४ वाजता उठून गार पाण्याने प्रातःस्नान वगैरे आवरून सूर्योदयापूर्वीच संध्या, गायत्रीजप, ब्रम्हयज्ञ, इष्टदेवतेचा जप करत. नित्य गीतापाठ, पूजा-अर्चा करून शाळेत जात. मधल्या सुट्टीत घरी येऊन हात-पाय धुऊन जप करून पुन्हा वेळेवर शाळा गाठत. काही दिवसांनी घरी राहून मनासारखे साधन होत नाही म्हणून इ. स. १९३२ साली चैत्र शुद्ध प्रतिपदेस घराशेजारीच स्वतंत्र झोपडी बांधून फक्त अग्निस्पृष्ट फराळाचे पदार्थ भक्षण करून ब्रम्हचर्ययुक्त मंत्रपुरश्चरण सुरू केले. संध्याकाळी शाळेतून आल्यावर पुन्हा स्नान करून मंत्रानुष्ठानास बसत ते ठराविक संख्या पूर्ण होईपर्यंत झोपत नसत. क्वचित झोप येऊ लागली तर शेंडी खुंटीस बांधून ठेवत म्हणजे डुलकी आलीच तर हिसका बसून जाग येई.[२][१७]

मंत्रपुरश्चरणाची पूर्तता संपादन

याप्रमाणे दरवर्षी १.५ कोटी जप करून ३ वर्षात ४.५ कोटी जप पूर्ण करून पुढील मार्गदर्शनासाठी श्रीगुरूंच्या दर्शनास गेले असता 'राम तुला सर्व सांगेल' असा आशीर्वाद मिळाला[[१०]] व त्याप्रमाणे रामरायाने[[११]] सर्व काही सांगून कृतःकृत्य केले.[१८]

साधनसिद्ध तीर्थयात्रा संपादन

इ. स. १९३३ साली मे महिन्याच्या सुट्टीत एकट्याने फराळावर राहून कुंभमेळा, मथुरा, वृंदावन, गोकुळ, हरिद्वार, ऋषीकेश, स्वर्गाश्रम, अयोध्या, प्रयाग, काशी, गया असा प्रवास नित्यक्रमात खंड न पडू देता केला. आधीच आगगाडीचे वेळापत्रक पाहून सूर्योदय-सूर्यास्त पाहून, कुठे कुठला थांबा आहे, कुठे किती वेळ गाडी थांबते, त्या वेळेत प्रातःस्नान, सायंस्नान व संध्या करून वेळेवर गाडी गाठत. यामध्ये हरिद्वारहून अयोध्येस जाताना व दि. २८ जानेवारी इ. स. १९५९ला मुंबईहून परंड्यास येताना केवळ दोन वेळा प्रातःस्नान प्रवासात असल्यामुळे चुकले. इ. स. १९३३ ते इ. स. १९५९ यामध्ये व इ. स. १९५९ नंतर पुढे महासमाधीपर्यंत कधीही नियमात खंड पडला नाही.[१३][१८]

बाबा गंगादास यांच्याकडून ब्रह्मज्ञानाचा उपदेश व जीवनमुक्तता संपादन

बाबा गंगादास हे महान भगवद्भक्त, अत्यंत प्रेमळ संत चिंचणी-तारापूरच्या किल्ल्यावर राहत. इ. स. १९३० पासून यांच्या संगतीने श्रींना श्रीरामचरितमानसाची गोडी लागली व त्याचे रहस्य प्राप्त झाले. बाबा गंगादासांचे त्यांच्या बाबूंवर(अर्थात श्रीस्वामींवर) खूप प्रेम होते. ते स्वामींना प्रेमाने 'बाबू' म्हणत.

दि. २७ जानेवारी १९३४ रोजी काही निमित्ताने श्रीस्वामी हे बाबा गंगादासांकडेच मुक्कामाला राहिले होते. मध्यरात्रीच्या शिवपूजेनंतर परमप्रसन्न असलेले बाबा श्रींना म्हणाले, 'बाबू जल्दी आ जा! अब ज्ञानका रहस्य एकही बात में कहूॅंगा। तेरी लायकात हो तो परचीती मिल जाएगी देख! 'जैसे हो वैसे रहना, कुछ बनना नही।''[१९][२०] हे वाक्य ऐकताच श्रींच्या हृदयात वेदान्त-गीता आदींच्या उपदेशाचा लख्ख प्रकाश पडला व परमानंदमय दशा प्राप्त झाली. याचवेळी तुलसीदास[[१२]] तेरे मुखसे बोलेंगे असाही आशीर्वाद दिला.[[१३]] नंतर परत दि. २८ जानेवारी १९३४ रोजी दुपारी १.३० वाजता तशीच स्थिती प्राप्त झाली व या दिवसापासून खरी निर्भयता प्राप्त झाली.

उर्वरित गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रमातील साधना संपादन

इ. स. १९२३ मध्ये श्रींना प्रथम अपत्य झाले होते. त्यानंतर इ. स. १९३५ मध्ये दुसरा मुलगा झाला व गेला. यावेळी शाळेतील सहकाऱ्यांना पेढे वाटत असताना श्री दोन पेढे सहकाऱ्यांच्या हातावर ठेवत होते. काहींनी दोन पेढे कशाचे असे विचारले असता, 'हा पेढा मुलगा झाल्याबद्दल आणि हा दुसरा पेढा तो गेल्याबद्दल' असे निर्विकारपणे सांगत. यानंतर इ. स. १९३५ सालीच स्वामींनी सौभाग्यवतींना ('सौ. कमलाबाई कर्वे अर्थात् द्वारकाताईंना) दीक्षा दिली.[२१]
इ. स. १९३७-३८ मध्ये श्रीस्वामी चौक, जिल्हा कुलाबा येथे धन्येश्वराच्या पडवीत एकांतवासात राहण्यास आले. यावेळी पत्नीस त्यांच्या बंधूंकडे चौकला ठेवले होते. येथे २-३ वर्षे मुक्काम होता. येथे श्रींनी संपूर्ण श्रीरामचरितमानस ९ महिन्यांत सांगितले.
यानंतर नर्मदातटाकी[[१४]] निबिड, घनदाट अशा घोर अरण्यात अहिल्यादेवींनी[[१५]] बांधलेल्या कोटेश्वर मंदिरात[[१६]] ११ दिवस राहून अनुष्ठान केले. अनुष्ठान चालू असताना भगवान शंकरांनी वृद्ध ब्राम्हणाच्या रूपात तर अनुष्ठान समाप्तीनंतर प्रत्यक्ष भगवान प्रभु श्रीरामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी तेजस्वी सगुण रूपात दर्शन दिले.[२२] [२३]यानंतर खेड, जि. पुणे येथील केदारेश्वर मंदिरात राहून इ. स. १९४१-१९४२ मध्ये २१ महिन्यात २४ लक्ष गायत्रीचे पुरश्चरण पूर्ण केले. येथेही तुलसीरामायणावर प्रवचने होत. येथे ९ महिन्यांत केवळ बालकांडच सांगून झाले.[२४]

संन्यासग्रहण संपादन

यानंतर श्रींनी चतुर्थाश्रम घेण्याचे ठरविले व त्यासाठी सौंना पत्र लिहिले की, चतुर्थाश्रम घेण्याचा विचार आहे;पण त्यास आपली संमती हवी. अन्यथा अग्निहोत्र ठेवून वानप्रस्थाश्रम घेऊन राहता येईल. हे मान्य असल्यास हे पत्र पोहोचल्यापासून १५ दिवसांत'तुम्ही खेड येथे येऊन हजर व्हावे. याप्रमाणे १५ दिवस वाट पाहिली जाईल. तसे न झाल्यास चतुर्थाश्रम स्वीकारण्यास आपली संमती आहे असे समजून संन्यासग्रहण केला जाईल. यावर काहीच पत्रोत्तर न आल्याने ता. १८ जानेवारी १९४३ रोजी, टिळक पंचांगाप्रमाणे पौष शुद्ध द्वादशीस त्यांच्या कुंडलीप्रमाणे स्थिरलग्नी स्थिरनवांशात खेड जि. पुणे येथे संन्यासाश्रम स्वीकारला.[२५] यापूर्वीच पत्नीच्या नावे जमीन करून देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच त्या आधीपासूनच म्हणजे इ.स. १९३७ पासून त्यांच्या बंधूंकडे चौक, जि. कुलाबा येथे वास्तव्यास होत्या.[२६]

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामींकडून दंडग्रहण संपादन

 
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (पोटे) स्वामी (पुणे - नाशिक रोडवरील आळे येथील पोटे स्वामीं)कडून श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांना संन्यास-दीक्षा (दंड) प्राप्त झाली.

परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (पोटेस्वामी) महाराजांबद्दल श्रींना दागिने, पैसे मागतात, संग्रह करतात, इ. परस्परविरुद्ध पुष्कळ माहिती कळली होती.[२७] पण तरीही ते श्रोत्रिय, ब्रह्मविद्, वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान होण्यासाठी त्यांच्या पायावर शिष्यभावाने डोके ठेवणे गरजेचे आहे अशी श्रींना अंतःस्फूर्ती होऊन बळावू लागली. त्याप्रमाणे श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडे म्हणजेच पोटे स्वामी अर्थात् आळ्याच्या महाराजांकडे (आळे हे ता. जुन्नर, जि. पुणे मधील एका गावाचे नाव आहे.) जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे दि. १२ फेन्रुवारी १९४३ म्हणजेच माघ शुद्ध १०, शा.श.१८६४, रविवारी दुपारी १२ च्या सुमारास आळ्याच्या महाराजांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले. श्रीमहाराजांचे दिव्य ब्राह्मतेज, प्रसन्ना मूर्ती पहाताक्षणी श्रींना परमसमाधान झाले. त्यावेळी श्रीमहाराज भिक्षा ग्रहण करीत असल्यामुळे श्री उभे राहिले. तेव्हा कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नसतानाही श्रीमहाराजांनी श्रींना पूर्वाश्रमीच्या आडनावावरून संस्कृतमध्ये क्षेम-कुशल विचारले. आळ्याच्या महाराजांची भिक्षा झाल्यावर श्रींनी यथाविधी पुढील श्लोक म्हणून वंदन केले.

यद्पादपङ्कजपरागपवित्रमौलि। भूयो न पश्यति नरो जठरं जनन्या।
तं वासुदेवमजमीशमनंतबोधम्।श्रीमद्गुरूं शरणदं शरणं प्रपद्ये।।''

त्याच दिवशी सायंकाळी योगपट्ट विधीही उरकला.[२८] याचे वर्णन श्रींनी पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे-

माघ शुद्ध दशमी मृग भानुवार । केला अंगीकार वासुदेवे ।।
योगपट्टदीक्षा देऊनी दासाशी । गुरुपरंपरा सांगितली ।।
वासुदेवानंद,त्रीविक्रमानंद । नृसिंहानंद,वासुदेवानंद ।।
यतीसांप्रदाय सरस्वती नामे । प्रज्ञानानंद अभिधान ।।
दुधाहारी मठ,भोसल्यांचा घाट । वाराणसी क्षेत्र पुण्यभूमी ।।
महावाक्य पंचीकरण तत्त्वबोध । करूनिया गुज निरोपिले ।।
शिरी पद्महस्त ठेवूनिया मम । मज आप्तकाम गुरूने केले ।।
तेंव्हा कृतकृत्य झालो याची देही । ठेवूनिया शीर गुरूपायी ।।
अजन्म्याचा आता जन्मची चुकला । सनातना प्राप्ती अमरत्व ।।
जगामाजी आता माझा मी भरलो । मजमाजी सर्व जग तैसे ।।
मजहूनी आता जग भिन्न नसे । जे जे दिसे भासे गुरुरूप ।।

{ इ स. १९४३, आळे मुक्काम,ता. जुन्नर जि.पुणे माघ शुद्ध दशमी शा. श. १८६४ }

नामकरणाच्या वेळी श्रींनी श्रीमहाराजांना त्रिवार विनंती केली की, 'रामानंद' किंवा 'राघवानंद' नाव ठेवल्यास सहज नामस्मरण होईल; पण श्रीमहाराजांनी निक्षून सांगितले की, नाव 'प्रज्ञानानंद' ठेवायचे आहे व तेच ठेवले गेले[[१७]].[२९]

गुरुशिष्यांचा थोर अधिकार संपादन

 
खाली बसलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतीस्वामी- पोटे स्वामी-आळ्याचे महाराज आहेत.यांच्याकडून श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींना(शेजारी उभे असलेले) संन्यासदीक्षा (दंड) प्राप्त झाली.

इ. स. १९४३ पूर्वीच आळ्याच्या महाराजांना अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्याने डावे अंग निरूपयोगी झाले होते. तसेच मधुमेहाचा विकारही तीव्र होता. उठता-बसताही येत नव्हते. त्यामुळे सर्व शरीरसुलभ क्रिया जागीच होत व सदा अवधूत स्थितीतच असत. परातीत उचलून ठेवून स्नान घालावे लागे. मांड्या वगैरे भागांवर तळहाताएवढी फाफरे पडत. त्यांना मुंग्या डसत. पण श्रीमहाराज एकही आवाक् काढत नसत. ते श्रींना पहावेना. तेव्हा एकदा श्रींनीच विनंती केली, 'आपले सर्व रोग व पीडा या दासास द्यावेत. आपल्या कृपेने या स्वामीच्या देहास ती उपाधी फार काळ घ्यावी लागणार नाही.' यावर श्रीमहाराज म्हणाले, 'मी देऊ शकेन व आपण घेऊ शकाल हे अगदी खरे;पण ज्याने केले त्यानेच भोगणे योग्य होय. फार त्रास होतो आहे असे मनास वाटताच प्राण ब्रह्मरंध्रात चढविताच कष्ट मुळीच नाहीत'. [३०]यावरून श्रीमहाराजांचा योगाभ्यास उत्तम होता हे श्रींना समजले.

इ.स.१९४३चा चातुर्मास खेड येथे झाला. एके दिवशी अचानक आदिशक्ती जगदंबेचे साक्षात् दर्शन झाले.[३१] [३२]कार्तिक शु. ४ व ५ शा. श. १८६५ या दोन दिवसांत श्रीस्कंदपुराणातील गुरुगीतेवर'श्रीगुरुगीता प्रबोधिनी' ही प्राकृत टीका[२२] लिहून आळ्याच्या महाराजांना समर्पित केली.[३३][[१८]] नंतर श्रीस्वामी चासकमान, ता. खेड येथे दीर्घकाळ राहिले.[३४]

श्रीरामचरितमानसाचा मराठी अनुवाद [[मराठी रामचरितमानस]] श्रीगुरूचरणी अर्पण केला. संपादन

[३५][३६]

 
श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी कृत श्रीरामचरितमानसाचा मराठी अनुवाद

वरचेवर श्रीस्वामींना अनिवार काव्यस्फूर्ती होऊ लागली.

सांगतसे मज तो रघुराणा। मम आज्ञा ऐके प्रज्ञाना।
सत्त्वर करण्या घे तूं हातीं। रामचरित मानस रचना ती।। १।।

अशी प्रत्यक्ष श्रीरामाज्ञाच झाल्याने श्रावण शुद्ध द्वितीया शा. श. १८६७ अर्थात् दि.१०-८ इ. स. १९४५, गुरुवार रोजी श्रीगोस्वामी तुलसीदास[१९] विरचित श्रीरामचरितमानसाचा[[२०]] ( दोहा, चौपाया, सोरठा, छंद, इत्यादी मूळाप्रमाणे तंतोतंत) समवृत्त-समच्छंद मराठी अनुवाद[३७][[http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/handle/123456789/5946]] अवघ्या तीन महिन्यांच्या आतच लिहून पूर्ण झाला. लगेचच आळ्याच्या महाराजांना पत्र लिहून कळविले व दर्शनाविषयी अनुज्ञा मागितली व अनुज्ञा मिळाल्याने जाणे झाले. श्रीस्वामी श्रीमहाराजांना मराठी रामचरितमानस[३८] वाचून दाखवू लागले. ते जसजसे वाचू लागले तसतसे श्रीमहाराजांना अश्रू अनावर होऊ लागले. अनेकदा तर ते अक्षरशः हुंदके देऊन धाय मोकलून भावविभोर होत. इकडे श्रींचाही कंठ दाटून येई, नयनी अश्रू येत असत. शेवटी मधेमधे थांबत थाबंत महत्प्रयासाने अनुवाद पूर्ण करून श्रीमहाराजांना अभिप्राय व आशीर्वाद मागितला. तेव्हा असा असा लिहून आणा म्हणून आज्ञा झाली व त्याप्रमाणे लिहून आणल्यावर खाली श्रीमहाराजांनी सही केली. तो अभिप्राय व आशीर्वाद असा-

धन्योsसि कृतकृत्योsसि पावितं स्वकुलं त्वया ।
अन्तः संतोषमापन्ना श्रुत्वा रामायणं वयम् ।।१।।
साकी :
तुलसीदासकृत-काव्य कुसुमगत् मधुपः प्रज्ञानोsयम् ।
रामरचित मधु निजभाषायामर्पितवानस्मभ्यः ।।२।।
इदं रामायणं काव्यं जनानां सौख्यदायकम् ।
प्रीतिपात्रं भवेल्लोके शाश्वतं कीर्तिवर्धनम् ।।३।।
भुक्तिं भक्तिंच कैवल्यं ज्ञानं वैराग्यमेवच ।
सेवनादचिरान्नित्यं दास्यत्येष वरो मम ।।४।।''[३९]

एकदा आळे मुक्कामी दि. २ ते ४ सप्टेंबर इ.स. १९४६ या काळात स्वामींनी 'भार्गव-दर्प-विमर्दन'व दि. ७ सप्टेंबर इ. स. १९४६ रोजी 'हिराबाई' अशी दोन कीर्तनोपयोगी आख्याने लिहिली गेली.[[स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती व्यक्ती व वाङ्मय]] दि. १२ एप्रिल १९४७ रोजी श्रीरामचंद्राचे बालरूपात दर्शन झाले.[४०] त्यावेळी 'बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला' हे काव्य झाले.[२१] दि. १५ एप्रिल १९४७ रोजी श्रीमहालक्ष्मीचे साक्षात् दर्शन झाले.[४१] या महिन्यात 'श्रीरामस्तोत्र, भोजनविधि, संतासंत संगति, श्रीराम प्रातःस्मरण', वगैरे अनेक स्फुट काव्ये झाली.[२२] दि. २८ एप्रिल १९४७ला श्रींनी केलेली अनेक नवीन वृत्ते संकलित केली गेली.[२३] इ.स. १९५३ मध्ये श्रींचा 'वेदान्त-सार-अभंग-रामायण'[४२] तसेच 'अभिनव-रामायण'[४३] हा स्फुटकाव्याचा संग्रह प्रसिद्ध झाला.[२४]

स्वभाववैशिष्ट्ये संपादन

वृत्ती अत्यंत प्रेमळ, निस्पृह, अत्यंत प्रसिद्धीपराङ्मुख. आपले नाव व्हावे या हेतूने चुकूनही श्रींच्या हातून काही घडत नसे. सत्यभाषणावर अत्यंत कटाक्ष. शिस्त व नियमितपणा यांची आवड. कुणी बेशिस्त वागलेले, थट्टेतही खोटे बोललेले, दिलेला शब्द न पाळलेले खपत नसे. लगेच त्याची निर्भिडपणे हजरी घेतली जायची. यामुळे एक प्रकारचा दरारा सर्वांनाच वाटे. पण चूक झाली व प्रामाणिकपणे कबूल केली तर लगेचच क्षमा केली जाई. दांभिकपणाची मात्र अत्यंत चीड होती.[४४]

श्रीस्वामींची प्रखर राष्ट्रभक्ती संपादन

इ. स. १९४६मध्ये 'चले जाव' आंदोलन चालू होते. हैदराबादेत रझाकाराचे अत्याचार चालू होते. या काळात पूर्वीचे रामदासी संप्रदायाचे[[२५]] संस्कार उफाळून येऊन 'अहो हिंदूंनो, संघ संपन्न व्हावे', 'हिंदूंनो डोळे उघडा', 'दूर करी शीघ्र जाच हा', 'श्रीसमर्थ प्रार्थनाष्टक' अशी काव्ये झाली.[२६] ती तत्कालीन 'केसरी'सारख्या वृत्तपत्रांतून प्रसिद्धही झाली.

औंध संस्थानातील कुंडलजवळच्या वीराण्णाच्या डोंगरावर ब्रह्मानंद महाराजांच्या आज्ञेने स्वामींनी ३९ दिवसांत राष्ट्रोन्नतीसाठी १ कोटी ७५ लक्ष ६ हजार 'प्रणव जपानुष्ठान' केले. (ब्रह्मानंदमहाराजांनी १ कोटीच सांगितले होते.) पुढे चासकमानला चातुर्मास करून श्रीस्वामी परंडा, जि. उस्मानाबाद - धाराशिव येथे आले तेव्हा रझाकार चळवळीचा जोर होता. तेव्हा श्रींनी सांगितले, जर रझाकारांचा हल्ला झाला, स्त्रियांची बेअब्रू, विटंबना होण्याचा प्रसंग आला तर हा स्वामी संन्यासी असला तरी हातात तलवार घेऊन प्राणपणाने रझाकारांशी मुकाबला करून तुमचे संरक्षण करील. तसेच सर्व जनतेस सुख लाभावे म्हणून श्रीस्वामींनी काही काळ अनुष्ठान केले. ते होताच वातावरण शांत झाले.[४५]

रामवन[[२७]]यात्रा संपादन

इ. स.१९५०मध्ये श्रीस्वामी 'मानसमणि' [[२८]] या रामचरितमानसावरील लेखनासच अग्रक्रम देणाऱ्या हिंदी मासिकाचे व नोव्हेंबर इ. स. १९५१ मध्ये 'मानसपीयूष'[[२९]]चे ग्राहक झाले. त्यासाठी संपादकाला लिहिलेल्या पत्राने संपादकच इतके प्रभावित झाले की, परशुरामप्रसंगावर भाव लिहून पाठवावे असे इ. स. १९५२मध्ये त्यांचे श्रींनाच पत्र आले. 'मानसपीयूष' मधील टीकेमुळे श्रींचे नाव उत्तरभारतातील मानसप्रेमी जनांना सुपरिचित झाले व श्रींच्या दर्शनाविषयी उत्कंठा प्राप्त होऊन 'रामवन', सतना येथून इ. स. १९५३ मध्ये चैत्रात रामनवरात्रात होणाऱ्या 'मानसयज्ञा'साठी आग्रहाचे आमंत्रण आले. [१३]त्यासाठी श्रींनी चास-कमानहून पुण्यास येऊन दि. ११ मार्च इ. स. १९५३, बुधवार रोजी 'रामवन' येथे प्रयाण केले. रामवन येथे रोज संध्याकाळी ५ वाजता श्रींचे हिंंदीमधून रामायणावर प्रवचन होई. त्यांचे ते तेज, मानसावरील प्रभुत्व पाहून उत्तरभारतीय थक्क होऊन गेले व श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. यानंतर श्रीस्वामी जबलपूर-गोंदिया करून चासकमानला परतले. यावर्षी श्रींना ६० वर्षे पूर्ण झाल्याने साठीशांतिनिमित्त सद्भक्तांचा मेळावा भरवला होता. यानंतरदि. १९ सप्टेंबर इ. स. १९५४ ते १ जुलै इ. स. १९५५ या काळात श्रीस्वामी हे इस्लामपूरला होते.[४६]

मानस गूढार्थ चंद्रिका [[मानस गूढार्थ चंद्रिका]][[३०]][४७][४८][४९][५०][५१][५२] संपादन

ज्या विस्तृत टीकेच्या लेखनाचा प्रारंभ कार्तिक शुद्ध प्रतिपदा शा. श. १८७५ मध्ये इस्लामपूर येथे झाला होता, ती तिच्या परिशिष्टासह श्रावण कृष्ण पंचमी शा. श. १८७७ अर्थात् सोमवार, दि. ८ ऑगस्ट १९५५ रोजी सातारा येथे लिहून पूर्ण झाली.[[३१]] ही टीका डेमी आकाराची छापील ६१०० पृष्ठे होतील एवढी विस्तृत आहे.[३२][५३][५४][५५][५६][५७][५८][५९][६०][६१][६२][६३][६४][६५][३३] यानंतर इ. स. १९५६चा चातुर्मास सांगली येथील विष्णुमंदिरात, इ. स. १९५७चा चातुर्मास इस्लामपूरला डाॅ. वैद्य यांच्या जुन्या वाड्यात स्वतंत्र जागेत, इ. स. १९५८चा चातुर्मास माधवनगर येथे श्री. नातूशेठ यांच्या बंगल्यात संपन्न झाला.[६६] यानंतर इ. स. १९५९ साली श्रींचा मुक्काम परंड्यास गेल्यानंतर समाधिकाळापर्यंतचे जास्तीत जास्त वास्तव्य परंड्यासच [[३४]] झाले.सप्टेंबर इ. स. १९५९ मध्ये रामवन[[३५]](सतना, मध्यप्रदेश) येथे 'श्रीप्रज्ञानानंद पेटिका' स्थापन होऊन त्यात रामचरितमानस(मराठी)[३८][३७][३६], गूढार्थ चंद्रिका नमुना अंक[६७], प्रस्तावना खंड[६८], 'मानसमणि'तील श्रींचे सर्व छापील लेख व श्रींचा पत्रव्यवहार वगैरे [३६] पेटिकेत ठेवून श्रींचा अद्भुत सत्कार व अद्वितीय गौरव करण्यात आला.[६९] इ. स. १९५९ ते इ. स. १९६२ या चारही वर्षाचे चातुर्मास परंड्यास झाले. इ. स. १९६३चा चातुर्मास लोहाऱ्यास व इ. स. १९६४चा चातुर्मास उस्मानाबादेस गरड वकिलांच्या वाड्यात माडीवर झाला. इ. स. १९६५-६६ सालचे चातुर्मास परंडा येथेच रामविश्रामधामात, तर इ. स. १९६७चा चातुर्मास लातूर येथे श्रीराम मंदिराच्या पडवीत झाला. हा श्रींचा २५वा चातुर्मास होता व हाच शेवटचा ठरला.[७०]

प्रायोपवेशनाचा निर्णय [३७] संपादन

इ.स १९६६ पासूनच प्रायोपवेशनाने देहत्याग करण्याचा श्रींच्या मनातील विचार बळावतच गेला व 'परंडा येथेच फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून प्रायोपवेशन करून देह ठेवण्याचे ठरविले आहे. तरी पौर्णिमेपर्यंत दर्शनास यावयाचे असेल त्यांनी यावे' अशी पत्रे शिष्यमंडळींकडे तसेच गुळवणी महाराज[[३८]], भगवान श्रीधरस्वामी महाराज[[३९]] यांनाही पाठवली गेली. गुळवणी महाराज [७१]तसेच भगवान श्रीधरस्वामी महाराज तसेच इतरही अनेक विद्वज्जन-सत्पुरुषांची पत्रे आली की, आपण उपोषण करू नये;पण प्रत्यक्ष श्रीरामरायाने सांगितले तरच हा विचार रद्द करू, असे श्रींनी कळविले.सर्व गोष्टींची तयारी अगदी एखाद्या कार्यक्रमाप्रमाणे श्रीस्वामी करत होते. 'सुतळीचा तोडा, रद्दी, उरलेली शाई, इत्यादि' प्रत्येक बारीक-सारीक वस्तूसुद्धा कोणास प्रसाद म्हणून द्यायची ही सर्वही मृत्युपत्र - व्यवस्था लिहून ठेवली होती. देह एखाद्या नदीत सोडून द्यावा किंवा चार तुकडे करून जंगलात टाकून द्यावा असे श्रीस्वामी म्हणत. समाधी बांधण्यास विरोध होता; पण नंतर सर्वांनी अनेकदा मान्य केल्यावरून मान्य केले.

 
श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींनी अन्नपाण्याचा त्याग करून प्रायोपवेशनाने देह ठेवला. त्यावेळी महासमाधीच्या एक दिवस आधी श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींची ध्यानस्थ मुद्रा.

होळी पौर्णिमेचा दिवस अन्न न घेता केवळ पाण्यावरच काढला व दुसऱ्या दिवशीपासून - फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून प्रायोपवेशन सुरू केले. रामविश्रामधामांत गर्दी होईल म्हणून श्री. वासुदेवराव देशमुख (नानासाहेब देशमुख) यांच्या वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिकडेच सर्व सोय केली गेली. पहिल्याच दिवसापासून हजारो लोक दर्शनास येऊ लागले. श्रींनी पहिले सात दिवस सारखे लोकांशी बोलणे सुरूच ठेवले होते. अन्नपाण्याचे तर नावसुद्धा नाही! बोलणे तर सुरू. पुढे लघवी रक्तासारखी लाल होऊ लागली.[७२] जिभेवर सर्वत्र भेगा पडल्या, फोड आले;पण श्री अत्यंत निर्विकार असत. 'आपण बोलू नका' अशी कुणी विनंती केल्यास 'जाऊ दे, आता हे मडके लवकरच फुटणार आहे' असे म्हणत.[७३]

अखेरचे काही दिवस संपादन

 
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींची प्रायोपवेशनाने समाधी घेण्याच्या १ तासापूर्वीची भावमुद्रा

'नाथषष्ठीस देह सोडू' असे श्रीस्वामी पूर्वी म्हणाले होते. त्यामुळे नाथषष्ठीस भक्तगण चिंतेतच होते. श्रींचे नऊ दिवसांचे तुलसीरामायणाचे [[४०]] पारायण चालू होते. दिवसभर रामनामाचा गजर चालायचा. संध्याकाळी ५ वाजण्याचे सुमारास नित्याप्रमाणे श्री स्नानगृहात गेले आणि स्नानास बसताना एकदम कोसळले. असे वाटले की श्री गेलेच. पळापळ सुरू झाली. सोवळ्यातील काही मंडळींनी घोंगडी अंथरली. दर्भ, तुळसी पसरल्या. काहींनी श्रीस्वामींना स्नानगृहातून बाहेर आणले तेव्हा ते थोडे शुद्धीवर आले. त्यामुळे त्यांना घोंगडीऐवजी पलंगावर बसविले. तेव्हा श्रींनी सांगितले, 'घोंगडी काढून टाका, 'अजून अवकाश आहे' रात्री ९ च्या सुमारास श्रीस्वामींना थोडे बरे वाटले. त्यावेळी एकाने विचारले, 'जलप्रवेश, पर्वतपतन, प्रायोपवेशन, इत्यादी मार्गाने देहत्याग करणे योग्य आहे का?' त्यावर श्रींनी सांगितले, 'वृद्धयतींनी असा देहत्याग करू नये, पण यतीवृद्धांना असे करण्यास हरकत नाही'[४१]

श्रीसेवेसाठी असणाऱ्या श्री. माधवराव जोशी यांच्या पत्नी सौ. जोशी यांनी श्रींच्या जिभेवर पडलेल्या भेगा पाहून त्यावर मुळी लावताना दोन थेंब पाणी अधिक घातले. त्याचा लेप लावत असताना ते पातळ झाल्याचे श्रींना जाणवले. तेव्हा 'आम्ही अन्नपाणी वर्ज्य केले असताना तू त्या लेपात जास्त पाणी का घातलेस?' असे त्या परिस्थितीतही म्हणाले.[७४]

दुसरे दिवशी श्रीतुलसीरामायणाचे वाचन चालू असताना श्रींनी 'आज कोणता योग आहे?' असे विचारले. 'आज परिघ योग आहे' असे सांगितले गेले. तेव्हा 'आज जायचे नाही' असे श्री म्हणाले. नंतर दोन दिवस बोलणे बंदच होते. स्नानादि नियमित होत असे. वेदना फारच झाल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घोष करीत. तोही दिवस गेला. रात्री १ च्या सुमारास श्रींच्या सेवेस असणारे डाॅ. कुलकर्णी यांनी वेळ जवळ आल्याचे जाणून श्रींनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रींच्या छातीवर शाळिग्राम ठेवला. हातपाय गार पडून त्राण नसतानाही श्रींनी तो आपल्या हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना गंगाजळ व तुलसीपत्र तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा जयघोष सुरू असताना फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वाजून १० मिनिटांनी खाड्कन डोळे उघडले गेले. एकदम वीज चमकल्यासारखे झाले व त्याचवेळी प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.[[४२]][४३][७५] नेत्रांतून प्राण जाणाऱ्यास वैकुंठ प्राप्त होतो असे श्रीस्वामी सांगत व आम्हीही तसेच जाणार असेही म्हणत.[७६] याप्रमाणे श्रींनी सांगितल्याप्रमाणेच सर्व काही घडले. दुसरे दिवशी अनेकानेक गावांहून शिष्यमंडळी, भक्तमंडळी अठरा पगड जातींचे लोक त्यांच्या या लाडक्या स्वामींच्या शेवटच्या दर्शनासाठी जमली. जवळजवळ १० हजार लोक त्या अपूर्व रथयात्रेत होते. भर उन्हाळ्यात ५० ब्राम्हण सोवळ्यात अनवाणी पायांनी श्रींचा रथ आनंदाने, प्रेमादराने ओढत होते.[७६] भजने, जयजयकार चालूच होता. अशी ही अथांग मिरवणूक दुपारी ४ च्या सुमारास श्रीहंसराजस्वामींच्या मठात आली. श्रींनी पूर्वी जी त्यांची वस्त्रे स्वतः धुऊन सोवळ्यात ठेवून सूचना देऊन लिहून ठेवली होती की, शेवटच्या वेळी विशिष्ट ठिकाणी ठेवलेली वस्त्रे वापरावी त्याप्रमाणे तीच वस्त्रे, कटिसूत्र, कौपीन त्यांना नेसवून, पूजा-आरती करून अश्रूपूर्ण नेत्रांनी सर्वांनी निरोप दिला. सारी जनता धाय मोकलून रडली. पण श्रींनी सांगून ठेवले होते की, 'देहरूपाने गेलो तरी चैतन्यरूपाने मी तुमच्याजवळ आहे. तुम्ही कळवळून प्रार्थना करा. मी तुम्हाजवळच आहे.'[७७]

 
परमहंस परिव्राजकाचार्य श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांनी प्रायोपवेशनाने दि. २३ मार्च १९६८ अर्थात् फाल्गुन वद्य दशमीला परंडा येथे देह ठेवला. पुढे त्यांची परंडा, जि. धाराशिव-उस्मानाबाद, महाराष्ट्र येथे समाधी बांधण्यात आली.

चित्रदालन संपादन

 
परमहंस परिव्राजकाचार्य श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी हे श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ईश्वरदास रामदासी या नावाने सेवेला होते.
 
नवीन श्रीराम मंदिर, मंडई पेठ, परंडा. जि. उस्मानाबाद - ४१३५०२ (महाराष्ट्र) येथील श्रीरामपंचायतन व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी.
 
परमहंस परिव्राजकाचार्य श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी हे एक थोर ब्रम्हनिष्ठ, श्रोत्रिय संन्यासी महाराष्ट्रात होऊन गेले.

बाह्य दुवे संपादन

१.[http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/handle/123456789/5946]]

२.http://satsangdhara.net/manas/about_svami.htm

३.[[४४]]

४.[[४५]]

५.[[४६]]

६.[[४७]]

७.[[४८]]

८.[[४९]]

== संदर्भ == संपादन

१.डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. लिखित 'स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती '(तिसरी आवृत्ती,प्रकाशक- श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली.)

२.डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा.लिखित 'स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती' (दुसरी आवृत्ती, प्रकाशक- श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ, डोंबिवली.)

३.डॉ.अनिता प्रभाकर केळकर यांचा पीएच.डी.प्रबंध- स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती : व्यक्ती आणि वाङ्मय[[स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती व्यक्ती व वाङ्मय]

४.डॉ.सौ.केळकर, अनिता लिखित 'महाराष्ट्राचे तुलसीदास - स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती'.

५.डॉ.कामत, अशोक (एप्रिल १९६९). "आदिकवी तुलसीदास आणि रामकाव्य परंपरा". प्रसाद. प्रसाद प्रकाशन पुणे.

६.डॉ.कर्वे, चंद्रशेखर लिखित 'कर्वे कुलवृत्तांत' पृष्ठ क्रमांक १७५.

७.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चन्द्रिका प्रस्तावना खंड' (प्रकाशक- मानस गूढार्थ चन्द्रिका प्रकाशन मंडळ,इस्लामपूर.पृष्ठ क्रमांक १४)

८.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीगुरुगीता प्रबोधिनी'. (प्रकाशक - संत-सेवा हंस मंडळ).

९.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीरामचरितमानस' (मराठी) (पाचवी आवृत्ती, प्रकाशक- श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,शाखा-मिरज.)

१०.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीरामचरितमानस (मराठी गुटिका)' (तिसरी आवृत्ती, प्रकाशक- गुरुदेव रानडे मंदिर,बेळगाव.)

११.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'वेदान्तसार अभंग रामायण'.

१२.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'स्फुटकाव्य संग्रह आणि अभिनव रामायण'.

१३.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' बालकांड (मराठी / हिंदी). (खंड १ ते ६) (प्रकाशक - श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली).

१४.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' अरण्यकांड (मराठी / हिंदी) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली).

१५.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' किष्किंधाकांड ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली).

१६.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' सुंदरकांड (मराठी / हिंदी) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली).

१७.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' लंकाकांड (मराठी / हिंदी ). (खंड १ व २) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली).

१८.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' उत्तरकांड (मराठी / हिंदी ). (खंड १ व २) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली).

१९.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीरामचरितमानस' (मराठी गुटिका) (दुसरी आवृत्ती, प्रकाशक- प्रसाद प्रकाशन,पुणे).

२०.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका ‌- नमुना अंक'.

२१.पोटभरे, अ.सि.लिखित 'जीवनगंगा' (प्रकाशक - श्रीवासुदेव प्रकाशन ,पुणे.)

  1. ^ डॉ.कामत, अशोक (एप्रिल १९६९). "आदिकवी तुलसीदास आणि रामकाव्य परंपरा". प्रसाद. प्रसाद प्रकाशन पुणे.
  2. ^ a b c डॉ.सौ.केळकर, अनिता. महाराष्ट्राचे तुलसीदास - स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; undefined नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली.
  5. ^ डॉ.कर्वे, चंद्रशेखर (१९९४). कर्वे कुलवृत्तांत. पुणे: डॉ.कर्वे चंद्रशेखर. pp. १७५.
  6. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १२.
  7. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १३.
  8. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १३.
  9. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १४.
  10. ^ "समर्थ रामदास".
  11. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १६.
  12. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १६.
  13. ^ a b c डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. (१९८१). स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (दुसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ, डोंबिवली.
  14. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १७.
  15. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १८.
  16. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १९.
  17. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. २० ते २२.
  18. ^ a b डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. २२.
  19. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९५८). मानस गूढार्थ चन्द्रिका प्रस्तावना खंड. मानस गूढार्थ चन्द्रिका प्रकाशन मंडळ,इस्लामपूर. pp. १४.
  20. ^ डॉ.श्रीमती कमल, बा.वैद्य. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. १९ ते २३.
  21. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. २५, २६.
  22. ^ a b Kelkar, Anita Prabhakar. "Swami Pragyananand saraswati : vyaktii aani vadmay (स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती : व्यक्ती आणि वाङ्मय)".
  23. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. २८, २९.
  24. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. २९, ३०.
  25. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३०.
  26. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३१.
  27. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९५९). मानस गूढार्थ चन्द्रिका प्रस्तावना खंड. मानस गूढार्थ चन्द्रिका प्रकाशन मंडळ,इस्लामपूर. pp. १ ते १२.
  28. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३२.
  29. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३३.
  30. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३३, ३४.
  31. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३४, ३५.
  32. ^ Kelkar, Anita Prabhakar. "Swami Pragyananand saraswati : vyaktii aani vadmay (स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती : व्यक्ती आणि वाङ्मय)".
  33. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९८०). श्रीगुरुगीता प्रबोधिनी. संत-सेवा हंस मंडळ.
  34. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३५.
  35. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९४९). श्रीरामचरितमानस मराठी अनुवाद.
  36. ^ a b स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९६१). श्रीरामचरितमानस (मराठी गुटिका) (दुसरी ed.). प्रसाद प्रकाशन,पुणे.
  37. ^ a b स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानस (मराठी) (पाचवी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,शाखा-मिरज.
  38. ^ a b स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती. श्रीरामचरितमानस (मराठी गुटिका) (तिसरी ed.). गुरुदेव रानडे मंदिर,बेळगाव.
  39. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. .स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ३८, ३९.
  40. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ४१.
  41. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. .स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ४२.
  42. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९५४). वेदान्तसार अभंग रामायण.
  43. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९५३). स्फुटकाव्य संग्रह आणि अभिनव रामायण.
  44. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ४०.
  45. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. .स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ४२, ४३.
  46. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ४४, ४५.
  47. ^ स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती (१९९७). मानस गूढार्थ चंद्रिका बालकांड (मराठी). (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  48. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (फेब्रुवारी २००८). मानस गूढार्थ चंद्रिका बालकांड (मराठी). (दुसरी ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  49. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (२०००). मानस गूढार्थ चंद्रिका बालकांड (मराठी). (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  50. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (२०००). मानस गूढार्थ चंद्रिका बालकांड (मराठी). (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  51. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (२००१). मानस गूढार्थ चंद्रिका बालकांड (मराठी). (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  52. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (२४ जुलै २००२). मानस गूढार्थ चंद्रिका बालकांड (मराठी). (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  53. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (मार्च १९६२). श्रीमानस गूढार्थ चंद्रिका (हिंदी) खंड २ रा.
  54. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (२४ जुलै २००२). मानस गूढार्थ चंद्रिका अयोध्याकांड. (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  55. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (ऑगस्ट २००३). मानस गूढार्थ चंद्रिका अयोध्याकांड. (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  56. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (जानेवारी २००४). मानस गूढार्थ चंद्रिका अयोध्याकांड. (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  57. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (सप्टेंबर २००४). मानस गूढार्थ चंद्रिका अयोध्याकांड. . श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  58. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९९७). मानस गूढार्थ चंद्रिका अरण्यकांड(मराठी) (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  59. ^ स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती (१९९५). मानस गूढार्थ चंद्रिका अरण्यकांड(हिंदी) (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  60. ^ स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती (१९९२). मानस गूढार्थ चंद्रिका किष्किंधाकांड (संपूर्ण) (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  61. ^ स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती (१९९५). मानस गूढार्थ चंद्रिका सुंदरकांड (मराठी) (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  62. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (२००३). मानस गूढार्थ चंद्रिका लंकाकांड (मराठी). (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  63. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१ जानेवारी २००४). मानस गूढार्थ चंद्रिका लंकाकांड (मराठी). (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  64. ^ स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती (२ जुलै २००४). श्रीरामचरितमानस गूढार्थ चंद्रिका उत्तरकांड. (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  65. ^ स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती (२ सप्टेंबर २००४). श्रीरामचरितमानस गूढार्थ चंद्रिका उत्तरकांड. (पहिली ed.). श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली.
  66. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. .स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ४७.
  67. ^ स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती (१९५४). मानस गूढार्थ चंद्रिका ‌- नमुना अंक.
  68. ^ प्रज्ञानानंद, सरस्वती स्वामी महाराज. श्री रामचरित मानस गूढार्थ चंद्रिका प्रस्तावना खंड. मानस गूढार्थ चंद्रिका प्रकाशन मंडळ,इस्लामपूर.
  69. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. .स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ४९.
  70. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ५०.
  71. ^ पोटभरे, अ.सि. (१९९०). जीवनगंगा. श्रीवासुदेव प्रकाशन ,पुणे.
  72. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ५२.
  73. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ५१, ५२.
  74. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ५३.
  75. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ५३, ५४.
  76. ^ a b डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ५४.
  77. ^ डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती (तिसरी ed.). श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली. pp. ५४.