या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांसोबतच सीडीज, मायक्रोफिल्म्स, व्हीडिओज, कॅसेट्स, स्लाइड्स, संशोधनपत्र, संदर्भग्रंथ अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. पारंपरिक ग्रंथालयाची कल्पना आता बदलली असून इंटरनेट, र्व्हच्युअल बुक्स इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्युट्स यासारख्या संस्थांमधल्या ग्रंथालये सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांना ग्रंथपालांची आवश्यकता असते. यामध्येही सार्वजनिक आणि खासगी लायब्ररी असे प्रकार असतात.
शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी पैशात न मोजता येणारी बौद्धिक संपत्ती लाभली आहे. ही सारी चळवळ सुरू कशी झाली, कानाकोपऱ्यात कशी पोहोचली आणि आज या टप्प्यापर्यंत कशी आली हा साराच उद्बोधक आणि रंजक असा इतिहास आहे. प्राचीन काळात राजे-राजवाडय़ांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल.
पण त्यामध्येदेखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेलं ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी. टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. या पी. टी. फ्रेंचचा बराच प्रभाव आपल्याकडे दिसतो. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी याकामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. काही ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. उदा. ब्रह्मपुरी, राजगुरूनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इ. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर / सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (आपटे वाचन मंदिर). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. त्यांच्या अफाट कार्यातून मराठी ग्रंथसंग्रहालयांनी एक वेगळीच उंची गाठली आहे.
कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरूझाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे.
प्रबोधना साठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयाची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरु व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. अनुदानाचा विनियोग योग्यप्रकारे होतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी नुकतीच वाचनालयाचीही विशेष तपासणी झाली. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकाकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. {{संदर्भ हवा}}
==इतिहास==
|