[१]वाघ्या-मुरळी (लोककला)

महाराष्ट्र हि विविध देवदेवतांची व संतांची भूमी आहे. या विविध देवदेवतांमधी खंडोबा हा देव सर्वत्र प्रसिद्ध आहे. खंडोबा हा हिंदू धर्मातील अनेक जातीमध्ये कुलदैवत मानला जातो. ज्या घराण्याचे कुलदैवत खंडोबा आहे त्या घरात खंडोबाची नित्य नियमाने पूजा केली जाते. घरात खंडोबाचा देव्हारा करून त्या देव्हाऱ्यात खंडोबाची मूर्ती, कोटंबा, खंडोबाचा घोडा , वारू, लोखंडी कड्या (लंगर) कातडी पिशवीत भंडारा (हळद) हे खंडोबाचे पूजेचं साहित्य मांडलेले असते. खंडोबाच्या भक्ताला वाघ्या म्हणतात तर महिला भक्त आहे तिला मुरळी म्हणतात. हे खंडोबाचा महिमा सवर्त्र पसरवण्याचं काम करातात.

वाघ्या मुरळी

एकाद्या दाम्पत्याला मुल होत नसेल तर कुलदैवताला म्हणजेच खंडोबाला नवस बोलतात कि " हे खंडोबा राय माझ्या घरात पाळणा हालुदे , जर मुलगा झाला तर वाघ्या म्हणून सोडेन आणि मुलगी झाली तर मुरळी म्हणून सोडेन". एकाद्या दाम्पत्याला मुली आहेत पण मुलगा नाही तेव्हा मुलगा व्हावा म्हणून नवस बोलला जातो आणि नवसाने झालेल्या मुलाला वाघ्या सोडला जातो. याच पद्धतीनं जर मुलं आहेत पण मुलगी नाही तेव्हा मुलगी होण्यासाठी नवस बोलतात आणि झालेल्या मुलीला मुरळी म्हणून सोडतात. तर काही घराण्याची परंपराच आहे की वाघ्याच्या घरातून एक मुलगा वाघ्या सोडतात तर मुरळी च्या घरातून एक मुलगी मुरळी म्हणून सोडतात . पण मुरळी च्या घरातून वाघ्या सोडला जात नाही आणि वाघ्याच्या घरातून मुरळी सोडली जात नाही. बाल वयात वाघ्या व मुरुळी म्हणून सोडलेली मुलं किशोरवयात आल्यावर त्यांचा विधिवत कार्यक्रम केला जातो. त्याला पट बसवणे असेही म्हणतात. वाघ्या चा पट बसवण्याचा कार्यक्रम करण्यासाठी एक चांगला मुहूर्त बघुन त्या दिवशी आसपासच्या सर्व वाघ्या-मुरळी यांना सुपारी (निमंत्रण) दिली जाते. सर्व वाघ्या-मुरळी आल्यावर खंडोबाला बोकड कापला जातो. विधिवत पुजा केली जाते. आलेल्या सर्व वाघ्या-मुरळी मधुन एक गुरु करावा लागतो. ज्या मुलीला मुरळी म्हणून सोडायचे आहे त्या मुलीचे आई-वडील एका जाणकार वाघ्या किंवा मुरळीला गुरु म्हणून निवडतात. निवडलेला गुरु मान्य आहे का असे विचारून गुरूच्या आज्ञेने वागावे लागेल अशी सूचना मुरळी होणाऱ्याला मुलीला दिली जाते. गुरु निवडल्या नंतर आलेल्या सर्व वाघ्या-मुरळी यांच्या गाण्याचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात खंडोबाची गाणी म्हणतात. या मध्ये वाघ्या मुरळी, वारुवाला, गोंधळी, तुणतुणे वाजवणारा, झांन्ज वाजवणारा, दुमडी वाजवणारा, ढोलकी वाजवणारा यांचा समावेश असतो.

वाघ्या मुरळी

गाण्याचा कार्यक्रम नंतर पट बसवण्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. गुरुला आणि मुरळीला अंघोळ घालतात. गुरूच्या मांडीवर मुरळी होणाऱ्या मुलीला बसवून त्यांच्या अंगावर घोंगडी टाकून त्यांना झाकून टाकतात. मग तो गुरु मुरळी होणाऱ्या मुलीच्या कानात मंत्र सांगतो. मंत्र सांगून झाल्यावर सर्वजण त्यांच्या अंगावर अक्षदा टाकतात. (हा अक्षदा फुलं हळद-कुंकू, खारीक, खोबरे, धान्य यांच्या पासून तयार केलेला असतो ) हा गुरु करण्याचा विधी झाला. या विधी नंतर मुरळी सोडण्याच्या विधी असतो. या विधी मध्ये मुरळी होणाऱ्या मुलीचे खंडोबाशी लग्न लावले जाते. मुरळी होणाऱ्या मुलीला कोटंबा घेऊन पाच घरी जोगवा मागायला लावतात. अंतरपाट धरून एका बाजूला मुरळी होणारी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला खंडोबाची मूर्ती ठेवली जाते. खंडोबाची आरती करून अक्षदा टाकला जातो. मुरळी होणारी मुलगी खंडोबाच्या मूर्तीच्या गळ्यात हार घालतो. अशा पद्धतीनं मुरळी चे खंडोबाशी लग्न लावले जाते. पट बसवल्या नंतर मुरळीला धार्मिक व समाज मान्यता मिळते. मुरळी प्रमाणेच वाघ्या सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. वाघ्या सोडलेल्या मुलाला गुरु करून कानमंत्र दिला जातो. खंडोबाशी लग्न लावले जाते. पट बसवल्या नंतर त्याला वाघ्या म्हणुन धार्मिक व समाज मान्यता मिळते. पट बसवल्यावल्यानंतर खंडोबाला सोडलेला वाघ्या व मुरळी यांनी जागरण-गोंधळ कार्यक्रम करावाच असे त्यांच्यावर बंधन नसते. त्यांच्या इच्छे नुसार ते वारी मागू शकतात, जागरण -गोंधळाचा कार्यक्रम करतात. तर काहीजण खंडोबाची पूजा अर्चा करून कोटंबा घेऊन पाच घरं वारी मागतात. ते वाघ्या मुरळीचा चा कार्यक्रम करत नाहीत. अशा वाघ्याला घर वाघ्ये म्हणतात. आणि जे वाघे जागरण-गोंधळाचा कार्यक्रम करतात त्यांना दार वाघ्ये म्हणतात.

  1. ^ भिसे, सूर्यकांत. Cite journal requires |journal= (सहाय्य); |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)