जंगलीमहाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत नसून अगदी अलीकडच्या काळातील संत होते. जंगली महाराज या नावावरून ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रूढ झाले आहे की, ते आपलेच संत आहेत, असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटते आणि यातच त्यांचे खरे संतत्त्व दडले आहे.

जंगलीमहाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे. जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहीत नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास बारा वर्षे संशोधन करून बरीच माहिती गोळा केली. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध भागांत गेले, जंगलीमहाराजांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली. डी.डी. रेगे यांनी गोळा केलेली माहिती अशी :-

बालपण संपादन

जंगली शहा यांचे जन्मगाव सोलापूर जवळील होनमुर्गी हे लहानसे खेडे. होनमुर्गी गावाचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथे जसे बसवेश्वराचे मंदिर आहे त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगली शहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू, संस्कृत आणि फार्सी या भाषा आणि मल्लविद्या यांचा त्यांनी अभ्यास केला होता .शिवाय, त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण अतिशय व्यापक झाला. ते शेतात जाऊन कष्टाची कामे करीत व द्रव्यार्जन करीत. श्रमप्रतिष्ठेवर त्यांचा भर होता. आपल्या वयाच्या तरुणांना ते धार्मिक शिक्षण देत.

साधना संपादन

वेदान्त, योगशास्त्र, मंत्रशास्त्र, राजयोग, हठयोग यांबरोबर हिमालय आणि आळंदी येथे नाथसंप्रदायी योग्यांबरोबर जंगली महाराजांनी साधनाही केल्या होत्या, असे म्हणतात. देशाटन करताना त्यांनी लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे उपदेश करणे, दीनदुबळ्यांच्या दुःखाचे निवारण करणे, तेथील सत्पुरुषांच्या समाध्या, तेथील देवस्थाने, मंदिरे यांचा जीर्णोद्धार करणे वगैरे कामे सुरू केली. जंगली महाराज नरसोबाच्या वाडीला असताना गतभर्तृका रखमाबाईं गाडगीळांनी त्यांचा अनुग्रह घेतला. त्यांना अष्टांगयोगात प्रवीण करून महाराजांनी रखमाबाईंना आपला उत्तराधिकारी नेमले.

पठ्ठे बापूराव यांना सदुपदेश संपादन

कऱ्हाडजवळच्या रेठरे हरणाक्ष येथील श्रीधरपंत कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव यांना जंगली महाराजांनी १८६५मध्ये अनुग्रह दिला. महाराजांच्या सहवासात आल्यावर पठ्ठे बापूराव यांचे काव्य शृंगाराकडून भक्तिमार्गाकडे वळले.

समाजकार्य संपादन

जंगली महाराज यांनी इ.स. १८६८ साली पुण्याला येण्यापूर्वी क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराजांच्या घरापासून ते त्यांच्या वैकुंठगमनाच्या स्थळापर्यंतचा रस्ता बांधवून घेतला आणि कडेला झाडेही लावली. तेथे भक्तांसाठी एक धर्मशाळा व पुंडलिकाचे मंदिर बांधले. आजही दर वर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी जंगली महाराज भजनी मंडळ पुण्याहून भक्त पुंडलिकाची पालखी घेऊन देहूला त्या मंदिराकडे जाते. इनामदार वतनदार शिरोळे पाटील घराणे हे भांबुर्डे गाव (आजचे शिवाजीनगर) पुण्याचे पाटील हे जंगली महाराज यांचे पहिले व प्रमुख शिष्य मानले जातात, सदगुरू जंगली महाराज आणि ग्रामदैवत रोकडोबा महाराज यांचा मान शिरोळे पाटील घराण्याचा आहे.

जंगली महाराजांना पुण्यात तुळसीबाई इंगळीकर नावाच्या बाई शिष्या म्हणून लाभल्या. शिरोळे पाटलांनी पुण्यात शिवाजीनगर गावठाण येथे रोकडोबा मंदिरासमोर श्रीरामाचे देऊळ बांधले. महाराजांचे पुण्यातल्या भांबुर्डे गावठाण्यातील रोकडोबा मारुती मंदिरात वास्तव्य असे. रोकडोबाचे त्या काळचे स्वरूप भैरवाचे असल्याने त्या मंदिरात पशू बळी देणे, विंचू-दंश झाल्यास देवासमोर वाद्यांचा गजर करून साकडे घालणे, नवसपूर्तीसाठी माणसाला बगाडाला अडकवणे वगैरे अघोरी प्रकार चालत. याबरोबर रेड्यांच्या झुंजी आणि तमाशेही चालत. जंगली महाराजांनी अनिष्ट गोष्टींना पायबंद घालताना केलेला पहिला बदल म्हणजे रोकडोबाचे भैरव हे स्वरूप बदलून त्याला मारुतीचे रूप दिले.बगाड या अघोरी प्रकाराऐवजी महाराजांनी गळ्यात वीणा घेऊन देवापुढे अखंड हरिनामाचा पहारा सुरू केला. रेड्यांच्या झुंजींऐवजी जंगली महाराजांनी मल्ल्यांच्या कुस्त्या सुरू केल्या. मंदिरात आजही 'पहारा' होतो आणि जवळपासच्या तालमींमध्ये बलोपासना चालते.

जंगली महाराजांनी १८८१ साली स्थापन केलेले सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ आजही कार्यरत आहे.

कुस्तीसाठी कार्य संपादन

महाराष्ट्रातील शाहूंच्या कारकिर्दीत बहरली गेलेली कुस्ती पश्चिम महाराष्ट्रात वाढवली पाहिजे आणि बलोपासना व अध्यात्म यांचा समन्वय साधून राष्ट्रोन्नत्ती केली पाहिजे ही जिद्द धरून जंगलीमहाराजांनी जिथे जिथे आश्रम आहेत तिथे तिथे कुस्ती सक्तीची केली. ध्यान धारणा आणि समाधी या अवस्थेत जाताना समाजाला बलोपासनेचा संदेश मिळावा यासाठी त्यानी त्यांच्या सर्व शिष्याना मल्लविद्या आत्मसात करायला शिकवले.

निर्वाण संपादन

इ.स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावत चालली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानेच जणू भांबुरड्याच्‍या टेकडीवर आपल्या समाधीची/कबरीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली. महाराजांच्या पश्चात रखमाबाईंनी त्यांचा संप्रदाय आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालवला. फेब्रुवारी १९०२मध्ये माघ वद्य षष्ठीला रखमाबाई ऊर्फ आईसाहेब निर्वतल्या. पुण्यात जंगली महाराजांच्या समाधीजवळच त्यांची आणि तुळसाआक्कांची समाधी आहे.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन