डॉ. वीरा राठोड (विनोद रामराव राठोड , ६ फेब्रुवारी, १९८०:सावळी तांडा, जिंतूर तालुका, परभणी जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक मराठी कवी आहेत. त्यांचा जन्म एका लमाण-बंजारा कुटुंबात झाला. आरंभीचे शिक्षण आश्रम शाळेत झाले.

त्यांचे तीन कविता संग्रह व एक लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. 'सेनं सायी वेस' (२०१४)' म्हणजेच सर्वांचं कल्याण होवो असा ज्याचा अर्थ आहे. ही बंजारा लमाण जमातीची प्रार्थना आहे. व 'पिढी घडायेरी वाते'(२०१६) हा बंजारा बोलीभाषेतल्या कवितांचा संग्रह आहे. ' हाडेल हप्पी जादूची झप्पी'(२०२०) हा बालकवितांचा संग्रह आहे. शिवाय 'हस्तक्षेप'(२०१८) हा लेखसंग्रह त्त्यांच्या नावावर अाहे.

त्यांच्या पहिल्या कविता संग्रहास दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार- २०१५ मिळाला आहे. शिवाय दया पवार साहित्य पुरस्कार, नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद आैरंगाबादचा कुसुमावती देशमुख काव्य पुरस्कार , यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार पुणे, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी साहित्य पुरस्कार , कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार संगमनेर,दै.दिव्य मराठी प्राऊड आॅफ महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण युवा साहित्य पुरस्कार अंबाजोगाई मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे आणि मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर चे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार आदी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

दै. दिव्य मराठी, दै. महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ आदी वर्तमानपत्रातून स्तंभलेखन केलेले आहे.

"मुंबई विद्यापीठ" "अमरावती विद्यापीठ" "औरंगाबाद विद्यापीठ" "नागपूर विद्यापीठ" "बालभारती इयत्ता दहावी" "विविध स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे".

"आशियायी देशातील लेखकांसमवेत सार्क लिटरेचर फेस्टिवल मध्ये निमंत्रित करण्यात आले आहे" "राष्ट्रीय लेखकांबरोबर विविध राष्ट्रीय साहित्य उत्सवांमध्ये त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आलेले आहे". शिवाय "भारतीय साहित्य अकादमी ने त्यांना प्रवासवृत्ती फेलोशीप देऊनही त्यांचा गौरव केलेला आहे".

स्वतः सामाजिक कार्यात सहभागी राहून मानवतावादी दृष्टिकोनातून व लोकशाहीच्या संवर्धनासाठी ते जाणीवपूर्वक आदिवासींच्या व भटके, विमुक्त, दलित, वंचितांच्या प्रश्नावर सातत्याने लेखन करीत असतात. पुणे येथे भरलेल्या अग्निपंख युवा मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य राहिले आहेत. तसेच बालभारती पुणे अभ्यास मंडळाचेही सदस्य राहिले आहेत. व्यवसायाने प्राध्यापक असलेले वीरा राठोड लोकसाहित्य आणि लोकभाषा- बोलीभाषांच्या संशोधनात विशेष रुची ठेवून आहेत.

सध्या ते चाळीसगाव जि.जळगाव येथे बी. पी.आर्टस, एस.एम.ए. सायन्स अेॅड के. के. सी. काॅमर्स काेॅलेज चाळीसगाव येथे'मराठी भाषा आणि साहित्य 'पदव्युत्तर विभागात सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.