कृष्णाबाई उत्सव हा कृष्णा नदीशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे.[१] महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या वाई, कराड, लिंब या गावांमध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.[२] माघ शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन पौर्णिमा या काळात हा उत्सव संपन्न होतो.

उत्सवातील कृष्णाबाई मूर्ती, गंगापुरी

धार्मिक महत्व संपादन

स्कंद पुराण या ग्रंथात कृष्णा नदीच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे.कृष्णा नदी ही विष्णू या अवताराचे स्त्री रूप मानले जाते. त्यामुळे ती समाजात नदी आणि देवता दोन्ही स्वरूपात पूजनीय मानली जाते.[३]

कथा संपादन

 
कृष्णाबाई मंदिर, महाबळेश्वर

अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना विजय मिळावा यासाठी तत्कालीन वाई ग्रामस्थांनी नदीला नवस केला होता. शिवाजी राजांनी खानाचा वध केला आणि विजय मिळविला त्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाली अशी याची कथा प्रचलित आहे.[२]

उत्सवाचे स्वरूप संपादन

इसवी सन १८८० पासून वाईच्या जोडीने माहुली येथेही हा उत्सव वैशाख महिन्यात संपन्न होतो. उत्सवासाठी मंडप उभारणे, घाटाची स्वच्छता करणे, कृष्णाबाईची मूर्ती पालखीत घालून मिरवणूक काढणे, भजन कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांचे हळदीकुंकू, गायनाचे कार्यक्रम अशा उपक्रमात नागरिक सहभागी होतात. सांगतेच्या दिवशी सर्वांसाठी भोजन प्रसादाचे आयोजन केले जाते.[४] कृष्णा नदीचे पाणी पारंपरिक कलशात भरून त्याची स्थापना देवीच्या मुर्तीपुढे केली जाते. या कलशाला गींडी असे संबोधतात.या कलशाची उत्सवीकाळात दररोज पूजा केली जाते.

वैशिष्ट्ये संपादन

 
महिला भाविक देवीची ओटी भारताना

वाईमधील या उत्सवाचे आयोजन वाई गावातील सात घाटांवर केले जाते. याचा क्रम ठरलेला असून त्यानुसार त्या त्या घाटावर उत्सवाशी संबंधित कार्यक्रम ठरलेले असतात.[३] मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी, गांगापुरी अशा क्रमाने उत्सव केला जातो.[५] धार्मिक विधीच्या माध्यमातून उत्सवाला प्रारंभ होतो. त्यानंतर पुढील चार पास दिवस भक्तगण दर्शनासाठी येतात. काही घाटांवर देवीची पालखीतून तर काही ठिकाणी रथातून मिरवणूक काढली जाते. कृष्णामाई म्हणून नदीची ओटी महिला भाविक भरतात. शेवटच्या दिवशी प्रसादाचे आयोजन केले जाते.[६]

सामाजिक महत्व संपादन

गावातील विविध भागांमध्ये होत असलेल्या या उत्सवाचे सर्व नियोजन त्या त्या परिसरातील, आळीतील सदस्य मिळून करत असतात. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र होवून या उत्सवात विविध जबाबदारी पार पाडतात. भोजन प्रसाद तयार करण्याचे कामही गावातील सदस्य मिळूनच करतात त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपणारा उत्सव या आर्थाने स्थानिक परिसरात या उत्सवाचे विशेष महत्व मानले जाते.[३]

अन्य गावातील उत्सव संपादन

  • वाई गावाच्या जोडीनेच सांगली येथेही कृष्णा नदीचे मंदिर आहे. हे मंदिर सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी बांधलेले आहे. तेथील सरकारी घाटावर कृष्णामाई उत्सव परंपरेनुसार साजरा केला जातो. तसेच पावसाळ्यात पूर येऊन गेला की त्यानंतर कृष्णा नदीची ओटी भरण्याचीही पद्धती प्रचलित आहे.[७]
  • मिरज येथेही कृष्णा नदीच्या उत्सव संस्थान काळात साजरा होत असे. काळाच्या ओघात हा उत्सव बंड झाला होता. तथापि मिरज येथील कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा उत्सव पुन्हा साजरा होऊ लागला आहे. मिरवणुका, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम असे याचे स्वरूप असते.

चित्रदालन संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Nagendra, Harini; Mundoli, Seema (2023-09-25). Shades of Blue: Connecting the Drops in India's Cities (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 978-93-5708-280-8.
  2. ^ a b "कृष्णामाईच्या उत्सवास वाईत सुरूवात". लोकसत्ता. 2013-02-11. 2024-02-29 रोजी पाहिले.
  3. ^ a b c "कृष्णामाई उत्सवसमानतेचा एक आदर्श". www.evivek.com (इंग्रजी भाषेत). 2024-04-04 रोजी पाहिले.
  4. ^ "उत्सवामुळं सुरू होतो संवाद". महाराष्ट्र टाइम्स. 2024-02-29 रोजी पाहिले.
  5. ^ "Wai celebrates Krishnabai Utsav". India Water Portal. 2024-03-21 रोजी पाहिले.
  6. ^ "वाईतील जगप्रसिध्द कृष्णामाई उत्सवास आज पासून सुरवात..! - Maha News Live". mahanews.live (इंग्रजी भाषेत). 2023-01-23. 2024-03-03 रोजी पाहिले.
  7. ^ "नदी नव्हे ही निसर्ग-नीती". www.evivek.com (इंग्रजी भाषेत). 2024-04-04 रोजी पाहिले.