डॉ. आनंद कर्वे हे एक मराठी शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा जन्म पुण्यात १९३६ साली झाला. त्यांचे वडील प्रा. दिनकर धोंडो कर्वे, भौतिकीचे प्राध्यापक व पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि आई डॉ. इरावती कर्वे पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधक, प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक होत्या.

आनंद कर्वे यांचे शिक्षण, संशोधन आणि व्यवस्थापकीय कारकीर्द संपादन

आनंद कर्वे यांनी वनस्पती शास्त्रात जर्मनीतील ट्यूबिंगेन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. पंजाब, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठात १९६१ ते ६६ त्यांनी व्याख्याता ते विभागप्रमुखाची नोकरी करून १९६६ मध्ये मेव्हण्यांच्या निंबकर फार्ममध्ये फलटणला संशोधन संचालक ते कृषिसंशोधन संचालक म्हणून १६ वर्षे काम केले. १९८३ साली जर्मनीत वर्षभर संशोधन केले आणि १९८४ ते ८८ हिंदुस्थान लिव्हरमध्ये कृषिसंशोधन विभागप्रमुख म्हणून काम केले. १९८८ ते ९६ भारत सरकारच्या कॅस्टफोर्ड म्हणजे सेंटर फॉर ॲप्लिकेशन ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंटमध्ये संचालक म्हणून काम केले आणि नंतर इंद्रायणी बायोटेक, आरती (ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट), सह्याद्री तंत्रसेवा सहकारी या संस्था काढल्या.

डॉ. कर्वे यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीवर काम केले आहे

आनंद कर्व्यांच्या तीन पिढ्या ‘ॲप्रोप्रिएट‘ विषयांवर काम करीत आल्या आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे हे आनंद कर्व्यांचे आजोबा. १८८० साली त्यांनी विधवांचे पुनर्वसन आणि स्त्री-शिक्षणाची सुरुवात करून दिली. हे त्या काळातील समुचित कर्वे. १९४० साली आनंद कर्व्यांचे काका रघुनाथ धोंडो कर्वे यांनी विल्सन कॉलेजातील गणिताची प्राध्यापकी आणि कुटुंब नियोजन ही दोन्ही कामे एका वेळी करता न आल्याने प्राध्यापकी सोडून कुटुंब नियोजनाचे काम केले. हे त्या काळातील समुचित कर्वे होत. १९७० पासून आनंद कर्वे हे सध्याचा काळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा असल्याने समुचित तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. हेही आपल्या काळातील समुचित कर्वे होत. प्रत्येकाची क्षेत्रे निराळी पण त्या त्या काळाला योग्य ते काम हे कर्वे लोक करीत आले आहेत. हे सर्व कर्वे घराणेच समुचित कर्वे म्हटले पाहिजे. या प्रवाहाला आता चौथी पिढीही येऊन मिळाली आहे. डॉ. आनंद कर्व्यांची मुलगी डॉ. प्रियदर्शिनी कर्वे हीसुद्धा आपल्या वडिलांबरोबर समुचित तंत्रज्ञानात काम करीत असून उसाच्या पाचटापासून इंधन बनवण्याच्या ज्या तंत्रज्ञानाला मार्च २००२ मध्ये लंडनचा ३०,००० पाैड म्हणजे तेव्हाच्या २२ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला त्या संशोधनात आनंद कर्व्यांइतकाच तिचाही सहभाग होता.

उसाच्या पाचटापासून इंधन संपादन

पाचटापासून इंधन बनविण्याची प्रक्रिा डॉ. आनंद कर्वे यांनी शोधून काढली. या प्रकल्पात वर्षाला ४५० कोटी रुपये निर्माण करण्याची क्षमता आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि शहरी भागातील गरिबांना स्वस्त आणि प्रदूषण न करणारे इंधन मिळू शकते. उसाचे पाचट, आंब्याची पाने, गव्हाचे काड यासारखे बायोमास शेतकरी एरवी जाळून टाकतात. एका विशिष्ट भट्टीत हा कचरा बाह्यपद्धतीने भाजून त्यापासून स्वयंपाकाचे इंधन बनविण्याचा प्रयोग डॉ. कर्वे यांनी फलटणच्या ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी (आरती) या संस्थेत केला. डॉ. कर्वे १९६६ सालापासून शेतीच्या क्षेत्रात आहेत. त्यांनी स्वतः उसाची शेती केली आहे. शेतीमधील टाकाऊ माल वाया घालविला जातो. अन्य क्षेत्रांतील टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. शेतीत तसे करता येते का, हा विचार त्यांना नेहमी पडत असे आणि पिडतही असे. त्यातून हा प्रकल्प पुढे आला.

शेतात मिळणारे पाचट ओलसर असल्याने जाळल्यावर त्याचा खूप धूर होतो. मग हे पाचट भाजता येईल का? या पर्यायाचा विचार झाला. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने अनुदान दिले. स्टेनलेस स्टीलच्या पिंपांत पाचट घालून त्याला बाहेरून उष्णता देण्याचा प्रयोग करण्यात आला. त्याला यश आले आणि संकल्पनात्मक पातळीवर प्रकल्प सिद्ध झाला. पुढील टप्प्यात अशी सात पिंपे भट्टीत घालून उष्णता दिली. पाचटाचे विघटन झाल्यावर त्याला यांत्रिक दाब दिला तर त्यातून इंधन मिळू लागले. चाळीस मिनिटांत ही प्रक्रिया होऊ शकते. हा प्रकल्प शेतकऱ्याला सहजपणे राबवता येईल. शेतकऱ्याने कोळशासारखे हे इंधन तयार करावे आणि शहरात गरिबांना ते विकावे अशी कल्पना आहे. अशा रितीने कचरा काड्याचे निर्मूलन, रोजगाराची संधी आणि स्वस्तात इंधन या तीनही बाबी साध्य होऊ शकतात. रॉकेल सध्या बारा रुपये लिटर आणि कोळसा सात रुपये किलो आहे. पाचटापासून बनविलेले इंधन पाच रुपये किलो दराने विकता येईल.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे वीस हजार रुपये लागतात आणि शेतकऱ्याला रोजचे पाचशे रुपयांचे उत्पन्न होऊ शकते. राज्यात ऊस तोडणीचा हंगाम संपल्यावर अन्य काळात गव्हाचे काड, आंब्याची पाने यांचा वापर करता येऊ शकतो. राज्यात सुमारे ४५ लाख टन पाचट निर्माण होते. त्यापासून नऊ लाख टन कोळसा निर्माण होऊ शकतो म्हणजे याद्वारे पाच रु. किलोप्रमाणे ४५० लाख रुपयांचा व्यवहार होऊ शकतो.

ब्रिटनमधील सेन्सबेरी कुटुंबीयांनी सामाजिक कार्यासाठी १९७० मध्ये विश्वस्त संस्था स्थापन केली. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी या संस्थांद्वारे ते पारितोषिके देतात. पर्यावरणाची हानी न करता पुनर्निमितीक्षम ऊर्जा विकसित करणाऱ्या आणि ती गरिबांना सहज परवडेल अशा पद्धतीने देऊ शकणाऱ्या, विकसनशील देशातील प्रकल्पांना, २००१ सालापासून अइडेन पारितोषिक देण्यास सुरुवात झाली. पारितोषिकासाठीचे सर्व निकष पुरा करणारा हा प्रकल्प होता, असे निवड समितीचे मत होते. आनंद कर्वे यांना हा पुरस्कार मिळाला.

आजवर ५० संशोधन प्रकल्प,१२५ शोधनिबंध , २५० शास्त्रीय लेख, चार पुस्तके, नऊ व्हिडीओफिती व १५ सीडी टॉ.कर्वे यांच्या नावावर जमा आहेत. युनायटेड नेशन्सतर्फे म्यानमार, इराण वगैरे ठिकाणी त्यांनी कामे केली आहेत.

शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करून ती रोपे इतरांना विकली तर शेतकऱ्याला शेतीतून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा अधिक नफा मिळतो आणि रोपवाटिकेला लागणारी जागा आणि मेहनत शेतीच्या तुलनेत किरकोळ असते. शेतकऱ्याला उपयुक्त असे रोपवाटिकांचे तंत्र डॉ. कर्वेे यांनी विकसित केले.१९९९ साली १०० तरुणांना या तंत्राचे प्रशिक्षण दिले. त्यापैकी खूपजणांनी स्वतःच्या वाटिका तयार केल्या. २००१-०२ साली उसाची ३ कोटी रोपे तयार करून वापरली. सह्याद्री तंत्रसेवा व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित फलटण यांनी २००१-०२ सालात उसाची सहा लाख रोपे विकून १.८ लाख रुपयांचा नफा मिळवला. या संस्थेतील कामगार दरमहा २५०० ते ३००० रु. पगार घेतात. महाराष्ट्रात जागोजागी रोपवाटिका हव्यात आणि एक लाख वाटिकांची गरज असून त्या २००० कोटी रुपयांचा धंदा करू शकतील. २००२-०३ सालात ‘आरती‘ने ३५ ठिकाणी रोपवाटिका तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन ३०० रोपवाटिका तयार करून घेतल्या.

महाराष्ट्रात सर्वत्र नाव मिळविलेल्या लक्ष्मी चुलीसारखी चूल बनवून तिला आतून भाजलेल्या मातीचा लेप दिल्याने तिचे आयुष्य वाढले. दोन तोंडाची चूल बनवून मुख्य तोंडावर स्वयंपाक आणि अविलावर (दुसरे तोंड) केक, बिस्किटे, नानकटाई भाजता येतात. लक्ष्मी चूल लोखंडी पत्रे वापरून केल्यावर ती दीर्घ काळ टिकणारी झाली. १०००- २००० माणसांचे अन्न शिजवणारी चूलही ‘आरती‘ने बनवून दिली.

याशिवाय बांबू व प्लॅस्टिक शीटच्या साहाय्याने बनवलेल्या, पावसाचे पाणी साठवण्याच्या टाक्या, बांबूच्या हातगाड्या, व्हील बॅरी बनवणे, टिशू कल्चर, अर्थव्यवस्थापन, विपणन कौशल्य यातील प्रशिक्षण आणि इतर खूप प्रकल्प आरती संस्थेतर्फे डॉ. आनंद कर्वे घेत आहेत.

डॉ. आनंद दिनकर कर्वे हे ठाणे येेथे १९ ते २२ डिसेंबर २००३ या काळात भरलेल्या अडतिसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष होते.

पुरस्कार आणि सन्मान संपादन

  • जे. जी. काणे पारितोषिक
  • युनायटेड स्टेटस्‌ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचे सर्टिफिकेट
  • डॉ. बी. डी. टिळक पुरस्कार
  • लंडनचा ॲइडेन पुरस्कार
  • अडतिसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्षपद.

संदर्भ संपादन

[१]

  1. ^ Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20031219/extra.htm.[मृत दुवा]It is a snapshot of the page as it appeared on 8 Jan 2010 20:28:49 GMT.