अभ्यासयोजना (अभ्यासक्रम): शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजतात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते. अभ्यासक्रम साधन होय, साध्य नव्हे म्हणून तो उद्दिष्टांच्या अंकित असतो. उदा., ‘प्रत्येक व्यक्तीच्या अंगी स्वतःचे विचार प्रकट करण्याचे व दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचे सामर्थ्य असावे’ हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट असते, म्हणून मातृभाषेच्या अभ्यासाला अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान देतात. ‘मुलांना आत्मनियंत्रण करता यावे’ हे लोकशाही शासनाचे शैक्षणिक उद्दिष्ट असते. म्हणून  अभ्यासक्रमात ‘मुलांचे स्वराज्य चालविणे’ हा अनुभव समाविष्ट करतात. हुकूमशाही शासनाची शिक्षण योजना असे अनुभव समावेश्य समजत नाही.

शिक्षणाच्या अवस्थेनुसार उद्दिष्टे बदलतात, म्हणून अभ्यासक्रमही बदलतो. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकाला ज्ञानार्जनाची मूलभूत साधने प्राप्त करून देणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात लेखन, वाचन, गणन या कौशल्यांना प्राधान्य असते. माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकांच्या नैसर्गिक क्षमतेचे अन्वेषण करून तदनुसार शैक्षणिक अनुभव पुरविणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात अनेक विषय वैकल्पिक असतात. उच्च शिक्षणाचे ध्येय पारंगतता असल्यामुळे तेथील अभ्यासक्रमात एका विषयाच्या सखोल अभ्यासक्रमाची अपेक्षा असते. प्रत्येक अवस्थेत वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांखेरीज काही सामान्य उद्दिष्टे असतात. उदा.,‘आदर्श नागरिक घडविणे’ हे उद्दिष्ट सर्व अवस्थांना सामान्य आहे. अशी सामान्य उद्दिष्टे साधणाऱ्या अनुभवांचाही अंतर्भाव अभ्यासक्रमात होतो.

तथापि अवस्थानुसार अभ्यास योजना करताना पुढील दोन तत्त्वे पाळावी लागतात :

(१) प्रत्येक अवस्थेच्या शेवटी जे विद्यार्थी जीवनात प्रवेश करतात, अशांसाठी अभ्यास योजना स्वयंपूर्ण असावी.

(२) ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढील अवस्थेत चालू राहणार असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यास योजना दोन्ही अवस्थांचा सांधा साधणारी, पहिल्या अवस्थेची उद्दिष्टे साधणारी व पुढील अवस्थेच्या शिक्षणाची पूर्वतयारी करणारी असावी.

महाराष्ट्रात प्राथमिक शाळेचा विद्यार्थी भाषा, अंकगणित, जमाखर्च, भूमिती, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व हिंदी हे विषय शिकतो. शिवाय त्याला सूतकाम, शिंपीकाम, सुतारकाम, कृषिविद्या, भरतकाम यांपैकी एक व्यवसाय हस्तगत करावा लागतो. ज्ञानार्जनाची साधने हस्तगत करणे व नागरिकासाठी आवश्यक ते ज्ञान संपादन करणे, हा दुहेरी उद्देश या अभ्यासक्रमाच्या रचनेत आढळतो. माध्यमिक  शालान्त परीक्षेसाठी चार विषय आवश्यक असतात व तीन अथवा चार वैकल्पिक असतात. आवश्यक विषय पुढील होत : १. मातृभाषा, २. हिंदी, ३-४. समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, प्राथमिक गणित, बीजगणित, भूमिती व जमाखर्च यांपैकी दोन. वैकल्पिक तीन वा चार विषय साठ विषयांतून निवडावयाचे असतात. या साठांत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इ. विषय मोडतात. सारांश, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमात सामान्य उद्दिष्टांसाठी आवश्यक विषय व विद्यार्थ्यांची क्षमता व आवड यांना अनुसरून ऐच्छिक विषय असे दोन भाग वर उल्लेखिलेल्या तत्त्वांनुसार आढळतात. महाविद्यालयीन अभ्यास योजनेतही एकूण विषयांची संख्या ठराविक असून तिच्यामध्ये काही आवश्यक व काही ऐच्छिक असतात.

विकास संपादन

या कल्पनेची आधुनिक व्याप्ती, तिच्यामधील अंतर्भूत विषय व मांडणी या गोष्टी त्रिकालाबाधित वा स्थिर नाहीत. त्या शेकडो वर्षे विकसित होत आल्या आहेत, बदलत आहेत. आपल्याकडे वैदिक व प्राचीन काळी आश्रम, विहार, मठ, तसेच तक्षशिला, नालंदा, काशी, उज्जयिनी यांसारख्या विद्याकेंद्रांतून वेद, वेदांगे, उपनिषदे, रूढ धार्मिक आचार, बौद्धधर्मानुसार व्रते, तत्त्वज्ञान इ. तत्कालानुसार उपयुक्त धार्मिक शिक्षण देत. शिवाय व्यावहारिक शिक्षण म्हणून धनुर्विद्या, अन्य क्षत्रिय वा युद्धविद्या, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नानाविध कला, निरनिराळे व्यवसाय काही आश्रमांत व विद्याकेद्रांत शिकवीत. व्यवसायांचे शिक्षण घराघरांतून अनुकरणाने मिळे. राजगृहासारख्या ठिकाणी राजधर्मानुकूल विषय व नानाविध कला यांचे शिक्षण देत. सामान्यतः व्यक्तिमात्राला वर्णानुकूल विद्या शिकवीत अशी अभ्यास योजना असे.

पुढे मध्ययुगात मदिरशाळा, पाठशाळा व घर यांतून ब्राह्मंणांना धार्मिक व्यवस्यायानुकूल विशिष्ट विद्या व अन्य वर्णांना राजवाड्यांत, घराघरांत विशिष्ट व्यावसायिक विद्या शिकवीत. मुसलमान राजवटीतही मुसलमान धर्म-समाजानुकूल भाषा व विद्या मकतब-मद्रसासारख्या संस्थांतून शिकवीत. एकोणिसाव्या शतकापासून पाश्चात्त्यांचा संपर्क व इंग्रजांचे वर्चस्व यांमुळे जुन्या संस्था व विषय नाहीचे होत गेले आणि नव्या संस्थांतून इंग्रजी भाषा, वाङ्‌मय, गणित, भारताचा इतिहास, इंग्‍लंडचा इतिहास अशा विषयांची योजना झाली. पहिल्या व विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान व तांत्रिक व्यवसाय-धंदे यांच्या शिक्षणाकडे ओघ वळू लागला. याच काळात शिक्षणाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाची व महत्त्वाची जाणीव होऊन राष्ट्रीय दृष्टीने अभ्यास योजना होऊ लागली [®राष्ट्रीय शिक्षण]. स्वातंत्र्योत्तर काळात तर हे दोन्ही प्रवाह एकत्र आले व नवप्रवाह जास्त खोल व प्रभावी झाला. माध्यमिक शिक्षण, विश्वविद्यालयीन शिक्षण. अशांचे परीक्षण उच्च आयोग नेमून झाले.

पाश्चात्त्य न अन्य देशांतही असेच विकसन दिसते. स्पार्टा या प्राचीन ग्रीक नगर राज्यात शारीरिक व तत्कालीन पद्धतीचे सैनिकी शिक्षणच दिले जाई. त्याचीच राज्याला व समाजाला गरज होती. सुधारलेल्या व समृद्ध अशा अथेन्सच्या नगरराज्यांत, स्वातंत्र्याचे हक्क उपभोगणाऱ्या नागरिकांसाठी राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान, वक्‍तृत्वकला, वाङ्‌मय, नानाविध ललितकला शिकवीत. असे नागरिक मात्र १० टक्केच असत. त्यानंतर रोमन साम्राज्यात व पुढे ख्रिस्ती मठमंदिरांत वेगळ्या अभ्यास योजना झाल्या. रोमन साम्राज्यात न्यायशास्त्राला महत्त्व आले, तर   मठमंदिरांत बायबल-धर्मतंत्र, धार्मिक रूढी यांच्या अभ्यासाने कला, व्यावहारिक शास्त्रे, वाङ्‌मय यांना बाजूला सारले. विद्येचे पुनरुज्‍जीवन व धर्मसुधारणा यांमुळे अभ्यास योजनांत पुन्हा बदल झाले.

अठराव्या शतकाच्या शेवटी रूसोने विचारक्रांती घडविली. अभ्यास योजनेत मोठे बदल होऊ लागले. निसर्ग, विज्ञान, समाजजीवन यांचा अभ्यास व अनुभवजन्य ज्ञान यांना स्थान मिळू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकात नवनवे व्यवसाय, धंदे, वाफ-तेल, वीज-अणू यांच्या शक्तीवर चालणारी विविध यंत्रे आली व नवनव्या अनेक विषयांची योजना होऊन लागली. याच काळात मानसशास्त्राचा विकास झाला. प्रातिनिधिक लोकशाहीसारखी नवी राजकीय रचना विकास पावली. प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली. या सर्वांमधून अभ्यास योजनेला आणखी निराळे वळण मिळाले. पूर्वी अभ्यास योजनेत विशिष्ट विषय नियोजित करीत. या काळात विषय व त्यांची आखणी तर बदलू लागलीच, शिवाय विषयाबरोबरच व काही वेळी विषयाऐवजी प्रयोग, अनुभव, स्वयंकृती, योजनासंधी, विषयांचा समवाय-अशा गोष्टींना अभ्यास योजनेत स्थान मिळू लागले. नव्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीने जरूर असे विषय, अनुभव यांचाही समावेश झाला. शिक्षणाच्या अवस्थांचे रचनेत बदल झाले व याचाही अभ्यास योजनांवर परिणाम झाला. एकंदरीत अभ्यास योजना विकसनशील आहे, हेच खरे.

अभ्यास योजनेच्या उत्क्रांतीच्या या इतिहासात अभ्यासविषय निवडण्याची दोन सूत्रे अंतर्भूत आहेत : एक उपयुक्तता व दुसरे संस्कारक्षमता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत संस्थांतर्गत शिक्षण फक्त उच्चवर्गीय मुलांना मिळे. म्हणून त्या शिक्षणाचा भर बौद्धिक संस्कारांवर होता व ते शिक्षण व्यवसायविन्मुख होते. अशा शिक्षणाला उदार संस्कारी शिक्षण ही संज्ञा देतात. शिक्षणाचा प्रसार होऊन सर्व थरांच्या मुलांना शिक्षण मिळू लागल्यावर उदार संस्कारी शिक्षणाच्या उणिवा दृष्टोत्पत्तीस आल्या व अभ्यासक्रमात उपयुक्त विद्येचा समावेश होऊ लागला. आधुनिक कल अभ्यासक्रमात संस्कारक्षम व उपयुक्त विद्याकलांचा योग्य प्रमाणात समावेश करणे हा होय.