राजनारायण बसू (जन्म ०७ सप्टेंबर १८२६ बोराल, कलकत्ता - मृत्यू १८ सप्टेंबर १८९९)[१] (बंगाली: রাজনারায়ণ বসু;) हे भारतीय लेखक आणि विचारवंत होते. त्यांनी 'तत्वबोधिनी पत्रिका' या ब्रह्मो समाजाच्या नियतकालिकात लिखाण केले.

राजनारायण नंदकिशोर बासू
राजनारायण बासू
जन्म ०७ सप्टेंबर १९२६
बोलार, दक्षिण परगणा, बंगाल
मृत्यू १८ सप्टेंबर १८९९
देवघर, बिहार
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती ऋषी राजनारायण बासू, राष्ट्रवादाचे पितामह
अपत्ये स्वर्णलता
नातेवाईक नातू - अरविंद घोष

शिक्षण व कौटुंबिक जीवन संपादन

१८४० साली त्यांनी हिंदु कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १७ वर्षे वयाचे असताना त्यांचा प्रथम विवाह प्रसन्नमयी मित्रा यांच्याशी झाला.

पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर १८४७ साली निस्तारिणी दत्त यांच्याशी द्वितीय विवाह झाला. त्या काव्यलेखन करत असत. त्यांना ५ मुली आणि ३ मुले झाली. त्यांची सर्वात थोरली कन्या म्हणजे स्वर्णलता. त्यांचे पुत्र म्हणजे श्रीअरविंद घोष.

कारकीर्द संपादन

त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी केनोपनिषद, अथोपनिषद, मंडुकोपनिषद आणि श्वेताश्वतरोपनिषद या चार उपनिषदांचा इंग्लिशमध्ये अनुवाद केला होता.[२]

वयाच्या एकोणविसाव्या वर्षी त्यांचा बाबू देवेंद्रनाथ टागोर यांच्याशी परिचय झाला आणि ते ब्राह्मो बनले. [३] असे असूनसुद्धा ते हिंदूधर्माची मुक्तकंठाने स्तुती करत असत.

राजनारायण बोस यांना इंग्रजी, बंगाली आणि पर्शियन भाषा अवगत होत्या. ते स्वतः उत्तम लेखक होते. बंगाली साहित्यामध्ये काव्य, लेख, निबंध असे विपुल लेखन त्यांनी केले होते. त्यांचे लिखाण विवाद्य असे. ते व्याख्यानेही देत असत.

''आधुनिक भारतामध्ये प्रचलित असणाऱ्या वेदांत, इस्लामिक आणि युरोपियन या तिन्ही संस्कृतींचा समन्वय त्यांच्यामध्ये झाला आहे,'' असे उद्गार श्री.बिपिनचंद्र पाल यांनी काढले होते. [३]

नोकरी संपादन

कलकत्ता येथील संस्कृत महाविद्यालयात इंग्रजी विभागात १२ मे १८४९ रोजी ते रुजू झाले. ईश्वरचंद्र विद्यासागर हे त्यांचे विद्यार्थी होते.

२१ फेब्रुवारी १८५१ रोजी ते मिदनापूर सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. ०१ जानेवारी १८६९ रोजी ते निवृत्त झाले. त्यांच्या कालखंडात ही शाळा खूप नावारूपाला आली होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मन, बुद्धीप्रमाणेच शारीरिक विकासाचीही काळजी घेत असत.[३]

कर्तृत्व संपादन

१८५७ च्या असफलतेनंतर सर्वसमावेशक अशी हिंदू संघटना असावी, यासाठी ’राष्ट्रीय गौरवेच्छा संपादनी सभा’ या संस्थेची स्थापना केली.[२]

ब्रिटिशांचा माल भारतात येत असताना, भारतीय वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्याच्या हेतूने, भारतात प्रथमच हिंदू मेळा (राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन) भरविण्यात आला, त्याची प्रेरणा राजनारायण यांची होती. नवगोपाल मित्र हे सह-संस्थापक होते. १२ एप्रिल १८६७ या दिवशी कलकत्त्यात हिंदू मेळ्याचे पहिले अधिवेशन झाले. [२] १८६७ ते १८८० या कालावधीत प्रत्येक वर्षी असा मेळा भरविण्यात येत असे. या मेळ्यास चैत्र मेळा असेही म्हटले जात असे.

भारतीय संस्कृतीच्या पायावर भारताची, भारतीयांची पुनरुथान केले पाहिजे असे त्यांना वाटत असे आणि त्यासाठी त्यांनी मिदनापूर येथे १८६६ मध्ये एका सोसायटीची स्थापना केली. Society for the Promotion of National Feeling among the Educated Natives of Bengal असे या सोसायटीचे नाव होते. आपल्या तेखन आणि भाषणांच्या माध्यमातून त्यांनी बंगाल प्रांतातील सुशिक्षित वर्गात आत्म-भान आणि आत्मविश्वास जागा करण्याचे काम केले.

मिदनापूरच्या भूमीमध्ये त्यांनी क्रांतिकारक विचारांची बीजे पेरली आणि पुढे मिदनापूर ही बंगाल प्रांतातील क्रांतिकारकाची एक प्रकारे जन्मभूमीच ठरली. संजीवनी-सभा नावाच्या एका गुप्त सोसायटीची देखील त्यांनी स्थापना केली होती. युवक वयातील रवींद्रनाथ टागोर त्याचे सदस्य होते, याची साक्ष श्रीअरविंद घोष यांनी दिली आहे.

त्यांना 'राष्ट्रवादाचे पितामह' असे संबोधले जात असे. त्यांना 'ऋषी राजनारायण बोस' असेही संबोधण्यात येत असे.

लेखन संपादन

ग्रंथसंपदा संपादन

धर्मतत्त्व दीपिका

हिंदुधर्म की श्रेष्ठता, अनुवादक - देवदत्त, श्रीअरविंद चेतना धारा ट्रस्ट, पाँडिचेरी, सप्टेंबर २००१

काही प्रसिद्ध लेख संपादन

हिंदू धर्मेर श्रेष्ठत्व,

वृद्धी हिंदूर आशा,

जातीय गौरव प्रसारिणी सभा [२]

स्मरणिका संपादन

राजनारायण बोस यांच्या स्मरणार्थ १९०९ साली 'आत्मचरित्र' या नावाची स्मरणिका काढण्यात आली होती. त्यामध्ये श्रीअरविंद यांनी त्याच्यावर एक कविता लिहिलेली होती. सप्टेम्बर १८७९ मध्ये ते देवघर, बिहार या गावी राहायला गेले आणि शेवटपर्यंत त्यांचे वास्तव्य तेथेच होते. उतारवयात त्यांना अर्धांगवायू झाला होता. [४] देवघर मुक्कामी स्वामी विवेकानंद राजनारायण यांना भेटण्यासाठी येत असत, असा उल्लेख आहे. [४]


संदर्भ संपादन

  1. ^ Sri Aurobindo (2009). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 02. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 282.
  2. ^ a b c d "आधुनिक काळातील हिंदुत्वाचे पहिले पुरस्कर्ते - ऋषी राजनारायण बसू". www.evivek.com (इंग्रजी भाषेत). 2023-09-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b c Sujata Nahar (1995). Mother's chronicles - Book four. PARIS, France: INSTITUT DE RECHERCHES EVOLUTIVES. Paris & MIRA ADITI, Mysore. ISBN 2-902776-35-7.
  4. ^ a b Sujata Nahar (1997). Mother's Chronicles - Book Five. INSTITUT DE RECHERCHES EVOLUTIVES, Paris. ISBN 2-902776-48-9.