अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी साहित्य संमेलन हे खानदेशात होणारे साहित्य संमेलन आहे. प्रा. चव्हाण आणि डॉ. शकुंतला चव्हाण यांनी प्रथमच अहिराणी साहित्य संमेलनाची संकल्पना खानदेशात रुजवली व वाढविली. त्यांच्या योजनेनुसार या पूर्वीची पहिली तीन संमेलने अनुक्रमे कासारे, मांडळ आणि चाळीसगाव येथे झाली होती. तर, चौथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नाशिकला तीन आणि चार डिसेंबर २०११ या दिवशी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ . शकुंतला चव्हाण होत्या. संमेलनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माणिकराव गावित, सुरूपसिंह नाईक, एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावित अशी राजकारणी मंडळी आली होती. या संमेलनाचे आयोजन खानदेश मराठा मंडळ, नाशिक परिसर यांनी केले होते.

या चौथ्या संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथयात्रा व सांस्कृतिक दिंडी झाल्यावर संमेलनाचे उद्‌घाटन अ‍ॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष , उद्‌घाटक , प्रमुख पाहुणे व संमेलनाध्यक्ष यांच्या भाषणानंतर दुपारी 'अहिराणी बोली व साहित्य मीमांसा' या विषयावर परिसंवाद झाला. सायंकाळी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री ‘खानदेशी ठेचा‘ हा विविधकलागुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन संमेलनाचा पहिला दिवस संपला.

संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ. यू.म.पठाण यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी डॉ.मु.ब. शहा हे प्रमुख पाहुणे होते.

अहिराणी साहित्य संमेलने संपादन

  • पहिले साहित्य संमेलन मांडळ (तालुका अंमळनेर-जिल्हा धुळे) येथे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : राजा महाजन.
  • दुसरे साहित्य संमेलन : धुळे जिल्ह्यातील कासारे(साक्री तालुका) येथे२७-२८ फेब्रुवारी १९९९ ला झाले. संमेलनाध्यक्ष : प्राचार्य सदाशिवराव माळी.
  • तिसरे साहित्य संमेलन : चाळीसगांव येथे २४-२५ मार्च २००० यां दिवशी झाले. संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. रमेश सूर्यवंशी.
  • चौथे अहिराणी साहित्य संमेलन नाशिकला तीन आणि चार डिसेंबर २०११ या दिवशी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ . शकुंतला चव्हाण.
  • ५वे अहिराणी साहित्य संमेलन धुळे येथे २२-२३ डिसेंबर २०१२ या दिवसांत झाले.संमेलनाच्या अध्यक्षपदी अहिराणी लेखक, कथाकथनकार सुभाष अहिरे..
  • आणखी एक अहिराणी साहित्य संमेलन धुळे शहरात ९-१० एप्रिल २०१६ या दिवसांत झाले. हेही संमेलन ५वे होते, असे समजते. या संमेलनाचे उद्‍घाटन श्रीपाल सबनीस यांनी केले. याही संमेलनाचे संमेलानाध्यक्ष अहिराणी लेखक, कथाकथनकार सुभाष अहिरे होते.

  • याच नावाची आणखीही काही साहित्य संमेलने आहेत. उदाहरणार्थ० चिंचवड येथील खान्देश वैभव सांस्कृतिक संस्थेच्या वतीने भोसरी येथील अंकुश लांडगे सभागृहात भरलेले पहिले खान्देशी साहित्य संमेलन. दोन दिवस चाललेले हे साहित्य संमेलन रविवार दि. ५, व सोमवार ६ फेब्रुवारी २०१२ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्रमुख डॉ. बापुराव देसाई हे होते.
  • खानदेश अहिराणी कला व सांस्कृतिक संस्था आणि सानेगुरुजी अहिराणी लोककला साहित्य विकास मंच यांच्या तर्फे निगडी (पुणे) येथे ४थे अहिराणी साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २०१४ला झाले. संमेलनाध्यक्ष अहिराणी कवी रामदास वाघ होते.
  • खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलन : हे संमेलन अहिराणी साहित्य आणि सांस्कृतिक कलाक्रीडा मंचातर्फे पिंपरी (पुणे) येथे २१ मे २०१५ रोजी भरले होते. डॉ. फुला बागूल संमेलनाध्यक्ष होते..

पहा :