चंद्रकांत बच्चू पाटील

महाराष्ट्रातील राजकीय नेते


[१]चंद्रकांतदादा पाटील ( १० जून १९५९) हे जुलै २०१६ पासून ते ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री होते. ते जुलै २०१९ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील होते.

चंद्रकांतदादा पाटील
The Union Minister for Road Transport & Highways and Shipping, Shri Nitin Gadkari chairing the review meeting of Mumbai-Goa Coastal Road and JNPT Port Connectivity Road, in Mumbai.jpg

प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष)
विद्यमान
पदग्रहण
जुलै २०१९ ते सप्टेंबर २०२२
मागील माजी मंत्री, महसूल, सार्वजनिक बांधकाम (सा.उ. वगळून) महाराष्ट्र शासन

विधानसभा सदस्य
कोथरुड साठी

जन्म १० जून १९५९
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास कोल्हापूर
गुरुकुल राजा शिवाजी महाविद्यालय, किंग जॉर्ज, दादर
संकेतस्थळ https://chandrakantdadapatil.in/

वैयक्तिक जीवन संपादन

चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून १९८५ साली त्यांनी पदवी प्राप्त केली.

सामाजिक जीवन संपादन

बी.कॉमचे शिक्षण घेत असतानाच, चंद्रकांत दादा पाटील यांचा संपर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तत्त्वचिंतक यशवंतराव केळकर यांच्याशी आला. अन् त्यांच्या आवाहनावरून १९७८ साली चंद्रकांतदादा हे विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात राहण्यासाठी आले. आणीबाणीचा कालखंड संपलेला होता. राज्यभर राष्ट्रवादी चळवळ अधिक आवेशात सक्रिय होत होत्या. याच आवेशात चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. या कालखंडात मा. यशवंतराव केळकर आणि मा. बाळासाहेब आपटे विद्यार्थी चळवळीला दिशा देत होते. त्यांच्या सुचनेनुसार १९८० सालच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या प्रचार अभ्यास वर्गात चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून घोषणा झाली, आणि जळगाव जिल्ह्याला पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला.

१९८० सालच्या ऑगस्ट महिन्यात चंद्रकांतदादा पाटील जळगाव येथे दाखल झाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत मैत्री करणे, काळजी घेणे आणि मित्रांची जोपासना करणे हे चंद्रकांतदादा पाटील यांचे बलस्थान. त्यामुळेच सगळी माणसे चंद्रकांतदादा पाटील यांना म्हणतात. चंद्रकांतदादा पाटील यांचा कार्यकर्त्यांसोबत संपर्क थेट चुलीपर्यंत आहे असे म्हटले जाते. प्रसिद्ध उद्योगपती माननीय भवरलालजी जैन हे दादांच्या सुसंवादामुळेच विद्यार्थी परिषदेचे कायमचे हितचिंतक झाले.

१९८० ते १९८३ या कालखंडात चंद्रकांतदादा पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात गावोगावी संघटना रुजविल्या नंतर त्यांच्यावर परिषदेची महाराष्ट्र संघटन महामंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आणि त्याचे केंद्र मुंबई झाले. असे असले तरी त्यांचे जळगाव जिल्ह्याशी असलेले स्नेहसंबंध तसेच टिकून राहिलें. अवघा महाराष्ट्र हा दादांचे कार्यक्षेत्र झाल्यानंतर संघटन कौशल्याच्या विलक्षण छटा महाराष्ट्रभर उमटू लागल्या. परिसर सक्रियता ही त्यांनी परिषदेला दिलेली मोठी देणगी आहे. रचनात्मक कार्याबरोबर रचनात्मक आंदोलनावर त्यांनी भर दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महाविद्यालयात विद्यार्थी चळवळ अधिक सक्रिय होऊ लागल्या.

सन १९८८-८९ हे वर्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संघर्षपर्व जाहीर केले होते. राज्यस्तरापासून शाखा स्तरापर्यंत पर्यंत त्यांनी अशी रचना तयार केली होती. केवळ महाविद्यालयातील निवडणुकांचे नव्हे, तर कॉलेज कॅम्पस मध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अधिक सक्रिय केले. त्यामुळेच विद्यार्थी परिषदेचे झेंडे विद्यार्थी संसदेवर फडकू लागले. मुंबई विद्यापीठाची देशभर गाजलेली निवडणूक त्यांच्यामुळेच अविस्मरणीय ठरली. या संघर्ष पर्वातच चंद्रकांतदादा पाटील यांनी कॅम्पस कल्चर हा नवा आयाम परिषदेला दिला.

विद्यार्थी संघर्ष करीत असतानाच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन करण्यासोबतच त्यांनी उपक्रम शीलतेवर खूप भर दिला. तंत्रशिक्षण, विद्यार्थी परिषद डिपेक्स, कृषिशिक्षण विद्यार्थी परिषद यासारखे नवनवीन आयाम त्यांच्यामुळेच विकसित होऊ लागले. प्रत्येक आयामासाठी समर्थ कार्यकर्ते त्यांनी उभे केले. आज हे सर्व आयाम स्वतंत्र चळवळी म्हणून उदयास आले आहेत.

दादांची विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री आणि महामंत्री म्हणून कारकीर्द अविस्मरणीय अशीच राहिली. सामाजिक समरसता सारख्या संवेदनशील विषयावर त्यांनी महामंत्री सुटताना देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी प्रवास करून विभिन्न प्रदेशातील परिस्थिती समजून घेतली. त्यांच्या देशव्यापी आभासातून तयार झालेला अहवाल सामाजिक परिवर्तनाची लढाई अधिक व्यापक करणाऱ्या चळवळीला दिशा देणारा ठरला. राष्ट्रीय प्रश्नांची जाण असलेल्या या विद्यार्थी नेत्याच्या नेतृत्वाखाली परिषदेने या सीमावर्ती भागात जाऊन संघर्ष केला.

बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनात ‘तीन बिघा’चे संघर्षांचे स्थान अधिक महत्त्वाचे आणि अधिक मोलाचे आहे. पूर्वोत्तर राज्यातील ‘आंतर छात्र जीवन दर्शन’ या प्रकल्पालाही दादांनी आगळे वेगळे स्थान प्राप्त करून दिले आहे.

सन १९९० मध्ये पूर्णवेळ प्रचारकीय जीवनातून परतून त्यांनी सामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपलं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी तालुक्यातील खानापूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जवळपास पाच वर्ष सामाजिक जीवनात काम करत जनसंपर्क तयार केला. त्यांना शेतीची प्रचंड आवड असल्याने उदरनिर्वाहासाठी काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. विद्यार्थी परिषदेतील काम थांबवले असले, तरी सामाजिक जीवनातील त्यांचे काम सतत सुरूच होते. सन १९९५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सक्रीय होऊन, संघकामास सुरुवात केली. सन १९९५ ते १९९९ मध्ये कोल्हापूर विभागाचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले.

राजकीय जीवन संपादन

विद्यार्थी परिषदेतील संघटनात्मक बांधणीचे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य हेरून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांनी त्यांना पक्षाचे काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार, राजकीय जीवनात प्रवेश करून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. सन २००४ मध्ये त्यांनी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली. सन २००९ मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत शरद पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विधान परिषदेत प्रवेश केला.

सन २०१३ रोजी त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०१४ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय संपादन करत, विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला. सन २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत, सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम आदी विभागाची सूत्रे सोपवण्यात आली. २०१६ पासून ते महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री आहेत. तसेच राज्याचे दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार सोपवला होता. जुलै २०१९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.

कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पे संपादन

विदर्भातील १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना भूमीस्वामीचा हक्क मिळवून देऊन इथल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. यासोबतच २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्यासाठी नागरी स्वराज्य संस्थांना शासकीय तसेच गायरान जमीन देण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला.[ संदर्भ हवा ]

संदर्भ संपादन

  1. ^ पाटील, चंद्रकांत. "व्यक्तिमत्व ओळख". https://chandrakantdadapatil.in/. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)

संदर्भ संपादन