अँथोनी लान्सेलॉट ड्यास

(ॲंथोनी लान्सेलॉट ड्यास या पानावरून पुनर्निर्देशित)

सरकारी नोकरीत राहूनही मनापासून देशसेवा आणि लोकसेवा करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंन्थनी लेन्सेलट डायस हे सनदी अधिकारी होय.

डायस यांचा जन्म 13 मार्च 1910 रोजी गोवा प्रांतात झाला. त्या वेळी गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. डायस यांच्याकडे असामान्य बुद्धिमत्ता होती. ते 1929 साली मुंबई विद्यापीठातून बी.ए. (अर्थशास्त्र) झाले. त्यानंतर लंडन येथील सुप्रसिद्ध 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' येथून 1933 साली त्यांनी बी. एस्सी. (अर्थशास्त्र)ची पदवी संपादन केली आणि 'लंडन कोब्डन क्लब'तर्फे देण्यात येणारे सुवर्णपदकही त्यांना मिळाले. पहिल्यापासूनच त्यांची प्रशासन सेवेत जाण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील सनदी अधिकाऱयांसाठी असलेली 'आयसीएस' (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) ही परीक्षा दिली. त्यांनी ही परीक्षा 'बॉम्बे कॅडर'मध्ये दिल्यामुळे त्यांची नियुक्ती मुंबई प्रांतात झाली. त्यांनी त्या काळातील मुंबई प्रांत आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कलेक्टर आणि कमिशनर म्हणून सेवा केली. मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेरमन म्हणूनही त्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली.

त्यांच्या कामाची धडाडी आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांना महाराष्ट्राचे गृह सचिव म्हणून बढती मिळाली. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारच्या सेवेत रुजू करून घेण्यात आले. तेथे ते 1960 साली अन्न पुरवठा खात्याचे सचिव म्हणून रुजू झाले. त्या काळात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी नियोजन केले आणि नेते व जनतेची शाबासकी मिळवली. त्यांचा हा अनुभव लक्षात घेऊन 1966 सालच्या बिहारच्या महाभीषण दुष्काळ निवारणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. ती जबाबदारीही त्यांनी अतिशय समर्थपणे पार पाडली. या काळातच त्यांनी सार्वजनिक बेकरी काढण्याचा उपक्रम हाती घेतला.

श्री. डायस 1969 साली सरकारी सेवेतून निवृत्त झाले. पण त्यांचे कार्य तेथेच संपले नाही. त्यानंतर त्यांची पूर्वोत्तर राज्यांमध्ये गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे ते पश्चिम बंगालचे गव्हर्नर झाले. त्या वेळी नक्षलवादी कारवायांना सुरुवात झालेली होती. या नक्षली कारवायांचा त्यांनी अतिशय समर्थपणे बिमोड केला. त्यांनी केलेल्या राष्ट्रसेवेबद्दल त्यांना 1970 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'ने 1977 साली सन्मान्य सदस्यत्व बहाल केले.

त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य मुंबईमध्ये व्यतीत केले. त्यांना दीर्घायुष्य लाभले. मुंबई येथेच 22 सप्टेंबर 2002 रोजी वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे निधन झाले.