दादाजी रामजी खोब्रागडे संपादन

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड हे एक छोटेसे गाव. त्या गावात रामजी खोब्रागडे हे शेतकरी. पाच एकर शेती; मात्र, ती मनापासून कसायचे. लग्न झाले आणि त्यांच्या सासरी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील खुटाळा येथे १० जुलै १९३९ रोजी त्यांच्या पोटी पुत्र जन्मला. वडिलाना शेती करताना पहात हे बाळ मोठे होऊ झाले. वडीलांची शेती करण्याची पद्धत शिकू लागले. त्या बाळाचे नाव दादाजी असे ठेवले होते. पुढे त्याला शाळेत घातले. तिसरीपर्यंत शाळा पूर्ण केली आणि वडिलांना शेतात मदत करण्यासाठी शिक्षण थांबले. दादाजी पूर्णवेळ शेतीतील कामे करू लागले. वडील बियाणासाठी भात निवडताना लोंब्या हातावर घेवून त्या मळत, आतील तांदूळ तुटतो का? तो किती लांबीचा आहे? याचे सूक्ष्म निरीक्षण करत. वडिलांची ही सवय दादाजीवर नकळत संस्कार करत होती. वडील असेपर्यंत ते सहाय्यकाच्या भूमिकेत होते. वडील गेले आणि दादाजी शेती सांभाळू लागले.

दादाजी सकाळी लवकर उठत. फक्त चहा घेवून ते शेतात जात. खांद्यावर एक कापडाची पिशवी. हातात काठी. एवढेच साहित्य घेऊन स्वारी शेतात जायची. शेत हेचं सर्वस्व. शेतातील काडी न काडीची माहिती घ्यायचे. वाढणाऱ्या पिकांचे निरीक्षण करत, वाढत्या पिकाची देखभाल करायचे. शेती जंगलाजवळ असल्याने पिकाभोवती काटेरी कुंपण करायचे. आवश्यक तेवढेच पाणी शेतात राहील, याची काळजी घ्यायचे. पिकात इतर कोणतेही तण वाढू देत नसत. त्यांचे शेत स्वच्छ असायचे. दहा वाजेपर्यंत असे शेतात फिरून काम करायचे. दहा वाजले की दादाजी परत फिरायचे. गावातील चहाच्या टपरीवर येऊन चहा प्यायचा. पेपर वाचायचा. गावकऱ्यांशी गप्पा मारायच्या आणि नंतर घरी यायचे. ऊन असो, थंडी असो वा पाऊस, दादाजींचा दिनक्रम ठरलेला. धो-धो पावसातही त्यांचा दिनक्रम बदलत नसे. कोणी विचारले तर ते आपल्या परीने शेतात जाणे कसे आवश्यक आहे, ते सांगत. त्यांचे म्हणणे लोकांच्या डोक्यावरून जायचे. आपल्याला एखाद्याचे म्हणणे पटले नाही की, लोक त्याला अतिशहाणा म्हणून विषय सोडून देतात. दादाजीना असे काहीसे उपहासात्मक 'डोकेवाले' हे नाव गावाने प्रदान केले. त्यांचे डोके गावाला समजण्यापलिकडचे होते, म्हणून कदाचित त्यांना हे नाव दिले असावे. पण या डोकेवाल्या दादाजींचे डोके खरंच कोणत्याही प्रशिक्षीत कृषी संशोधकापेक्षा जास्त चालत होते.

दादाजींच्या शेतात अनेक वर्षापासून भात लावला जात असे. १९८१ पासून दादाजीनी आपल्या शेतात 'पटेल-३' हे भाताचे संकरीत वाण लावायला सुरुवात केली. त्यावेळी इतर वाणापेक्षा हा वाण आधिक प्रसिद्ध झाला होता. पिक कापणीला आले असताना त्यातील कांही भाताच्या रोपाच्या लोंब्या या इतर वाणापेक्षा लांब आणि भरपूर दाणे असणाऱ्या दिसल्या. त्यानी त्या लोंब्या काळजीपुर्वक बाजूला काढल्या. पुढील वर्षी त्या वेगळया ठेवलेल्या लोंब्यातील भाताचे बी काढून त्यांची वेगळी लागवड केली. शंभर चौरस फूट जागेत लावलेल्या या वाणाचे पिक 'पटेल-३' वाणांपेक्षा कितीतरी जास्त होते. त्यातील काही भात त्यानी सडला. त्यापासून मिळालेला तांदूळ शिजवला. हा भात इतर भातापेक्षा आधिक चवदार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढे त्यानी आपल्या संपूर्ण शेतात हे वाण पेरले आणि भाताच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. तीन चार वर्षात दादाजींचे प्रतिएकर भाताचे उत्पादन इतरांपेक्षा जास्त निघते, याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. आजूबाजूचे शेतकरी त्यांच्याकडे बियाणे मागू लागले. यापैकीचं एक शेतकरी होते भिमराव शिंदे. ते दादाजींचे मेहुणे. त्यानी दादाजीकडून नव्वद किलो बियाणे नेले आणि ते चार एकरात लावले. त्यातून त्याना नव्वद पोती भाताचे उत्पादन मिळाले. शिंदे यानी हा भात विकायला अडत दुकानात नेला.

शिंदे यांचा भात भरपूर होता आणि तो इतर तांदळापेक्षा वेगळा होता. या वाणाचे वेगळेपण ओळखून व्यापाऱ्याने शिंदे यांना वाणाचे नाव विचारले. त्यानी नाव तुम्हीच लिहा, असे सांगीतले. त्या काळात एचएमटी घड्याळे प्रसिद्ध होती. त्या व्यापाऱ्याने काही दिवसापूर्वीच एचएमटी कंपनीचे नवे घड्याळ विकत घेतले होते. त्याने भाताच्या या वाणाचे नाव ‘एचएमटी’ असे लिहिले. हे भाताचे वाण सर्वत्र एचएमटी या नावाने लावले जाऊ लागले. या भाताचे नामकरण त्याच्या पित्याला दादाजींना न विचारता झाले. सर्वत्र या वाणाची चर्चा होऊ लागली. आपण विकसीत केलेला वाणचं एचएमटी नावाने लोक लावतात, हे लक्षात आल्यावरही दादाजींना त्याचे ना कौतुक ना अहंभाव. आपले वाण लावतात याचा अभिमानही त्यांच्या बोलण्यात नसे. दादाजीनी एचएमटी वाण तयार करताना आपल्या शेतातील विशिष्ट वाणांचाच संकर या जास्त लांबीच्या आणि भरपूर व घट्ट दाणे असणाऱ्या वाणांशी होवू दिला होता. हे प्रयोग सलग चार पाच वर्ष करून त्याना यश मिळाले होते. त्याचप्रमाणे या यशामूळे नवा वाण तयार होतो, याची त्याना खात्री पटली. त्यानंतर त्यानी आपले प्रयोग सातत्याने सुरू केले आणि नवे वाण शोधत राहीले.

एचएमटी हा सर्वात यशस्वी वाण हा १९८३ पासून लावला जात होता. त्यानंतर चारच वर्षात ठेंगू चिनोर किंवा नांदेड चिनोर हा वाण लागवडीसाठी उपलब्ध झाला. पुढच्या पाच वर्षात म्हणजेचं १९९२ मध्ये नांदेड-९२ हा भाताचा नवा वाण तयार केला. पुढच्या सहा वर्षात आणखी चार वाण त्यानी तयार केले. नांदेड हिरा (१९९४), विजय नांदेड (१९९६), दिपक रत्ना (१९९७), डीआरके (१९९८) या वाणांचे बियाणे  लावण्यासाठी दादाजींनी उपलब्ध करून दिले. हे वाण सर्वत्र लावले जावू लागले. हे बियाणे कोणत्याही शासकीय यंत्रणेने किंवा कंपनीने लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेले नव्हते. तरीही हळहळू विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा राज्यात या वाणांची लागवड होऊ लागली.

पुढे हा एवढा प्रसिद्ध झालेला वाण कोणी विकसीत केला? याचा शोध काही लोकानी घेतला. दादाजींचा नागभीड तालुक्यात सत्कार झाला. तेथील गट विकास अधिकाऱ्यानीही त्यांचा सत्कार केला. त्याच्या वर्तमानपत्रातील बातम्या पाहून चंद्रपूरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यानी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संपर्क साधला. तत्कालीन कुलगुरू आणि नागभीड तालुक्यातील विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे अधिकारी हे दादाजींच्या घरी गेले. त्यांच्याकडून १९९४च्या जून महिन्यात एचएमटी वाणांचे पाच किलो बियाणे घेतले. तसेचं ठेंगू चिनोर आणि नांदेड-९२ या वाणांचेही बियाणे घेतले. त्यानी आपण या बियाण्याला शास्त्रीयदृष्ट्या लोकापर्यंत पोहोचवू असे सांगण्यात आले. मात्र तत्कालीन कुलगुरुंचे  दिड वर्षात दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर दादाजीना विद्यापीठाने काहीही कळवले नाही. अचानक एक दिवस विद्यापीठाने एचएमटी वाण हा वाण नोंदवला आणि तो बाजारातही बियाणे रूपात आणला.

दादाजींचे वाण शोधणे सुरू असताना त्यांचा मुलगा मित्रजीत आजारी पडला. अनेक उपचारानंतरही तो बरा होत नव्हता. मुलाला त्यांनी बियाणे कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले होते. मुलगा महत्त्वाचा म्हणत त्याच्या उपचारासाठी दादाजींना आपली काही जमीन विकावी लागली. पुढे मुलाच्या सासऱ्यानी त्याना दिड एकर शेती घेऊन दिली. त्यानंतर दादाजींना पेटंट रॉयल्टीबाबत कळाले. २०१० मध्येही दादाजी असेच शेतात काम करत होते. इकडे सर्व चॅनेलवर फोर्ब्जच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाव झळकल्याची आतमी दाखवली जात होती. सर्वात प्रथम दादाजींशी संवाद साध्ण्यासाठी प्रतिनिधींची धांदल सुरू होती. शेतात काम करत असताना प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीनी त्याना फोर्ब्ज मासीकाने तुमची दखल घेतल्याचे सांगीतले. दादाजींना याचे काहीच कौतुक नव्हते. महाराष्ट्र शासनाने त्यांचा ‘कृषीभुषण’ पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानंतर दादाजीनी आपल्या प्रयोगासाठी आणखी शेती मिळावी, अशी मागणी केली. मात्र त्याना दिड एकर शेती देण्यात आली. त्याना सव्वाशेपेक्षा जास्त पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र त्यांनी वीस एकर शेतीची केलेली मागणी मात्र अखेरपर्यंत पूर्ण झाली नाही. तरीही ते अखेरपर्यंत नव्या वाणांच्या शोधात मग्न राहीले.

त्यानी आपल्या बियाण्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई लढावी म्हणून खुप लोक आग्रही राहीले. त्यानी तसे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या हाती तुटपुंजी रक्कम आली. मे २०१८ मध्ये त्यांची प्रकृती आणखी खालावली. उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यातचं त्यांचे ३ जून २०१८ रोजी निधन झाले.