१५ जुलै १९२६ साली रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या नेवरे ह्या गावात त्यांचा जन्म झाला, लहानपणापासून अभिनयाची, नाटकांची त्यांना आवड होती. शाळेत शिकत असतानाच गावातील श्रीराम जन्मोत्सवात झालेल्या 'प्रतिज्ञा कंकण' या नाटकात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबई मध्ये आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच त्यांनी एस.टी महामंडळात नोकरी मिळवली. तिथे होणाऱ्या विविध नाटकात काम करण्याची पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली आणि तिथून एका अविस्मरणीय नाट्यप्रवासाला सुरुवात झाली!

आपल्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून मित्रांच्या सहकार्याने त्यांनी स्वतःची 'जयमंगल' नावाची नाट्यसंस्था स्थापन केली ज्यामार्फत त्यांनी बेबंदशाही, तुझे आहे तुजपाशी, संगीत एकच प्याला, संगीत सौभद्र, उद्याचा संसार, संगीत भावबंधन, शबरी, नटसम्राट अश्या नावाजलेल्या नाटकांचे जवळपास १०००हून अधिक प्रयोग केले.

नटसम्राट नाटकाच्या शतक महोत्सवी प्रयोगात मधुसूदन कोल्हटकर ह्यांची भूमिका पाहिल्यावर ज्येष्ठ नट शरद तळवलकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते कि, 'श्री. तात्यासाहेब शिरवाडकरांनी नटसम्राट नाटकाचा अंगरखा नटसम्राट नानासाहेब फाटक ह्यांच्याकडे पाहून बेतला. श्रीराम लागू, दत्ता भट इत्यादी नटसम्राटांनी तो घातला. पण तो श्री. मधुसूदन कोल्हटकर ह्यांना चपखल बसला' हे उद्गार म्हणजेच त्यांच्या यशाची पावती आहे!

बेबंदशाही नाटकात संभाजी, संगीत एकच प्याला मधील सुधाकर, संगीत सौभद्र मधला बलराम अश्या एकसोएक भूमिका त्यांनी सादर केल्या. हाऊसफुल बुकिंग घेणारा कलाकार अशी त्यांची ओळख होती. एकाच वेळी एकाच नाटकाचे एकाच प्रयोगात दुपार व रात्र असे प्रयोग असतील तर ते अगदी नियमितपणे हाउसफुल्लच असायचे!

अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे रंगभूमीवरील गुणी कलावंत, कै. शाहूमहाराज कोल्हापूर स्मृतिचिन्ह तसेच उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट विलेपार्लेतर्फे गुणगौरव पारितोषिक व सत्कार अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं!