महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे नगर सात बेटांनी बनलेले आहे.

मुंबईची सात बेटे

पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती. या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले, ज्यापरत्वे आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे होती -
  1. माहीम (Mahim)
  2. वरळी (Worli)
  3. परळ (Parel)
  4. माझगाव (Mazgaon)
  5. मुंबई (Bombay)
  6. कुलाबा (Calaba)
  7. छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)

मुंबई बेटाची निर्मिती संपादन

या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत. त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉइंटपासून वरळीपर्यंत पसरला आहे. या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे. दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे. या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे. या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत. या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

साष्टी बेट संपादन

मुंबई बेटाच्या उत्तरेकडील साष्टी बेटाचा मध्यवर्ती भाग टेकड्यांनी (उदा.,कान्हेरीचे डोंगर, घाटकोपर टेकड्या) व्यापला आहे. या टेकड्यांमधून अनेक लहानलहान नद्या (मिठी, पोईसर, दहिसर इ.) उगम पावून समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे साष्टी बेटावर अरीय नदीप्रणाली निर्माण झाली आहे. पश्चिमेला मिठी नदी व माहीमची खाडी, पूर्वेला एका लहानशा नदीमुळे तसेच ठिकठिकाणच्या दलदलीच्या भागांमुळे मुंबई बेट साष्टी बेटापासून वेगळे झाले आहे. शिवाय पश्चिमेची वसईची खाडी व पूर्वेची ठाण्याची खाडी ही साष्टी बेटाला मुंबईच्या मुख्य भूभागापासून अलग करते. मोसमी साकव (कॉजवे), सडका, लोहमार्ग, खाडीवरील पूल इत्यादींनी मुंबई व साष्टी ही दोन बेटे आता एकमेकांशी जोडली गेली आहेत. मुंबईचा मोठा भाग समुद्रात भर घालून तयार केला गेला आहे व आजही बॅक बे, माहीम इत्यादी ठिकाणी हे भरावकार्य दिसते.

मुंबईतील आणखी बेटे संपादन

अर्नाळा, ऑयस्टर आयलंड, क्रॉस आयलंड, घारापुरी, तुर्भे (ट्रॉम्बे), गल बेट, धारावी, पाणजू बेट, प्रॉंग्ज आयलंड, बुचर आयलंड (जवाहर द्वीप), मढ, मार्वे, मिडिल ग्राऊंड, मुर्ढे, वांद्रे, राई, वेसावे, वगैरे.