उल्लासकर दत्त

भारतीय क्रांतिकारक

उल्लासकर दत्त (१६ एप्रिल, १८८५ - १७ मे, १९६५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म सध्याच्या बांगला देशातील ब्राह्मणबैरिया जिल्यातील कालीकछा गावात झाला होता. वडील द्विजदास दत्त हे लंडन विद्यापीठातून शेतकीचे उच्च शिक्षण घेऊन आलेल होते. ते ब्राह्मोसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते.

उल्लासकर दत्त

उच्चशिक्षित पित्याच्या सहवासाने उल्लासकर दत्त यांच्यावर चांगले संस्कार झाले. बुद्धिमान आणि तर्कसंगत विचार करणारा विद्यार्थी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा, पण थोड्याचे दिवसात भारतीय आणि त्यांतही बंगाली लोकांबद्दल वाईटसाईट बोलणाऱ्या रसेल नावाच्या प्राध्यापकांना बडवल्याबद्दल उल्लासकर दत्तांना कॉलेजमधून काढून टाकले.

त्यानंतर उल्लासकर दत्त हे बंगालमधील युगांतर नावाच्या क्रांतिकारकांच्या संघटनेचे सदस्य झाले, आणि बॉंब बनवायला शिकले. युगांतरची बॉंब बनवायची जागा कलकत्त्यात अलीपूरला होती.

संघटनेच्या सर्वच कारवायांसाठी बॉंब बनवून द्यायची जबाबदारी त्यांच्यावर पडली. कुप्रसिद्ध मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्डला मारण्यासाठी बनविलेला बॉंब उल्लासकर आणि त्यांचे मित्र हेमचंद्र दास यांनी मिळून बनवले होते. अशाच काही घटनांनंतर युगांतरचे मुख्य बारींद्रनाथ घोष आणि काही इतर सदस्यांना अटक झाली. उल्लासकर दत्त यांनाही २ मे १९०८ रोजी ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला भरलागेला. हा खटला अलीपूर बॉंब केस म्हणून प्रसिद्ध आहे. उल्लासकर यांना फाशी झाली, पण वरिष्ठ न्यायालयात ती शिक्षा बदलून जन्मठेप करण्यात आली.

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती, उल्लासकर दत्त भयंकर अमानुष अत्याचार सहन करीत वेडे झाले होते. हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालविली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी 'राजबंदी मुक्ती' मंडळ स्थापन केले होते.

१० जून १९१२ ला उल्लासकर दता यांना अंगात खूप ताप असताना साखळदंडांत जखडून कोठडीत ठेवले होते. त्यांच्या किंकाळ्या जेलभर घुमत होत्या. पण जेल अधिकारी बधले नाहीत. उल्लासकर आता जिवंत रहात नाहीत असेच सगळ्यांना वाटले. अशा परिस्थितीत त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि उपचारांसाठी त्यांना अंदमानमधल्या इस्पितळात भरती केले. १९१२ साली तिथून काढून त्यांना १९१३ मध्ये मद्रासच्या रुग्णालयात टाकले. १२ वर्षे मद्रासच्या पागलखान्यात राहिल्यावर त्यांची प्रकृती थोडीफार सुधारली आणि त्यांना मुक्त केले गेले. अंदमानच्या सेल्युलर जेलमधील आठवणींवर उल्लासकर दत्त यांनी लिहिलेले पुस्तक एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे.