कोणत्याही रागात घेतली जाणारी स्वरांची रचना किंवा मालिका ही विशिष्ट अशा नियमांनी बद्ध केलेली असते, ताल-लयबद्ध असते. तिला विशिष्ट असा आकृतीबंध असतो. अशा नियमांच्या चौकटीत बसविलेल्या, रागाच्या नियमांना अनुसरून, ताल-लयबद्ध स्थितीमध्ये रागातील स्वरांचा आविष्कार केला जातो. अशा रचनेला त्या रागाचे ‘सरगमगीत, सुरावर्त', ‘सुरावट’ किंवा ‘स्वरमालिका' म्हणतात. शब्दविरहित स्वर गुंफून स्वरमालिका तयार होते. स्वरमालिकेचे अस्ताई आणि अंतरा असे दोन भाग असतात. स्वरमालिकेची रचना ही सर्व रागांमध्ये आणि तालांमध्ये केली जाते. सरगममुळे रागाचे स्वर, रागाचे स्वरूप, स्वरांचे स्वरूप, चलन इत्यादींचे ज्ञान जाणकारास होते.