वसंत सोमण हा उमदा कलाकार मराठी रंगभूमीवरचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. ते मुंबईत रिझव्ह बँकेत काम करीत.

आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत वसंत सोमण यांनी प्रायोगिक नाटक, बालनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच, पण संस्मरणीय भूमिका केल्या. काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. २ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे अकाली व आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या रत्‍नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, दिलीप प्रभावळकर प्रदीप भिडे, प्रभाकर सावंत, कमलाकर नाडकर्णी, विनोद भट, अरविंद औंधे, युधिष्ठिर वैद्य, वगैरे मित्रमंडळींनी एकत्र येऊन वसंत सोमण मित्रमंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे वसंत सोमण सारखीच जी माणसे झगमगाटापासून दूर राहून महत्त्वाचे काम करतात अशा प्रयोगशील समाजाभिमुख रंगकर्मींना 'वसंत सोमण पुरस्कार' देऊन गौरवण्याची प्रथा सुरू केली. हा पुरस्कार दरवर्षी २ ऑगस्ट किंवा त्याच्या आसपासच्या सोईस्कर दिवशी दिला जाई. २०१६ साल हे या पुरस्कारांचे शेवटचे वर्ष होते.

इ.स.१९९७पासून सुरुवात झालेल्या या पुरस्कारांनी २०१५ सालापर्यंत गौरवलेल्या कलावंतांची नावे :

  • १९९७ : विजय केंकरे : हे व्यावसायिक आणि प्रायोगिक दिग्दर्शक आहेत.
  • १९९८ : राजीव विजय शिर्के : अभिनयाचे अंग असतानाही त्याने कायम पडद्यामागची संयोजकाची भूमिका स्वीकारली.
  • १९९९ : संभाजी भगत : लोकशाहीर संभाजी भगत 'कोर्ट' किंवा 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' अशा कलाकृतींमुळे चर्चेत असले तरी, त्याआधीही ते लोकांच्या समस्या पोवाड्यांतून मांडत होते आणि आजही त्यांनी आपली ती भूमिका सोडलेली नाही.
  • २००० : कांचन सोनटक्के : तीसहून अधिक वर्षं शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या मुलांसाठी नाट्के बसवून एकप्रकारे त्या माध्यमातून त्या मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास साधत आहेत.
  • २००१ : निखिल रत्‍नपारखी : निखिल उत्तम अभिनेता आहे, पण पैशासाठी कुठल्याही भूमिका स्वीकारून त्यांनीे आपला छाप होऊ दिलेला नाही. उलट बुद्धिमान नट म्हणून त्यांची ओळख आहे.
  • २००२ : संदेश कुलकर्णी : अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना महाविद्यालयीन स्पर्धामधून भाग घेऊन नवनवीन संहिता शोधून प्रयोग केले.
  • २००३ : चेतन दातार : हे लेखक-दिग्दर्शक असले, तरी हाडाचे कार्यकर्ते होते, म्हणूनच ते ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेची धुरा सांभाळून होते.
  • २००४ : विद्या पटवर्धन : चित्रकलेच्या शिक्षिका असूनही नाटकाच्या ओढीने दूरदर्शन आणि भारतीय विद्या भवन या ठिकाणी होणऱ्या स्पर्धेसाठी त्यांनी शाळेतर्फे मुलांची नाटके बसवायला सुरुवात केली, आणि चित्रकला मागे पडली.
  • २००५ : उदय पंडित
  • २००६ : विजयकुमार नाईक : गोव्यातील ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक आणि संकलक विजयकुमार नाईक यांनी सुमारे ३५० नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.
  • २००७ : राजकुमार तांगडे : जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ गावी शेती करणाऱ्या राजकुमार तांगडे याने नाटकाचे कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता, स्वयंप्रेरणेने गावातील समस्यांवर नाटक लिहायला आणि बसवायला सुरुवात केली.
  • २००८ : रसिका जोशी : रसिका जोशीला जेव्हा पुरस्कार दिला, तेव्हा त्या पुरस्काराच्या निमित्ताने तिनेच 'व्हाइट लिली आणि नाइट रायडर' लिहि्ले आणि त्याचा प्रवेश प्रथम त्या रंगमंचावर सादर केला.
  • २००९ : अरुण होर्णेकर : रंगभूमीवर सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहणारे हरहुन्नरी रंगकर्मी अरुण होर्णेकर हे लेखक, दिग्दर्शक कलावंत आहेत. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये थिएटर ऑफ ॲब्सर्डच्या अचाट प्रयोगांपासून ते अलीकडच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ पर्यंत ते सतत काहीना काही करून बघत असतात. ते नाट्यक्षेत्रात किमान ३५ वर्षे आहेत.
  • २०१० : चंदाताई तिवाडी : महिला भारुडकार म्हणून लोकरंगभूमी गाजवत आहेत.
  • २०११ : अप्पासाहेब धाडी
  • सदानंद बोरकर विदर्भात झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहेत.
  • नकुल घाणेकर : तरुण नट असलेला नकुल घाणेकर नाटक-मालिकांमध्ये व्यग्र असतानाही नृत्यक्षेत्रातही कार्यरत आहे.
  • २०१६ : झोपडपट्ट्यांमध्ये मुलांसाठी नाटके बसवणाऱ्या आणि त्यातून त्या मुलांचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या चार जणांना देण्यात आला.