'अब्दुल रसूल कुर्बान हुसेन' हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविण्यात आले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत, असे सांगण्यात येते. सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला.त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरू केले होते. ‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरू केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.मार्शल लॉ जारी होण्यापूर्वी 'गजनफर'अर्थिक अडचणी व संपादकाचे प्रकृती असल्यामुळे बंद पडले.

हुसेन यांची भाषा प्रभावी आणि परखड होती, ते एका सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्माला आले. ते स्वतः गिरणी कामगार होते. स्वातंत्र्य लढ्यातील सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जी सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते. सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी येरवड्याच्या तुरुंगात फाशी दिली. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. दरम्यान, सोलापुरात आजही मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे हुतात्मा कुर्बान हुसेन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. हुसेन यांनी देशासाठी दिलेल्या कुर्बानीचा सोलापूरकरांना, महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान आहे.