उन्हाळा संपत आला कि चिमण्या -कावळ्यां सारख्या पक्षांची कड्या-कुड्या गोल करण्यासाठी जी तारांबळ उडते. ती पाहताना आपल्यालाही पावसाळा जवळ आल्याची जाणीव होते . घरात मसाले ,पापड , लोणची यांची रेलचेल सुरु झालेली असते .

आजकाल पैसा देऊन काहीहि विकत मिळत हे बाजारात दिसतच तरीही घरी बनवलेल्या वस्तूची बातच काही और.पूर्वी महिला मंडळी घरीच मसाले ,पापड ,लोणची करत धम्माल असायची घरी यावेळी अंगणात मिरच्या निवडायच्या,सुखवायच्या , आणि कांडप वर नेऊन दळून घेत इथे येणाऱ्या बायका परी परीचे मसाले बनवत त्यात कांदा खोबरं घालून केलेला गोडा मसाला ,खडे मसाले लवंगी मिरच्या घालून केलेला कोल्हापुरी मसाला , लाल भडक कलरची मिर्ची पिसून केलेला कोकणी मसाला इत्यादी मसाल्याचा कडक ताजा खमंग वास कांडपच्या वातावरणात पसरलेला असे . पापडाचं ही असंच काहीसं आज हिच्याकडे तर उद्या तिच्याकडे पापड बनवायचा बेत असे .पोळपाट लाटणी घेवून पोरी एकमेकिंच्या दारात बसून पापड लाटायच्या , लोणच्याच म्हणाल चंदगडची मावशी लोणचं झकास बनविते म्हणून आपल्या घरी लोणचं बनवायचं आमंत्रण देण्यासाठी तिच्या घरी फोना-फोन निरोप . हे सगळं आत्ता हळूहळू कमी होत चाललंय झालंय सध्या बायका कुणाकडे पापड लाटायला जायचं म्हटलं तरी भलामोठा आळस देत डेली-सोप चा एपिसोड बुडेल अस काही कारण देता

कोल्हापुरला असताना पूर्ण मे महिना कामात जायचा. गायी म्हशीसाठी वैरण गोठ्यात भरून ठेवायची , चुलीची लाकडं एका झोपडीत खोपीत मांडून ठेवायची , दारातल्या वळचणीला आडोसा घालायचा, रोज नव्या कामाची यादी तयार असे. मे महिन्याच्या आठवडा बाजारात खरेदीसाठी लोकांची झुंबड उडत असे . ते दिवसही तसे होते म्हणा. मुसळधार पावसात कित्तेक गावांचा संपर्क तुटत असे. आणि एखदा पावसाळा सुरु झाला. आणि लोक शेतीच्या कामाला वाकले कि मग दोन तीन महिने त्यांना फुरसत नसे . अशा वेळी दिवसभर शेतात राबून घरी आल्यावर गरम गरम भाकरी सोबत सांडग्याची भाजी खाण्याची मजा नादखुळा . दुपारी शेतावरच्या बांधावर बसून कच्या कैरीच्या तुकड्या सोबत भाकरीचा तुकडा मोडताना भूक म्हणजे काय याची खरी जाणीव होत असे.

"मी तुझ्या पेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत " हि म्हण पावसाळ्याबद्दल आणि एकूण त्याचा अनुभव याबाबत खूप काही सांगून जाते . निसर्गाच खरं रूप पावसातच पाहायला मिळत. लहानपणी एक गोष्ट होती. ' कावळ्याच घर होतं शेणाच आणि चिमणीच घर होतं मेणाचं ' काय गम्मत अजूनही ती गोष्ट जशीच्या तशी आठवतेय. आमच्या पूर्वीच्या जुन्या घरी कवलातून टीप टीपणाऱ्या पाण्याखाली टोपं लावताना आमची तारांबळ उडत असे. पण त्यातही एक वेगळी मजा होती. मातीच्या घरात जो ओलावा होता तो सध्याच्या सुखवस्तू घरात नाही. दिवस बदलले शेती करणारी लोकं हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच राहिलीत. पापड , लोणची, तिखट मसाले बाजारात स्वस्त दारात रेडी मेड मिळू लागले. तरीही पक्षी ,प्राणी वा माणसं सगळ्यांनाच या ऋतूत चार गोष्टी जमवायला लागतात. कारण पावसाळा पहिला असो वा दुसरा झोडपणाऱ्या पावसाच्या सरी मनात रंजी घालत असतानाच घोंघावणांर वादळ कधी सारं उध्वस्त करेल याचा अंदाज बांधता येत नाही.