ठाणे मतदाता जागरण अभियान

ठाणे मतदाता जागरण अभियान महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील लोकशिक्षण अभियान आहे.

अभ्यासू व प्रामाणिक नागरिक आणि नागरी समस्यांशी निगडीत विषयांवरील तज्ञ ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यावेत या हेतूने वेगवेगळ्या संस्था, संघटना व समतावादी राजकीय पक्ष यांच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे अभियान चालविले आहे. ३१ डिसेंबर २०१६ रोजी या अभियानाला सुरुवात झाली, नाक्या-नाक्यावर प्रचार करीत लोकांनीच आपल्यामधून चांगल्या लोकांना उमेदवार म्हणून निवडावे, त्यांच्या निवडणुकीसाठी होणारा खर्च लोक-वर्गणीतून करावा या प्रचाराला प्रतिसाद देत फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पाडलेल्या म.न.पा. निवडणुकीत १३ लोक-उमेदवार ठाण्याच्या मतदारांपुढे पर्याय म्हणून उभे राहिले.

शिवसेना, भाजपा, मनसे, कोंग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांचे सहयोगी पक्ष यांनी स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करू नये यासाठी या १३ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यातील सर्व उमेदवार १३५ ते ५२३ मते मिळवून हरले. पण त्यानंतर सातत्याने मतदाता जागरण अभियानाचे कार्यकर्ते ठाणे शहरात जागल्याची भूमिका पार पाडत आहेत.

सारे प्रस्थापित पक्ष हे गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत असे अण्णा हजारे यांनी म्हटले ते ठाणे शहर आणि ठाणे महापालिकेच्या बाबतीत 200 टक्के खरे आहे. ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, नियोजन-शून्य विकास योजना, प्रशासनाची दादागिरी, नगरसेवकांची अकार्यक्षम मक्तेदारी आणि केवळ काळ्या पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर चाललेली घराणेशाही हे ठाणे शहराचे वास्तव चित्र आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या सभागृहात मारामाऱ्या झाल्याने किती वेळा पोलीस आलेत, उप-महापौरांच्या कानाखाली वाजविणे, नगरसेविकेचे अपहरण करणे असे प्रकार, त्याशिवाय सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चार नगरसेवक जेलमध्ये जाऊन आलेत, अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात नोव्हे. २०१५ मध्ये तीन नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे

ठेकेदारांना दिलेल्या कंत्राटातून ४३ टक्के कमिशन गोळा होते, हे आनंद दिघे यांचे वक्तव्य आजही खरे आहे. मुंबईतील काळ्या यादीतील अनेक कंत्राटदारांना ठाण्यातील मोठी कामे मिळतात. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणाच्या चौकशीमध्ये १९९८ साली नंदलाल समितीच्या अहवालात सर्व पक्षाचे मिळून छपन्न नगरसेवक आणि सहा अधिकारी वेगवेगळ्या प्रकरणात दोषी आढळूनसुद्धा कारवाई काही झाली नाही, त्याच्यानंतर २० वर्षात किती प्रकरणे आणि किती भ्रष्टाचार वाढला याची नोंद नाही. नगर-विकास खाते हे भ्रष्टाचाराचे मोठे आगर आहे. बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत गेल्यामुळे आज ९० टक्के इमारती बेकायदेशीर आहेत. परिवहनचा टायर-घोटाळा, जलवाहिन्या घोटाळा, शैक्षणिक साहित्य खरेदी घोटाळा, महिला-बचत गट घोटाळा, दफनभूमी घोटाळा, समाज-मंदिर घोटाळा, रस्ता-रुंदीकरण घोटाळा अशा अनेक प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी चौकशी करावी लागेल.

असे नगरसेवक, असे बेजबाबदार प्रशासन आणि नागरिकांच्या घामाच्या पैशातून जमणाऱ्या करातून यांचे भरणारे खिसे, हे थांबविण्यासाठी आणि आपले शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी आपल्याला स्मार्ट व्हावं लागेल. एकदा मतदान करून भागणार नाही, पाच वर्षे डोळ्यात तेल घालून चुकीच्या गोष्टींना विरोध करावा लागेल. विरोध करण्यासाठी आपल्यातले चांगल्या, अभ्यासू आणि प्रामाणिक लोकांना पुढे यावे लागेल, लोकांच्या मदतीने निवडणूक लढवावी लागेल आणि नगरसेवक बनून न्याय, अधिकार आणि खरा विकास यासाठी नागरिकांची बाजू मांडवी लागेल. यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियान संवाद, संघर्ष आणि संघटन या त्रिसूत्रीवर काम करीत आहे.

एकदा नाही सतत पाच वर्षे हे काम करण्यासाठी, आपले प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांच्या पक्षात सामील व्हा. आपण निवडणूक लढविणार असाल तर ठाणे मतदाता जागरण अभियान आपला प्रचार करेल. निवडणूक लढविणार नसाल तर प्रचाराला आणि मतदाता-जागरणाला मदत करा. संस्थापक अध्यक्ष - अनिल शाळीग्राम व संस्थापक सचिव - उन्मेष बागवे

पालिकेतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी, चांगला विकास घडवून आणण्यासाठी, नागरी समस्या सोडविण्यासाठी आता जागृत नागरिकांचा सक्षम पर्याय – ठाणे मतदाता जागरण अभियान – सामील व्हा.