डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डबेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत.

डबेवाले
डबेवाले

मुंबई शहर हे विस्ताराने अवाढव्य असल्याने कामाच्या जागी वेळेवर पोहचण्यासाठी नोकरदार मंडळींना घरांतून लौकर निघावे लागते. जर डबेवाल्यांची यंत्रणा अस्तित्वात नसती तर बहुसंख्य मंडळींना सकाळचा नाष्ता व दुपारच्याजेवणाचा डबा सकाळीच घेऊन निघावे लागले असते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा कार्यालयात पाठवू शकतात. १८९०ला हा व्यवसाय मुंबईत सुरू झाला. १८९०ला संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते. व भारताचा इंग्लंडशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातुन चालायचा या व्यापारा मुळे काही कंपनींची कार्यालये दक्षिण मुंबईत होती.या कार्यालयात काम करणाऱ्यांना पहीले डबे पोचवण्याचे काम सर्व प्रथम चालु झाले. व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करत गेले. जसं जसं डबेवाले काम करत गेले तसं तसं व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली.सिक्स सिग्मा मिळाला ISO प्रमाणपत्र मिळाले. दिवसाला २ लाख डबे घरातुन कार्यालयात व जेवून रिकामी झालेले २ लाख डबे पुन्हा घरी पोचवायचे म्हणजेच दिवसाला ४ लाख डब्यांची देवाण घेवाण डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान ५ हजार डबेवाले काम करत आहेत.

इतिहास संपादन

मुंबई, उद्योगनगरीचे रूप घेऊ लागली होती. १८८०ला मुंबईतील फोर्ट ( किल्ला) हा इंग्रजांना व्यापारासाठी कमी पडू लागला होतो. मग सदरचा किल्ला पाडुन बॅलार्ड पियर, फाऊंटन, ते थेट आत्ताच्या गेट वे पर्यंत  सलग ईमारतींची नवीन बांधनी केली गेली.

भारतावर इंग्रजांची सत्ता असल्यामुळे भारताचा युरोपशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातूनच चालत होता. त्या वेळी जवळ जवळ ९०% व्यापार हा मुंबई बंदरातुन चालत होता. त्या मुळे अनेक कंपन्यांची कार्यालये फोर्ट विभागात होती.

नवीन ईमारतींची बांधणी झाल्या मुळे त्यात पुन्हा नवीन कार्यालयांची भर पडली व त्या मुळे फोर्ट, फांऊंटन, बॅलार्ड पियर, बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांची, अधिकाऱ्यांची संख्या वाढली.

त्या काळात मुंबईत पारशी समाज मोठ्या प्रमाणात होता व तो समाज उच्च शिक्षित होता. उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना त्या कार्यालयात अधिकारीपदाच्या नोकऱ्या मिळाल्या.

साधारणता १८९० च्या काळात एका कार्यालयात एक पारशी अधिकारी काम करत असे आणी दुपारचे जेवण करायला घरी जात असे तो अधिकारी घरी जाऊन जेवून यायचा तेव्हा साधारणता त्याला दिड तास लागायचा ( त्या वेळी फास्ट फुडचा जमाना नव्हता त्या मुळे हाॅटेल नव्हती. व वाहनांची कोणतीच सोय नव्हती त्या काळी फक्त टांगागाडी मुंबईत चालायची तिला व्हिक्टोरीया म्हणटल जायच ) मग त्या अधिकाऱ्याला एका माणसांन विनंती केली साहेब आपण दुपारी घरी जाता जेवून पुन्हा कामावर येतां साधारणता आपला दिडतास वाया जातो त्या येवजी मी आपला जेवणाचा डबा घरून घेऊन येतो आपण आपल्या कार्यलयातच जेवा आपल्या कार्यालयात आपण जेवलात तर साधारणता अर्धा तासात आपले जेवण होईल व आपला एक तास वाचेल आपण एक तास जास्त काम करू शकता.

साहेबाला ही कल्पना आवडली व त्या व्यक्तीला आपला घरून डबा आणायला त्याने सांगितले व अशा प्रकारे मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली.

आज चर्चगेट ते विरार, सी.एस.टी. ते कल्याण, व नवि मुंबई या दरम्यान पाच हजार डबेवाले दोन लाख डबे पोचवण्याचे काम करत आहेत

सुरुवात संपादन

महादू हावजी बच्चे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरू केली. त्यानंतर डबेवाला धर्मशाळेची स्थापना भीमाशंकर या ठिकाणी १९३८ साली करण्यांयात आली.

मुंबई शहरात सध्या सुमारे ५००० डबेवाले आहेत. त्यांपैकी ८५ टक्के डबेवाले निरक्षर व १५ टक्के डबेवालेच साक्षर आहेत. हे डबेवाले सुमारे २,००,००० डब्यांची ने-आण करतात असा अंदाज आहे.[१]

नियम व शिस्त संपादन

त्यांच्या कामात शिस्त आहे. कुठल्याही घरून डबा घेण्यासाठी फक्त ५ सेकंदांचा वेळ देण्यात येतो. नेहमीच उशिरा डबा देण्याची सवय असल्यास तो डबा बंद करण्यात येतो. यावर असलेल्या रंग संकेतामुळे(कलर कोड) डब्याची अदलाबदल कधीच होत नाही. या डबेवाल्यांनी गेल्या १२० वर्षात कधीच संप केलेला नाही. सर्व डबे पोहेचते झाल्याशिवाय कोणताही डबेवाला जेवत नाही.

या डबेवाल्यांच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीवर ’मुंबईचा डबेवाला’ नावाचा एक मराठी व्यावसायिक चित्रपटही बनवण्यात आला होता. त्यात भरत जाधव यांची प्रमुख भूमिका होती.

प्रणालीची ओळख संपादन

एकाच भागातील डबे प्रथम एकत्र करून त्यांची गंतव्य स्थानाप्रमाणे छटाई (Sorting) होते. एकाच ठिकाणी जाणारे डबे जलद पोहोचणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्यांवर (Fast Local Trains) चढवण्यात येतात. डब्यांवर पोहोचवायचा पत्ता ठिपक्यांच्या स्वरूपात गोंदलेला असतो. सुरुवातीच्या काळात अनेक डबेवाले निरक्षर असल्याने ठिपक्यांच्या स्वरूपातील पत्ता त्यांना सोईचा होता. प्रत्येक स्टेशनवर त्या त्या ठिकाणचे डबे उतरवले जातात व वितरणासाठी स्थानिक डबेवाल्यांकडे देण्यात येतात. हे स्थानिक डबेवाले त्यांचे योग्य त्या ठिकाणी तातडीने वितरण करतात.

कर्मचाऱ्यांची जेवणे झाल्यावर रिकामे डबे गोळा करून ते पुन्हा परत पाठवण्यात येतात. डबे घरांघरांतून गोळा करणे व रिकामे डबे परत नेणे ही सर्व कामे अतिशय काटेकोर, वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्यात येतात. डब्यांचे वितरण करतांना हे डबेवाले कोणतेही प्रत्यक्ष इंधन खर्च करीत नाहीत, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. त्यांची भांडवली गुंतवणूक अत्यल्प आहे. आपसात वाद अजिबात नाहीत. सुमारे २५० ते ३०० रु. या दराने ते महिनाभर सेवा पुरवितात. महिन्याला साधारणतः ७००० रु. इतकी कमाई प्रत्येक डबेवाल्यास होते.

प्रणालीची अचूकता संपादन

डबेवाल्यांच्या या वाहतूक प्रणालीत डबा चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता (Error rate) १.६ कोटी डब्यांमधे १ इतकी नगण्य असते. इतक्या अचूकतेमुळे प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस सिक्स सिग्मा वर्गात स्थान दिले आहे. या वर्गात मोटोरोला, जनरल इलेक्ट्रिक अशा मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्यानुसार डबेवाले फारतर सायकलींचा वापर करतात. त्यांचा इंधनाचा वापर शून्य टक्के, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शून्य टक्के, गुंतवणूक शून्य टक्के, वादविवाद शून्य टक्के, परिणाम शंभर टक्के आणि ग्राहकांचे समाधान शंभर टक्के, असे या डबेवाल्यांचे गणित मांडले आहे.[२]

संदर्भ संपादन

  1. ^ फ्रेन्च विकीवरील डबेवाल्यांवरचा लेख
  2. ^ http://marathi.indiainfo.com/2008/06/21/0806211535_mumbai_dabbawala_shares_secret_success_dubai_accountants.html[permanent dead link]

3. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/dabbawalas-taken-for-a-ride-by-their-association-leaders/articleshow/73972755.cms

4.https://www.outlookindia.com/newsscroll/now-mumbai-dabbawalas-fight-fakes-in-fraternity/1637411