बाल नाट्य

(बाल रंगभूमी या पानावरून पुनर्निर्देशित)

बालप्रेक्षकांचे मनोरंजन करताकरताना नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बालरंगभूमीचे उद्दिष्ट असते. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली, तरी ती केवळ बालकांनी सादर केली नसतात. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली जातात. या नाटकांत केवळ बालकांनाच प्राधान्य असेल असे नाही. नाटकांमध्ये लहानमोठ्या वयाची माणसे, प्राणी, पक्षी, राक्षस, भुते यांतले काहीही असू शकते. लोककथा, परीकथा, साहसकथा किंवा बालकांच्या समस्या असे या नाटकांचे विषय असतात. अशी नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी दिग्दर्शकाला प्रत्यक्ष मुलांच्या डोळ्यांनी व मनाने नाटकाकडे बघावे लागते. ठाशीव कथासूत्र, सोपे, चटकदार आणि चटपटीत संवाद हे या नाटकांचे वैशिष्ट्य असते. मुलांचे भाषाज्ञान प्रौढांइतके प्रगल्भ नसल्याने नाटकांत संवादापेक्षा प्रकाशयोजना, कथेला अनुसरून वातावरणनिर्मिती, पात्रांची वेषभूषा आणि रंगमंचव्यवस्थापन यांकडे अधिक लक्ष दिलेले असते.. मुलांना जास्त ताण सहन होण्यासारखा नसल्याने नाटकातले वातावरण हलकेफुलके असते..

बालनाट्याला इतक्या मर्यादा असूनही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील 'गंमतजंमत'वरून आणि पुणे केंद्रावरील 'बालोद्यान'वरून मुलांसाठी अनेक नभोनाट्ये सादर होत गेली आणि त्यांचा केवळ श्रवणानंद घेत मुलांची एक पिढी पोसली गेली. ह्या श्रुतिका सादर करणाऱ्या दिग्दर्शक-निर्मात्यांची त्या काळात खरोखर कसोटी लागत असे. मुलांना ही नभोनाट्ये अतोनात आवडत.

संदर्भ संपादन