दलित एकांकिका: उद्गम, विकास व वाटचाल' डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून हजारो वर्षापासून वंचित असणाऱ्या दलितांना उच्च शिक्षणाची कवाडे उघडली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बदली तरुण शिक्षणासाठी मिलिंद महाविद्यालयात दाखल झाले. शिक्षण व चळवळ एकत्र पोहोचू लागली. आंबेडकरी चळवळीला अकॅडमिक स्वरूप प्राप्त. या तरुणांचे हुंकार नव्या जाणिवेतून व्यक्त होऊ लागले.[ संदर्भ हवा ]

इ.स.१९५५ मिलिंद महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला डॉक्टर आंबेडकर पाहुणेेे म्हणून आले होतेे. स्नेहसंमेलन मध्ये विद्यार्थी प्राध्यापकांनी सादर केलेली नाटके त्यांनी पाहिली. सर्वसाधारण स्वरूपाच्या नाटकापेक्षा दलित जीवनावर नाटके लिहा असेे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आणि एक प्रकारे दलित रंगभूमीचीर्तमेढ रोवली गेली.

मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी योग यात्रा लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजप्रबोधनपर हाकेला प्रतिसाद दिला.  इ.स.१९५६मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकरांच्या समोर लाखो प्रेक्षकांसमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षातच एकांकिका स्वरूपाची काही नाटके दलित लेखकांनी लिहली.अशाप्रकारे दलित रंगभूमीचा प्रवाह विविध वळणे घेत एका विशिष्ट टप्प्यावर स्थिर होऊन अता संथपणे वाहत आहे.या प्रवाहाचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. दलित लेखकांना आपल्या समाजाची दुःखे,समस्या जगाच्या वेशीवर मांडण्यासाठी एकांकिकेसारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही.दलित रंगभूमीला एकांकिका हा साहित्य प्रकार जवळचा आहे.कारण मोठे अभिनेते,देखावे, नेपथ्य, प्रकाशयोजना, अशाप्रकारच्या तांत्रिक गोष्टींना खर्च नको,थोडी हालचाल करायला जागा ,समोर प्रेक्षकांना बसायला जागा,किंवा उभे राहायला जागा,अभिनयाच्या जोरावर,रस्त्यावर,चावडीवर,समाजमंदिरात दलित एकांकिका रंगू शकते. प्रायोगिक दृष्ट्या नाटकापेक्षा कमी खर्चिक व सुटसुटीत असा साहित्यप्रकार म्हणून दलित एकांकिकाकडे पाहिले जाते. दलित साहित्य संमेलनातून, स्पर्धांमधून दोन अंकी नाटकापेक्षा एकांकिका अधिक सादर झाल्या. दलित नाटककारांची नाटके प्रस्तापित रंगकर्मींनी नाट्य संस्थांनी रंगभूमीवर आणली. दलित रंगकर्मी संस्थांना नाटक मिळाले नाही, त्यामुळे दलित रंगभूमीच्या अस्तित्वाला उतरती कळा लागली.अशा उतरत्या काळात दलित रंगभूमी जिवंत ठेवण्याचे कार्य एकांकिका लेखक ,कलाकारांनी केले आहे. दलित एकांकिकेने दलितांचे प्रश्न सतत मांडले. त्यातून दलित चळवळीला पोषक वातावरण निर्माण झाले.[ संदर्भ हवा ]

दलित एकांकिकेचा उगम फार मागे नेता येणार नाही.   तिची पाळेमुळे मराठी रंगभूमी तेही शोधता येणार नाहीत. दलित एकांकिका पर्यायाने दलित रंगभूमी ही स्वतंत्र आणि स्वयंभू अशी रंगभूमी आहे. दलित रंगभूमी व मराठी रंगभूमी विषय व सादरीकरणात फरक आहे. दलित रंगभूमीचा आणि मराठी रंगभूमीचा फार काही संबंध लावता येणार नाही. ओढून ताणून तो लावता येईल पण तो तसा लावणे संयुक्तिक होणार नाही कारण भाषा एक असली तरी दोन्ही रंगभूमीची अनुभवाची पातळी वेगळी आहे. दलित चळवळीमध्ये दलित एकांकिकेची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे.अनेक दलित लेखकांनी त्यांच्या लेखनाची सुरूवत एकांकिका लेखणापासून केली.

दलित रंगभूमीचा उगम लोक कलांमधून झाला. ललित, गोंधळ, दशावतारी खेळ इत्यादी लोकरंजनाचे प्रकार महाराष्ट्रात प्रचलित होते. या सर्व प्रकारातील थोड्या-थोड्या गोष्टी घेऊन तमाशा जन्माला आला आणि दलित रंगभूमीचा जन्म झाला. "तमाशा, सत्यशोधक जलसे,आंबेडकरी जलसे,पथनाट्य व दलितनाट्य असा विकासक्रम दलित नाट्यसृष्टीचा सांगता येईल."१.(दलित नाटक आणि रंगभूमी-डॉ.ईश्वर नंदपुरे - पृष्ठ क्रमांक २५)

त्या विकासक्रमाचा आढावा पुढीलप्रमाणे. ‘तमाशा’ हा दलित कलांचा अविभाज्य घटक आहे कारण तमाशातील कलावंत हे दलित समाजातील असतात. ‘महारी लावणी’पासून प्रगत झालेल्या ‘ढोलकीचा तमाशा’ हा दीर्घकाळापासून महाराष्ट्राला परिचित आहे. गीत, संगीत, वाद्य यांना प्राधान्य असलेला तमाशा प्रकार उत्तर पेशवाईत महाराष्ट्र रुळला. दलित रंगभूमीचा विचार करताना ‘तमाशा’ या लोककलेचा विचार अपरिहार्य आहे. तमाशामध्ये गणपती व शारदास्तवन, गौळण लावण्या, एखादी पौराणिक कथानक अंगे असतात. लोकरंजन हा तमाशाचा मुख्य हेतू होता व पारंपरिकता हा तमाशाचा ढाचा होता. पारंपरिक तमाशात शृंगाराचा, अश्लिल भाषेचा अतिरेक असायचा. त्यामध्ये ‘पांचटपणा’ याला काही मर्यादा होत्या. त्यामुळे तो काहीसा बदनाम झाला होता.त्या काळातील मध्यमवर्ग, स्वतःला श्रेष्ठ समजणारा वर्ग या तमाशापासून काहीसा दूर राहिला, त्यामुळे या तमाशा मध्ये काम करणाऱ्या दलित कलावंतांना मान मिळाला नाही. तसेच मांगा महाराची कला म्हणून उच्चवर्णीयांकडून ती तुच्छ लेखले जात होती. तमाशा हे एकमेव मनोरंजनाचे साधन एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजात प्रचलित होते. दलित कलावंतांनी समाज प्रबोधनासाठी या आयत्या मनोरंजन साधनाचा उपयोग करून घेतला. अनेक दलित शाहिरांनी तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्या प्रारंभीच्या शाहिरांचा थोडक्यात परिचय करून घेऊ. उमा बापू सावळजकर : या मातंग समाजातून उदयास आलेल्या दलित शाहिराने असंख्य लावण्या व पोवाडे लिहिलेले. त्याकाळी त्यांनी ‘मोहन–बटाव’ हा वग लिहिला. आजही तो उपलब्ध आहे. या वगात त्यांनी बालविवाहाची समस्या मांडले आहे. हा वग मराठीतील पहिला असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

गोपाळ बाबा वलंगकर यांनीही अस्पृश्यांच्या दिन अवस्थेचे नेमकेपणाने दर्शन आपल्या कावणानमधून घडविले आहे.

शाहीर शिवा–संभा कवलपूरकर यांचा तमाशाला त्याकाळी प्रतिष्ठा होती.‘मानी मराठा’ या वगाला स्वतः शाहू महाराजांनी शाबासकी दिली होती. त्यांनी ‘दामाजीपंत ’,‘चंद्रहंस’ , ‘विक्रम–शशिकला’,‘व्यंकट मास्तर’, ‘आला रात्री मुरलीवाला’ इत्यादी वग लिहिले. शाहीर अर्जुन वाघोलीकर यांनी इ.स. १८९०ते १९२०या काळात ‘निळावती वग’ ‘हुजऱ्याचा वग’ ‘सावकाराचा वग’ इत्यादी वग लिहून समाज प्रबोधनाचे काम केले. शाहीर हरिभाऊ वडगावकर हे ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्य मुळे लोकप्रिय झाले. ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यतून धर्म व राजकारणातील सावळ्या गोंधळावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. शाहीर भाऊ– बापू मांग नारायणगावकर यांनी जातीयतेच्या वेदना ‘चंद्रमोहन’ या वगनाट्य यातून मांडले आहे. इ.स.१९६१मध्ये लिहिलेल्या वगाला राष्ट्रपतीपदक आहे. तमाशाला राष्ट्रपती पदक मिळवून देणारे ते पहिले शाहीर आहेत.[ संदर्भ हवा ] शाहीर भाऊ फक्कड यांच्यावर डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याचा जबरदस्त परिणाम झाला. त्यांनी आपली लेखणी अस्पृश्य उद्धारासाठी वाहिली इ.स.१९२०ते१९३०या काळात त्यांनी तमाशाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचविले. अशाप्रकारे दलित शाहिरांनी तमाशा व वगनाट्यच्या माध्यमातून,लोककलांच्या माध्यमातून दलित समाजाला जागृत करण्याचे काम केले. सत्यशोधक जलसे: इ.स.१८५५ साली महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न ’नाटक लिहिले. हे नाटक आधुनिक दलित नाट्य परंपरेशी आपले नाते जोडते. म्हणून त्याला पहिल्या दलित नाटकाचा मान दिला जातो. त्यातील बोलीभाषेतील संवाद, वास्तव विषय, शिक्षणाचे महत्त्व, नांदी, भैरवीची हकालपट्टी, कंसात दिलेल्या सूचना या सर्व गोष्टी पाहिल्या की महात्मा फुले हे आधुनिक नाट्य परंपरेचे जनक ठरतात. दलित नाट्य चळवळीचेही ते जनक ठरतात. २४ सप्टेंबर १८७३जी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली सत्यशोधक समाजाने संमेलने भरवली. आपले विचार समाजापर्यंत पोचविसाठी लोकप्रिय अशा तमाशा माध्यमाचा स्वीकार केला. यालाच प्रथम त्यांनी ‘सत्यशोधक तमाशे’ असे नाव दिले. ‘सत्यशोधक तमाशाचे’ पुढे ‘सत्यशोधक जलसे’ असे नामकरण झाले. जलसा या कला प्रकारातून सत्यशोधक समाजाने मनोरंजनातून लोकजागृती केली. सत्यशोधक समाजातील तमाशाची सुरुवात रामचंद्र बाबा घाडगे यांनी केली. इसवी सन १९१५ला त्यांनी सत्यशोधक समाजाच्या जलशाची स्थापना केली.१९४५ पर्यंत २९ फड तयार केले. शिक्षणाचे महत्त्व,अंधश्रद्धा व देवपूजा करण्यासाठी कोणत्याही दलालाची आवश्यकता नाही, हे महात्मा फुले यांचे विचार त्यांनी या सत्यशोधक जलशातून मांडले. किसन भाऊ बनसोडे(१८५९-१९४६) यांनीही जलशाच्या, माध्यमातून सत्यशोधक विचारधारा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. ‘एका साधूची फजीती’, ‘भट आणि भटनीचा संवाद' ‘पारतंत्र्य विमोचन’ ‘अंत्यज सुधारणेचा मार्ग’ ‘सनातन धर्माचा पंचरंगी तमाशा’ इत्यादी जलसे त्यांचे अत्यंत लोकप्रिय होते. दलित जनतेत लोक जागृती करण्यासाठी लेखन करणारे किसन फागू बनसोडे हे खरे दलित रंगभूमीचे पहिले शिल्पकार मानता येतील. त्यांनी तमाशा ही परंपरागत नाट्य माध्यम वापरले. किसन फागू बनसोडे यांना आपल्या बांधवांना आत्मभान आणून द्यायची होते. त्याचबरोबर आपल्याला गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या सवर्णांच्या मनातही परिवर्तन घडवून आणायचे होते. आपण कुणासाठी आणि का लिहितो? याचे भान त्यांच्याजचौवळ होते. लढाऊपणा हा त्यांच्या लेखनाचा धर्म होता. ‘संत चोखामेळा’ या नाटकात त्यांनी अगतिकतेचा कोंडीत सापडलेल्या चोख्याची वेदना मांडली आहे त्याचबरोबर अस्पृश्यतेचा प्रश्नही मानला आहे. सारांशाने असे म्हणता येईल की महात्मा फुले यांच्या   ‘ ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या लेखनापासून दलित रंगभूमीची पायाभरणी झाली पुढे त्यातूनच छत्रपती शाहू महाराज कालीन सत्यशोधक जलसे आले. या काळातील सत्यशोधकी जलसे प्रामुख्याने गणेशोत्सवातील ब्राह्मणी मेळ्याना (संगीतमेळे) उत्तर म्हणून लिहिले गेले, त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मण विरोध ठासून भरला आहे. या काळातील सत्यशोधक जलसे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच जातीयतेचा, अस्पृश्यतेचा, अंधश्रद्धेच्या प्रश्नाचे ही चित्रं करीत होते. सत्यशोधक जलशात गणपती ऐवजी निराकार ईश्वराचे, पंचम जॉर्ज यांचे स्तवन सुरू केले. संगीत मेळाल्याप्रमाणे यामध्ये भटीन असे, पण ती आणि सत्याजीराव सत्यशोधकी जलशात बसणारे संवाद बोलत असत. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुले नेहमीच जलसाकारांचे प्रेरणास्थान राहिले आहेत. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करणं, गरीब शेतकरी, कामगार, मजूर यांचे प्रश्न मांडणं, स्रीशिक्षण, अस्पृश्यता, बालविवाह यासंदर्भात लोकांचे डोळे उघडणं यासाठी महात्मा फुले यांनी आपलं आयुष्य वाहिलं होतं. त्यासाठीच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपले विचार मांडण्यासाठी लिखाण केलं. नाटक, वैचारिक पुस्तकं, अखंड या माध्यमातून आपले परखड विचार मांडत ते अखेपर्यंत जनजागृतीसाठी झटले. त्यांनी लिहिलेले अखंड, पोवाडे, पदं जलसाकारांनी आपल्या कार्यक्रमांतून वापरले. पुढे पुढे महात्मा फुले यांच्या विचारांचा धागा पकडून नवीन जलसे लिहायला सुरुवात झाली. लोकजागृतीमध्ये सत्यशोधक जलशांचा अशा रीतीने मोठा वाटा होता.


आंबेडकरी जलसे: आंबेडकरी जलसे दलित रंगभूमीची दुसरी पायरी आहे. ‘आंबेडकरी जलसे’हा आधुनिक मराठी रंगभूमीचा नाटयचळवळीचा पाया आहे. ‘जलसा म्हणजे अस्पृश्यांच्या मा.णुसकीच्या हक्कांचा सांधत इतिहास’ असे भीमराव करडक यांनी म्हटले आहे’

  पारंपरिक तमाशाची प्रेरणा अध्यात्माची होती. त्यात रंजनाचा पदर मिसळलेला होता. आंबेडकरी जलसा का जलसाकरांनी यामध्ये्ये्ये बदल करूनबदल गणपती ऐवजी भीमाला नमन केले. मावशी हे पात्र प्रतिगामी विचारांच्या विरोधात दलितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दाखविले आहे. यातील सोंगाड्या विनोदबरोबरच आंबेडकरांच्या विचारांचा करताना दिसतो. भटाचे पात्र आंबेडकरी जलसा कारणांनी महात्मा्मा फुले यांच्या तृतीय रत्न नाटकातून घेतले व ते तसेच ठेवले अशाप्रकारे आंबेडकरी जलसा तयार झाला.
   आंबेेडकरी  जलशाची सुरुवात भीमराव करडकांपासूूूून झाली असेे म्हटले जाते. पण त्याअगोदर भाऊ फक्कड यांनी आपल्या तमाशात गण, गवळण ,बतावणी ,वग ,या या घटकांना आंबेडकरी विचारांचे अधिष्ठान दिले होते.भाऊ फक्कडांचा कालखंड १९२० ते१९३०.भिमराव कराडक व आंबेडकरी जलसे नाशिक येत काळाराम मंदिर सत्याग्रह प्रवेशानंतर उदयास आले.सत्यशोधक जलासाकारानी निर्गुण—निराकार परमेश्वराला नमन केले,तर आंबेडकरी जळसाकारानी तेही नाकारून त्याना दस्यतून मुक्त करणाऱ्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांना नमन केले. महात्मा फुल्यांचा विचारानुसार तमाशातील कृष्ण, पेंद्या, मावशी हे घटक आंबेडकरी जलासाकरांना रुचत नव्हती म्हणून ते त्यांनी काढून टाकले व एकदम बतावणीला प्रारंभ केला.[ संदर्भ हवा ]
बतावणीतील सत्याजीराव व महादू पाटील जत्रेनिमित्ताने  गावी जातात. तिथे त्यांना अन्याय दिसतो, तो अन्याय निवारण्यासाठी ते प्रयत्न करतात. 
 सत्यशोधक जलसाकारांनी गौळणीला फाटा दिला पण आंबेडकरी जलसा कारांनी गौळण हा प्रकार न वगळता त्याला वेगळे रूप दिले. गौळणी तील मावशी जलसाकारांचे सुधारणावादी विचार बोलू लागली.भीमराव करडकाची मावशी तर अस्पृश्यता पाळणाऱ्या भटांच्या विरोधात उभी राहते.‛सत्यशोधकी जलसा‘व ‛आंबेडकरी जलसा‘यांचा समाजमनावर प्रचंड परिणाम झाला. त्याविषयी डॉक्टर आंबेडकर, भीमराव करडकाना यांना म्हणाले,“माझ्या दहा सभा,मीटिंगा आणि भीमराव कारडकांचा यांचा एक जलसा बरोबर आहे.” सत्यशोधक जलसाकारांनी व आंबेडकरी जलसाकारानी फुले-आंबेडकरांचा विचार बहुजन समाजात रुजविण्यासाठी घरादाराची ही पर्वा केली नाही.आजचे दलित साहित्य त्याच्या खांद्यांवर उभे आहे. पण महाराष्ट्रातील विचारवंतानी त्यांची दखल घेतली नाही.आज कितीतरी जलसाकारांची साधी नोंदही आढळत नाही. तरीही आंबेडकरी  जलशांना भीमराव करडक,केरुजी घेगडे, शाहीर वामनदादा कर्डक, करूबुवा गायकवाड, अर्जुन हरी भालेराव, सुखा आहेर, प्रभाकर गवई, गोपाळबाबा वलंगकर, दीनबंधू गुरुजी, शेगावकर, अण्णाभाऊ साठे इत्यादी जलसाकारणांनी महत्त्वाचे योगदान दिले.
समारोप:

१८५५ साली महात्मा फुले यांनी तृतीयरत्न नाटक लिहले.त्यानंतर अनेक नाटके लिहिली गेली पण महात्मा फुले यांच्या तृतीयरत्न नाटकाची उंची त्यांना गाठता आली नाही. त्यामुळे पाहिल्या दलित नाटकाचा मान महात्मा फुले यांच्याकडे जातो .त्यामुळे डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात, ज्योतिबा फुले दलित रंगभूमीचे सूर्योदय आहेत. त्यांच्या ‛तृतीय रत्न‘ या नाटकाने दलित रंगभूमीचा पहिला घोष केला. त्यावरून दलित रंगभूमीचे भरतमुनी आणि विष्णूदास महात्मा फुलेच ठरतात.१८५५ ते १९५५ पर्यंत अनेक नाटके लिहिली गेली, पण आंबेडकरांच्या विचारात बसेल आणि महात्मा फुले यांच्या ‛तृतीय रत्न ‘नाटकाच्या जवळपास फिरकेल असे नाटक निर्माण झाले नाही. महात्मा फुले यांच्या ‛तृतीय रत्न’ या नाटकानंतर शंभर वर्षांनंतरही दलित नायक मराठी नाटकात कुठेच दिसत नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म.भा. चिटणीसांना म्हटले, “अरे मनोहर ही कसली नाटक सादर करता त्यापेक्षा आपल्या जीवनात संबंधी नाटके विद्यार्थ्यांना लिहायला सांगा.”बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार म.भा.चिटणीसांनी'युगयात्रा’ हे नाटक लिहले. २० नोव्हेंबर १९५५ रोजी ‛बोधीमंडळाने’ मिलिंद महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात ते सादर केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माई आंबेडकर यांनी या नाटकाचा संपूर्ण प्रयोग पहिला.१९५६ साली पुन्हा या नाटकाचा प्रयोग दीक्षाभूमीवर झाला.सहा लाख लोकांनी एकाचवेळी पाहिलेले ‛युगयात्रा’ हे जगातील पाहिले नाटक ठरले.या नाटकात रामायणापासून ते डॉ. आंबेडकरांच्या कालखंडापर्यंत दलितांवर होणाऱ्या अन्यायाचे चित्रण आले आहे. युगयात्रेनंतर म्हणजे १९५५ नंतर दर्जेदार ‛दलित जाणिवांच्या’ नाटकांचा उदय व्हायला १९७६ साल उजाडावे लागले. सुगंधाबाई शेंडे यांचे ‛कडू कारली गोड झाली’ या नाटुकल्याचा प्रयोग १९६८ साली जचताळा येथे झाला. त्यानंतर म.ना. वानखेडे यांनी १९६९ साली औरंगाबाद येथे दलित एकांकिका स्पर्धा भरवली.या स्पर्धेत अविनाश डोळस यांची ‛आहुती’ ही एकांकिक सादर झाली. आणि येथूनपुढे दलित एकांकिकेची भरभराहट व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्र मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक, संगमनेर, बार्शी, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी अनेक दलित नाट्यसंस्था उदयास आल्या. या नाट्यसंस्थातून प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत, भि.शी. शिंदे, अविनाश डोळस, खुशाल कांबळे, कमलाकर डहाट, अमर रामटेके, रामनाथ चव्हाण, डॉक्टर सुरेश मेश्राम, टेक्सास गायकवाड, एम.जी. वाघ, दादाकांत धनविजय, रतनलाल सोनग्रा, प्रकाश त्रिभुवन, रुस्तम अचलखांब, नामदेव व्हटकर, हेमंत खोब्रागडे, वि.रु. गोडबोले, प्रेमानंद गौरेकर, प्रभाकर जीवने, भास्करराव जाधव, प्रभाकर दुपारे, सि.टी. देवकर, गंगाधर पानतावणे, भुजंग मेश्राम, प्रमोद लांडगे, योगीराज वाघमारे, अच्युतराव सुरवडकर, भगवान हिरे अशा अनेक दलित लेखकांनी एकांकिका लेखन केले.या सर्वांनी आपापल्यापरीने दलित एकांकिकेच्या वाढ आणि विकासासाठी हातभार लावला. लेखक ,दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना, प्रेक्षक हे सर्वजण एकदा दलित होते. त्यामुळे महारी बोलीतून अत्यंत जिवंतपणे त्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.१८५५ ते १९५५ या काळात दलित एकांकिका फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. कारण दलित लेखकांना नाट्य तंत्राचे जुजबी ज्ञान, त्याचबरोबर तमाशा, जलसा, लोककला यांच्या आधारे मनोरंजनाची गरज भागत होती. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र नाटके,एकांकिका लिहिल्या नसाव्यात. दलितांचे प्रश्न, समस्या नाटक किंवा एकांकिकांच्या माध्यमातून मांडल्यास त्या प्रभावी ठरतात ही जाणीव त्यांच्यामध्ये नसावी. त्यातच दलितांचा शिक्षणाचा, पोटाचा प्रश्न नीटसा सुटलेला नव्हता त्यामुळे त्यांनी समाजप्रबोधनाकडे फारसे लक्ष दिले नसावे पण डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे त्यांना आत्मभान आले.आपले प्रश्न, समस्या आपणच मांडले पाहिजे ही जाणीव झाली. त्यांनी आपल्या अनुभवांना नाट्यरूप दिले. आहे त्या परिस्थिती उपाशी-तापाशी ही दलित नाट्य मंडळी दलितांच्या प्रबोधनासाठी गावोगाव भटकून लागली. दलित नाट्यसंमेलने भरवली. दलित नाट्यसंस्था सुरू केल्या. स्वतः नाटके लिहून, बसवून, स्वतः त्यामध्ये अभिनय केला. अशाप्रकारे दलित रंगभूमीची उभारणी झाली. २. दलित एकांकिकेतील विचार : दलित एकांकिकेत कोणत्या विचारांना महत्त्व दलित लेखकांनी दिले याचा परामर्श घेण्याआधी दलित एकांकिका कोणत्या हेतूने निर्माण झाल्या ते पाहणे महत्त्वाचे आहे आहे. ‛कलेसाठी कला’ हा दृष्टीकोन स्वीकारून दलित एकांकिका निर्माण झाल्या नाहीत तर सामाजिक बांधिलकीतून दलित एकांकिकेची निर्मिती झाली आहे हे महत्त्वाचे. दलितांच्या हीन-दीन परिस्थितीचे, दारिद्र्याचे, समस्यांचे चित्रण करून दलित एकांकिका थांबल्या नाहीत तर,ती परिस्थिती कोणी निर्माण केली याचीही कारणमिमांसा दलित एकांकिका करते.नुसती कारणमिमांसा करून दलित एकांकिका लेखक थांबत नाहीत तर त्यावर उपायही सुचवितो. नुसती एखादी एकांकिका (साहित्यकृती) लिहून दलित लेखक थांबत नाही तर स्वतःच्या कृतिशीलतेची जोड देतो. दलित लेखक एकांकिकेतून एखादा विचार मांडत नाही तर तो विचार स्वतःच्या आचरणात आणतो.दलित एकांकिका लिहिल्यानंतर तो तिला प्रयोगरूप देण्याचा प्रयत्न करतो.त्याच्याकडे आवश्यक ती साधन सामग्री नाही, पैसे नाहीत, मोठे नट, कलाकार नाहीत ; रंगमंच नाही ,नेपथ्य, प्रकाश योजना नाही, संगीत नाही पण म्हणून तो थांबतं नाही. आहे त्या साधनसामग्रीत, आहे त्या कलाकारांच्या सहकार्याने तो ती एकांकिका सादरीकरणासाठी प्रयत्न करतो.म्हणून दलित एकांकिका लेखक नुसता लेखक नसतो तर तो कलावंत असतो, चळवळीचा सच्चा कार्यकर्ता असतो. हे विसरून चालणार नाही हे सर्व समजल्यानंतर आपण दलित एकांकिकेतील विचारांचा योग्य परामर्श घेऊ शकतो. सामाजिक बांधिलकी: ‛सामाजिक बांधिलकी’ हेच दलित एकांकिका लेखकांचे प्रथम उद्दिष्ट आहे. त्यांना दलित एकांकिकेतून मनोरंजनापेक्षा समाज प्रबोधन करायचे आहे.त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत.सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, धार्मिक समस्या, शैक्षणिक समस्या, सांस्कृतिक समस्या, राजकीय समस्या, मानसिक समस्या, स्त्रीयांच्या समस्या, नैतिक समस्या इत्यादी. या सर्व समस्यांना त्यांना एकाच वेळी तोंड द्यायचे आहे. सगळीकडून कोंडीत पकडल्याची अवस्था झाली आहे.लढण्याशिवाय पर्याय नाही. या समस्यांशी लढण्याची शिकवण दलित एकांकिका देते. दलित माणसाचे जीवन कसे सुखमय होईल याचा दलित एकांकिका विचार करते . त्यादृष्टीने वाटचाल करते. एकांकिकेतून नुसते मनोरंजन करावे ही भूमिका त्यांना मान्य नाही . मनोरंजनाबरोबरच दलित माणसाने आत्मपरीक्षण केले पाहिजे असे त्यांना वाटते. नुसते दलित माणसांनी आत्मपरीक्षण करून या समस्या सुटणार नाहीत तर सवर्णांनी, प्रस्थापितांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे,. दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे; तो त्यांना दिला पाहिजे; यासाठी स्वतः प्रस्थापीत व्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजेत ; ही मनोभूमिका तयार करण्यासाठी दलित एकांकिकाकार एकांकिका लिहिताना दिसतात.

     आपण ज्या समाजात जन्मलो, ज्या समाजात वाढलो, त्या समाजाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी माझ्या लेखणीचा उपयोग झाला पाहिजे; अशी ठाम भूमिका या लेखकांची आहे. दलित लेखक हा नुसता लेखक नसतो तर तो दलित कार्यकर्ता असतो ,दलित चळवळीचा अविभाज्य घटक असतो. म्हणून तो समाज प्रबोधन हे आपल्याच साहित्याचे प्रथम कर्तव्य मानतो. ही त्याची ‛सामाजिक बांधिलकीची’ भूमिका त्याला आणि दलित समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. 

पुरोगामीत्व: दलित एकांकिकाकार आपल्या एकांकिकातून सतत पुरोगामीत्व मांडतात,प्रगतीकडे नेणारा विचार मांडतात.त्यांच्या विचारांची पायाभरणी म फुल्यांच्या सत्यशोधक विचारातून, डॉ. आंबेडकर यांच्या प्रखर विचारांतून झाली आहे. त्यामुळे त्यांचे विचार करण्याची पद्धत इतर लेखन पेक्षा वेगळी आहे त्यामुळे ते हिंदू संस्कृती, त्यांच्या देवळे, त्यांच्या सण-उत्सव, रीतीरिवाज यांचे परंपरा यांना ते नकार देतात. पारंपारिक व्यवस्थेला नुसता नकार देऊन चालणार नाही हे त्यांना माहीत आहे म्हणून पारंपारिक व्यवस्थेस नकार देतानाच ते पुरोगामी विचारांचा स्वीकार करतात. तो विचार आपल्या एकांकिकेतून म्हणतात मांडतात; म्हणून ते ब्राह्मणशाहीच्या ढोंगी व्यवस्थेवर हल्ला चढवतात. आत्मा, स्वर्ग, नरक, अध्यात्म, पुनर्जन्म, ईश्वर,श्रद्धा- अंधश्रद्धा या सर्व गोष्टी ते नाकारतात आणि वास्तववादी विचार, पुरोगामी विचार एकांकिकेतून पेरत जातात. परिवर्तन: परिवर्तनाचे चक्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फिरवले. ते अर्धेच फिरले पूर्ण फिरले नाही.ते पूर्ण फिरविण्याची जबाबदारी आपली आहे असे म्हणून दलित एकांकिकाकार लिहितात.एकना एक दिवस हे परिवर्तनाचे चक्र पूर्ण फिरल्याशिवाय राहणार नाही; कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे हे त्यांना चांगले माहीत आहे.ज्या अस्पृश्याना वरून पाणी वाढले जाई; ज्यांचा स्पर्श अपवित्र मानला जाई तेच अस्पृश्य आज शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. ज्या अस्पृश्यांना शिक्षणास बंदी होती तेच अस्पृश्य आता सर्वात जास्त पुस्तके खरेदी करतात, वाचतात; ज्या अस्पृश्यांना मताचा अधिकार नव्हता, ज्या अस्पृश्यांना सवर्णाच्या शेंबड्या पोरांना सुद्धा वाकून तीनदा जोहार घालावे लागेल त्यातच पुरुषांसमोर सवर्ण राजकारणी आता मतासाठी हात जोडतात, हे परिवर्तन आहे.पण हे परिवर्तन परिपूर्ण नाही, अपूर्ण आहे.राजकारण ही सर्व कुलपाची किल्ली आहे.तिने विकासाचे सर्व मार्ग उघडे होतात म्हणून राजकीय सत्तेशिवाय खरे परिवर्तन होणार नाही.ते परिवर्तन घराघरात पोहोचविण्यासाठी दलित साहित्यिक ,एकांकिकाकार प्रयत्न करीत आहेत.

प्रबोधन: पुरोगामीत्व, परिवर्तन, याप्रमाणे प्रबोधन हे दलित साहित्याचे आणि प्रामुख्याने दलित एकांकिकेचे आद्य कर्तव्य आहे.असे मानून दलित लेखक लिहतात. अशी एकही दलित एकांकिका नाही की ती केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. किंवा नुसती समस्या मांडण्यासाठी लिहिली आहे.एखादी समस्या, एखादा प्रश्न मांडता- मंडताचदलित समाजाचे प्रबोधन करणे हा दलित एकांकिकेचा मुख्य उद्देश, आहे, व वैशिष्ट्यही आहे. शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा; शंभर दिवस बकरी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस शेर होउन जगाएस भांडू नका; पैशासाठी स्वत्व विकू नका, असे कितीतरी प्रकारचे प्रबोधनात्मक विचार दलित एकांकिका मांडते. आत्मभान: दलित समाजासमोर अनेक समस्या आहेत आणि त्या काही त्यांच्या स्वभावातून निर्माण झालेल्या आहेत तर काही बाह्य परिस्थिती, बाह्य घटकांनी निर्माण केलेल्या आहेत.दलित माणूस हा समस्येच्या गर्तेत रुतत चालला आहे. त्याला नेमके आपण काय केले पाहिजे हे बऱ्याच वेळा समजत नाही. अशा परिस्थितीत तो न्यूनगंडाने ग्रासला जातो.या ठिकाणीचे जातीय राजकारण ,या ठिकाणीचे आर्थिक धोरण, या ठिकाणीचे सांस्कृतिक वातावरण या सर्वांमुळे त्याच्यावर सतत अन्याय होतो.तो अन्याय दूर करण्याचा तो प्रयत्न करतो.पण प्रस्थापित व्यवस्था प्रचंड मजबूत आहे.त्याला न्याय मिळत नाही, तो काही करूच शकत नाही. त्यामुळे त्याची कोंडी होते. आपण काहीच करू शकत नाही या विचाराने तो आत्मभान हरवून बसतो,न्यूनगंडाने अधिकच ग्रासला जातो.या न्युनगंडातून त्यास बाहेर काढण्यासाठी दलित एकांकिकाकार प्रयत्न करतात. त्यांच्यामधल्या न्यूनगंड काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी दलित एकांकिकाकार तशा प्रकारचे विषय आपल्या एकांकिकांमधून हाताळतात. प्रयत्न केल्यावर नक्की यश मिळते हे दाखविण्याचा ते प्रयत्न करतात. दलित एकांकिकांमधून दलित समाजामध्ये पुन्हा आत्मसन्मान आत्मभान निर्माण होतो एवढे मात्र निश्चित. हिंदू समाजातील देव-देवता, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, खुळचट विचार यामुळेही दलितांचा आत्मविश्वास गमावतो; पण दलित एकांकिका सांगते की माणूस जन्मतः स्वतंत्र आहे. मानव जात सगळीकडे सारखीच;कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो; आपण आपल्या शिक्षणाच्या ,न्यानाच्या जोरावर सर्वकाही मिळवू शकतो.प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो.डॉ.आंबेडकरांच्या काळात काय जातीयता नव्हती काय? त्यांना या व्यवस्थेने त्रास दिला नाही का?पण जिद्द, चिकाटी, प्रयत्न, सर्व अपमान गिळून त्यांनी आपले ध्येय साध्य केले.तसे आपणही केले पाहिजे.अशाप्रकारची उदाहरणे दलित एकांकिकेतून मिळाल्यावर दलित माणसाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.त्या दिशेने तो वाटचाल करतो.

विज्ञाननिष्ठा:
विज्ञाननिष्ठा म्हणजे कोणत्याही गोष्टी मागील,चमत्कारामागील,घटना-प्रसंग यामागील खरे कारण शोधणे होय.हिंदू धर्मात अशा अनेक घटना, प्रसंग, कथा आहेत की त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्वास ठेवणे अशक्य आहे.या ठिकाणचा माणूस मूलभूत विचार कधीच करत नाही किंवा मूलभूत विचार करण्याची शिकवण आपल्याला आपल्या अभ्यासक्रमातून,समाज्यातून मिळत नाही.