मराठी वाङ्मय परिषद, बडोदे या संस्थेची स्थापना ८ फेब्रुवारी १९३१ रोजी कै. चिं.वि. जोशी व कै. डॉ. वि.पां. दांडेकर यांनी केली.

संस्थेतर्फे भरविण्यात येणारी तीन दिवसांची अधिवेशने

इ.स. १९३१ मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून आजतागायत संस्थेची एकूण चौसष्ट अधिवेशने झाली आहेत. शेवटचे ६४वे अधिवेशन ५ ते ७ फेब्रुवारी २०११ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. नरेन्द्र जाधव होते. आत्तापर्यंत या अधिवेशनांचे अध्यक्षपद न. चिं. केळकर, वि. दा. सावरकर, आचार्य अत्रे, पु. ग. सहस्रबुद्धे, सेतुमाधवराव पगडी, कवी अनिल, विजया राजाध्यक्ष, कवि कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. दिलीप चित्रे, विश्वास पाटील, विजय कुवळेकर, डॉ. अरुणा ढेरे, कुमार केतकर, सुरेश खरे, प्रतिभा रानडे, अशा नामवंत साहित्यिकांनी विभूषित केले आहे.

अन्य उपक्रम
  • ‘सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला’ :- बडोद्याच्या अन्योन्य कोऑपरेटिव्ह बँकेने ‘मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी संस्थेला दिलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी एक किंवा दोन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेअंतर्गत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षास अथवा अन्य व्यासंगी साहित्यिकास-विचारवंतास निमंत्रित करून त्याच्या ज्ञानाचा व व्यासंगाचा, महाराष्ट्रापासून दूरवर राहून आपली भाषा व संस्कृती यांचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या आणि वाङ्‌मयाचा आस्वाद घेण्यास व साहित्यातील नवनव्या प्रवाहांचे ज्ञान करून घेण्यास उत्सुक असलेल्या रसिकांना लाभ घेता यावा, हा यामागील उद्देश आहे.

या व्याख्यानमालेचा श्रीगणेशा सन १९९४-१९९५ मध्ये कवि नारायण सुर्वे यांच्या व्याख्यानाने व काव्यसादरीकरणाने झाला.
यापूर्वी झालेल्या या व्याख्यानमालेत प्रा. नारायण सुर्वे, डॉ. गो. पु. देशपांडे, बालशंकर देशपांडे, डॉ. य. दि. फडके, नारायण देसाई, प्रा. राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, डॉ. विलास खोले, डॉ. दिगंबर पाध्ये, अरुण साधू, . समीर पळणीटकर, ह. मो. मराठे यांसारख्या विचारवंतांच्या, संशोधकांच्या, संपादकांच्या, साहित्यिकांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा लाभ बडोदेकर रसिकांना मिळाला आहे. या मालेतले शेवटचे व्याख्यान २५डिसेंबर २०११ला झाले.

  • कै. शांताराम सबनीस सत्कार समितीकडून परिषदेला देणगी म्हणून देण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी बडोद्यातील अथवा बडोद्याबाहेरील साहित्य, शिक्षण, विज्ञान आणि (ह्युमॅनिटीज) या क्षेत्रांतील तज्ज्ञ, व्यासंगी व्यक्तींची व्याख्याने कै. शांताराम सबनीस स्मृती व्याख्यानमाला या नावाने आयोजित केली जातात.

आत्तापर्यंतची या मालेतील व्याख्याने :-
१. 'गुरुकुल ते संगणक प्रगती की अधोगती?'(डॉ. अनिल काणे) -३१ ऑगस्ट २००८
२. 'मी न लिहिलेल्या कादंबऱ्या' (ह.मो. मराठे) - १३ सप्टेंबर, २००९
३. ’मराठी भाषेची परंपरा व त्याचा पुनर्विचार’ (सतीश काळसेकर) - २४ डिसेंबर २०११

  • मराठी अकादमीकडून परिषदेला देणगी म्हणून दिलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी ’मराठी अकादमी अमृत महोत्सवी व्याख्यानमाला’, चर्चासत्रे, परिसंवाद वगैरे आयोजित केले जातात.

या मालेतील आत्तापर्यंतचे कार्यक्रम :
१. ‘माधुरी दीक्षित ते मधु दंडवते’ (वक्ती - शोभा बोन्द्रे) - ३० ऑक्टोबर २०१०

  • विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर व्याख्यानमाला
  • साहित्यस्पर्धा वगैरे