खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेवून त्यावरती खरबुज आणि दोन सांजोऱ्या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देउन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेउन पुर्वजांचं स्मरण करून कुंकवाचं एकेक बोट उंबऱ्यावर उमटवत आणी एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर/ आता गॅसवरच 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, डाळीची आमटी (रसी), भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासुन आंबे खायला सुरुवात करतात. रस्त्यावरल्या पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.

खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकिकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!

इंटरनेटवर सर्फ करता करता ही आखाजीची गाणी मिळाली.

माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरून चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.

चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय

वैशाखाचं उन्हं

खडक तापुन लाल झाले वं माय

तापुन झाले लाल

आईच्या पायी आले फोड वं माय

पायी आले फोड

आईची बेगडी वाव्हन वं माय

बेगडी वाव्हन

तठे काय कन्हेरानं झाड वं माय

कन्हेरानं झाड

माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथाऱ्या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरू होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं

कैरी तुटनी खडक फ़ुटना, झुयझुय पानी व्हायं वं

झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं

झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं

माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो

बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो

बन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्याना

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं

कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं

झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.

वाटवर हिरकनी खंदी वं माय

संकर राजानी खंदी वं माय

वाटवर जाई कोनी लाई वं माय

संकर राजानी लाई वं माय

जाईले पानी कोनी घालं वं माय

संकर राजानी घालं वं माय

जाईले फुल कोनी आनं वं माय

संकर रानाजी आनं वं माय

गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय

संकर राजानी घाली वं माय

इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते.

गौराई नारय तोडी लयनी

वं माय तोडी लयनी

इकाले गयी तं देड पैसा

वं माय देड पैसा

सासुनी सांग्या मीठ मिरच्या

वं माय मीठ मिरच्या

सासरानी सांगी तंबाखु

वं माय तंबाखु

देरनी सांगा झिंगी भवरा

वं माय झिंगी भवरा

ननिन्दनी सांगा ऐन दोरा

वं माय ऐन दोरा

पतीनी सांगा पान पुडा

वं माय पान पुडा

या संसारले हात जोडा

वं माय हात जोडा

आखाजीचे दिवस निघुन जातात. आता सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला येतो. माहेरचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते. नवऱ्याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते.

गडगड रथ चाले रामाचा

नि बहुत लावण्ण्याचा

सोला साखल्या रथाला

नि बावन्न खिडक्या त्याला

बायनी लावली खारीक

बापसे बारीक

बायनी लावली सुपारी

बापसे बेपारी

गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरू होते. आईबाबांची लेकीला माहेराहुन देण्यासाठी पापड, कुरड्या, शेवया,लोणचं अशा सामानाची बांधाबांध. इकडे आपली गौराई पण हुश्शार! ती स्वतःच शिंप्याकडुन साड्या आणते, सोनाराकडुन हार विकत घेते, वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते.

काया घोडानी काय मन्ही गौराई

इन्हा प्रताप चालस ठाई ठाई

प्रताप कोन्या वाडी गेला

प्रताप शिंपी वाडी गेला

शिंपी उठला घाई घाई

साड्या काढल्या नवलाई

सोनार उठला घाई घाई

नवसर हार लयी येई

वाणी उठला घाई घाई

नारय लयी पयी पयी

सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे सहा महिन्यांनी. दाटुन आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, "धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवुस गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो. म्हणुन मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव."

आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन

भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन

धाकला मुराई नको धाडजो

माय बाई आंबानी आमराई

राघो मैनाना जीव भ्याई