मुसलमान मराठी संतकवी

इसवी सनाच्या पंधराव्या ते अठराव्या शतकापर्यंत मुसलमान संत कवी आढळतात. त्यांमधील सुरुवातीच़ा आणि गुणांनीही अग्रगण्य असा कवी म्हणजे मुंतोजी ब्रह्मणी हा होय. मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे. नारायणपूर येथे त्याची समाधी आहे. 'सिद्धसंकेत प्रबंध' हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ. दोन हज़ार ओव्या असलेल्या या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणाला 'राम-जानकी' असे नाव आहे. त्यातील काही निवडक ओव्या -

मन - नयनां येकांत करावा। प्रेम भाव हृदयी धरावा॥ सत्य विश्वास मानावा। निश्चयेसी॥

दिसेल इंदू भास्करांच़े परी। तोचि उभय दृष्टी धरी॥ त्यांत तू प्रवेश करी। निश्चय मनें॥

मयोर पत्रावरील डोळे। तैसी दिसती जे वर्तुळे॥ तयांमध्ये ज़े नीळे। ते रूप माझें॥

तयांत खोवोनि दृष्टी। ते अंजन सुवावे नेत्रपुटी॥ मग उघडेल पेटी। ब्रह्मतेजाची॥

ध्यानी चित्त स्थिरावेल ।तया अखंड तेज प्रकाशेल॥ मन तदाकार होईल। विसरलोनि देहाते॥

या कवीबद्दल रा.चिं.ढेरे म्हणतात, असा हा संतकवी केवळ मुसलमान संत कवीच नव्हे, तर अखिल मराठी संत मंडळात मानाचे स्थान पावणारा आहे .[१]

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सहा,पान क्रमांक ७६४