महाराष्ट्र राज्य फुलपाखरू

ब्लू मॉरमॉन तथा राणी पाकोळी (शास्त्रीय नाव:पॅपिलिये पॉलिम्नेस्टर) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित झाले आहे..

ब्लू मॉरमॉन

फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी झाल्यावर २२ जून, २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.

महाराष्ट्र राज्याची इतर मानचिन्हे अशी आहेत --

महाराष्ट्रात फुलपाखरांच्या जवळपास २२५ प्रजाती आहेत. देशातील १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात.

ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू भारताच्या आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतरचे सर्वांत मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो.

ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू श्रीलंका व भारताच्या महाराष्ट्र, दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचे अस्तित्व आहे.

ब्लू मॉरमॉनला तज्ज्ञांचा विरोध संपादन

ब्लू मॉरमॉन' हे राज्य फुलपाखरू म्हणून निवडण्यात आले खरे, पण अभ्याकांनी त्याची दुसरी बाजू उजेडात आणली आहे. ती म्हणजे हे फुलपाखरू लिंबू व संत्रावर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते. त्यामुळे ते राज्य फुलपाखरू ठरल्यामुळे विदर्भातील संत्राउत्पादकांच्या चिंता वाढण्याची भीतीही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या 'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, या निर्णयावर फुलपाखरांच्या अभ्यासकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि परिपूर्ण माहिती न घेताच हा निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ईशान्य भारत हे फुलपाखरांचे नंदनवन. तेथील प्रसिद्ध भीमताल तलावाजवळील फुलपाखरू संशोधन केंद्रातील अभ्यासक पीटर स्मेटासेक यांनी ब्लू मॉरमॉनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. विविध पर्यावरण अभ्यासक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या गोष्टीचा प्रसार करत आहेत. त्यांची ही भूमिका व्हॉट्स अ‍ॅपच्या विविध ग्रुपमध्ये पसरवली जात आहे.

पीटर यांनी म्हटले आहे, की 'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखरू घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय परिपूर्ण अभ्यासावर आधारित नाही. हे फुलपाखरू लिंबू (संत्रा)वर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते. त्यामुळे उत्पादनात घटही येते. या फुलपाखराचा उपद्रव वाढल्यास संत्रा, लिंबू यांचे पीक घेणारे शेतकरी त्याच्या वर नियंत्रण आणण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबू शकणार नाहीत. या निर्णयाबाबत ज्या कोणी आग्रह धरला असेल, त्यांना वन्यजीवांबाबत फारशी माहिती असल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनी तरी अपुऱ्या माहितीच्या आधारे असा निर्णय घेऊ नये.

पीटर यांच्याप्रमाणेच विदर्भातील काही अभ्यासकही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यात गुंतले आहेत. सरकारच्या निर्णयाचे काय होणार याची कल्पना नाही, पण या फुलपाखराबाबत वस्तुस्थिती तरी लोकांपर्यंत पोहोचायला हवी, अशी प्रतिक्रिया काही अभ्यासकांनी दिली.

त्या तज्ज्ञांना आव्हान संपादन

राज्याच्या निर्णय चुकीचा असेल तर त्या संदर्भातील संशोधन पेपर किंवा माहिती त्या अभ्यासकांनी प्रसिद्ध करावी, असे आव्हान राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष व फुलपाखरांचे गाढे अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर यांनी दिले. संत्र्याच्या कीडीच्या यादीत शेकडो कीटकांचा समावेश असून त्यात फक्त 'लाईम बटरफ्लाय' या एकाच फुलपाखराचा समावेश आहे. मात्र, या फुलपाखराच्या अळ्या फक्त कोवळी पानेच खातात आणि त्याला 'मायनर पेस्ट' म्हणून गणले जाते. शेतकरीही याला शत्रू समजत नाही. कारण, 'ब्ल्यू मॉरमॉन' हे फुलपाखरू संत्रावर्गीय वनस्पतीच्या पेस्टच्या यादीतसुद्धा नाही. त्यामुळे फुलपाखरू अभ्यासक हेच फुलपाखराला 'पेस्ट' कसे काय ठरवू शकतात, ते काम शेती संशोधकांचे आहे, या शब्दात फुलपाखरावर संशोधन करणारे डॉ. जयंत वडतकर यांनी आव्हान दिले आहे. जंगल प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतीवर जगणारे हे फुलपाखरू आहे आणि संत्रा पीक हे जंगल क्षेत्रात किंवा पहाडी भागात घेतले जात नाही. परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे फुलपाखरू आहे म्हणून शेतकरी आहे. पतंगामुळे थोडेफार नुकसान होऊ शकते. कारण, पतंगाच्या अळ्या जाडय़ा असतात. मात्र, समाजमाध्यमांवरून 'ब्ल्यू मॉरमॉन'वर संत्रावर्गीय वनस्पतीसाठी घातक असल्याचा शिक्का बसवणाऱ्यांनीच ही बाब पुन्हा तपासून पाहावी, असे मत अमरावतीचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी व्यक्त केले

हे सुद्धा पहा :-