घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. घाटशिरस हे गाव नाशिक विभागात मोडते. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. तसेच इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत विदयालय आहे

वृद्धेश्वर मंदिर संपादन

येथील श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर हे नाथ पंथाचे आद्‍य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे. वृद्‍धेश्‍वर हे महादेवाचे खूप जुने मंदिर असल्‍याचे म्‍हटले जाते. डोंगर सानिध्यात, निर्सग रम्य परीसरात वृद्‍धेश्‍वराचे हे पवित्र स्थान आहे. वृद्‍धेश्‍वराबद्‍दल एक आख्‍यायिका सांगितली जाते. पूर्वी मच्छींद्रनाथांच्या समाधानासाठी गुरू आज्ञा म्हणून येथे खूप मोठा भंडारा झाला होता. त्या निमित्ताने मच्छींद्रनाथ व गोरक्षनाथांनी नाथ पंथाचा मेळा जमवला आणि गहिनीनाथांना उपदेश केला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथास अनुग्रह दिला, त्यावेळी त्रिभुवनातील सर्व देवता ऋषीमुनी, संन्यासी सर्व एकत्र जमले. या ठिकाणी गर्भगिरी पर्वत आहे. गोरक्षनाथांनी सुर्वण सिद्ध मंत्राचा वापर करत संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला. गुरू मच्छीद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्‍धेश्वर येथे ३३ कोटी देव साधू, संत-महंत. ऋषीमुनी आदी सर्व देवदिकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव-पार्वतीने ब्राम्हण वेषात प्रकट होऊन पंगती वाढल्या. देवराईपर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्‍थानाला देवराई हे नाव पडले देवाच्या पंगतीत महादेव वृद्‍ध म्हताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवानी विनंती केली की, हे महादेवा आता हे रूप घेतले, आम्हाला याच रूपात दर्शन दिले; तुंम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विंनती केल्यावर महादेव वृद्‍ध रूपात राहीले म्हणून त्यांना म्हतारदेव (वृद्‍धेश्र्वर) म्हणू लागले. वृद्‍धेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ १२ ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्‍याचे म्‍हटले जाते. महाशिवरात्रीला हे शिवलिंग वृद्धींगत (वाढते) होते, असे म्‍हटले जाते. राजा रामदेवराय यांनी अकराव्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली. पुण्‍यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. संत ज्ञानेश्वर, साईबाबा यासारख्या महान संतांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथात आहे. 'साद देती हिमशिखरे' या हिमालयातील प्रवास वर्णनावर अधारित ग्रंथामध्ये या स्थानाचे महात्म्य दिलेले आहे. नाथसंप्रदायात तप तीर्थाटन आणि महाप्रसाद सेवा सर्वश्रेष्ठ समजली जाते. नाथांची, योगी संत-महंताची तपोभूमी म्हणून हे स्‍थान ओळखले जाते. श्रावण महिन्यात रोज रात्री आठ वाजता बेल आरती होते. श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक येतात. श्रावण महिन्‍यात प्रत्‍येक सोमवारी मोठा उत्सव असतो. तिसऱ्या सोमवारी व महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. मकर संक्रांती निमित्त श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर येथे संक्रातीच्या दिवशी यात्रा भरते. या दिवशी मंदिरात पुरूष जात नाहीत. येथे पार्वती मातेला मान आहे. त्‍यामुळे संक्रातीनिमित्त येथे अखंड सौभाग्य समृद्धी, संतती भाग्य, सौख्य आरोग्य प्राप्तीसासाठी महिला भक्‍तीभावाने येतात. पार्वती मातेची जिल्ह्‍यातील फक्त वृद्‍धेश्वर देवस्थानात यात्रा भरते, असे हे वृद्‍धेश्वरचे स्थान आहे.