काटकोन त्रिकोण (नाटक)

काटकोन त्रिकोण या मराठी नाटकाचे लेखक डॉ. विवेक बेळे हे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेन्टर या संस्थेने गिरीश जोशींच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक रंगभूमीवर आणले. डो. मोहन आगाशे यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे.

दोन पिढींमधल्या विचारसरणीतील फरकाने घर पाहाता पाहाता कसे दुभंगत जाते याचे नाट्यमय चित्र रंगभूमीवरून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न 'काटकोन त्रिकोण'ने केला आहे.

काटकोन त्रिकोणचे कथानक : नाटकात दाखवलेल्या घरातले पती-पत्नी दोघेही कमावते आहेत. पतीचे वडील आबा घरातच राहत आहेत. आईचे निधन झालेले आहे. सून गणिताची प्राध्यापिका आहे. ती नोकरीवरून नवऱ्यापेक्षा जास्त उशिरा घरी येणारी आणि आलेला पैसा हा खर्च करण्यासाठीच आहे अश्या विचारसरणीची आहे. घरात स्वयंपाकाला बाई आहे. कर्ज काढून थाटात रहाणारे हे आनंदी कुटुंब आहे. साठीच्या पुढचा सासरा सतत सुनेवर लक्ष ठेवून किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींवर कटकटी करणारा आहे. मुलगा वडील आणि बायको यांच्यापैकी एकाचकडेही न झुकता समतोल सांभाळण्याचा प्रयत्न करणारा आहे. वेळ न जाणारा सासरा आणि बाहेरच्या अतिकामांमुळे घरात वेळ न देऊ शकणारे वेळ नसलेले मुलगा व सून असा विरोधाभास नाटकात आहे. सुनेचा घरातले प्रश्न गणितीपद्धतीने साडविण्याचा मनोरंजक भाग प्रथम खूप आनंद देतो. पण हाच गणिती प्रकार पुढे गंभीर केव्हा बनत जातो आणि रहस्यभेद कसा करतो याची पूर्वकल्पनाही न येणे हा या नाटकाचा यशस्वी भाग आहे.

बायको-नवरा-सासरा असा काटकोनी कुटंबाचा आजच्या परिस्थितीतला हा वास्तविक कौटुंबिक प्रश्न, डॉ. विवेक बेळेंनी नेटक्या संवादातून उलगडत नेला आहे. त्रिकोणाच्या भाषेत सांगायचे झाले तर कधी समभुज तर कधी त्रिकोणाचा कर्ण बदलून घरच्या प्रश्नांना सोडवत हे नाटक रहस्याचा आधार घेत पुढे सरकते. पोलिसी थाटातल्या श्री.बापटांच्या धारदार शब्दफेकीतून आशय बाहेर आणत नाटक आबांसारख्या एकाकी बापाची कैफियत मांडत रहाते.

आबांच्या वृद्धत्वाला चिंतेची धार चढते आणि संवादाला विसंवादाचे ठिगळ जोडले जाते. लेखनातून विविध प्रकारचे कंगोरे मांडलेल पाहून आजकाल एकाकी पडलेल्या वृद्धांचे प्रश्न प्रेक्षकांना समाजायला लागतात. समाजातील वृद्धांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने विचार करणारा आजचा तरुण घरात आपल्या आई-वडिलांशी कसा वागतो हे नाटकात सांगून लेखकाने प्रेक्षकांना डोळस बनविण्याच प्रयत्न केला आहे.

'काटकोन त्रिकोण'मधल्या तीन पात्रांतून चार भूमिकांना न्याय मिळाला आहे. आबा आणि बापट हे दोघेही नेमके वेगळ्या प्रकृतीचे लोक मोहन आगाशेंच्या रूपात सहजपणे वावरतात आणि प्रेक्षकांना रमवतात. परस्पर भिन्न अशा दोहोंच्या जीवनातील फरक ते सहजी दाखवतात. अंगयष्टी, बोलण्यातला बदल आणि चालण्यातल्या बदलाने ते नाटकाचे नायक केव्हा बनतात ते कळतच नाही.

पेशाने डॉक्टर असणाऱ्या विवेक लेखक बेळे यांनी शेवटी नाटकातील रहस्यभेद इतका छान केला आहे की त्यांच्या संवाद मांडणीची दाद द्यावीशी वाटते. त्यांनी केलेल्या अभिनयामुळे ते नाटकातल्या पती आणि मुलगा या दोन्ही जबाबदाऱ्या सहजपणे निभावतात. केतकी थत्ते यांनी हल्लीच्या आधुनिक युगातली सून उभी केली आहे. तिच्या संवादांतली चलाखी आणि कामातली हुशारी प्रेक्षकांना आवडेल अशी आहे.

'काटकोन त्रिकोण' हे नाटक 'सुदर्शन'च्या छोट्या मंचावर जितके बहरत गेले, त्या मानाने नेपथ्य तोकडेच बेतले गेल्यामुळे ते मोठ्या रंगमंचावर तितके छान वाटले नाही. तरीही दिग्दर्शकाच्या रूपात दिसलेले गिरीश जोशींचे कौशल्य नाटकातला आशय नेमका बाहेर आणते. तांत्रिक अंगाच्या रूपाने नाटकाला नेटके मांडण्यात सारे सारखेच जबाबदार आहेत.

हे सुद्धा पहा संपादन