देवकाते घराण्याने महाराष्ट्रामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला दिसून येतो. त्यामध्ये आतापर्यंत धायगुडे, कोकरे,पांढरे, बंडगर, शेळके,रूपनवर, खताळ आणि देवकाते इत्यादी सरदारांचे उल्लेख मिळाले आहेत. [१]

सरदार जिवाजीराजे देवकाते (सुभेदार बळवंतराव)- बळवंतराव हे विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार. विजापूरच्या पातशाहाकडून वंशपरंपरेने जहागीर, मनसब, इनामे व वतने घेऊन सेवाचाकरी करत होता. पहिल्या शाहूने देवकाते यांना दिलेल्या वतनपत्रातील नोंदीनुसार विजापूरकरांकडून कर्यात बारामती प्रांत सुपे येथील २२ गावांची सरपाटीलकी तर ६ गावांची पाटीलकी त्यास वंशपरंपरेने मिळाली होती. तसेच मौजे कन्हेरी हा गाव वंशपरंपरेने इनाम देण्यात आला तर मौजे सोनगाव या गावी एक चावर (६० एकर) जमीन इनाम देण्यात आली होती अशी नोंद सापडते.

छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचे राज्य उभे केल्यानंतर स्वतःच्या जहागिरीला व वतनाला लाथ मारत देवकाते स्वराज्यात सामील झाले. अफजलखान मोहिमेतही शिवाजी राजांकडून देवकाते लढल्याच्या नोंदी मिळतात. इसवी सन १६७४ च्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या सरदारांच्या यादीमध्ये देवकाते घराण्यातील "भवानराव" व "बळवंतराव" यांचा उल्लेख येतो. "भवानराव" व "बळवंतराव" ही केवळ नावे नसून ते किताब असल्याचे शाहूकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांवरून सिद्ध होते. प्रत्यक्ष शिवछत्रपतींनी दिलेले हे किताब देवकाते सरदारांनी स्वराज्यासाठी दिलेलं मोलाचे योगदानच अाहे. शिवछत्रपतींनी बळवंतराव यांना मौजे सोनगाव या गावी सवा चावर(७५ एकर) जमीन इनाम दिली असल्याची नोंद ही या कागदपत्रांमध्ये सापडते. आजही या गावातील देवकाते मंडळींची निवासी वस्ती इनामपट्टा म्हणूणच ओळखली जाते.

सुभेदार बळवंतराव देवकाते- संभाजीराजांना औरंगजेबाने ठार मारल्यानंतर स्वराज्यातील कित्येक सरदार वतनाच्या लालसेने मोघलांना मिळाले. अशा बिकट प्रसंगी संकटात सापडलेली स्वराज्यरूपी नौका पैलतीरास लावण्याचे काम सेनापतींच्या दिमतीला राहून देवकाते यांनी पार पाडले. जे सरदार स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा सरदारांना राजाराम महाराजांनी इसवी सन १६९० मध्ये वतने दिली. त्यात देवकाते घराण्याचाही समावेश आहे.
यात धर्मोजी बळवंतराव देवकाते यांना प्रांत कडेवळीमधील ८ महालांचे सरपाटील हे वतन दिले. धर्मोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सुभानजी यांना "बळवंतराव" तर मकाजी यांना "हटकरराव" असे किताब व सरंजाम देऊन त्यांचा गौरव केला. पुढे राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने घोरपडे यांचे सेनापतीपद काढून घेण्यात आले. व त्यांच्या दिमतीला असलेली स्वराज्याची फौज ही काढून घेण्यात आली.
ही घटना १६९६ साली घडली तेव्हा सेनापतींच्या दिमतीला असलेले मकाजी हटकरराव आपले भाऊबंद व फौजेसह जिंजी येथे राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. स्वराज्याच्या व नंतर साम्राज्याच्या अनेक महत्त्वपूर्ण लढायांत देवकाते सरदारांचे योगदान बहुमूल्य राहिले.

सरदार देवकाते यांचा सरंजाम- शाहूने देवकाते यांना लष्करी खर्चासाठी एकूण १६ महाल व २१ गावे सरंजाम म्हणून दिली होती. हा सरंजाम बळवंतराव व हटकरराव यांच्यात ३:२ प्रमाणात विभागला गेला. पुढे दोघांच्याही सरंजामात वारसांच्या संख्येच्या प्रमाणात भाग होत गेले.बळवंतराव घराण्याच्या ३ तकसीम (भाग) सरंजामापैकी २ तकसीम चव्हाजी बळवंतराव बाळगून असत तो असा.- प्रांत सुपे बारामती : ६ गावे
प्रांत कडेवळीत : ३९ गावे
प्रांत बालेघाट : अर्धा महाल
सरकार नांदेड: १ महाल व ३ गावे
सरकार पाथरी : १ कसबा
सरकार माहूर : ६ महाल दीड कसबा व १ गाव
एकूण : साडे सात महाल अडीच कसबे व ४९ गावे.

सरंजामातील संबंधित प्रांत,गाव व गावांवरील एकूण हक्काची सविस्तर माहितीही सरंजामपत्रात दिलेली असे. सरंजाम हा वंशपरंपरेने चालणारा अधिकार नसे. त्यामुळे त्या सरंजामात वारंवार बदलही होत असत. अनेकदा सरंजाम जप्त अथवा कमी करण्यात येई. तसेच तो वेळप्रसंगी वाढविण्यातही येई.सरंजामातील काही गावे इनाम करून दिली असल्यास अशा गावांवरील संबंधित सरदारांचा अधिकार मात्र वंशपरंपरेने चाले. देवकाते यांना बारामती येथील कन्हेरी, सोनगाव व निरावागज तर कडेवळीत मधील कोंढार चिंचोली, कवढणे व दिगसल अंब अशी ६ गावे शाहूने व पेशव्यांनी प्रांत गंगथडी मधील सेंदुरसना अशी ७ गावे वंशपरंपरेने इनाम होती.[२]

संदर्भ संपादन

  1. ^ http://www.dhangar.org/dhangar_gotra_list.php
  2. ^ शाहू दफ्तर पुरालेखागर, पुणे