महाराष्ट्रात पूर्वी म्हणजे इ.स. १९७० च्या सुमारास जून जुलै महिन्यात जर पाऊस पडला नाही तर आपआपल्या आळीतील मुले आणि मुली एक चिखलाची शंकूच्या आकाराची भुंडी तयार करून तिच्या टोकावर हरळी किंवा चिमणचारा खोचत. एक मोठी वाटी घेऊन तिच्यात ती भुंडी टाकून गल्लीत प्रत्येक घरासमोर जाऊन खडखड फिरवून वाटी पालथी घालत. जर भुंडी सुलटी किंवा सरळ पडली की पाऊस पडणार असा समज होता. मग ते लोक त्या मुलांना आपल्याकडील ज्वारी किंवा गहू देत. अशा प्रकारे जमा झालेली ज्वारी दुकानात देऊन मुले त्याबद्दल गूळ आणत आणि गव्हाच्या भरड्यात मिसळून तो ग्रामदैवतेचा प्रसाद म्हणून खाऊ घालत.