श्रीनिवास हरि दीक्षित

प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित (जन्म : बुदलमुख -निपाणी), १३ डिसेंबर १९२०; - पुणे ३ ऑक्टोबर २०१३ [काळ सुसंगतता?] ) हे एक मराठी लेखक होते.. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तत्त्वज्ञानावरच्या अकरावी-बारावीच्या क्रमिक पुस्तकांसह त्यांनी आणखीही ग्रंथही लिहिले आहेत.

शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द संपादन

श्री.ह. दीक्षित यांचा जन्म कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील एका खेडेगावात झाला. प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. त्याच्या अनुषंगाने शेतातील काही किरकोळ कामे व घरची गुरे राखण्याचे कामही थोडया प्रमाणात त्यांना करावे लागले. पुढील शिक्षणासाठी ते त्यांचे कोल्हापूरला सरकारी अधिकारी असलेल्या मामांकडे आले. त्यांनी दीक्षितांना आपल्याकडे एम.ए. होईपर्यंत ठेवून घेतले

कोल्हापुरातील राजाराम हायसस्कूलमधून शालान्त परीक्षा झाल्यावर त्यांनी राजाराम कॉलेजात प्रथम विज्ञान शाखेत नाव घातले होते. परंतु तेथील प्रयोगाच तासांच्या वेळा व तेथून दूर असलेल्या त्यांच्या घरातील जेवणाच्या वेळा जुळेनात. म्हणून विज्ञान शाखा सोडून ते वाङ्‍मय शाखेकडे आले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झालेले डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कडक शिस्तीत दीक्षित वाढले.

श्री.ह. दीक्षित यांनीे बी. ए. साठी तत्त्वज्ञान हा प्रमुख विषय घेतला. घरच्या माणसांना त्यांनी वकील व्हावे असे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञान विषय घेण्याला थोडा विरोध होता. घरच्या थोडया जमिनी होत्या. त्यानिमित्त कोर्टकज्जे नेहमी चालावयाचे त्यासाठी घरचाच वकील बरा असा सरळ साधा हिशोब पण दीक्षितांना तत्त्वज्ञान विषयाची मनापासून आवड होती. शाळेत असताना स्वामी विवेकानंद व रामतीर्थ यांची बरीच पुस्तके त्यांच्या वाचनात आली होती. त्यामुळे ‘मी कोण?’ विश्वाच्या अस्तित्वात काही हेतू आहे काय ? अवकाशाचा अंत कोठे असेल ? जिला अंत नाही अशी वस्तू असेल तरी कशी ? यासारखे प्रश्‍न दीक्षितांना आकर्षक आणि आव्हानात्मक वाटत.

प्रा. ना.सी. फडके हे दीक्षितांचे राजाराम महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे मुख्य अध्यापक. प्रा. फडक्यांची शिकवण्याची हातोटी अतुलनीय होती पण त्यांचे त्या विषयावर प्रेम नव्ह्ते. त्या विषयावरची नियतकालिके अथवा नवीन नवीन पुस्तके ते पहातही नसत. परंतु विद्यार्थिदेशात ते जे काही शिकले होते ते रसाळपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगत, असे दीक्षितांचे मत होते. तत्त्वज्ञानाचे दुसरे प्राध्यापक प्रा. एम.ए. निकम. शहाजीराजांबरोबर जी मराठा घराणी बंगळूरास गेली. त्यांच्यापैकी एक निकमांचे घराणे. त्यामुळे त्यांना इकडील मराठी येत नसे. ते केंब्रिजचे पदवीधर होते. तत्त्वज्ञान या विषयाची त्यांना खरी आवड होती व ज्ञानही अद्ययावत असे. पण केंब्रिजच्या इंग्रजीतील त्यांची व्याख्याने बहुतेक मुलांच्या डोक्यावरून जात, असेही दीक्षितांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

कॉलेजात श्री.ह. दीक्षित यांना रमेश मंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील हे दोन चांगले मित्र मिळाले.

बी.ए.ची परीक्षा दीक्षित पहिल्या वर्गात पास झले. तेव्हा प्राचार्य बॅ.खर्डेकर यांनी त्यांना १॥-२ वर्षांकरिता व्याख्याता म्हणून नेमणूक दिली. आमचे प्रा. निकम दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे ही जागा रिकामी होती. पुढे दीक्षित एम.ए.च्या परीक्षेत तत्त्वज्ञान विषयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले; त्यांना त्या विषयाचे तेलंग सुवर्ण पदकही मिळाले. त्यामुळे लगेचच १९४५ साली सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये व १९४६ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम करावयास मिळाले. पुढे मुंबई सरकार चालवीत असलेल्या धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक झाली. तेथे तीन वर्षे काम करून ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आले व येथूनच १९७८ अखेर निवृत्त झाले.

तर्कशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान, नीतिमीमांसा, इहवाद, धर्म आणि तत्त्वज्ञानातील समस्या अशा विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

अन्य काही उल्लेखनीय गोष्टी संपादन

इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस, इंडिया फिलॉसॉफिकल असोसिएशन यांसारख्या त‍त्त्वज्ञान विषयाला वाहिलेल्या संस्थांचे श्री.ह. दीक्षित आजीव सभासद होते.१९६४ साली पन्हाळा येथे इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशनचे अधिवेशन त्यांनी आयोजित केले होते.

दीक्षित हे, १९६९ साली धारवाड येथे भरलेल्या इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस(परिषदे)मध्ये ते नीतिशास्त्र व सामाजिक त‍त्त्वज्ञान या विभागाचे अध्यक्ष होते.

श्री.ह. दीक्षित महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे उद्‌गाते होत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची वाटचाल १९८० साली सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. परिषदेचे पहिले अध्यक्ष प्रा.दि.य. देशपांडे होते. त्यांच्यानंतर दुसरे अध्यक्ष प्रा.दीक्षित स्वतः होते.१९८४ व १९९७ साली परिषदेची दोन अधिवेशने (म्हणजे पहिले व चौदावे अधिवेशन) कोल्हापुरात आयोजिली होती. ह्या दोन्ही अधिवेशनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.२००८ सालच्या रौप्यमहौत्सवी अधिवेशनावेळी त्यांची शरीरप्रकृती त्यांना साथ देत नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही ते त्या अधिवेशनात सहभागी होऊ शकले नाहीत.

ग्रंथलेखन संपादन

राजाराम कॉलेजात असतानाच प्रा. श्री.ह. दीक्षित यांनी ’भारतीय तत्त्वज्ञान’ व ’नीतिमीमांसा’ ही दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांना त्या त्या वर्षाची सरकारी व बिनसरकारी अशी पारितोषिके मिळाली.

पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांना व्यासंग खूप सखोल व सर्वांगीण असा होता. ह्या दोन्हीतील मूळ ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता.मानवी जीवनाचे भरण-पोषण कोणत्या प्रकारे शकेल याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.’भारतीय तत्त्वज्ञान’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ याची साक्ष देणारा आहे. ह्या ग्रंथातील मराठी भाषेचे सौष्ठव पाहिले की त्याची प्रचिती सामान्य वाचकालाही येऊ शकेल. अत्यंत सोपी भाषा, सुबोध विवेचन आणि सरळ व सुस्पष्ट निवेदन ही त्यांची वैशिष्ट्ये होत. महाराष्ट्र शासनाने तीन वेळा ’उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’ देऊन या ग्रंथाचा गौरव केला आहे.

कोल्हापूरच्या फडके प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली श्री.ह. दीक्षित यांची काही पुस्तके संपादन

  • इंद्रधनुष्य़
  • इसवी सन १९००पासूनचा केलेला नीतिविचार (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - मेरी वॉरनॉक) (प्रकाशक - महाराष्ट्र ग्रंथ भांडार, १९८७)
  • तर्कशास्त्र
  • नीतिमीमांसा (१९८२)
  • नैतिक आणि सामाजिक तत्त्वज्ञान
  • भारतीय तत्त्वज्ञान
  • The Meaning of Guna in Samkhya System, वगैरे


संदर्भ संपादन

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा वृत्तान्त Archived 2013-10-16 at the Wayback Machine.